रात्रीचे 9 वाजून गेले होते. बाहेर संध्याकाळी असणारी सुंदर हवा, मी जेवण करून आमच्या नेहमीच्या ठिकाणी सगळे जण एकत्र जमलो होतो, आमच्या नेहमीच्या बागेजवळच्या झाडाजवळ. तसा आमचा ग्रुप 7-8 जणांचा. त्यातली अजून दोघे आले नव्हते. आम्ही सगळे इंजिनीरिंग ला शेवटच्या वर्षाला शिकत होतो. इथे येऊन आम्ही फक्त मजा आणि आयुष्यात काय केलं आणि काय केलं नाही या विषयावर खूप वेळ गप्पा मारायचो.
अर्धा तास होऊन गेला असेल, आम्हाला रस्त्याच्या पलिकडच्या बाजूने एक आकृती चालत येताना दिसली. कोण असेल बरे, म्ह्णून आमच्यात ककही बोलणं चालू होतं. जशी ती आकृती लाईट च्या दिव्याखाली आली तशी आम्हाला एक मुलगी दिसली. अंगावरती पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म घातलेला होता, आम्हला समजला वेळ लागला नाही की ती एक नर्स आहे. साधारण 20-22 वर्षांची असेल, ती जशी आमच्या जवळून जाऊ लागली, तशी ती अगदी स्पष्टपणे आम्हाला बघू शकत होती, तिच्या चेहऱयावर एक वेगळाच तणाव जाणवत होता, तिला काय होतंय हे कळत नव्हतं.
आम्ही थांबलेलो त्या झाडाच्या पलीकडच्या बोळातूनच तिला पुढे जायचे आहे हे लक्षात आलं. आमच्यातल्या बऱयाच जणांचं तिच्याकडे लक्षही नव्हतं. पण नंतर एक गोष्ट लक्षात आली, आम्ही खूप मुलं एकाच ठिकाणी थांबलेलो होतो, बहुदा यामुळे तिला असुरक्षित वाटत असेल. ती रस्त्याच्या पलीकडच्या बाजूलाच थांबली. ती तिथे बराच वेळ थांबलेली, शेवटी न राहवून मी तिच्याकडे गेलो, तशी ती आणखीनच घाबरली.
"हॅलो, आपल्याला काही मदत हवी आहे का?" मी लांबूनच विचारलं. पण ती यावर काहीच बोलली नाही.
मी पुन्हा म्हणालो, "माफ करा, पण एवढ्या उशिरा तुम्ही इथून चालला आहात म्हणून विचारू असं वाटलं, आपण कुठे राहता.?"
"विवेकानंद सोसायटी." इतकंच ती म्हणाली, आणि परत शांत झाली.
विवेकानंद सोसायटी आम्ही थांबलेलो तिथून फार लांब नाही पण किमान 3-4 किमी नक्कीच असेल, आणि पायी चालत जाण्यासाठी तसेही ते अंतर फार होते, आणि एवढ्या रात्री तर नक्कीच सुरक्षित नव्हते.
"माफ करा, पण याआधी तुम्हाला कधी पाहिलं नाही आणि एवढ्या रात्रीचं आपण कुठून येत आहात?" न राहवून मी विचारलं.
"मी नर्स आहे. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये काम करते. रोज 7 ला घरी जाते मी. पण आज पेशंट ची संख्या जास्ती असल्याने मला काम पूर्ण करायला वेळ लागला. आणि आज एवढ्या रात्री मला रिक्षाही नाही मिळाली, म्हणून मी चालत चालले होते." ती अजूनही खूप घाबरलेली होती.
"तुम्ही घरात फोन करून कळवलं आहेत का? फार वेळ झाला, म्ह्णून म्हणलं."
"नाही ना, माझा मोबाईल नेमका बंद पडलाय, आणि इथून पास होताना इतक्या मुलांचा घोळका पाहून थांबले, उगीच मनात नाही नाही त्या शंका येत होत्या!"
"असुरक्षित वाटणं सहाजिक आहे, पण काळजी नका करू, आम्ही तशी मुलं नाही आहोत." मी अगदी काळजीनं म्हणालो तिला.
"हो, तुम्ही इतकी विचारपूस करता यावरून कळलं मला." तिला आता थोडं बरं वाटत होतं.
"तुमची काही हरकत नसेल, तर तुम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था करू का? खप उशीर झालाय तुम्हाला." मी पुन्हा जरा काळजीनं विचारलं.
