भ्रमिष्ट कोण? भाग सात.

ईतके दिवस असे काही वाईट प्रसंग घडले नाही, पण जेव्हापासून ते लिंबू सापडले, तेव्हा पासून अशुभ घटना घडत आहेत.’



गेल्या भागात आपण पाहिले, लता काकू नेहाला सांगते, नजर दोषाचे खूप वाईट परिणाम होतात. ती राज आणि नरेशची नजर काढायला सांगते. नेहा चिंतीत होते.
आता पाहू पुढे.

राधा विचार करते, ‘ईतके दिवस असे काही वाईट प्रसंग घडले नाही, पण जेव्हापासून ते लिंबू सापडले, तेव्हा पासून अशुभ घटना घडत आहेत.’

तिला फार काळजी वाटू लागली होती.
नको नको ते विचार डोक्यात येऊ लागले होते.

ती देवाची मनोभावे पूजा करते आणि देवाकडे घराच्या सुख, शांतीसाठी प्रार्थना करू लागते.
नेहाचे मन आता सतत बेचैन राहू लागले होते. ती खूप प्रयत्न करायची मन रमावे म्हणून; पण काही उपयोग होत नव्हता, मनात सतत नकारात्मक विचार डोके वर काढत होते.


राज आणि नरेशला तिची अवस्था कळत होती. दोघेही तिचे मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते.

नेहा हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागली होती. ती आता छोट्या छोट्या गोष्टींना देखील घाबरु लागली होती. तिची झोप कमी झाली होती, भूकही मंदावली होती. वरचेवर आजारी पडू लागली होती.

डिप्रेशनमुळे तिला अनेक समस्या उद्भवू लागल्या.

नरेश तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जातो.

नेहाच्या अंतर्मनात इतकी भीती बसली की, ती तिचे आधीसारखे आयुष्य जगणे विसरली होती. घराच्या चार भिंतीत स्वतःला कोंडून घेतले होते.

नरेश आणि राज दोघेही चिंतित झाले होते.
उत्साहाचा झरा असणारी नेहा उदास राहू लागली होती.

सतत खोल विचारात राहू लागली होती.

आई अशी सतत उदास राहते ,हे पाहून राज विचार करतो कुठेतरी बाहेर फिरून आले की आईला ताजेतवाने वाटेल.

तो तिला म्हणतो,
“आई, तू, मी आणि बाबा कुठे तरी बाहेर फिरायला जाऊयात.”

“नको, नको मला भीती वाटते.” नेहा.

“आई, काय हे कसली भीती? आम्ही आहोत की.” राज.

“नाही! मी कुठेही बाहेर पडणार नाही.” नेहा.
“पण का आई?” राज काकुळतीला येत म्हणाला.
“तुला सांगितले ना एकदा मी येणार नाही, विषय संपला.”

राजला नेहाचा प्रचंड राग आला होता.
तो रागातच म्हणाला,
“आई, असे तू किती दिवस वागणार आहेस? मी आणि बाबा किती टेंशनमध्ये आहोत. तू आधीसारखी आमच्याशी बोलत नाही. कोणत्या गोष्टीत रस दाखवत नाहीस. रात्रीची नीट झोपत नाहीस. सतत विचारात गुंतलेली असते. घराच्या बाहेर पडत नाहीस. सगळं काही ऑनलाइन मागवतेस. घरात बसून बसून तुझा लठ्ठपणा वाढतो आहे, त्यामुळे तू निरुत्साही झाली आहेस. कधी नव्हे ते, तू सतत आजारी पडते आहेस. आई, डोक्यातून सगळे विचार काढ. तू आधी होती तशी आनंदी रहा. तू खुश तर, मी आणि बाबा देखील खुश.

हे सर्व ऐकून नेहाला रडू कोसळते.

राज नेहाचे हात हातात घेत म्हणाला,
“आई, तूच मला लहानपणी सांगायचीस की, आपण नेहमी खंबीर राहिलो की, समोरून कितीही वादळे आली तरी, आपल्यावर त्याचा काही फरक पडत नाही, आणि आता तूच अशी वागते आहेस?”

नेहा फक्त ऐकत होती.

राज पुढे बोलू लागला,
“आई, तुला आठवतंय का? मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात किती डिप्रेस झालो होतो? तेव्हा तू म्हणाली होती,

“आजूबाजूच्या वाईट लोकांचा आणि घटनेचा आपल्या मनावर अजिबात परिणाम होऊ द्यायचा नाही. आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल तर आपण संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. पण जर का आपलं मनच आपल्या ताब्यात नसेल तर सारं जग आपल्यावर राज्य करायला टपलेलं असतं.”
तिला राजचे बोलणे ऐकून थोडा धीर आला होता. राजच्या बोलण्यात तथ्य होते.
किती तरी दिवासाने तिच्या चेहऱ्यावर हसू आले होते.
“ बरं! कधी जायचे फिरायला?” नेहा डोळे पुसतच म्हणाली.
राजने नेहाला मिठी मारली.
“राज, चल मी छान आलं टाकून चहा बनवते आणि तुला आवडते तशी कांदा भजीही करते.”

आईला पूर्वीसारखे वागताना पाहून राजच्या जीवात जीव आला.

नक्कीच आई आता पहिल्यासारखी वागेल, अशी त्याला खात्री पटली.

नेहामध्ये झालेला बदल तात्पुरता होता की नेहमीसाठी?
ह्याचे उत्तर शोधण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.
क्रमश:
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला? कमेन्टमध्ये नक्की सांगा. लाईक, शेयर जरूर करा.
मला फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all