झळाळी ( भाग ४ )

एका स्त्रीच्या जीवनाची कथा
( भाग ४ )

एके दिवशी वैशूने लेकीला बरोबर घेऊन त्या वस्तीतून पळण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला.
वैशूला तिथल्याचं एका दणकट माणसाने रस्ता अडवून पुन्हा त्या बाजारात ढकलले आणि त्यानंतर कित्येक दिवस वैशूवर कडक नजर ठेवण्यात आली होती. बहुतेक तीन वर्ष वैशू त्या नरकात राहून उलटली असतील त्यावेळी वैशूच्या जीवनात एक भला मनुष्य आला. त्यांच्या बायकोने त्यांच्याशी पैशासाठी लग्न केलेले. लग्नानंतर अवघ्या एक महिन्यात पैसे, दागिने घेऊन ती तिच्या प्रियकाराबरोबर पळून गेली होती.

तो मनुष्य रेड लाईट एरियामध्ये अतिशय वैफल्यग्रस्त अवस्थेत आला होता. अनेक मुली तिथे नटूनथटून आपल्या गिऱ्हाईकाची वाट पाहत उभ्या होत्या. वैशूकडे त्याची नजर गेली. वैशू एका कोपऱ्यात गुपचूप उभी होती पण वैशूच्या टपोऱ्या डोळ्यांत करूणतेची छाप दिसत होती.

त्याने वैशूसोबत रात्र घालविण्याचे ठरवले.

" तुझं नाव काय आहे ?" त्या मनुष्याने वैशूला विचारले.

" माझं नाव वैशाली. पण इथे मला वसुबाय बोलतात. " वैशूने खाली मान घालून त्या गृहस्थांना उत्तर दिले.

" मी तुला वैशू म्हटलं तर चालेल ?" त्या गृहस्थांनी वैशूला विचारले. त्यांनी असे विचारल्यावर वैशूच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले.

" मला घरात सगळे वैशूचं म्हणायचे. तीन वर्षांनी हे नाव माझ्या कानावर पडले."

" माझं नाव अच्युत. आपण समवयस्क आहोत तर तू मला नावाने हाक मारू शकतेस."

" नाही साहेब, तितकी माझी लायकी नाही. मी तुम्हाला साहेब म्हणेन." वैशू म्हणाली.

वैशूच्या त्या गलिच्छ आयुष्यात पहिल्यांदा असा पुरुष आला होता की त्याने वैशूचे सुखदुःख जाणून घेतले. तिच्यावर कुठलीही जबरदस्ती केली नाही. रात्रभर त्या दोघांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखे सांगितली. एकमेकांकडे मन मोकळे केले. वैशूची लहान लेक पाहून अच्युतच्या डोळ्यांत पाणी तरळले. उद्या पुन्हा येतो असे वचन देऊन तो सकाळी तिथून बाहेर पडला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा अच्युत वैशूसाठी आला आणि आता तर तो रोजचं येऊ लागला. दोघेही एकाचं वयाचे असल्याने दोघांमध्ये नकळत प्रेम फुलू लागले होते. वैशूशी लग्न करायला देखील अच्युत तयार झालेला होता पण वैशूने त्यांचा प्रस्ताव नाकारला कारण तिचे शरीर आता पवित्र राहिले नव्हते. पण ते दोघे एकमेकांबरोबर अगदी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. ज्या खऱ्या प्रेमाची दोघांना गरज होती ते प्रेम या उकिरड्यावर त्यांना मिळालेले.

ते गृहस्थ म्हणजे श्री. अच्युत सरनाईक. ज्यांचा कापडकारखान्याचा व्यवसाय होता. मोठी आसामी व्यक्ती. त्यांनी आता लग्नाचा धसका घेतला होता. पण वैशूकडून मिळालेल्या खऱ्या प्रेमामुळे वैशूबरोबर लग्न करण्यात त्यांना कसलाच आक्षेप नव्हता. वैशूने लग्नासाठी नकार दिला पण वैशूने त्यांच्याकडून देविकाला सांभाळण्याचे, उच्चशिक्षण देण्याचे वचन घेतले. अच्युत त्यांच्या वचनाला जागले. देविकाला दत्तक घेऊन त्यांनी देविकाला पाचगणीमध्ये शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये ठेवले.

देविका त्यावेळी लहान असल्याने तिला आई आठवत नव्हती. अच्युत यांनाच ती तिचे वडील समजत होती. मुळातच देविका अभ्यासात हुशार असल्याने शिक्षणाच्या एक एक पायऱ्या ती घवघवीत यशाने पार पाडत होती. देविका अच्युत यांना तिच्या आईविषयी विचारायची तर \" वेळ आल्यावर तुला तुझ्या आईबद्दल सांगेन \" असे अच्युत देविकाला म्हणायचे.

देविकाची खुशाली, तिची अभ्यासातली हुशारी त्यांच्यामार्फत वैशूला सारं काही समजे. वैशूने देविकाच्या शिक्षणात, तिच्या आयुष्यात कधीच दखल दिली नव्हती. वैशूने \" माझी ओळख कधीच माझ्या मुलीला दाखवू नका \" असे अच्युतकडून वचन घेतलेले. देविकाला तिच्या आईबद्दल खरं समजल्यावर तिची प्रतिक्रिया कशी असेल याची भीती वैशूला वाटायची.

देविकाने एम.डी. ला प्रवेश घेतला. त्यादरम्यान अच्युत यांना कॅन्सर सारखा रोग जडला तेव्हा त्यांनी देविकाला जवळ बोलावून तिचा आणि तिच्या आईचा भूतकाळ सांगितला. देविकाचे लग्न लावून दिल्यावर त्यांनी दोन महिन्यांतचं प्राण सोडला. देविकाच्या नावे अच्युत त्यांची सगळी इस्टेट ठेऊन गेले. त्यांच्या पैशाचा सामाजिक कार्यासाठी वापर व्हावा यासाठी देविकाने त्यांच्या नावाचे रेड लाईट एरियामध्ये हॉस्पिटल सुरू केले.

देविकाने तिच्या आईला खूप शोधले. शेवटी एके ठिकाणी तिची आई तिला सापडली. वैशू आता पन्नाशीला आली होती पण आयुष्याच्या प्रवासात तिच्या झालेल्या परवडीमुळे ती जास्त थकली होती.

देविकाने वैशूला स्वतःची ओळख दाखवली. समोर आपली मुलगी बघून वैशूचा बांध फुटला. देविकाने मायेने वैशूला आपल्या हॉस्पिटलचे उदघाटन करायला लावले आणि वैशूला स्वतःच्या घरी नेले.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

🎭 Series Post

View all