साथ दे तू मला

Marathi love story

काॅलेजचा पहिलाच दिवस संकेत गडबडीत लवकरच काॅलेजला पोहोचला.. काॅलेजमध्ये आल्यावर तो त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊन बसला.. हळूहळू एक एक करत सगळे मित्र कट्ट्यावर जमा झाले.. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या.. सुट्टीत कोण काय काय मजा केलं याची जणू मैफिलच जमली होती..

पण त्या गर्दीत संकेत मात्र गेटकडेच टक लावून पाहत बसला होता.. त्याच कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष नव्हतं.. एक मित्र बोलता बोलता संकेतकडे बघितला तर तो गेटकडेच पाहत होता..

"अरे संक्या, आम्ही एवढं बडबडतोय तुझं लक्ष कुठेय.." एक मित्र.

"अरे तुला माहीत नाही काय.. दोन वर्ष झाले तरी हा नुसता बघतच बसतो.." दुसरा मित्र.

"ए संक्या बास झालं ह आता.. प्रपोज करून टाक बाबा एकदाच आणि बनव वहिनी आमची.." पहिला मित्र.

"तितकं सोपं आहे का??" संकेत वैतागून..

"अरे नुसता प्रपोज करायचं.. झालं.." मित्र

"झालं.. एवढंच.." संकेत..

"मग.. तुला कोण नाही म्हणणार?? एवढा हुशार आहेस.. दिसायला हॅण्डसम आहेस.. मुलींना आणखी काय हवं असतं.." मित्र.

"अरे पण माझ्याकडे पैसा नाही.. आईबाबा आणि इतर नातेवाईक सुध्दा नाहीत.. मी अनाथ आहे.. मग ती माझ्याबरोबर येईल.." संकेत.

"मग तू नुसता प्रपोज कर.. टाईमपास रे.. लग्न झालं तर झालं.. नाहीतर नाही.." मित्र.

"मला टाईमपास नको आहे.. कायमची साथ हवी आहे.." संकेत

"बरं बाबा.. मग विचारून तर बघ.. तिची मैत्रीण तुझी मानलेली बहिण आहे ना.. मग सोपं होईल तुला.. बघ प्रयत्न करून.. नाहीतर तू असा नुसताच बघत बसलास तर एक दिवस तिच लग्न होईल.." मित्र

"बरं बघतो.." संकेत असे म्हटला इतक्यात तिची एंट्री झाली.. ती म्हणजे सायली.. दिसायला एकदम सुंदर, गोरी पान, डोळे काळे निळे.. केस मऊ मुलायम.. अगदी परीसारखीच.. कुणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती.. मग संकेत कसा सुटेल त्यातून.. तिच्यासोबत तिची बेस्ट फ्रेण्ड मेघना जी संकेतची मानलेली बहिण होती..

"ए मेघना.." संकेत हाक मारतो तसेच त्या दोघी थांबतात..

"काय रे.." मेघना

"काही नाही.. मावशी (मेघनाची आई) खूप दिवस झाले भेटल्या नाहीत म्हणून विचारलो.." संकेत..

"अरे हो तिची तब्बेत बिघडली होती.. एक दोन दिवसात येऊन जाईल म्हणत होती.." मेघना

"कोण ग हा.. तुमचा कोणी नातेवाईक आहे का??" सायली

"अगं हा माझा मानलेला भाऊ संकेत.. आणि संकेत ही माझी मैत्रीण सायली.." मेघनाने एकमेकांची ओळख करून दिली.. आता काय ओळख झाली म्हणजे झालं.. रोज त्यांच बोलणं होऊ लागलं.. रोज काॅलेजमध्ये भेटी होऊ लागल्या आणि बघता बघता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांचे त्यांनाच कळले नाही..

दिवसामागून दिवस गेले.. काॅलेजचे शेवटचे वर्ष संपत आले.. मग काय दोघांचेही मन नाराज झाले.. आता भेटता येईल की नाही.. फायनल एक्झामसाठी सुट्टी चालू झाली आणि सगळंच काही क्षणासाठी थांबलं..

