Login

वत्सला

सत्य घट्नेवर आधारित. मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

नऊवारी साडीतील वत्सला, दिसायला एखाद्या सुंदर हिरॉईनसारखी होती. त्याकाळी कुणी शिक्षणाचा इतका विचार करीत नसत, पण वत्सला मात्र लिहायला वाचायला येईल इतक शिकलेली होती. वयात आली तशी आईवडिलांनी स्थळ शोधायला सुरुवात केली. पण वत्सला जशी दिसायला सुंदर तशीच कमालीची हट्टी होती. तिला साडीवर मॅचिंग ब्लाउज हवा होता आणि तो काही मिळेना. त्याकाळात खूप श्रीमंत बायकाच मॅचिंग ब्लाउज वैगरे वापरत असत. पण हिचा हट्ट पुरवला नाही तर ही लग्नालाच उभी राहणार नाही. हे दोघानाही माहित होत. म्हणून त्यानी नातेवाईक बाईचा ब्लाऊज मागून आणला आणि हिला तो बसला. झालं मग ह्या बाईसाहेब दाखवण्याच्या कार्यक्रमाला तयार झाल्या. तस म्हटलं तर वत्सला काही एकुलती एक मुलगी नव्हती तिला बहिण- भावंडही होती. पण ही जरा हट्टी म्हणून जास्त खास. कामात आतिशय तरबेज. स्वयंपाकघरात आणि अगदी रानातून चुलीसाठी लाकूडफाटा आणण्यासाठी सुद्धा.

     तर मग अशा वत्सलाला जे स्थळ आल होत ते अगदी तालेवार होत. म्हणजेच खूप श्रीमंत आणि गावात मान मरतब असणार. ही पसंत पडली तिच्या सासुबाईंना आणि लग्न झालं. सासरी पाचवारी गोल साडी नेसायची पद्धत, हिला काही सवय नव्हती त्याची पण ही शिकली. त्या घरंदाज घराण्याला शोभेल अशीच वत्सला होती. नवराही गोरपान राजबिंडा. दोघांच लग्न होवून संसार सुरु झाला.

     नवरा दिवसरात्र आपल्या व्यवसायात गढून गेलेला. वत्सला मात्र घरी सासू आणि नणदाच्या ताब्यात. सासू खूप खाष्ट होती, त्यात वत्सला गरीब घराण्यातली होती. सासुबाईंकडे खूप दागदागिने होते, सणासुदीला वत्सलाला सुद्धा घालयला दिले जायचे पण मग सासुबाईंच्या ताब्यात द्यायचे. नणदा मात्र ते दागिने घालून मिरवायच्या पण तशी मुभा वत्सलाला नव्हती. या सगळ्या सासुरवासात तिचा हट्टी स्वभाव जरा वरमला होता. हळूहळू नणंदांची आणि दिरांची लग्न झाली. त्यानी घरातील त्या सगळया सोन्या नाण्याचा खूप मुद्देमाल आपल्या सोबत नेला. हिचा नवरा घरातला मोठा मुलगा होता पण कुणालाही काहीही बोलला नाही. तो खूप समाधानी माणूस होता.

     या सगळ्या राम रगाड्यात वत्सलाला लागोपाठ तीन मुली झाल्या. नवरा आणि सासुबाई नाराज होत्या कारण त्याना घराण्याला वारस हवा होता. त्यातच काही वर्षानी सासुबाईंना अटॅक आला त्यातच त्या गेल्या. त्यावेळी तर  नणंदांनी कहरच केला. आई जाण्याच दुःख राहील बाजूलाच, ह्यानी आधी आईच्या दागिन्याची आणि साड्यांची वाटणी करुन घेतली.

     मग मात्र वत्सलाने परत एकदा चान्स घेतला आणि तिला मुलगा झाला पण तो ज्न्म झाल्या  झाल्याच गेला. खूप खचली या दुःखाने. एकतर सासुने केलेला जाच, दीर आणि नणंदांची पैशासाठी हपापलेली नजर. हिला मुलगा नाही तर घराण्याला ही वंश देवू शकत नाही ही बोचणी.

     या सगळया वातावरणामुळे ती थोडी निगरगट्ट बनत गेली. फाटकं माहेर, या अशा प्रकारच सासर. माहेराहून भावंडाची साथ होतीच पण कुणीही एवढं आथिर्क दृष्टया सधन नव्हत. याची तिला कल्पना होतीच. पण त्यांची साथ होती हेच पुष्कळ होत तिच्यासाठी.

