भाग ३: विमलाचं अर्धसत्य
मंदिराच्या गाभाऱ्यात अर्पिता आणि आरोहीने डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या पुजाऱ्याकडे पाहिलं. त्यांचे शब्द अजूनही त्यांच्या मनात घुमत होते— "तिच्या मृत्यूमागचं सत्य अजूनही गुलदस्त्यात आहे..."
"तुम्हाला विमलाची कथा जाणून घ्यायची आहे ना?" पुजाऱ्याने डोळे न उघडताच विचारलं.
"हो… आम्ही तयार आहोत," अर्पिताने धीर करून उत्तर दिलं.
पुजाऱ्याने एका कोपऱ्याकडील लाकडी पेटी उघडली. आत एक फारच जुनी पुस्तकवजा वस्तू होती—संपूर्ण पानं काळवटलेली, पण एका पानावर ठळक अक्षरं चमकत होती:
"विमलाचं अर्धसत्य"
"हे पुस्तक सामान्य डोळ्यांना फक्त कोरी पाने वाटतात," पुजारी म्हणाले, "पण जर तुम्ही हे ‘कळसूत्र तेल’ डोळ्यांत घातलं, तर तुम्हाला तिच्या आयुष्याचे काही क्षण दिसतील… जे क्षण फक्त तिच्या आत्म्याचं अर्धसत्य मांडतात."
"पूर्ण सत्य नाही?" आरोहीने विचारलं.
"पूर्ण सत्य पाहण्याची फार मोठी किंमत चुकवावी ," पुजाऱ्याचं उत्तर.
अर्पिता आणि आरोहीने एकमेकांकडे पाहिलं… आणि त्यांनी एकत्रितपणे होकार दिला.
.......
त्या दोघींनी डोळ्यांत तेल घातलं. काही क्षणातच अंधारात एखादं दृश्य साकार होऊ लागलं… धूसर… अस्पष्ट… पण स्पष्ट होत जात.
एका लहानशा स्टेशनवर गर्दी आहे. एका मुलीचा चेहरा दिसतो—शांत, पण डोळ्यांत न सांगता येणारा स्वभावातच असलेला राग. तिचं नाव आहे विमला.
ती कुणाच्या तरी वाट पाहतेय… पण समोर एक पुरुष येतो—लग्नाची मान्यता नाकारतो. लोक तिच्यावर संशय घेतात. अपमानित, संतप्त आणि व्यथित विमला धावत ट्रेनच्या दिशेने जाते…
आणि त्या क्षणी, ट्रेनचे ब्रेक्स फेल होतात.
एक विचित्र आवाज—काहीतरी तुटतं, आणि सर्व बाजूंनी अंधार…
पुन्हा दृश्य बदलतं—विमला आता स्टेशनच्या पुलावर आहे, तिचा चेहरा रक्ताने माखलेला, डोळ्यांत वेदना… आणि शाप!
"तुम्ही माझं आयुष्य जाळलं… आता माझा राग तुम्हा सर्वांच्या आत्म्यांत जळत राहील…!"
तेवढ्यात अर्पिता जोरात ओरडली आणि भानावर आली. आरोहीही घाबरून मागे सरकली.
"हे अर्धसत्य होतं," पुजारी म्हणाले. "पण अजून काहीतरी दडलं आहे. तुमचं पुढचं पाऊल म्हणजे त्या ट्रेनमध्ये परत जाणं… आणि त्या रात्रीचं खरं वास्तव स्वतः पाहणं."
"आम्ही… तयार आहोत," आरोही निर्धाराने म्हणाली.
"तुमचा प्रवास पुन्हा सुरू होईल उद्या पहाटे," पुजारी म्हणाले, "पण लक्षात ठेवा… प्रत्येक उत्तर एक नवीन प्रश्न घेऊन येईल."
त्या दोघीही गोंधळलेल्या अवस्थेत एकमेकिंकडे बघतात नजरेनेच एकमेकिंना धीर देतात आणि होकारार्थी मान हालवतात.