वाघिण

आईवडील अपघातात मृत्यू पावले. यानंतर आजी आजोबांनी लक्ष्मीचा सांभाळ केला. आजी आजोबा नंतर मामीने तिचे लग्न एका मतीमंद मुलाबरोबर लावून दिले.


वाघिण

"अगं, लक्ष्मी लहान आहे. तिचे अजून लग्नाचे वय नाही झाले गं. एक दोन वर्षे जाऊ दे, मग लग्नाचं बघुया की. तिच्या पाठवणीची इतकी घाई का करतेस? जरा शिकू दे पोर. जरा काही दिवस आपल्याजवळ राहू दे. लग्न तर करायचे आहेच गं, पण करु की दोन वर्षांनी."

"इतकी वर्षे थांबायची काही गरज नाही. वयात आलेल्या भाचीला घरात ठेवून, आपल्या मुलीचे लवकर लग्न करून दिले, म्हणून लोकं तोंडात शेण घालतील. ते काही नाही, आधी लक्ष्मीच्या लग्नाचे उरकून देऊ मग शैलजासाठी स्थळ बघू." मामीने ठसक्यात म्हटले. मामा शांतच बसला.

लक्ष्मी सर्जेरावांची भाची. लक्ष्मी वर्ष दिड वर्षाची असेल, तेव्हा एकदा एका नातेवाईकांचे लग्न आटोपून लक्ष्मीचे आईवडील आपल्या गाडीवरून येत होते. लक्ष्मी आपल्या आईच्या कुशीत बसलेली होती. तोच समोरून एक मोठा ट्रक सुसाट वेगाने आला आणि त्याने लक्ष्मीच्या वडिलांच्या गाडीला जोरात धडक दिली. त्यामुळे लक्ष्मीच्या वडिलांचा गाडीवरून ताबा सुटला, ते जोरात पलीकडे फेकले गेले. त्याचबरोबर तिची आईदेखील दुसरीकडे फेकली गेली. तो अपघात इतका भयानक होता की ते दोघेही जागीच गतप्राण झाले. पण म्हणतात ना, \"देव तारी त्याला कोण मारी\" तसेच झाले. लक्ष्मी एका बाजूला गवताच्या पेंढ्या होत्या तिथे जाऊन पडली, तिला काहीही इजा झाली नाही.

आईवडील लहान वयातच गेले, ती लहानगी लक्ष्मी समज येण्याआधीच आईवडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली. तिची आजी तिला आपल्या जवळ घेऊन आली. आजी आजोबांच्या मायेच्या ओलाव्यात तिला तिच्या आईबाबांची काही कमी भासली नाही. तिचा मामापण तिला आपल्या हातावरील फोडाप्रमाणे जपायचा. कालांतराने आजी आजोबांचा मृत्यू झाला. आजीची जागा मामीने घेतली. पण फक्त तिने जागाच घेतली, माया ममता हे तिच्या स्वभावात नव्हतेच. होते ते फक्त कडवट बोलणे, टोचून बोलणे किंवा वेळप्रसंगी शिव्या शाप देणे इतकेच. मामा तसा शांत संयमी होता. त्याला लक्ष्मीवर होणारे अत्याचार कळत होते, पण त्याचा नाईलाज होता.

शैलजा मामाची मुलगी. लक्ष्मी आणि शैलजामध्ये एक दोन वर्षाचेच अंतर होते. शैलजा दिसायला ठिकठाक, अभ्यासात लक्ष कमी पण रिकामटेकडे उद्योग करण्यात मात्र हुशार होती. या उलट लक्ष्मी, सर्व गुण संपन्न होती. अभ्यास, स्वयंपाक करण्यात उत्तम, दिसायला खुप सुंदर होती. तिच्या देखणेपणामुळे मामीचा जळफळाट व्हायचा. तिच्या समोर मामीला आपली शैलजा जरा डावीच वाटायची.

लक्ष्मी वयात आली तेव्हा तिचे रुप आणखीन खुलले. सर्वांना मोहनी घालावी असे ते सौंदर्य होते. आता मात्र हिला कुठेतरी स्थळ बघून लवकरात लवकर लग्न करून द्यायचे, असा मामीने निर्णय घेतला. तिच्या सुंदरतेमुळे तिला चांगली स्थळे येणार, हे मामीला माहीत होते. म्हणून मामीने लग्नात हुंडा न मागणारा, लग्नाचा सगळा खर्च तेच करतील, असा मुलगा आपल्या भावाला शोधायला सांगितला. मामीच्या भावाने आपल्या बहिणीच्या सूचनांचे अगदी तंतोतंत पालन करत, लक्ष्मीसाठी गावातील पाटलाच्या मुलाचे स्थळ सुचवले. मामीने सुद्धा पटकन होकार दिला.

कांदापोहेचा कार्यक्रम ठेवला. पाटील आणि पाटलीन बाई दोघांच आले होते. मुलगा कामात व्यस्त असल्यामुळे येऊ शकत नाही, असे कारण त्यांनी पुढे करत त्यांनी मुलाचा फोटो सगळ्यांना दाखवला आणि त आमची जी पसंत तिच त्याची पसंती असे सांगत लक्ष्मी त्यांना सून म्हणून पसंत आहे असे सांगितले. लक्ष्मीच्या मामीने सुद्धा लगेच लक्ष्मीला स्थळ पसंत आहे सांगुन दिले.

"आम्हाला पुढच्या आठवड्यात मुहूर्त पाहून लगेच लग्न करायचे आहे. लग्नाचा सारा खर्च आम्ही करतो तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या." असे म्हणत पाटील जोडपं निघून गेले.

"तुझ्या आईबाबांच्या पुण्याईने तुला असे मोठे घरंदाज घर मिळाले हो! लक्ष्मी, तू खूप नशीबवान आहेस, तू तिथे राज्य करशील." मामी अगदी कुत्सितपणे म्हणाली.

मामाच्या डोळ्यात पाणी आले. लक्ष्मी तर लहान बाळासारखी मामाला बिलगून रडू लागली.

लक्ष्मीला हळद लागली. आज मेहंदी पण झाली. हळदीने लक्ष्मीच्या चेहऱ्यावर खूप तेज आले, मेहंदीच्या हातात हिरवा चुडा खूप खुलून दिसत होता. लग्नाची मंगल घटिका जवळ आली तशी लक्ष्मीच्या ह्रदयाचे ठोके जलद गतीने वाढत होते. काहीशी लाजत, काहीशी घाबरत ती लग्नमंडपात उभी राहिली.

"नवऱ्या मुलाला बोलवा." भटजी म्हणाले.

"आज माझे लग्न, मी आज नवरा बनलो. मी खऱ्याखुऱ्या घोडीवर बसणार. चल मेरे घोडे टुकटुक, टुकटुक!" असा आवाज आला.

आवाजाच्या दिशेने लक्ष्मीने बघितले तर एक तरुण मुलगा, डोक्यावर जरीचा फेटा, अंगांत सुंदरशी शेरवानी, श्रीमंतीचा रुबाब, असा तो दिसत होता. तो लक्ष्मीच्या दिशेने येत होता. तो एकच वाक्य सारखे बडबडत होता आणि लहान मुलासारखे उड्या मारत होता.

"हो हो धाकले मालक, तुमचेच लगीन हाय. हळूहळू चाला, नाही तर पडाल. चला मी धरलाय न हात तुमचा." त्याच्या शेजारी दोन माणसं बोलत, त्याला सांभाळत, त्याला लक्ष्मीजवळ घेऊन आले. हे बघून लक्ष्मी एखदम भोवळ येऊन धाडकन जमिनीवर पडली.

लक्ष्मीच्या मामीने त्याच्या भावाला सुचवल्याप्रमाणे, त्यांनी अगदी एकही पैसा खर्च करावा लागू नये असे श्रीमंत पण एका मतिमंद मुलाचे स्थळ लक्ष्मीसाठी सुचवले होते, ज्याला मामीने एकदम होकार दिला होता.

"सूनबाई, आल्या का शुध्दीवर? जरा गर्दी कमी करा. अरे शाम्या, ये शाम्या तो ज्युस आण लवकर, वहिनी साहेबांना दे." एक कणखर आणि कडक आवाजात कोणीतरी म्हटले.

मोठ्याने बोलण्याचा आवाज आल्यामुळे लक्ष्मीने आपले डोळे हळूहळू उघडण्याचा प्रयत्न केला, तर तिला आपण कुठे आहोत हेच कळले नाही. तिने पटकन आपले डोळे बंद केले आणि पुन्हा तिच्या कानात कुजबुज ऐकू आली.

"बाय बाय वहिनीसाहेब काय सुंदर आहेत! धाकल्या धन्यानी नशीब काढलं हो." एका महिलेचा आवाज आला.

ते ऐकून लक्ष्मी ताडकन उठली. उठून बघते तर, तिने स्वतःला एका मोठ्या घरात असलेले बघितले. घर कुठे तो प्रशस्त वाडाच होता. तिच्या आजूबाजूला काही लोकं घोळका करून उभे होते.

"मी? हे घर? कुठे?" लक्ष्मी भांबावल्या नजरेने सगळेकडे बघत म्हणाली.

"अगं हो हो, इतकी अवघडून जाऊ नकोस. तू आपल्याच घरात आहेस, म्हणजे हे घर तुझेच आहे. तू या घरची एकुलती एक सून आहेस. हे बघ तिथे बाहेर व्हरांड्यात खेळतो आहे ना, तो तुझा नवरा म्हणजे आमचे चिरंजीव सुरज पाटील, इथे तुझ्या बाजूला बसली आहे ना, ती तुझी नणंद सुतेजा, या दोघी इथे उभ्या आहेत त्या आपल्या घरात काम करणार्या शांताकाकू,
आणि शीलाताई आहेत." असे म्हणत पाटलीन बाईंनी सर्वांची ओळख करून दिली. तोच समोरून एक रुबाबदार तरुण पांढरा कुर्ता पायजमा घातलेले कोल्हापुरी चप्पलांचा करकर आवाज करत आला. तो येताच पाटलीन बाई आपल्या डोक्यावर पदर सावरत हळूच उठून उभ्या राहिल्यात.

" हु! मग? आल्या का शुध्दीवर?" असे म्हणत त्याने लक्ष्मीवर एक कटाक्ष टाकला.

"हो हो! सयाजीराव तुम्ही इथे बसा. बरं का लक्ष्मी, हे तुझे भाऊजी सुतेजाचे पतीदेव आहेत." पाटली बाई अगदी अदबीने म्हणाल्या.

\"हे जे बघतेय, ते स्वप्न आहे की खरे आहे.\" लक्ष्मीला काहीच कळत नव्हते.

रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर पाटिलीन बाई लक्ष्मीला आपल्या खोलीत झोपायला घेऊन गेल्या. लक्ष्मी मात्र खूपच गोंधळून गेली होती.

"हे बघ लक्ष्मी, आता तू या घरची सून आहेस. आमच्या नंतर तूलाच या घराचे घरपण सांभाळायचे आहे. तुझे सासरे कडक शिस्तीचे आहेत पण मनाने खूप चांगले आहेत हो. सुरजला तू पाहिले आहेसच, तर त्याच्याबाबतीत सांगायची गरज नाही. आम्हाला आमच्या नंतर आमच्या मुलाचे संगोपन करणारी, त्याची काळजी घेणारी, अशी संस्कारी मुलगी हवी होती. तू गाडी तशीच आहेस हो. आता आमची काळजी मिटली बघ. आणि हो आपल्या वाड्याच्या बाजूला जो दुसरा वाडा आहे, तिथे यांचे भाऊ रहातात. त्यांनी तुझ्या आजेसासऱ्यांची खोटी सही करून जमीन बळकावली होती. त्यांचे तिजोरीत असलेले पैसे चोरले होते. नाचणाऱ्या बाईच्या नादाला लागले, आणि सगळ्या वाईट व्यसनांच्या आहारी गेले. हे बघून आजोबांनी त्यांना घराबाहेर काढले. आजोबांनी मरेपर्यंत त्यांचे तोंड पाहिले नाही. आता ही आपली जमीन, आपली शेती आहे, ती तुझ्या सासऱ्यांनी स्वकष्टाने कमावलेली आहे. आता सर्जेराव मदत करतात, पण शेवटी ते आपले जावईच आहेत, त्यांना सगळे कामं सांगणे बरे दिसत नाही. म्हणून आता यापुढे तू लक्ष द्यायचे बघ. हे घे ही तिजोरीची चावी." असे म्हणत चाव्यांचा मोठा जुडगा लक्ष्मीच्या हातात देत पाटलीन बाईंनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

आजी गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तिला मायेचा स्पर्श जाणवला होता. त्या स्पर्शात इतके प्रेम, इतकी काळजी जाणवली की तिच्या हा लग्नाचा वाईट प्रसंग सुद्धा तिला आता कठीण वाटला नव्हता. आता हेच, इथेच आपले आयुष्य, असे म्हणत तिने आपल्या सासूला खाली वाकून पाया पडत नमस्कार केला. ते बघून त्यांचे डोळे पाणावले, त्यांनी तिला उचलून आपल्या छातीशी धरले.

लक्ष्मी आता एकेक करून सगळी कामे बघू लागली. शेतावर जाऊन तिथे पण लक्ष देऊ लागली. शिकलेली होतीच, त्यामुळे पैशाचे व्यवहार अगदी चोखपणे करत होती.

लक्ष्मीने आपल्या चांगल्या वागणुकीमुळे सासरी सर्वांची मने जिंकली होती स्वयंपाक करण्यात तर ती सुगरण होतीच. तिची आजी नेहमी तिला सांगत, घर जिंकायचं तर घरातील लोकांची मने जिंकायला हेवे, आणि मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो ती ते तंतोतंत पाळत होती. सुरजला सुद्धा ती एका लहान मुलासारखेजपू लागली होती.

बघता बघता दिवस पुढे सरकू लागले. लग्नानंतरची पहिली दिवाळी आली. लक्ष्मीचे मन माहेरी जाण्यासाठी तळमळत होते, पण तिच्या मामीमुळे तिने जाणे टाळले होते.

दिवाळीची खरेदी जोरात सुरू झाली होती. नव्या सूनेसाठी नवीन दागिने घडवायचे सासूबाईंचा अट्टाहास होता. लक्ष्मीला तर हे दागिने वगैरेचा काहीच मोह नव्हता, पण सासूबाईंनी आपल्या आवडीने लक्ष्मीसाठी सुंदर सुंदर दागिने घडवून आणले होते.

घरात फराळाची तयारी सुरू झाली. यावेळी प्रत्येक फराळ लक्ष्मीने आपल्या हाताने बनवला होता. मदतीला कामवाल्या बायका होत्याच, पण तरीदेखील तिने जितके होईल तितके तिने स्वतः केले. तिच्या हातची चव चाखून पाटील खुप खुश झाले.

दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे लक्ष्मीने सुगंधित उटणे लावून आपल्या नवऱ्याला आंघोळ घातली. नवीन कपडे घालून त्याची छान तयारी करून दिली. तिने घरात सर्वत्र फुलांची सजावट केली, दारासमोर सुरेख रांगोळी काढली. तिने घर खुप सुंदर पद्धतीने सजवले. यानंतर ती नवीन साडी, नवीन दागिने घालून तयार झाली.

"आज खरंच तू अगदी लक्ष्मी दिसत आहेस. कोणाची दृष्ट न लागो." असे म्हणत सासूबाईंनी तिची दृष्ट काढली.

दिवसभर घरात येणाऱ्या जाणाऱ्या नातलगांना, मित्रांना पाटिल आपल्या सूनेने बनवलेला फराळ देत तिचे गोडवे गात होते.

बघता बघता सुगीचे दिवस आले. लक्ष्मीने जातीने लक्ष देऊन शेतीमध्ये खूप सुधारणा केली होती.

पाटिल आपले फुललेल्या शिवारात उभे राहून लक्ष्मीची पाठ थोपटून म्हणाले," लेकी, तू खरी लक्ष्मी आहेस बघ. मी तुझा अपराधी आहे. मी तुझ्या मामीच्या सांगण्यावरून सुरजसाठी म्हणून तुला या घरी आणले, तो नवरा बनण्याच्या योग्यतेचा नाही हे माहिती असताना सुद्धा तुमचं लग्न लावून दिले. पण खरंच पोरी इथेच मी चुकलो. मला क्षमा कर बाळा."

त्यांच्या तोंडून बाळा शब्द ऐकून तिचं मन गहिवरून आले.

"नाही नाही आबा, माफी का मागता. जे माझ्या नशीबी होते तेच झाले. पण खरे सांगू का, मी इथे खूप आनंदी आहे. लहानपणीच मी माझ्या आई वडिलांच्या प्रेमाला मुकले, पण आता मला तुम्हा दोघांत माझे आईबाबा मिळाले." लक्ष्मी म्हणाली. त्यांनी मायेने तिच्या डोक्यावर थोपटले.


दोन दिवसांवर पिके काढायची होती. रात्री शिवारात राखणीसाठी चार कामगार नेमले होते. रात्रभर जागून ते पहारा देत होते.

\"अगं बाई, मी आज बाहेर वाळत घातलेले कपडेच आणले नाही. किती हा वेंधळेपणा माझा!\" झोपायला गेलेल्या लक्ष्मीला अचानक आठवले आणि ती ताडकन उठून बाहेर अंगणात कपडे आणायला गेली.

"कोण? कोण आहे तिकडे?" तिला कोणाचीतरी कुजबुज ऐकू येत होती.

ती आवाजाचा कानोसा घेत त्या दिशेने गेली, तशी अंगणातील झाडांचा सळसळ आवाज आला. कोणीतरी दबलेल्या पायाने हळूच पळ काढला असे तिला जाणवले. तशी ती पटकन कपडे घेऊन आत आली.

"आबाssss आबाssss तुम्हाला झोप लागली आहे?" तिने हळू आवाजात पाटलांना विचारले.

पाटलांना झोप लागली होती, त्यामुळे तिला काहीच प्रतिउत्तर मिळाले नाही. लक्ष्मी तिथून मागे फिरली. घरात कोपऱ्यात खुरपे पडले होते, ते उचलले आणि घराबाहेर पडली.

अंधार वाढू लागला होता. रस्त्यावर कुत्री भुंकत होती. गावाचे रस्ते सुनसान झाले होते. एकही माणूस बाहेर दिसत नव्हता. लक्ष्मी न घाबरता तशीच सपसप पाय उचलत चालू लागली.

लक्ष्मी आपल्या शेताजवळ आली तोच तिला दोन पुरुष हातात मशाल आणि तेलाचा डबा घेऊन उभे असलेले दिसले.

"ये कोण रे? काय करतात रे? एकेकाला चिरून काढीन. व्हा बाजूला!" असे म्हणत ती जोरात त्यांच्या मागे पळू लागली. इतक्यात तिला कोणीतरी मागुन पकडले.

"अजून शेत जळले सुद्धा नाही, ते विझविण्यासाठी तू पळते आहेस? आणि इतक्या दिवसांपासून माझ्या आत लागलेल्या आगीचे काय? ती कधी विझवणार? इतकी सुंदर बया तू, तुला त्या खुळ्याच्या पदरात टाकले. छ्छे...! अशाने तुझी जवानी बरबाद होईल. चल ये, मी तुला सगळे सुख देईन. चल माझी राणी. जेव्हा तू आंघोळ करून येतेस ना तेव्हा आमच्या छतावर चढून मी तुला रोज बघत असतो. आहाहा! काय ते तुझे रुप, काय तुझा तो कमनीय बांधा, काय तुझे हे...." तो बोलतच होता की लक्ष्मीने फाटकन त्याच्या कानफाडात मारली.

"अरे नालायका, मी तुझ्या मुलगी सारखी आहे, तू माझ्याकडे अशा नजरेने बघतोस? थ्थू.!" असे म्हणत तिने त्याच्या तोंडावर थुंकले.

हे ऐकून तो आणखीनच चिडला.

"अरे असे बघत काय बसलात? पेटवा, सारे शेत पेटवा, मी आता हिला बरोबर बघतो. आता तर हिच्या सासऱ्याचे नाक कापायचे आहेच. चल चल." असे म्हणत तो लक्ष्मीला ओढू लागला.

लक्ष्मी त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करू लागली. हा सुरू असलेला आरडाओरडा ऐकून शेतावर राखण करणाले कामगार पळत आले. तोपर्यंत त्यांनी शेतात पेटत्या मशाली टाकल्या होत्या, त्यामुळे शेत जळायला सुरुवात झाली होती.

इकडे लक्ष्मीला ओढत नेत त्याने तिला जमीनीवर पाडले. तिच्या पदरावर हात घालणार तोच लक्ष्मीने आपल्या हातातील खुरपे त्याच्या हातावर दाणकन मारले. तसा त्याचा हात कापला गेला. तो जोरजोरात ओरडत पळू लागला.

लक्ष्मी पटकन उठली, शेताकडे पळत येत हातातील खुरपे घेऊन जळलेले शेताची पिके सपासप कापू लागली, जेणेकरून आग पुढे न जाऊ नये. कामगार पण आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेवढयात अचानक मोठ्या पाईपने शेतावर पाण्याचा वर्षाव सुरू झाला. पाणी आले त्या दिशेने सर्वांनी पाहिले तर तिथे पाटील पाण्याचा टँकर घेऊन उभे होते.

"शाब्बास सूनबाई! आज आम्ही धन्य झालो. आम्हाला जशी हवी होती तशीच सून भेटली. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे."

"पण आबा, तुम्ही कसे काय आलात?"

"अगं, मला श्यामाने येऊन सांगितले. मी सयाजीरावांना पण फोन केला आहे, ते पोलिस कम्प्लेंट करून इतक्यात येतीलच. तू खरोखर वाघिण आहेस वाघिण!"

शेतीचे सगळे व्यवस्थित करून, सगळेजण घरीच परतले. लक्ष्मीच्या अंगावर काहीशी जळलेली साडी रक्ताचे डाग बघून सासूबाई एकदम घाबरल्या आणि रडू लागल्या.

"अहो रडताय काय, सूनबाईची आरती ओवाळा. लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात वाघिण आली आहे." असे म्हणत पाटलांनी लक्ष्मीची पाठ थोपटली.

सयाजीराव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करुन घरी आले.

"आता त्याला चांगलीच शिक्षा होणार, त्याचा एक हात तर गेलाच आहे, आता आयुष्य पण असेच काळकोठडीत संपणार." सर्जेराव म्हणाले.

"जा पोरी, निवांत झोप जा. माझी गुणाची पोर." असे म्हणत चहापाणी झाल्यावर पाटीलीन बाईंनी लक्ष्मीला आत पाठविले.

सकाळी उठल्यावर लक्ष्मीला घरात काही तरी उत्सव असल्यासारखे वाटले. घरात वेगळीच आरास केली होती.

\"आज तर कोणता सण नाही, काही नाही. तर घरात एवढी सजावट कशाला?\" असे मनात म्हणत लक्ष्मी स्वयंपाक घरात गेली.

"अगं नको, आज तू काही काम करावयाचे नाही." सासूबाई म्हणाल्या.

लक्ष्मीला काहीच कळले नाही, ती तशीच उभी राहिली.

"तयार झालात काय? पाहूणे आता येतीलच. लक्ष्मी कुठे आहे?" पाटलांचा आवाज आला.

"हो हो झाले झाले. लक्ष्मी तू आज नवी काठापदराची हिरवी साडी नेस." सासूबाई म्हणाल्या.

"बरं, पण कोण येणार आहेत?"

तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता सासूबाई आपल्या कामात व्यस्त झाल्या.

"या या, तुमचे स्वागत आहे." पाटील आनंदाने म्हणाले.

"लक्ष्मी बेटा, लक्ष्मी, तू तयार झाली, चल माझ्या बरोबर ये." असे म्हणत सासूबाईंनी तिला खोलीमधून बाहेर घेऊन आल्या.

सगळी पाहुणे बसलेली होती. सुचेता पण समोरच होती.

\"अरे हे तर ताईंच्या सासरची मंडळी आहेत.\" असे मनात म्हणत लक्ष्मीने आदराने सुतेजाच्या सासू सासऱ्याच्या पाया पडत नमस्कार केला.

"औक्षवंत हो! अष्टपुत्र, सौभाग्यवती हो बाळा." असा आशीर्वाद देत सुतेजाच्या सासूने तिला आपल्या जवळ बसविले.

\"अष्टपुत्र\" शब्द ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिने कोणालाही कळू न देता अलगदपणे डोळे पुसले.

"अगं पोरी l, आजच्या एवढ्या आनंदाच्या क्षणी रडायचे नसते, वेडीच आहे. हे बघ, आता हे तुझे होणारे सासू सासरे आहेत. सयाजीरावांनी आपले धाकटे बंधू, विलासरावांसाठी तुला मागणी घातली आहे. आम्ही तुला आमच्या स्वार्थापोटी सुरजसाठी करुन आणले, तिथेच आम्ही चुकलो. पण मरायच्या आधी सर्जेरावांनी आम्हाला आमची चूक सुधारण्याची संधी दिली आहे. विलासराव शहरात एका नामवंत कंपनीत काम करत आहेत. त्यांनी आपल्या भावाच्या पसंतीस होकार दिला आहे. यावेळी तुझी फसगत होणार नाही, कारण रविवारी विलासराव स्वतः इथे येणार आहेत. तू हो म्हणालीस तर ते येतील तेव्हा तुमचं साखरपुडा करायचा, असे आम्ही ठरवले आहे. तुझे लग्न झाले तर तू आम्हाला परकी झाली असे नाही बरं का, जशी सुतेजा तशीच तू आमची दुसरी मुलगी. माहेरपणाला इथेच यायचे. आम्हीच तुझे कन्यादान करणार." बोलता बोलता पाटलांचा कंठ दाटून आला होता, डोळ्यात पाणी तरळले होते. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून डोळ्यांची उघडझाप करत त्यांनी डोळ्यातच जिरवले होते, शेवटी बापाचेच हृदय ते, पोरगी दूर होताना बघून दुखणार तर होतेच, वेदना तर झाल्या होत्याच. जन्म दिल्यानेच बाप होतो, हे त्यांनी अगदी खोडून काढले होते.

लक्ष्मीला हे सगळे अजबच वाटले.

हे पाहून सयाजीराव म्हणाले," काही काळजी किंवा विचार करु नका. जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. आम्ही तुमच्यासाठी जो निर्णय घेतले आहे, तो योग्य आहे असे आम्हाला वाटते. तुमचे आयुष्य आमच्या बंधूबरोबर सुखाचे जाणार यात तीळमात्र शंका नाही. तरीदेखील तुम्ही तुमचा निर्णय विचारपूर्वक करुन सांगावा. "

ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारी विलासराव घरी आले. या दोघांना एका खोलीत बोलण्यासाठी पाठविले. विलासरावांचे ते राजबिंडे रुप बघून लक्ष्मीच्या मनात थोडी चलबिचल झाली. विलासराव होतेच तसे देखणे राजबिंडे रुप, गोरा रंग, उंचपुरे, कपडे अगदी जिथल्या तिथे व्यवस्थित कडक इस्त्री केलेले, त्यांना बघताच कोणीही घायाळ झालेच असते असेच विलासरावांचे व्यक्तिमत्व होते. दोघांची एक तासभर बोलणी झाली. त्यानंतर हे दोघे खोलीच्या बाहेर आले. दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखताना सर्वानी जे ओळखायचे ते ओळखले.

"आणा ते पेढे, आधी देवासमोर ठेवा मग सर्वांचे तोंड गोड करा." असे म्हणत पाटील आनंदाने लक्ष्मीकडे बघू लागले.

तेवढयात विलासराव आणि लक्ष्मी दोघांनी एकदमच म्हटले," थांबा थांबा, तुमचा काही तरी गैरसमज होत आहे."

हे ऐकताच सर्वजण क्षणभर स्तब्ध होऊन बसले. एक भयाण शांतता पसरली.

ती शांतता भंग करत लक्ष्मी पटकन बाहेर अंगणात जाऊन तिथे मुलांबरोबर खेळत असलेल्या सूरजचा हात धरून त्याला आत घेऊन आली. तो देखील लक्ष्मीचा हात धरून अगदीच आनंदाने उड्या मारत आता आला.

"आज केला आहेस नवीन खाऊ तू मला लछमी? गोडच केले आहे न? आणि ते माझे चाॅकलेट तुझ्याजवळ ठेवले होते, ते कोणाला दिले नाहीस न? मला रात्री दे बरं का." सूरज लहान मुलांसारख्या बोबड्या बोलीत म्हणाला.

"गोड गोजिरी लाज लाजरी
लछमी माझी मैतरणी." असे म्हणत सूरज उड्या मारत होता‌.

"हो हो, तुम्हाला खाऊ देते हां. आणि हो मी काय शिकवले आहे खेळून आल्यावर काय करायचे असते?" लक्ष्मी म्हणाली.

"हात पाय स्वच्छ धुवून देवाला नमस्कार करायचा." सूरज म्हणाला.

"व्हेरी गुड!" लक्ष्मी म्हणाली.

"मी हात पाय धुवून, कपडे बदलून येतो, तोपर्यंत माझा खाऊ तयार ठेव ग लछमी."

"गोड गोजिरी लाज लाजरी
लछमी माझी मैतरणी…" असे म्हणत सूरज उड्या मारत आत बाथरूममध्ये गेला.

तो आत गेल्यावर लक्ष्मी सर्वांसमोर उभी राहिली आणि बोलू लागली," तुम्ही सर्वांनी पाहिले न आता काय झाले? या आधी सूरज मला बघताच ओरडायचे, मला मारायला यायचे. कधी कधी तर त्यांनी मला बॉल फेकून मारले आहे, अगदी माझं डोकं सुद्धा फुटले आहे. एकेक वेळी तर माझ्या पैजणांचा आवाज आला की भूत भूत म्हणून घाबरून पळायचे. तेव्हा पासून मी पैंजण घालायचे बंद केले. मला समोर पाहताच, \"तू कोण आहेस? ती तुझ्या घरी जा, हे माझे घर आहे, इथे राहायचे नाही, आई हिला घराबाहेर काढ\" असे म्हणायचे. नंतर मी त्यांच्या एवढे बनत त्यांच्या सोबत खेळू लागले, हळूहळू आमची गट्टी होत गेली. मी त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्या आवडीचा शिरा करुन दिला, चॉकलेट आणून दिले, त्यांच्या आवडीचे खेळ खेळले. मी तर अगदी लहान बाळासारखे वागले. कधी कधी खोटे खोटे भांडले, रुसले, त्यांच्या बरोबर बोललेच नाही, तेव्हा शंभर वेळा ते माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. मला खायला आणून देत होते. पण मी काहीही बोलले नाही की खाल्ले नाही, तेव्हा मात्र भोंगा पसरत आईंजवळ जाऊन आईंना सांगत होते, तेव्हा आई आमचे भांडण मिटवून देत. त्या पण माझ्या खोट्या रुसण्यावर हळूच हसत होत्या.

आता परिस्थिती बदलली आहे. सूरज माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाकडेही इतके व्यवस्थित राहत नाही. मी दिवसभर शेतावर गेले की इकडे घर डोक्यावर घेतात, रडून रडून गोंधळ घालतात. यांच्याबरोबर माझे लग्न झाले आहे. आता आमची सात जन्माची गाठ बांधली गेली आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. जोपर्यंत माझे आयुष्य आहे तोपर्यंत मी फक्त सूरज यांचीच पत्नी असेल आहे. ते मानसिक दृष्ट्या अशक्त असले तरीही त्यांची माझ्यावर खूप माया आहे, त्यांना माझी काळजी असते. त्यांना सोडून मी दुसऱ्या लग्नाचा विचार करणं शक्य होणार नाही. माझ्या या मतावर विलासरावांनी देखील होकार दिला आहे."

"अगं पण बाळा, तुझे संपूर्ण आयुष्य तू असे कसे घालवणार? स्त्री पूर्ण कधी होते जेव्हा ती आई होते. हे सुख भोगण्यासाठी स्त्री आतुरतेने वाट पाहत असते. पण हे सुख तुला कसे मिळणार गं? बघ अजूनही वेळ गेलेली नाही, विचार करून निर्णय घे. हवं तर आम्ही अजून दोन दिवस वाट बघतो. काही गडबड नाही." सासूबाई म्हणाल्या.

"नाही आई, माझ्या या निर्णयावर मी ठाम आहे. मला लहानपणापासून आईबाबांची माया, ममता, वात्सल्य, प्रेम मिळाले नाही, जे मला इथे तुम्हा दोघांकडून मिळाले. मी खूप नशीबवान आहे की मला असे दृष्ट लागण्यासारखे सासर मिळाले. बहिणीची माया देणारी नणंद आहे. सुखांनी माझी ओंजळ पूर्ण भरली आहे आणि मुलाचे काय, मी मूल दत्तक घेईन. पण मी दुसरे लग्न करणार नाही. तुम्हा दोघांची सेवा करण्याचे पुण्य मला भेटू देत. आजन्म मी तुमची सून म्हणून नाही तर लेक म्हणून राहील. काय माहित तो वर बसलेला देव बाप्पा प्रसन्न झाला तर सूरज अगदीच बरे होतील. या आशेवर मी सर्व आयुष्य आनंदाने जगायला तयार आहे. मी माझ्या छातीची ढाल करून तुम्हा सर्वांचे संरक्षण करेन." असे म्हणत लक्ष्मीने आपल्या सासूसासऱ्यांच्या पाया पडत नमस्कार केला. तेवढयात आतून सूरजचा आवाज आला, "लछमी ये लछमी, केव्हा पासून देवासमोर उभा आहे, ये न लवकर मला खूप भूक लागली आहे."

"हो हो, आले आले..." असे म्हणत ती आत पळाली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पाटील पाणावलेले आपले डोळे पुसत म्हणाले, "खरोखरच आमचे अहो भाग्य आहे, अशी लेक आम्हाला भेटली. नशीबाने सूरजची थट्टा केली, पण त्याचे भाग्य घडवायला लक्ष्मी या घरात आली. कामात धाडशी असलेली, मनाची श्रीमंती बाळगणारी, वाघिण आहे ही वाघिण."

©® परवीन कौसर