काही दिवसांपूर्वी ईरा चॅम्पियन ट्रॉफी ह्या स्पर्धेसाठी मी "येसा" ही ऐतिहासिक कथा लिहिली होती. खरतर अश्या अनेक ऐतिहासिक कथा आपल्या वाचनात आल्या असतील. तसेच अनेक ऐतिहासिक चित्रपट, नाट्य, मालिका ह्या आपण बघितल्या असतील. पण ते काहींच्या अर्धवट लक्षात राहतात. खरंतर त्या पूर्णपणे ऐतिहासिक असतातच असं नाही. त्या फक्त काही ऐतिहासिक धागे दोरे हाती घेऊन केलेल्या असतात. आणि असे असल्यास त्यांनी ते स्पष्टपणे त्यात नमूद केलेले असते.
जर आपण ते चित्रपट, नाटकं, मालिका पाहिल्या असतील किंवा ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या वाचल्या असतील तर निदान ते काल्पनिक आहे की सत्य हे आधी बघावे. बऱ्याचदा काय होते की, आपल्याला असे वाटते की हे जे दाखवत आहेत ते सर्व खरे आहे आणि हाच आपला इतिहास आहे असे आपण समजतो. मग सुरू होते मोठ्या मोठ्या शुर वीरांची बदनामी.
या सगळ्यात सर्वात जास्त बदनामी ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची झाली आहे.
स्पष्टच सांगायचे तर अनेक लोक त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना आजही दिसतात. त्यांच्यावरून चर्चा करतांना अनेक लोक मला दिसतात. "संभाजी महाराज व्यसनी होते." इतकंच काय तर "त्यांना नको नको ते नाद होते." असं म्हणणाऱ्या लोकांची अक्षरशः चीड येते. अहो ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले, इतक्या भयानक मृत्युला ते सामोरे गेले. अशा संभाजी महाराजांबद्दल असे बोलवते तरी कसे ह्यांना.
खरा इतिहास काय आहे हे माहीत करून न घेता केवळ अर्धवट माहिती घेऊन हे असे बोलतात.
खरतर एकही लढाई न हरणारे अजिंक्य योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. ते निर्व्यसनी होते आणि त्यांच्या आयुष्यात येसूबाई राणीसाहेब ह्या त्यांच्या पत्नी सोडल्या तर एकही स्त्री नाही. ते अत्यंत चारित्र्यसंपन्न होते.
इथे मी माझे व्यक्तिगत मत मांडले आहे. परंतु, मी हे ठामपणे सांगू शकते की, मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे सांगितले ते अगदीच खरे आहे. बऱ्याच जणांचे त्यांच्या चारित्र्यावरून अनेक गैरसमज झाले आहेत. ह्या लेखाद्वारे ते दूर करण्याचा माझा प्रयत्न होता..... तरीही माझ्या कडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर...... क्षमस्व.....
लेखिका : कु. कोमल पाटील
★★★