एक दिवस संकेत मेघना कडून सायलीचा नंबर घेतो.. मग काय फोनवरून मेसेज बोलणे चालू झाले.. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते.. फोन आणि अभ्यास दोन्ही अगदी व्यवस्थित रूटीनमध्ये चालू होते..

परिक्षा संपल्या.. थोड्या दिवसांनी निकाल पण लागला.. आणि संकेतला एक छान नोकरी पण मिळाली.. सगळं एकामागून एक पटापट घडत गेलं.. त्याला तर आता स्वर्गसुखच वाटतं होते.. तो आता सायलीला प्रपोज करणार होता.. कारण त्यालाही माहित होते की सायली पण त्याच्यावर प्रेम करत होती..

अखेर तो दिवस उजाडला.. सायलीला आज संकेत प्रपोज करणार होता.. त्याने तिला एका ठिकाणी भेटायला बोलावलं.. सायली मस्त पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती.. त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.. संकेत तर तिच्याकडेच पहात बसला.. त्याला काय बोलावे तेच कळेना..

"हाय.. बोल का बोलावलं आहेस तू मला.." सायली..


"सायली तू राग मानू नकोस.. तुझ्या मनात काय आहे ते तू सांग.. पण मी आता माझ्या मनातल सांगणार आहे.. मी काॅलेजच्या अगदी पहिल्या दिवसापासून तुझ्या प्रेमात आहे.. पण हे आज तुला सांगत आहे.. प्लीज माझ्या स्वप्नातली परी बनून माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर बनवशील.. मी एका जीवनसाथीच्या रूपात तुला पाहतो.. तर तू माझ्या आयुष्यात येऊन माझे जीवन पूर्णत्वास नेशील.. तू मला आयुष्यभरासाठी साथ देशील.." असे म्हणत संकेत तिच्या समोर गुडघे टेकून बसतो आणि हातात एक रिंग घेऊन हात पुढे करतो..

सायली पण त्याच्या हातात हात देते आणि संकेत तिच्या बोटात रिंग घालतो.. इथपर्यंत सगळं ठीक होत.. पण आता पुढे काय??

तर पुढे सायलीच्या घरच्यांनी नेहमीप्रमाणे लग्नाला परवानगी दिली नाही.. म्हणून ते दोघे मित्रांच्या मदतीने (संकेतच्या मनाविरुद्ध) पळून जाऊन लग्न केले..

थोडे दिवस दोघेही अगदी आनंदात राजाराणीचा संसार चालला.. आणि आता एक गोड बातमी सुध्दा मिळाली.. पण म्हणतात ना सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच.. तसंच काहीसं झालं..

जगभरात कोरोनाने थैमान घातले.. आणि लाॅकडाऊनचा काळ सुरू झाला.. हळूहळू दोघेही सांभाळून घेऊ लागले.. पण म्हणतात ना पैशाचे सोंग घेता येत नाही.. तसेच काहीसे झाले.. संकेत आणि सायलीचे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागली..

"तू तुझ्या आईबाबांकडे जा.. माझ्यासोबत तू सुखी राहणार नाहीस.." असे संकेत वारंवार तिला भांडणात म्हणू लागला..

आता तर तो शांत शांतच राहू लागला.. सायलीशी काहीच बोलत नसे.. ती काही बोलायला आली तर तेथून निघून जाई.. मित्रांशी बोलणे पण बंद झाले.. लाॅकडाऊनमुळे कोणाची भेटही होत नसे.. असे बरेच दिवस गेले..

त्याला असे शांत बघून.. "याला मी आवडेनाशी झाली आहे का?? माझ्यात काही कमी आहे का?? हा मी सोडून दुसर्या मुलीवर तर प्रेम करत नसेल ना??" असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात.. तिला काय करावे कळेना..

