Login

त्याचे ते माहेर ?? अन तिचे ??

त्याचे ते माहेर
त्याचे ते माहेर ?? अन तिचे

"राहून राहून आई आठवते रे आजकाल.." ती

"आठवते तर आता मी काय करू शकतो..?" तो

"आपण जाऊन यायचे का साताऱ्याला ,एक दिवसात जाऊन येऊ ,पण तू म्हणशील तरच..पण प्लिज जाऊन येऊ का आपण ? " ती विनवणी करत

"बाई नको इतक्या उन्हात ,मी आधीच त्रस्त होतो तिकडे जाऊन ..त्यात तुमचे ना एक दिवस म्हणतात आणि दोन दिवस ठेऊन घेण्याचा तो आग्रह करतात तोच नाही पटत मला...हे काय असते ग सतत सतत माहेर माहेरी..जरा सहा महिने होत नाहीत तर चला चला...खरेतर तुम्ही अतीच लाघवी असतात ,जीव गुंतून घेतात...जर प्रॅक्टिकल राहून बघ...उद्या मी म्हंटले की जर्मिनला जाऊ काही वर्षे काढून येऊ परत तर काय करशील..हे असे उठसुठ नाही जमणार यायला ,मग तेव्हा गप रहाशील ना..आता ही गप रहा ना.."

तो किती बोलून गेला ,त्याला हे कुठे कळत होते तिचे ते माहेर आहे ,हक्काचे घर आहे..तिचे ते आई वडील आहेत..ती लाडाची प्रेमाची लेक आहे...आणि जसे तो उठसुठ दर दोन तासाने दोन बिल्डिंग सोडून तिसऱ्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या आई वडिलांना सोडून जास्त वेळ रहात नाही ,त्यांच्या साठी तो जवळ रहातो..त्यांच्या आनंदात वाटा करतो ,त्यांना आनंद देतो..त्यांना सुखी बघण्यासाठी उलथा पालथ करतो तर तिने साधे तीन महिन्यातून ही माहेरी जाऊ नये का ,त्यासाठी त्याची विनवणी करायला का हवी .?? तसा तर तो भर उन्हात आईला उसाच्या रस आवडतो म्हणून दोन तीन किलो मीटर पायी जातोच...तेव्हा नाही ऊन लागले आणि आताच बरे लागले...त्याची आई आणि त्याची काळजी ,त्याचे ते प्रेम सगळे चालू द्या...पण तिला मात्र ज्ञान पाझळत होता

"मी काय म्हणते मीच जाऊन येते साताऱ्याला ,आहे माझी ST त्याची ही सवय आहे ,ती तर दारात सोडून देईल..तू तसदी घेऊ नकोस...तुला काय तुझे माहेर ,तुझी माहेरची माणसं जवळ आहे ,दोन तास खूप होतात की तू तिकडे कधी ते इकडे असतातच गळ्यात गळे घालायला...दिसला नाही की कसनुसे व्हायला...तू रहा मी येते जाऊन...आणि हो उसाच्या रस आणायला जाऊ नकोस खूप ऊन आहे...काळा पडशील लगेच.."

तिने हे ऐकवताच त्याला लक्षात आले ,आपण नको तितके बोलून बसलो होतो ,काल भर उन्हात ताईला सोडवायला कळव्या पर्यंत गेलो होतो ,तसे कल्याण ते कळवा हे अंतर उन्हात गेल्याने त्रास झाला होता पण हे बायकोला कळले असते तर आज तिने त्याचा ही हिशोब लावला असता.. पण सगळे हिशोब तिने का मांडायला हवेत ,काही आपण आपल्या मनाशी ही करायला हवेत..अगदी आपण आपल्या माहेरी उठसुठ पडलेलो असतो त्याचा ही..तर ती जर म्हणते आई आठवते तर मीच म्हणायला हवे होते जरा आपण लॉंग ड्राइव्ह व्हाया सातारा करून येऊ...पण मीच भाव खाल्ला

"तू तसे नको करू ,तुझी ही बॅग रिकामी दिसते ती दोन नाही चार दिवसाच्या कपड्यांची भर ,त्यात माझे टाक आणि चल ,आता साताऱ्याला जाऊन येऊ ,मस्त आईच्या हातचे चुलीवरचे जेवण करून येऊ ,बाहेर मोकळ्या हवेत झोपू..त्यांच्या सोबत गप्पा मारून आणि येऊ परत .."

"हे आधी सांगायला काय बिघडलं होत ,चार बोलणे ऐकल्यावर का हे शहाणपण सुचते..."

"म्हणजे काय ??"

"म्हणजे तुझे कपडे टाकायचे होते तर आधी सांगायचे ना असे म्हणते मी?"

दोघे हसत गाडी कडे निघाले ,तिच्या आनंदात तो ही सामील झाला होता...तिच्या माहेरपणासाठी तो ही त्याचे माहेर बाजूला ठेवणार होता..
©®अनुराधा आंधळे पालवे