आपल्या समाजव्यवस्थेतील मराठी माणसाचा सगळयात मोठा दोष कोणता आहे?

आपल्या समाजव्यवस्थेतील मराठी माणसाचा सगळयात मोठा दोष कोणता आहे?

वैचारिक लेख:

आपल्या समाजव्यवस्थेतील मराठी माणसाचा सगळयात मोठा दोष कोणता आहे?
   आज कित्येक मराठी भाषा प्रेमींची हीच एक तक्रार आहे की आपली मराठी भाषा ही आंतरराष्टीय पातळीवर इंग्रजी भाषेच्या बरोबरीने का वापरली जात नाही?अणि खुप मराठी भाषा प्रेमींना हा पण प्रश्न पडतो की माझी माय मराठी तर कोणत्याच बाबतीत कमी नाही?मग तिचा आंतरराष्टीय पातळीवर इंग्रजी भाषेप्रमाणे वापर का केला जात नाही? का कित्येक देशांनी भाषिक संभाषणासाठी इंग्रजी भाषेला प्रथम प्राधान्य दिले आहे?माझी मराठी भाषा तर कोणत्याच बाबतीत कमी नाही मग तिचा वापर आंतरराष्टीय पातळीवर का केला जात नाही?.म्हणुन मराठी साहित्य तसेच भाषा प्रेमी मराठी भाषेला अभिजात राष्टभाषेचा दर्जा मिळावा म्हणुन पदोपदी आंदोलने करताना दिसतात अणि त्या आंदोलनातुन एकच मागणी करतात की आमच्या मराठी भाषेला अभिजात राष्टभाषेचा दर्जा देण्यात यावा.
     पण आपण हा विचार करतो का की आपली मराठी भाषा इंग्रजी भाषेच्या तुलनेत कमी का व कुठे पडती आहे?का मराठी माध्यमातील शाळा बंद पडता आहे?का आपली तरुण पिढी डाँक्टर,इंजिनिअर अशा इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे वळते आहे?का मराठी भाषेच्या माध्यमातुन उच्च शिक्षण करायला तरुणाई संकोच बाळगते आहे?.याला कारणीभुतही आपलाच मराठी भाषिक समाज आहे.कारण आपल्या मराठी माणसाचा एक स्वभाव आहे जिथे आपले स्वार्थ आहे तिथेच जायचे.जिथे आपल्याला कमी मेहनत अणि भरपुर पैसा मिळेल तिथेच जायचे.म्हणजे खिसा भरेल पण राहतो अणि डोक्याला जास्त ताणही पडत नाही.म्हणजेच जिथे स्कोप आहे तिथेच आपल्या मराठी माणसाला जायचे आहे.का तर तिथे पैसा खुप आहे.सर्व जण तिथेच जाऊ राहिले म्हणुन आपण पण तिथेच जायचे.असा दृष्टिकोण आपल्या मराठी माणसाचा झाला आहे.
   त्यामुळे आज जर पाहायला गेले तर दहावी बारावीनंतर लगेचच कित्येक विद्यार्थी हे डिप्लोमा इंजीनियरिंगकडे वळतात.का तर तिकडे स्कोप आहे.मराठीमध्ये शिक्षणाला स्कोप नाही.मराठीत शिक्षण करणारयांना नोकरीच्या संधी कमी असतात.म्हणुन सर्व जण डिप्लोमा,इंजिनिअरींगकडे वळतात.म्हणजेच प्रत्येकाला धावत्या गंगेत आपला हात धुवायचा आहे.जिकडे पाण्याचा ओघ जातो आहे तिकडे सर्वाना जायचे आहे.पण इथे परिवर्तनाची जबाबदारी घ्यायलाच कोणी तयार होत नाही.हा आपल्या मराठी माणसाचा सगळयात मोठा दोष आहे.
    अणि मग हाच मराठी माणुस म्हणतो की माझी मराठी भाषा कुठे कमी पडती आहे?ती इंग्रजी भाषेच्या बरोबरीने का गणली जात नाही.पण याला कारणीभुतही आपलाच मराठी भाषिक समाज आहे जो परभाषेतील शिक्षणाकडे एवढा आकृष्ट झालेला आहे की त्याला आपल्या मराठी भाषेचा कंटाळा यायला लागला आहे. 