"नको, नको. ठीक आहे सगळं, जाईन मी." ती नकार देत म्हणाली.
"तुम्हाला जवळपास 3-4 किमी जायचंय, फार उशीर सुद्धा झालाय आणि यावेळी बाहेर जाणं, थोडस ठीक नाही आहे."
"नको, मी जाईन." पुन्हा ती म्हणाली.
काही तरी अडचण आहे हे लक्षात येत होतं, पण ती ऐकायला तयार नव्हती, शेवटी आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आम्ही सगळी मुलं बघून ती नाही म्हणती आहे. तिला अजूनही असुरक्षित वाटतंय.
"तुम्हाला माझ्या एका मैत्रिणी बरोबर घरी जाण्याची व्यवस्था करू का?"
ती थोडवेळ थांबली, आणि म्हणली "चालेल!"
लगेच इथेच राहणाऱ्या आमच्या ग्रुप मधल्या एकाला मी फोन करायला सांगितलं, ती जवळच राहत असल्याने लगेच आली.
दोघींची ओळख करून दिली, आणि कुठं सोडायचं हे सुद्धा सांगितलं.
"Thank you so much.! आभारी आहे आपली!" इतकं म्ह्णून ती गाडी वरती बसली.
मी फक्त स्मित हास्य केलं. आणि गाडी तिथून निघून गेली.
पुन्हा आमच्या ग्रुप मध्ये येऊन थांबलो. पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या. पण माझं लक्ष लागत नव्हतं.
मी स्वतःच म्हणलेलो वाक्य मला पुन्हा आठवत होतं, 'आम्ही तशी मुलं नाही आहोत ' म्हणजे नक्की कशा प्रकारची? ज्या मुलांमुळे मुलीला असुरक्षित वाटतं तसली? मग तशी तर आम्ही होतोच की मगाशी! आम्हाला बघून ती मुलगी दचकली, तिला आमच्या बाजूच्या रस्त्यावरून जाऊही वाटत नव्हतं. पण मी जेव्हा विचारपूस करायला जवळ गेलो तरी, तिला भीती वाटली. म्हणजे आम्ही इतकं वाईट आहोत, असं तिला वाटलेलं. असं वाटण्या मागचं कारण मला आपोआपच लक्षात आलं.
भारत हा एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा देश असला तर्री इथे महिलांना असुरक्षित वाटतं, त्यांना रस्त्यावरून एकट्याला फिरणं देखील खूप जिकिरीचे वाटतं, असं का? तर याचं उत्तर काही आकडेवारी देते.
167 देशाचा यादीत महिलांच्या सुरक्षितता मध्ये भारतचे स्थान 133 वे आहे. भारता मध्ये दर 2 मिनिटाला एक स्त्री अत्याचार ला सामोरे जाते. दर 10 मिनिटाला एक स्त्री वर बलात्कार होतो. मागच्या फक्त एका वर्षात 30,000 हुन अधिक बलात्काराच्या केसेस नोंदल्या गेलेल्या आहेत. हा आकडा इतका प्रचंड आहे, की साहजिकच रस्त्यावरून जाताना अनोळखी मुलांकडे बघून कोणतीही स्त्री स्वतःला असुरक्षित समजते. मुलांचा एखादा घोळका जरी रस्त्यावर दिसला तरी मुली तिथून जाण्याचा विचार 10 वेळा तरी नक्की करते. मग प्रश्न येतो, की या सगळ्या गोष्टीला जबाबदर कोण? आम्ही सरसकट सगळी मुलं? की रस्त्यावर फिरतानाचा असणारा मुलींच्या कपड्यांची उंची मोजणारा समाजातील एक घटक? की काम करणाऱ्या सगळ्या महिला? की निर्लज्ज पणे एखाद्या महिलेकडे बघत बसणारी काही टवाळकी? कोण जबाबदार नक्की.
असे खूप सारे प्रश्न मनात येत असतानाच, आमची मैत्रिण तिथे अली, त्या मुलीला सुरक्षित घरी सोडून! ती ही मग लागचेच घरी परतली. तेंव्हा मात्र बरं वाटलं, ते सगळं पाहून, आणि पुन्हा एकदा म्हणू वाटलं, 'आम्ही तशी मुलं नाही आहोत'. पण खूप सारे प्रश्न अजूनही बाकी होते, 'तशी मुलं!'......
©आदित्य सदाशिव माळी
___________________________________________
*All rights are reserved by Writer.