अंधश्रद्धा हा मानवी समाजाला मिळालेला शाप आहे.
अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो.
श्रद्धा ही मानवी जीवनातील अमूल्य ठेव आहे.
आई-वडील गुरुजन यांच्याविषयीची श्रद्धा ही खचितचं
अभिमानास्पद आहे. श्रद्धा हवीच पण ती अंध नको.डोळस हवी.
माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे म्हणून तीर्थक्षेत्री जाणे ,लांबच लांब
रांगेत उभे राहणे , फुले, नारळ यांचा पडलेला खच ,त्यावर केवळ..
मनाच्या समाधानासाठी केलेला खर्च यापेक्षा मी माझ्या
घराच्या देव्हाऱ्यातील देवाची मनोभावे पूजा करते. फुले वाहते.
दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य झाडाच्या बुडाशी टाकते .माझ्या..
नातवंडांची मी मीठ मोहरी यांनी दृष्ट काढते.कुणाला कदाचित
ही अंधश्रद्धा वाटेल या मीठ मोहर्या ओवाळून टाकण्यात काहीही..
अर्थ नाही हेही मला माहित आहे. परंतु आपल्या आजीला..
आपली किती काळजी आहे , मीठ मोहरी ओवाळतांना
नातवंडांचे हसरे चेहरे पाहिले ती मी मनापासून सुखावून जाते.
देवीच्या नवरात्रात येणारे गोंधळी , त्यांना बोलावून मी देवीची ..
गाणे म्हणायला लावते. त्यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा
मला जाणवते. शिवाय गाणे म्हणणाऱ्यांच्या हातावर दक्षिणा
ठेवतांना त्यांना होणारा आनंद मला अनुभवायला मिळतो.
शिवाय तेही एक समाजघटकचं ना .
हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतांना एक 'गेट टुगेदर '
किंवा एक सामाजिक उपक्रम म्हणून त्याकडे बघते. कोणत्याही
श्रद्धेचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिणत होऊन समाजाला..
हानिकारक ठरू शकतो याचे भान ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
समाजातल्या आपल्याला न पटणाऱ्या प्रथा परंपरांना फाटा
देऊन ज्या प्रथा-परंपरा समाजासाठी आवश्यक आहे त्यांना
नवे रंगरूप देऊन आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवायला
काही हरकत नाही असे मला वाटते.