वाट पाहतेय ती...

नकळत मलाही पाऊस आवडायला लागला. तिच्या सवे पावसात भिजावंस वाटायचं. तिचे ओलेचिंब केस, अंगाशी घट्??

        ती नेहमी पावसाची वाट पहायची. अगदी त्या चातकासारखी! अगदी लहान मूल होऊन पावसात चिंब भिजण्याचा आनंद घ्यायची. हात फैलावून डोळे मिटून चिंब चिंब भिजायची. मोहरून जायची. पावसाच्या सरी बरसाव्यात आणि तिला मनसोक्त भिजता यावं म्हणून पावसाला विनवणी करणारी. म्हणायची,

'ये... ये... मुसळधार ये... रिमझिम ये... कसाही ये ... '
'नखशिखांत भिजवून टाक मला.'
'तुझ्या बाहुपाशांत सामावून घे.'
'घट्ट आलिंगन दे.'
'आणि एकरूप होऊन जाऊदे मला तुझ्यात...'

        काळेभोर पाणीदार टप्पोरे डोळे, रेखीव भुवया, नाजूक पण सरळ नाक, गौरवर्ण अशी ती. हसली कि गालांवर नाजूक खळी पडायची. नेहमी केसांची वेणी घातलेली. त्यात एखादं गुलाबाचं फुल असणारचं. कधी गुलाबी, कधी नारंगी, तर कधी लाल, पिवळ्या रंगाचं गुलाब तिच्या वेणीमध्ये उठून दिसायचं. गुलाबाच्या फुलाशिवाय ती कधी परिपूर्ण वाटलीच नाही. ऑफिसला स्कुटीवरून जायची, पण एकदम फुल फ्रीडम मध्ये. डोक्यावर कधी हेल्मेट नाही की तोंडावर स्कार्फ नाही. भुर्रकन निघून जायची. आजूबाजूची लोकं तिच्यापासून चार हात लांबच राहायची. पावसाळ्यातही तिनं कधी रेनकोट वा छत्री घेतलेली नसायची. नसायची म्हणजे तिने कधी खरेदीच केली नाही. केसांपासून पायांच्या नखांपर्यन्त नखशिखांत चिंब भिजून यायची. बदलायला दुसरा ड्रेस नेहमी बरोबर ठेवायची. खूप आवडायचा पाऊस तिला. पावसाची चाहूल लागली कि, बेभान होऊन जायची. लहान मुल होऊन खेळायची, बागडायची अन मनसोक्त नाचायची. धुंद होऊन जायची. पावसाच्या सरींना अंगावर घ्यायला नेहमी आतुर असायची. पावसाचे थेम्ब तिच्या रोमारोमांत नवचैतन्य, उत्साह आणि आनंद निर्माण करून जायचे.

     तिला जेवढा पाऊस आवडायचा तितकाच मला तो नकोसा वाटायचा. पण नकळत मलाही कुठेतरी तिच्यासवे पावसात भिजावंस वाटायचं. तिला तसं भिजताना बघायला आवडायचं. तिचे ते ओले चिंब केस. ते अंगाशी घट्ट बिलगलेली वस्त्र. आणि तिच्या सम्पूर्ण देहावरून ओघळत जाणारे ते पावसाचे थेंब! जणू माझं रोमरोम धुंद करीत जायचे. एरव्ही न आवडणारा पाऊस तिच्या सहवासाने मलाही आवडू लागला. पाऊस आला की, ती कुठेही असो, मला तिची आठवण यायची. मग आठवायचं तिचं ते भिजलेल सौंदर्य. नखशिखांत भिजलेली ती! त्या पावसात भिजून आणखीनच सुंदर दिसायची. तिच्या डोळ्यातली मादकता मला अजून वेड लावायची. अस वाटायचं, सर्व मर्यादांची कुंपणं तोडून मी तिला त्याच क्षणी अगदी घट्ट मिठीत घ्यावं. जणू पावसाचे तुषार बनून मीच तिच्या सर्वांगावरून ओघळत जावं. कधी तिच्या ओठांना टिपून तिच्या शहरणाऱ्या देहाशी धुंद होत बरसत राहावं. तिची गात्र नी गात्र त्या स्पर्शाने मोहरून टाकावं.