   इंग्रजी भाषा ही जागतिक पातळीवर गणली जाते.जास्तीत जास्त प्रमाणात अंतरराष्टीय पातळीवर भाषिक संभाषणासाठी वापरली जाते.याला कारण इंग्रजी भाषिकांचे त्यांच्या भाषेवरचे प्रेम अणि निष्ठा कारणीभुत आहे.त्यांनी इतर भाषांकडे जास्त लक्ष दिलेच नाही त्यांनी फक्त आपल्या भाषेत काय परिवर्तन घडवता येईल?काय नवनिर्मिती करता येईल जेणेकरून ती इतर भाषेंच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर राहिल.जास्तीत जास्त लोक तिचा वापर करतील तिला पसंती देतील याकडे त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रीत केले.म्हणुन इंग्रजी भाषा आंतरराष्टीय पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहे अणि प्रत्येक देशात ह्या भाषेचा भाषिक संभाषणासाठी जास्तीत जास्त करुन वापर केला जातो.म्हणुन आपण म्हणतो परदेशात जर जायचे तर इंग्रजी शिकावीच लागेल.कारण ती भाषा परदेशात व्यवहारासाठी,विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी,संवादासाठी अनिवार्य आहे.म्हणुन परदेशात जायचे तर इंग्रजी शिवाय दुसरा पर्याय नाही.
   अणि याला कारण इंग्रजी भाषिक समाजाचे आपल्या भाषेवरची निष्ठा अणि प्रेम आहे की त्यांनी इतर भाषांना जास्त प्राधान्य न देता आपल्या भाषेला जगभरात पहिले प्राधान्य कसे मिळेल याचा विचार केला.तिला घडवले तिला निर्मितीशील बनवले.अणि आज तीच भाषा जगभरात वापरली जाते.
  आपल्या भाषेवरची ही निष्ठा अणि हे प्रेम आपल्या मराठी भाषिक समाजाच्या लोकांमध्ये आहे का?हा एक खुप मोठा चर्चेचा विषय आहे.अणि ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावयास गेले तर आपल्याला एकच उत्तर मिळते.की आपल्या मराठी भाषिक समाजाला इंग्रजी भाषिक समाजाच्या लोकांच्या बरोबरीने आपल्या भाषेवर प्रेम तसेच निष्ठा नाही.कारण जर आपल्या मराठी भाषिक समाजाचे जर इंग्रजी भाषिक समाजाएवढे आपल्या भाषेवर प्रेम असते.तर आपला मराठी भाषिक समाज एवढया मोठया प्रमाणात इंग्रजी भाषेतील शिक्षणाकडे आज वळताना दिसुन आलाच नसता.ते ही केवळ भरपुर पैसा मिळतो आहे त्या भाषेतील शिक्षणात म्हणुन तर नाहीच नाही.
    याला कारण एकच आहे की आपला मराठी भाषिक समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यायला तयार नाही,अणि ते परिवर्तन  घडवुन आणत असताना ज्या अडी अडचणींना सामोरे जावे लागते त्यांना सामोरे जायला आपला मराठी भाषिक समाज तयार नाही.कारण परिणामांचा विचार करूनच आपला मराठी भाषिक समाज माघार घेऊन घेतो.म्हणुन आज आपण इंग्रजी भाषेचे गुलाम झालो आहोत.संपुर्णपणे तिच्या आहारी गेलो आहोत.
   कारण आपल्या स्वभाषेला उच्च प्रतीचा दर्जा मिळवुन देण्यासाठी जी मेहनत,समर्पण,त्यागाची भावना अणि मातृभाषेवरची नितांत निष्ठा श्रदधा हवी.ती आपल्या मराठी भाषिक समाजात नाहीये.अणि जरी ही त्याग,समर्पणाची भावना,भाषेवरचे नितांत प्रेम निष्ठा मराठी भाषिक समाजात कोणात जर असेल तर ती ही लोक बोटावर मोजण्याइतकीच आहेत.जी आपल्या मातृभाषेसाठी काहीही करू शकतात.तिच्या प्रेमाखातर कशाचाही त्याग करू शकतात.असे आपणास दिसुन येते.म्हणुन आज आपली माय मराठी आज खितपत पडत चालली आहे.आपल्या मराठी भाषिक समाजासाठी पोरकी होत चालली आहे.याला कारणीभुत आपला मराठी भाषिक समाजच आहे.
  अणि आपल्या मराठी समाज व्यवस्थेचा सगळयात मोठा दोष हाच आहे की तो जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळावा यासाठी इंग्रजी भाषेतील शिक्षणाकडेच वळतो आहे.प्रत्येकाला इंग्रजी भाषेच्या माध्यमातुन शिक्षण घेऊन डाँक्टर किंवा इंजीनियर बनायचे आहे.त्यात आपल्याला जगासमोर सांगायला खुप अभिमान अणि गौरवही वाटतो की मी एम बी बी एस करतो आहे.किंवा मी आयटी इंजिनिअरींग करतो आहे.पण कोणालाच आपली मातृभाषा मराठीच्या माध्यमातुन उच्च शिक्षित होऊन मोठे व्हायचे नाही आहे.
  कारण आपल्या मराठी माणसाला समाजासमोर स्वताला मराठी म्हणवुन घ्यायला खुप मोठा अभिमान तसेच गर्व वाटतो.पण त्याच मराठी भाषेतुन शिक्षण घ्यायला तसेच तो मराठीतुन शिक्षण घेतो आहे हे समाजासमोर सांगायला त्याला लाज वाटते.कमीपणा वाटतो.त्याच्या मनात हाच विचार येतो की लोक काय म्हणतील.अणि लोक हे असे असतात की तुम्हाला पायीही चालु देणार नाही अणि घोडयावरही बसु देणार नाही.कारण त्यांचे एकच काम असते फक्त तुमचे पाय ओढायचे.कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला फक्त विरोध करायचा.तुम्हाला कमजोर पाडायचे.पण आपल्याला हे कळतच नाही.म्हणुन आपण आयुष्यभर लोकांच्या धाकातच जगतो की लोक काय म्हणतील?अणि हाच मोठा दोष आहे मराठी माणसामधला की तो त्याला काय करायचे? याचा विचार न करता लोकांना काय हवे आहे?त्यांना काय आवडेल याचा तो जास्तीत जास्त विचार करतो.त्याकारणानेच तो आयुष्यभर मन मारुन जगतो.अणि तसाच मरुनही जातो.ते ही केवळ लोकांना खुश करण्यासाठी त्यांची मने राखण्यासाठी.
   भाषा ही कोणतीच वाईट नसते.तसेच ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठही नसते.सर्व भाषा ह्या मानवी अभिव्यक्तीची साधने,माध्यमे आहेत.ज्यादवारे आपण एकमेकांजवळ आपल्या भावना,विचार व्यक्त करतो.पण आपली मराठी भाषा जागतिक पातळीवर उपयोगास येत नाही.म्हणुन इंग्रजीकडे वळायचे अणि आपल्याच मातृभाषेकडे इतके दुर्लभ करायचे की ती परभाषेसमोर आपल्यालाच एकदम किचपट वाटायला लागावी हे कितपत अणि कुठपर्यत योग्य आहे? अणि ह्याला दोषी दुसरा कोणी नसुन आपलाच मराठी भाषिक समाज आहे.जो आज परभाषेवर इतके प्रेम करतो आहे की तो आपल्या मातृभाषेलाच विसरत चालला आहे.आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करतो आहे.म्हणुन महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात इंग्रजी माध्यमातुन शिक्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे.अणि मराठी माध्यमातुन शिक्षण घेण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे.मराठी माध्यमातील शाळा,महाविदयालये बंद पडण्याची वेळ आली आहे.कारण शाळा,महाविदयालयात पाहिजे तितके विदयार्थीच येत नाही मग अशा परिस्थितीत शिक्षक तरी कोणाला शिकवतील?अशी समस्या निर्माण झाली आहे.
  अणि खरे पाहायला गेले तर कोणतीही भाषा जन्मताच समृदध किंवा उच्च दर्जाची नसते.मानवी अभिव्यक्तीसाठी आपणास जी भाषा सोपी पडते.जी भाषा जास्त प्रमाणात अभिव्यक्तीसाठी वापरली जाते.तिच्याकडे लोकांचा कल वाढत जातो.मग त्याच भाषेचा वापर जास्त प्रमाणात वाढत जातो.अणि मग आपण त्या भाषेच्या इतक्या आहारी जातो की आपण इतर भाषा अणि त्यांचे महत्वच विसरुन जातो.अणि मग तीच एक भाषा जागतिक पातळीचा दर्जा गाठते.
   म्हणुन आपणही आपल्या मराठी भाषेला इंग्रजी भाषेच्या बरोबरीने जागतिक पातळीचा दर्जा मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.आपल्या भाषेला अधिक समृदध कसे बनवता येईल याकडे आपण बारकाईने लक्ष द्यायला हवे.त्यासाठी आपण आपल्या भाषेत नवनिर्मिती केली पाहिजे.तिला अजुन निर्मितीशील बनवले पाहिजे.मग आपली मराठी भाषाही एकदिवस इंग्रजी भाषेच्या बरोबरीने जागतिक पातळीवर व्यवहारात,बोलीत,आंतरराष्टीय पातळीवर जगभरात उपयोगात आणली जाईल.पण त्यासाठी आपण आपल्या भाषेवर निष्ठा अणि प्रेम ठेवणे हे फार गरजेचे आहे.कारण आपल्या आईच्या मानसन्मानाचा विचार आपणच नाही केला तर मग इतर लोक तरी कुठे तिच्या सन्मानाचा विचार करणार आहे?म्हणुन आधी आपण आपल्या भाषेची महती समजायला हवी.मग त्यानंतर जगाला तिची महती कळायला जास्त वेळ लागत नाही.
   काही चुकले तर माफी असावी मी फक्त ह्यात माझे वैयक्तिक मत मांडले आहे.बाकी ते मान्य करायचे की नाही तो आपणा सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण माझ्या ह्या बोलण्याचा एकदा तरी नक्की विचार करा मला खात्री आहे तुम्हालाही माझे मत नक्की पटेल.