काही दिवसांनी त्याच्या वागण्यात फरक जाणवू लागला.. तो तिच्याशीच नाही तर कुणाशीच बोलेना.. त्याला कशाच टेन्शन आहे का?? हे सुद्धा तिला कळेना.. शेवटी कंटाळून ती त्याला सोडून जायचा निर्णय घेते.. बॅग भरते आणि निघणार इतक्यात तिची मैत्रीण मेघनाचा फोन येतो..

"हॅलो लवबर्डस् कसे आहात??" मेघना

"मेघना काही ठिक नाही.. मी आईबाबांकडे जात आहे.." असे म्हणत सायली रडू लागली..

"अगं सायली काय झालं.. संकेत काही बोलला का?? अग रडू नकोस.. मला सांग बघू काय झालं ते.." मेघना

सायली तिला सगळं काही सांगते.. आणि "मी आता कायमच त्याला सोडून जाणार आहे.." असे म्हणते.

"अगं वेडी आहेस का तू?? तू समजतीस तसे काही नाही.. मी चांगलंच ओळखते त्याला.. या लाॅकडाऊनच्या काळात त्याच्यावर खूप जबाबदारी आहे.. आणि नोकरीची शाश्वती नाही.. जो पैसा जवळ आहे तो खर्च होत आहे.. आणि आता पुढे काय?? असा त्याला प्रश्न पडला असेल आणि याच विचारात तो असेल.. त्यात तू प्रेग्नेंट आहेस.. तुझ्यासोबत आता बाळाची जबाबदारी त्याला घेता येईल का?? याचा तो विचार करत असेल.. तू तुझ्या आईबाबांकडे असताना किती सुखात होतीस.. तसे सुख मी देऊ शकेन का?? म्हणजे आधी त्याला खात्री होती तो नक्कीच देऊ शकेल म्हणून.. पण आता लाॅकडाऊनच्या काळात कसे शक्य होणार याच्या विचारात असेल ग.. पण तू अस तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस.. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर.. आता तूच त्याला आधार देणार आहेस.. नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल.." इतके बोलून मेघना फोन ठेवते..

मग सायली खूप विचार करते.. इतक्यात संकेत येतो.. त्याला पाणी देऊन ती त्याच्या जवळ जाऊन बसते.. त्याचा हात प्रेमाने हातात घेऊन.. "संकेत मला काहीच नको.. माझ्या तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीत.. मला फक्त तुझं प्रेम हव आहे.. आपण काटकसर करून दिवस काढू.. हेही दिवस जातील रे.. मी पण घरात बसून काहीतरी काम करेन.. आता आपणच एकमेकांना आहोत.. मी तुझ्या सोबत आहे.. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस.." असे सायली बोलल्यावर संकेत तिच्या मांडीवर डोक ठेवून खूप रडतो.. सायली पण तो रडून मोकळं होऊ दे म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते..

थोडं शांत झाल्यावर संकेत सायलीचा हात हातात घेतो.."तू मला कठीण काळात साथ दिली आहेस.. हे मी कधीच विसरणार नाही.. मला खूप टेन्शन आलं होतं.. तुझ्या गरजा मी पूर्ण करेन का?? असे सारखं वाटायच.. पण आता तुझी साथ आहे तर मी पुन्हा प्रयत्न करेन.. आणि सर्व सुख तुझ्या पुढ्यात ठेवेन.. अशीच साथ तू मला आयुष्यभर दे.." असे म्हणत दोघेही पुन्हा आनंदाने राहू लागतात..

तर मित्रांनो.. आयुष्यात एक फेज अशी येतेच तेव्हा आपणच आपल्या माणसांची काळजी घ्यायला हवी.. आपण संवाद साधला पाहिजे.. त्यांना नैराश्याच्या गर्दीतून बाहेर काढले पाहिजे.. मगच काहीतरी अनर्थ घडणार नाही..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.