     प्रत्येकवेळी फक्त नशिबाची चक्र उलटीच फिरत होती तिच्यासाठी. श्रीमंत सासर दिल पण तशी मनाने श्रीमंत माणस नाही दिली. समाजाला दाखवण्यासाठी आणि वंशाला दिवा दिला तो ही हिसकावून घेतला.

     हे सर्व कमी होत की काय त्यात तिच्या नवर्याला कॅन्सरने ग्रासल. तिन्ही मुलींची साथ होती मात्र तिला. अशा असहाय्य दुखण्यामुळे त्यांच व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. त्यामूळे व्यवसायात तोटा सहन करावा लागला. वत्सला पूर्वी पासूनच काटकसरीने संसार करीत होती. त्यामूळे तिने तिच्याजवळचा पैसा सुरक्षित ठेवला होता. पण या आजारपणाला खूप पैसा लागणार होता. त्याच ऑपरेशन करायच होत. पण एकाही दिराने किंवा नणंदेने काहीही मदत केली नाही. जेव्हा दादाकडे पैसा होता त्यावेळी त्या येत होत्या पण आता दादाच्या गरजेच्या वेळी कुणी ढुंकूनही बघितल नाही. त्यावेळी ह्या सद्गृहस्थाचे डोळे उघडले. आपण तर काहीच कमावलं नाही आणि जे कमावलं ते ह्याना वाटून टाकल. ऑपरेशन झाले त्यांचे. मुली तेव्हा खूप लहान होत्या पण त्याना जमेल तशी त्यानी व्यवसायाची मदार पेलली.

     या सगळ्या खटाटोपात सगळे प्रयत्न उपचार करुनही फक्त पुढील दोन वर्षेच काढली त्यानी. संसार असा अर्ध्यावर सोडून गेले ते. एकाही मुलीच शिक्षण पूर्ण नाही, त्याची लग्न नाही. सगळ होत्याच नव्हत झाल. पूर्वी अशी सयुक्त कुटुंब नव्हती त्यामुळे बाराव्याच्या दिवशी अशा कुटुंबाची जबाबदारी घरातली जाबाबदार व्यक्ति पेलवत असते. पण इथे तर दीर आणि नणंदा जागा जमिनीच्या वाटणिसाठी जमलेले. तरी वत्सलाला तिची वाटणी दयायला तयार नाही कारण तिला फक्त मुलीच होत्या. वंशाचा दिवा नव्हता तिच्याकडे.

     आता मात्र वत्सलाची खरी लढाई होती. अजुनपर्यंत फक्त भोगल होत आता अॅक्शनची वेळ होती. तिन्ही मुलीच्या पाठीमागे ती भक्कमपणे उभी राहिली. तिने ह्या वाटण्या बाराव्याला होवुच दिल्या नाहीत. तिने वाटणीसाठी कोर्ट गाठल. इतक्या वर्षात तिने कधी घराची पायरी ओलांडली नव्हती पण आता तिच्या हक्कासाठी तिला हे करावच लागलं. प्रत्येकवेळी विश्वासघाता वर कोलमडून पडलेली ती आता सावरली होती. छोट्या कोर्टापासून अगदी हाय कोर्टापर्यंत गेली ती. एकटीच लढत होती. कधी स्व्तःशी तर कधी इतरांशी. मुम्बई हायकोर्टात येण हा तिच्यासाठी सोपा प्रवास कधीच नव्हता. मुम्बईत नविन आलेला, शिकला सवरलेला माणूस बावचळून जातो. हिने एकटीने मुम्बई गाठली. खूप वर्ष ती ही लढाई लढत होती. अखेर तीने आपला न्याय मिळवूनच दाखवला. तिच्या वाट्याची जागा जामिन तिला मिळाली. नाहीतर दीर तिला मुली असल्यामूळे काहीच द्यायला तयार नव्हते. आता दिरांनीही बघितल की ती जिंकली होती.

     तिच्या मनावर खोलवर कुठेतरी खूप मोठे आघात होत होते, त्यातून ती तावुनसलाखून बाहेर पडली होती. पण "विश्वास" नावाची जी काही गोष्ट असते ती मात्र ती विसरून गेली होती. म्हणजे तिला विसरावीच लागली, अशी परिस्थिति तिच्यावर आली होती आणि वेळोवेळी येत होती.

     आता ती पुर्णपणे लढाई जिंकली आहे. पण ती कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही.