प्रस्तुत कथेच्या मागील भागात आपण बघितले की मधु आता विधवा झाली आहे आणि वसुंधरा तिचा पाहिजे तसा छळ करते आहे.(दोन वर्ष्यानंतर )
*******
दरवाज्याजवळ कोणीतरी आल्याची त्याला चाहूल लागली तेवढ्यात बाहेरून आवाज आला.
"घरात कुणी आहे का हे तुमचे पत्र...?"
बाहेरून आवाज येताच प्रितम हातातले पुस्तक बाजूला ठेवत घरातून बाहेर आला. बाहेर पोस्टमन आलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले, आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या घरी पहिल्यांदा पोस्टमन आलेला होता. पोस्टमनने त्याच्या हातात ते पत्र सोपवले आणि तो तिथून निघून गेला. प्रीतम ने पत्र निरखून पाहिले त्या पत्राला मागून पुढून निहारले, पत्र त्याचेच होते. त्यावर प्रीतम देसाई असा त्याचा नावाचा उल्लेख केला होता. पत्र झेडपीचे होते मग तर त्याची उत्सुकता आणखीनचं वाढली हात थरथर करत. पत्र बाजूच्या साईडने फाडून आतील पत्र बाहेर काढले, पत्रातील मजकूर तो जसा जसा वाचत होत तस तसा त्याचा चेहरा खुलत होता. पत्र वाचून संपले तेव्हा त्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सज्जनगडाजवळ असलेल्या झेडपीच्या शाळेमध्ये त्याची शिक्षक म्हणून नेमणूक झाली होती. नोकरी लागल्याचा त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. नोकरीपेक्षा आता गरिबी दूर होईल याचाच त्याला जास्त आनंद होता.
वडील कारखान्यात कामाला जात होते. आई कुणाच्याही घरी धुणी भांडे करून कुटुंबाला हातभार लावत होती. तसा तो परिस्थितीने गरीब होता. हातावर चालणारे कुटुंब होते ते. पण मनाने अगदी स्वाभिमानी होते. कधी त्यांनी कुणासमोर लाचारीने हात पसरवले नाही. म्हणतात ना गरिबीपेक्षा स्वाभिमानाला जास्त तीक्ष्ण धार असते. आपण कुठे तरी लवकरात लवकर नोकरीला लागावेयासाठी त्याची नेहमीच धावपळ असायची. कुठे ही नोकरीच्या जागा निघाल्या की तो तिकडे फॉर्म भरत असे, कुठे जॉब इंटरव्हिव्ह असला की जात असे. त्याने प्राथमिक शाळेसाठी शिक्षक म्हणून अर्ज भरला होता पण आज पर्यं त्याचे काही उत्तर आले नाही म्हणून त्याने त्याचा नाद सोडला होता. त्या दिवशी त्याचे कुटुंब खूप आनंदित होते. मस्त पैकी घरात पुरिभाजी,गोड जेवण बनवण्यात आले तो दिवस आणि रात्र फार आनंदात केली. जाण्याचा दिवस उजाडला, प्रितमची सर्व तयारी झाली. आई त्याला लागेल तो सामान वेवस्थित बांधून देत होती. तिला त्याची काळजी वाटून होती. ती प्रितमला परत परत बजावून सांगत होती स्वतःची काळजी घे म्हणून, तसा तो खुप गुणी होताचं पण शेवटी आई वडील ते धास्ती त्यांनाही वाटतं असायची. आपला मुलगा आता घरापासून दूर जाणार म्हणून तेही उदास झाले होते. त्याची लहान बहीण सुधाला एकटेच वाटतं होते. नेहमी आपल्या जवळ असणारा भाऊ आपल्या पासून दूर जाणार म्हणून तिही उदास झाली होती.
प्रितमने आईवडलांना नमस्कार केला आणि त्यांना दिलासा देत सांगितलं की तुम्ही कसलीही काळजी करू नका माझे सर्व काही चांगलेचं होणार.
प्रितमने सज्जनगडाच्या महामार्गावर जाणारी बस पकडली. कशीबशी जागा मिळवत खिडकी जवळील शिटावर तो जाऊन बसला. जशी बस धावू लागली तशी त्याला घरची आठवण अधिकचं येऊ लागली. मन कठोर करून तो तसाच बसून राहिला. धावत्या बस सोबत त्याचेही विचार मागे धावत होते.
जिकडे जायचे आहे तिकडले ते गाव कसे असेल.? तिकडची लोक कशी असतील? कुणी आपल्याला मदत करेल का? शाळा कशी असेल? असे नाना विक विचार त्याच्या डोक्यात क्षणभरात घर करून गेले.
लोकांबद्दल असलेले भय, कुतूहल, गावाबद्दल असलेली जिज्ञासा अश्या अनेक भावनांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले होते. बघता बघता बस सज्जनगडा जवळ येऊन थांबली. गाव अगदीच लहानसे होते. कसलीच सोय नाही. अगदीच दुर्गम भागात वसलेले ते गाव होते. जिकडून बसने सोडले तिकडून अजून दोन किलोमीटर जावे लागणार होते. त्याने जरा इकडे तिकडे नजर फिरवली, सर्व ठिकाणी सामसून दिसत होते. सायंकाळचा अंधार जरा लवकरच पडला होता, तेव्हा थंडीचे दिवस असल्या कारणाने अंधार अगदीच सात वाजताचं पडलेला होता. अंधार पडण्याच्या अगोदर आपण गावात पोहोचले पाहिजे म्हणून त्याने जरा घाई केली.जवळ कुणी दिसत नव्हते. कुणी दिसेल म्हणून त्याने थोडी दूरवर नजर फिरवली असता एक माणूस त्याला पायी चालतांना दिसला. प्रितम त्याच्या जवळ जात त्या माणसाला विचारू लागला.
"अहो,दादा... मला जरा मदत करणार का..?" तेवढ्यात त्या माणसाने वर पहात विचारले... हो बोलना
"कुठे जायचे तुम्हांला भाऊ..!!"
" सज्जनगडाजवळ"
"आता काही वाहन मिळणार नाही बुवा..तुम्ही असे करा जवळ असलेल्या फाट्याजवळ जाऊन उभे रहा म्हणजे तुम्हाला एखादी मोटरसायकल तरी मिळेल, नाही तर मग एखादा टांगा तरी मिळेल.!"
त्या माणसाने असं बोलून फाट्याच्या दिशेने बोट दाखवला. त्या माणसाचे आभार मानत प्रितम फाट्याच्या बाजूने निघाला. पाच दहा मिनिटातचं तो फाट्यावर येऊन पोहोचला. इकडे तिकडे मान फिरवून बघत मनात विचार करू लागला, कुठे एखादे वाहन मिळते का म्हणून...
परंतु दुर दुर पर्यंत काही वाहन येण्याचे चिन्ह दिसत नव्हतं. मनाशी उदास होऊन तो एका दगडावर येऊन बसला. एखादे वाहन तरी मिळावे म्हणून तो मनोमन देवाला प्रार्थना करत होता. अंधार अधिकच वाढल्यामुळे रात्री रात किड्यांची किर्र चौफेर वातावरणात पसरली होती. सर्वत्र भीतीचे वातावरण वाटत होते. पायी चालणार तर रस्ता ही माहीत नाही, अपरिचित ठिकाणी जावे तर नेमके कोणत्या रस्त्याने जावे...? दोन-चार पावले पुढे चालावे तर रस्ता परिचयाचा नसल्यामुळे अंतरही कमी होत नव्हते. अचानक पाठीमागून उजेड आला आणि त्या पाठोपाठ आवाजही आला.
टप... टप... टप sss तेवढ्यात एक टांगेवाला जवळ आला तसा प्रीतमने त्याला आडवा हात करत थांबण्याची विनंती केली. टांगेवाला त्याच्या जवळ येऊन थांबला त्यात एक वयस्कर गृहस्थ बसलेला होता.
"कुठे जायचे साहेब तुम्हांला...? टांगेवाल्याने विचारले असता प्रीतमने एकंदरीत उत्तर देऊन टाकले.
" सज्जनगडाजवळ सोडणार का मला? "
"बरं...बरं...बसा...सोडतो की साहेब तुम्हास्नी..!"
प्रीतम लगबगिने टांग्यात बसला त्याच्या हातात एक भली मोठी बॅग होती.जशी तशी आपली बॅग सावरत तो बसला.
"कोठून आला आहेत साहेब तुम्ही ..? या पूर्वी तुम्हाला गावात तर बघितले नाही कधी..?"
"मी चंदनवाडीवरून आलो आहे, आणि मला आता इकडे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे त्यामुळे माझी इकडे बदली झाली, काका... ह्या गावात वाहनांची सोय नाही का..?? नाही म्हणजे मगापासून मी केव्हाची एखादी गाडी मिळेल म्हणून वाट बघत बसलो होतो, कोणतेच वाहन दिसलें नाही म्हणून विचारलं!"
(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.प्रितम सज्जनगडापर्यत येऊन पोहोचेल का..? गावातील लोक त्याला मदत करतील का? )
कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा