आता त्यांचा प्रवास सुरू झाला होता. पुणे ते सज्जनगड, सकाळच्या लोकलने सज्जनगडाकडे त्यांना रवाना व्हायचे होते. खिडकीच्या बाजूने जागा मिळवतआर्यन बसला होता. त्याला लागूनच मधु बसली होती. लोकल पुर्ण गर्दीने गच्च भरली होती,
लोकल वेगाने धावत होती. ट्रॅकच्या बाजुला असणार्या इमारती, झाडे त्याच वेगाने मागे पडत होते आणि आर्यनचे मन ही आता घरी गेल्यावर आपले काय होईल याकडे घिरट्या घालायला लागले होते. त्याला असे अस्वस्थ बघून मधुने विचारलं.
"अहो, काय झालं..? कसला विचार करता आहेत का..?"
त्यावर तिला घरचे काहीचं न बोलता त्याने लगेच विषय बदलवला.
"मधु एक विचारू का गं तुला...?तु सुखी तर आहेस ना माझ्यासोबत..? माझ्याबरोबर पळुन येवून लग्न केल्याचा पश्चाताप तर होत नाहीये ना गं... तुला?”
"असा प्रश्न तरी कसा आला तुमच्या डोक्यात ? मी कधी तुमच्या जवळ ह्या गोष्टीबद्दल तक्रार केलीय आहे का..? हा निर्णय तर आपल्या दोघांचा होता, आणि त्यात आपण सुखी अहोत मग अजून तरी काय पाहिजे असेल मला, आणि हा निर्णय आपण विचार करुनचं घेतला होता ना..? आपले हे दिवस कायम थोडीच राहणार आहेतं ?एक ना एक दिवस तर नक्कीच बदलणार आहे ना हे सारे..!"
"हो गं, नक्कीच असचं होऊ दे...
आयेंगे मेरी जान… हमारे भी दिन आयेंगे. एक दिवस आपण आपल्या कारने इथे येवु. मग तुच बघ आपले दिवस!!"
बघता बघता आता गाव ही जवळ आले होते. आर्यनच्या हृदयात धडकी भरली होती. आपल्या मनातील भिती मधुला दिसू नये म्हणून तो तिला गावाकडच्या तसेच वाड्यातील इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत होता.
मधु.. अगं आमचे घर म्हणजे वाडा आहे गं. तिकडे मनाला अगदी प्रसन्न आणि शांत वाटत बघ. महिलांसाठी वाड्यात भव्य असे न्हाणी घर आहे. तेथून मागच्या वाड्यात जाण्यासाठी भालिमोठी कमान आहे, आजूबाजूला मोगरा,चमेली,जाई जुई,चंपा चमेलीच्या वेलींची मांडव... बाजूलाच लहानसा बगीचा... मेन म्हणजे आमच्या घरात भगवान श्रीकृष्णाला खुप मानले जाते. कधीही घरात जातांना आणि घरातून बाहेर जातांना भगवान कृष्णाला नमस्कार करून जाण्याची आमची प्रथा आहे. डावीकडून बाजूच्या दरवाजातून दोन पायऱ्या खाली उतरली की मोठे स्वयंपाक घर आहे.
आणि हो एक गोष्ट म्हणजे ,
आमच्या वाड्यात तुला सर्व बायका, पोरी भरजरी नऊवार साड्या घातलेल्या दिसतील. तसेच तुला पण रहावे लागेल थोड्या दिवसासाठी का होई ना...
परंतु शहरात चुडीदार ड्रेस, शॉर्ट स्कर्ट, जीन्स टॉप किंवा सणावारीला पाचवारी साडी आणि सिव्हलेस ब्लाउज घालणाऱ्या मधुला या अशा भरजरी पेहरावात अडखळल्यासारखे वाटेल हे आर्यनला समजले होते.
******
दारातूनच कमला काकूने आर्यनला बघितले तशी ती धावपळ करत छोट्या मालकीनबाईंजवळ आली त्यांना हे सारे सांगू लागली, हे ऐकून त्या थोड्या चिडल्याच होत्या त्यांनी त्वरित जाऊ आप्पासाहेबांजवळ सांगितले. आप्पासाहेब ओसरीवरल्या बंगळीवर बसून आपल्या लहान मुलासोबत खेळत होते. तेवढ्यात वसुंधरा तिकडे आली. त्यांना सारे सांगू लागली. तसा आप्पासाहेबांचा पारा आणखीनच चढला. ते दारात येऊन उभे राहिले. आर्यन आपल्या पत्नीसोबत दारात आला ना आला तोच ते त्याच्यावर बिनसले.
" आर्यनsss, हे काय पहातो अहोत आम्ही...? तुम्ही लग्न केल आणि तेही आम्हांला न सांगताच.. ही अपेक्षा तुमच्या कडून कधीचं नव्हती, आम्हाला!"
तसा आप्पासाहेबांचा आवाज चढता झाला. डोळ्यात तीक्ष्ण आग होती. त्यांच्या भर्जरीत भल्या मोठ्या पिळदार मिश्या, चेहरा लालबुंद झालेला. हे बघताच मधु जरा घाबरलीचं. आर्यनच्या मागे जाऊन भीत भीत उभी राहिली. त्यांच्या समोर मुद्दामच वसुंधरा जरा पुढे येऊन म्हणाली.
" नवीन सुनबाई आली आहे, अप्पासाहेब दारात आणि तुम्ही असे त्यांच्यावर ओरडलात. येऊ द्या की त्यांना आत. चुकलं माकल आपलंच पोरं आहे ते, अगोदर दारातून घरात तर येऊ द्या की त्यास्नी...मग काय रागवायचे ते रागवा खुशाल!"
(हे सर्व नाटक करण्यामागचा हेतू भला मोठा होता वसुंधरेचा, तिला फक्त आप्पासाहेबांसमोर आणि आर्यन समोर असे दाखवायचे होते की मी आता आर्यनला आपल्या आईसारखा जीव लावते आणि त्याची मला किती काळजी वाटून असते. )तिचा सर्व प्लॅन आता योग्य काम करत होता. गोड बोलून यांना ह्या वाड्यात येऊ द्यायचे मग यांना कसे आप्पासाहेबांच्या आयुष्यातून बेदखल करायचे नाही तर आर्यनला मधुपासून दूर करायचे हे तिला चांगलेच माहिती झाले होते.
मधु दारात आली तशी वसुंधरणे कमलाला हाक मारून बोलावलं.
" कमला अगं... ये कमला दारात नवीन सुनबाई आली आहे जरा मापं ओलांडण्याची आणि स्वागताची तयारी करा"
कमलाने धावपळ करत जाऊन मापं आणि आरतीची थाडी आणली तशी वसुंधरने त्यांची भाकरीने आणि पाण्याने नजर उतरवली.
मधुला आतमधल्या खोलीत घेऊन जाऊन वसुंधरेने मधुला एक नववारी साडी नेसायला दिली. गळ्यात मोत्याच्या माळा, सोन्याच्या सरीची माळ, हातात सोन्याची कडे, कानात सोन्याचे भरगच्च डूल केसांचा अंबाळा बांधलेला, त्यावर मोगऱ्याचे गजरे, नाकात मोत्यांची नथ. असा पेहरावात मधुला त्यांनी नटवलं. तिला असे पाहताच आर्यनला खुप आनंद झाला. तसेच तिला आप्पासाहेबांचा व जेस्ट मंडळींचा नमस्कार करायला सांगितलं. आता अप्पासाहेबांचा राग जरा कमी झाला होता.
वाड्यात येऊन मधु सर्वांचाच कौतुकाचा विषय बनली होती, सर्व तिला छोट्या मालकीनबाई म्हणून हाक मारत होते. गावातल्या सर्व बायकांना मधु म्हणजे शहरातून आलेली एक सुंदर राजकुमारी वाटायची.
सुरवातीचे काही दिवस अगदी असे मजेत भुर्ररकन निघून गेले. काही दिवसातच तिला तिकडे नको नको वाटायला आले आता तोच वाडा तिला खायला उठायचा. घरातल्या मोलकरनी , नोकर चाकर दिवसभर आपल्या कामात मग्न असायचे फक्त कामापुरते तेवढे बोलणे व्हायचे, तिला आता ह्या भर्जरी पेशावात कुठेतरी अडगडल्या सारखे वाटू लागे शहरात शिकलेली मधु इकडे कुठे खेडेगावातले वातावरण बघून फारच उदास झाली होती. त्या गावात ना लाईट ना शाळा, वाहतुकीची सोय नाही काय नाही. अजूनही टांग्याने प्रवासकरण्याची पद्धत होती. घरातल्या महिला पुरुषांसमोर येतांना डोक्यावरचा पदर कपाळापर्यत येईल असा घेत होत्या. अजूनही स्रियांना पुरुषासोबत जास्त बोलता येत नव्हते. त्यामुळे तिला आणखीनच बोर वाटायला आले होते. तिचा गावी येण्याचा उत्साह आता तिलाच खायला निघाला होता.
थोडाफार वेळ मिळाला की आर्यन मधुजवळ येत असायचा, तेवढच त्यांचं बोलन व्हायचं बाकी वेळ तर त्याला शेतावर तसेच मजुरांच्या देख रेखीवरच जास्त पाठवल जायचं.
आर्यन शेतावर गेला की वसुंधरा मधुजवळ येऊन तिला बोलता बोलता हसत टोमणे मारत असायची.
"तु शहरातली मुलगी तुला काय करमणार इकडे...?"
वसुंधराला फक्त एक गोष्ट हवी असायची ती म्हणजे आर्यन मधुपासून जितका दूर ठेवता येईल तितका बरा. तिचा एकच हेतू होता तो म्हणजे आर्यनला ह्या वाड्याचा एकही हिस्सा मिळायला नको, सारे काहीं आपल्या पोटच्या मुलाला मिळावे ह्यासाठी तिची ही खटपट चालली होती.
(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.मधुची ह्या वाड्यातून लवकर सुटका होईल की नाही, मधु कायमची तर नाही अडकून पडणार त्या वाड्यात...? अजून कोणत्या संघर्षातून तिला आपला मार्ग काढावा लागेल. सोबत आर्यन असेल की,ती एकटीच त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल..? हे बघण्यासाठी वाचत रहा ही कथा )
कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा