आजची महिला सक्षम आहे कि नाही...

Power Of Women

महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी, पहिली स्त्री शिक्षीका व पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक प्रकारचा त्रास सहन केला. पती निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले.

विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन केली. त्यामध्ये हळदी कुंकू, समारंभ, रसपान, प्रौढ स्त्रियांचे शिक्षण आणि स्त्रीयांवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा व उपाय सूचवले जात असत, तसेच आत्माराम तर्खडकर यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण दिले. अन्नपूर्णा ही विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीय महिला होती.

पंडिता रमाबाई यांचे स्त्री सुधारणेसंदर्भात कार्य मोलाचे समजले जाते. स्त्रियांच्या उन्नतीसंदर्भात शिक्षण प्रसाराचे कार्य केले. भारतातील शिक्षण पध्दतीत पुनर्रचना करण्यासाठी १८८३ मध्ये हंटर कमिशन समोर रमाबार्इंनी साक्ष नोंदवली. मार्च १८८९ ‘शारदा सदन‘ नावाची मुंबई येथे शाळा सुरु केली. स्त्रियांमध्ये पंडिता रमाबाई यांच्यानंतर प्रभावी कार्य करणारी प्रमुख महिला म्हणून रमाबाई रानडे यांचा उल्लेख केला जातो.

अमेरिकेत जाऊन वैद्यकिय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली महिला आनंदीबाई जोशी होत्या. महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ताराबाई शिंदे यांनी स्वतंत्र विचार मांडले. १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना‘ या विषयावर निबंध लिहिला. विठ्ठल शिंदे यांची बहिण जनाबाई शिंदे यांनी अस्पृश्य स्त्रियांमध्ये जागृती करण्याचे कार्य केले. स्पृश्य-अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

त्यानंतरच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मादाम कामा, प्रितीलता वेदार अशा अनेक स्त्रियांनी मोलाचे योगदान दिले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणुन इंदिरा गांधींनी उत्कृष्ट कार्य केले. स्त्री चळवळीची बीजे रोवण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी रोवली, आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. हे काम उल्का महाजन, मेधा पाटकर, डॉ. राणी बंग, मंदा आमटे इ. स्त्रीया अखंडपणे चालवत आहेत.

महिलांचे सक्षमीकरण :-

स्त्रियांचे सबलीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्व एक माणूस म्हणून विकसित करायचे व तिला तशी संधी मिळवून द्यायची. महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी द्ययला हवी. कारण, प्रत्येक वेळी ती अबला आहे तसेच तिला काही कळत नाही, ती सक्षम नाही, पुरुषांच्या तुलनेत ती काम करण्यास सक्षम नाही. असे म्हटले जाते. 

विविध जातीधर्माच्या स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या अंगी असणारी सहनशक्ती, संयम या गुणांमुळे तिला प्रत्येक वेळी गृहित धरले जाते, परंतु झाशीची राणी लक्ष्मीबाई ते आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना गार्ड ऑफ ऑनर देणारी पुजा ठाकूर यांच्या उदाहरणावरुन स्त्रिया किती सक्षम आहेत हेच दिसून येते.

महिलांसंदर्भात विविध विकास योजना राबवल्या जात आहेत. त्यांचा विकास होण्यास प्रारंभदेखील झाला आहे, परंतु ही विकासाची वाटचाल सातत्याने टिकवावी लागेल. समाजाला स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात जागृत करणे आवश्यक आहे.

महिलांचे सामाजिक स्थान आणि सक्षमीकरण :-

भारतीय संस्कृती विकासाच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की, पूर्व कालखंडात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची होती, मध्य कालखंडात ती वासना आणि विटंबनेची प्रतीक बनली आणि उत्तर कालखंडात गुलामगिरीच्या पाशात स्त्री अडकली गेली. स्त्रीयांचे आजच्या समाजातील स्थान काय याचा विचार केला तर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की, मातृसत्ताक कुटूंब पध्दतीत जीथे घरातील सर्व अधिकार महिलांकडे आहेत, तिथे स्त्री पुरुष नात्यांमध्ये मात्र महिलांना एकतर पुरुषांच्यासाठी पुरक मानलं गेलं किंवा देवत्वाच्या सोनेरी पिंज-यात तीला बंदिस्त करण्यात आलं, एक माणुस म्हणुन आम्ही स्त्री कडे कधी पाहिलंच नाही हे ही वास्तव आहे.

लहानपणी बाप, तरुणपणात नवरा आणि म्हातारपणी मुलगा या तीन कक्षांमध्ये महिला बंदिस्त झाल्या. रांधा, वाढा, उष्टी काढा यातुन व चूल आणि मूल यातून स्त्री बाहेर पडली नाही. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली. आज विविध क्षेत्रात महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतांना दिसत आहेत.

स्त्रीची प्रतिमा आता विस्तारली असली तरी, सामान्य गृहिणीपासून, डॉक्टर, शिक्षीका, कायदे तज्ञ, लेखिका, पत्रकार, अभियंता या क्षेत्रातही अस्तीत्वासाठी स्त्रीयांना संघर्ष करावा लागतो.

‘‘स्त्री जन्मा ही तुझी काहणी -हदयी अमृत नयनी पाणी‘‘ अशी परिस्थिती आहे. बीड जिल्हा हा स्त्री भ्रुण हत्या प्रकरणात देशात गाजला, ही परिस्थिती का आली याचाही विचार व्हायला हवा. स्त्रीकडे आम्ही उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले. त्यामुळे तीचे समाजातील स्थान डळमळीत झाले. महिलांवरील अत्याचार वाढले. हुंड्यासारख्या प्रथेने आमच्या समाजात पाय घट्ट रोवले, मुलगी घरात होणे म्हणजे मुलीच्या बापासाठी जीवाला घोर निर्माण झाला. आणि आजारापेक्षा उपचार भयानक या उक्तीप्रमाणे महिला अत्याचार, हुंड्याची समस्या या बाबत उपाय शोधण्यापेक्षा मुलगी न होऊ देणे हा पर्याय निवडण्यात आला. २०११ च्या जनगणनेच्या अहवालानुसार देशात दहा वर्षात ४ कोटी मुली गर्भातच मारल्या गेल्या, हा जर अधिकृत आकडा असेल तर अनाधिकृत आकडा यापेक्षा नक्कीच जास्त असेल.

समाजात आज स्त्री राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहित्य, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रात मुक्तपणे संचार करत आहे. तीच्या पाऊलखुणा, पदचिन्ह विविध ठिकाणी उमटत आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत स्त्रीयांनी समाजातील आपले स्थान निर्माण केले आहे.

शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण :-

महात्मा फुले म्हणतात की, ‘‘घरातील एक माता शिकुन शहाणी झाली तर, सर्व कुटूंब शहाणे होईल, सगळ्या स्त्रीया शिकल्या की, सर्व देश जागा होईल.‘‘ असा विचार करुनच महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतच नव्हे तर महाराष्ट्र देखील अग्रेसर राहीला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे महिला शिक्षण संस्था सुरु केली.

आज महाराष्ट्रात अनेक संस्था स्त्री शिक्षणाचे कार्य करत आहेत. मुलींकरिता स्वतंत्र शाळा, वस्तीगृहे, महाविद्यालये, त्या अंतर्गत चालवली जातात. शासनाकडून स्त्री शिक्षणाच्या प्रसारा करिता १२ वी पर्यंतचे शिक्षण मुलींना मोफत दिले जाते. प्राथमिक स्तरावर १९६०-६१ ते २०००-०१ या अवधीत मुलींच्या संख्येत ३.८२ पट, माध्यमिक स्तरावर १० पट व उच्च माध्यमिक स्तरावर ६.५ पट वाढ झालेली आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्रीयन स्त्रीयांचे प्रमाण वाढत आहे. ही प्रगती निश्चितच नोंद घेण्यासारखी आहे.

आर्थिक दृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण :-

भारतातील बहुसंख्या महिला घरकामात गुंतलेल्या आहेत. समाजात माणूस म्हणून जगायचे असेल तर, आर्थिक स्वावलंबन आवश्यक आहे. स्त्रीयांच्या आर्थिक स्थिती बाबत मार्केस म्हणतो की, ‘‘उत्क्रांतीच्या टप्यावरुन पुढे सरकताना, आणि रानटी अवस्थेतुन सांस्कृतिक आवस्थे पर्यंत येताना उत्पादन साधने विकसीत होत गेली. नंतर खाजगी मालमत्ता ही संकल्पना रूढ  झाली. आणि संपत्तीवरील इतर हक्क पुरुषांकडे गेले. एन्जेल्स म्हणतो, ‘‘जस जशी संपत्ती वाढली, तस तसा पुरुषाचा कौटूंबीक आणि कुटूंबा बाहेरचा दर्जा स्त्रीयांच्या तुलनेत उंचावला, यातुन स्त्रीच्या लेखी दुय्यम दर्जा प्राप्त झाला.‘‘ उपरोक्त संदर्भानुसार वेतना संबंधी भेदभाव, स्वयंरोजगार अर्थ सहाय्याचा अभाव, विना वेतन काम व बेरोजगारी, कुटीर उद्योगात मालकी हक्क नाही अशा अनेक कारणांमुळे स्त्रीचे आर्थिक स्थान पुरुषांपेक्षा दुय्यम राहीले, असे दिसते. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. महिलांना आर्थिक अधिकार मिळवून देणे, उत्पादन प्रक्रियेत सहभागी करुन घेणे या गोष्टी केल्या तरच राष्ट्राचा विकास होईल.

राजकीय दृष्ट्या स्त्रीयांचे सक्षमीकरण :-

महिलांना पुरुषांच्या तुलनेत समान स्तरावर आणण्यासाठी सबलीकरणाची नविन संरक्षक शक्ती व सामर्थ देणे गरजेचे आहे. राजकीय स्तरावर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढल्यास राजकारणात बदल होईल. तसेच राजकारणाला नवी दृष्टी मिळेल आणि राजकारणात संस्थात्मक बदल देखील घडतील. शिक्षणाचा आभाव राजकारणाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोण, महिलांची कुटूंबाप्रती असणारी जबाबदारी व परंपरेमुळे तसेच मानसशास्त्रीय दृष्ट्या स्त्री राजकारणा पासून उदासिन राहते. या व अशा अनेक बाबी स्त्रीयांच्या राजकीय सहभागातील कमी प्रमाणास कारणीभुत ठरतात. परंतु इंदिरा गांधींपासून आजच्या ग्रामविकास मंत्री पंकाजा मुंडे यांच्या पर्यंत स्त्रीयांचा राजकारणातील सहभाग नाकारता येणार

महिलांना सक्षम करुनच आपण समाज आणि राष्ट्राला बलवान करु शकतो. महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागणार आहे. स्त्रीयांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे आवश्यक आहे.

२१ व्या शतकातील आधूनिक समाजाने स्त्रियांकडे निखळ दृष्टीने पहायला हवे असा समाज घडविणे ही पुरुष व स्त्री दोघांची जबाबदारी आहे. समाजाने आपली मानसिकता बदलून स्त्रीयांना जगवले पाहिजे तरच ती शिक्षीत होऊ शकेल तसेच त्या माध्यमातून विकसित राष्ट तयार होईल.