       ती म्हणते, 'माणसं फक्त स्वतः पुरता विचार करतात. फायद्यासाठी जवळ येतात. स्वार्थासाठी नाती जोडतात. अन काम झालं की दूर होतात.' त्यामुळे अनोळखी लोकांपासून ती नेहमी दूरच राहायची. स्वतःहून नवीन ओळख तिनं कधी करून घेतलीच नाही. मग तिची अन माझी ओळख झालीच कशी? खरं तर आमची तशी ओळख ग्रॅज्युएशनच्या परीक्षेला झाली होती. मागच्या वर्षीचा एक बॅकलॉग विषय राहिल्यामुळे फ्रेशर मुलांचे नम्बर त्यानंतर यायचे. परीक्षेला कधी माझ्या मागच्या तर कधी पुढच्या बाकावर तिचा नंबर यायचा. अभ्यासात तशी हुशार होती, पण अभ्यासच केला नाही तर प्रश्नाची उत्तरं कशी येणार! त्यामुळे बऱ्याच वेळा मला खुणावून उत्तरं विचारायची. त्यातून ओळख वाढली. ती ओळख केव्हा मैत्रीत अन नंतर कधी प्रेमात बदलली दोघांनाही कळलं नाही. पावसाळ्यात दोन तीन वेळा तरी मला लोणावळ्याला न्यायची. धबधब्याखाली मनसोक्त भिजायची. तिला सावरता, सांभाळताना माझी धांदल उडायची. गाडीवर पावसात घट्ट बिलगून बसायची. नेहमी माझ्या डब्यातली पोळी भाजी खायची. घरचं असं कुणी नव्हतंच तिला. अनाथ आश्रमात राहायची. अनाथ होती. त्यामुळे घरचं असं खायला कधी मिळालंच नाही. म्हणुणच की काय माझा डबा फस्त करायची.

        रस्त्यावर कुणाच्या लग्नाची मिरवणूक वा वरात दिसली कि, बेधडक घुसायची. बिनधास्त नाचायची. तिला पाहून नाचणारे मुलं, माणसं अचंभ्यानं आपोआप बाजूला व्हायचे. तिला असं नाचताना पाहून मलाच लाज वाटायची. आजूबाजूचे लोक आपापसांत कुजबुजत तिच्याकडे पाहत उभं राहायचे. पाच दहा मिनिटं मनसोक्त नाचली कि पुन्हा माघारी यायची. कधी कधी बळेबळेच तिला ओढून आणावं लागायचं. खूपदा समजावूनही ती अल्लड ,बालिश, एका शाळकरी मुलीप्रमाणे वागायची आणि मला मात्र तिच्या अश्या वागण्याचा प्रचंड संताप यायचा. रागात मी तिला कधी खूप बोलूनही जायचो आणि तीही मग नकळत दुखावली जायची.

मी म्हणायचो, 'अगं.. तुला काही कळतं की नाही? लोक काय म्हणतील? असं माणसांत नाचताना काहीच कसं वाटत नाही?'

तेव्हा गालावर सुंदर नाजूक खळी पाडत मिश्किल हसायची. किशोर कुमारच गाणं ऐकवायची.

कुछ तो लोग कहेंगे,
लोगों का काम है कहना |

छोड़ो बेकार की बातों में,
कहीं बीत ना जाए रैना |

मुक्त जगायची. स्वतःच्या मनाप्रमाणे. लहान लहान गोष्टींमधे आनंद शोधायची. सगळ्यांना हवीहवीशी. सारखं म्हणायची,

'हे जीवन एकदाच मिळतं.'
'सो जे वाटतं ते करा.'

'मुक्त जगा. हे जग म्हणजे एक निसर्गसौंदर्यानं भरलेलं ठिकाण आहे. कधीही निघा, कुठेही जा. फिरा. खा. प्या. मस्ती करा. मौजमजा करा.'
'आयुष्यात येणारे आनंदी क्षण मनमुराद लुटा. त्यांचा महोत्सव करता आला पाहिजे.'
'लोकांचा जास्त विचार नका करू.'
'लोकं नावं ठेवायलाच असतात.'
'तुम्ही चांगलं काम केलं तरी बोलणार आणि वाईट केलं तरीही बोलणारच.'
'तुम्हाला जे मनापासून वाटतं ना , ते ते करा.'
'आजचा दिवस जगून घ्या. क्या पता कल हो ना हो?'

लेडी शाहरुखच होती ती. लहान मुलांच्यात रमायची. लहान मुलं खूप आवडायची तिला. म्हणायची,

'मुलं म्हणजे देवाघरची फुलं!'
'किती निरागस !'
'किती गोंडस !'
'निष्पाप अन गोड !'

        पण नियतीला पाहावलं नाही तिचं असं आनंदी राहणं. पावसात भिजणं! मुक्त जगणं!आता काहीच कळत नाही तिला. डोळे उघडे आणि फक्त पापण्यांची उघडझाप होते. कोण काय बोलतंय, आजूबाजूला काय चाललंय? काहीच कळत नाही तिला. तिचं सगळं करावं लागतं. कुणालाही ओळखत नाही. पाऊस असो की लहान मुलं, आता काहीच वाटतं नाही तिला त्यांचं!

        महिना झाला असेल त्या गोष्टीला! सिग्नल वर थांबली होती. रिमझिम पाऊस पडत होता. तिचा सखा पाऊस तिला भेटायला आला होता. आकाशाकडे तोंड करून, दोन्ही हात फैलावून ती त्याला आपल्या कवेत येण्यासाठी आवाहन करत होती. सिग्नल सुटला तरी तिला त्याचं भान नव्हतं. हॉर्नचा गोंगाट जेव्हा वाढला तेव्हा ती भानावर आली. पटकन गाडी स्टार्ट केली आणि निघाली भुर्रकन. डाव्या बाजूला सिग्नलची वाट पाहत असणारा टँकरने वेग पकडला होता. ती आपल्याच धुंदीत निघाली होती. पण या वेळी मात्र, नियतीनं डाव साधला. टँकरचा ब्रेक दाबल्याचा कर्णकर्कश आवाज झाला. तिची स्कुती टँकर खाली फरफटत गेली. सुदैवाने ती बाजूला फेकली गेली होती.

        डॉक्टरांनी सांगितलं की, मेंदूला जबरदस्त मार बसला आहे. सगळी मेमरी लॉस झाली आहे. रिकव्हर होईल की नाही? काहीच सांगू शकत नाही.

कम्प्युटरचं बरं असतं ना !
डिलीट केलं तरी पुन्हा रिकव्हर करता येत !
माणसाच्या मेंदूचं काय?
किती बरं झालं असतं ना !
जे नको ते शिफ्ट डिलीट करायचं. जे हवं ते रिकव्हर करायचं.
फॉरमॅट किंवा रिकव्हर करता आलं असतं तर !

आम्ही खूप प्रयत्न करतो. पण, ती मात्र काहीच प्रतिसाद देत नाही. लहानपानापासूनच अनाथ होती. आज मात्र शरीर, बुद्धी, मन, संवेदना सगळ्यांनीच अनाथ झाली आहे. जेव्हा जेव्हा बोलायची, तेव्हा तेव्हा शिवरायांचा आणि शंभूराजांचा उल्लेख आल्याशिवाय तिचं बोलणं कधी पूर्ण व्हायचंच नाही. नेहमी त्यांचे दाखले देत असायची. त्यांचे विचार सांगायची.

'कितीही कठीण परिस्थिती असो. डगमगायचं नाही. माघार घ्यायची नाही. हरायचं नाही. लढायचं! शरीरात रक्ताचा शेवटचा थेम्ब असे पर्यंत आणि काळजात शेवटचा श्वास असे पर्यंत! निसर्ग नेहमी तुमची परीक्षा पाहत असतो. कारण, तुला जे यश मिळणार आहे. ध्येय गाठायचं आहे. यशाच्या, कीर्तीच्या ज्या अत्युच्च शिखरावर तू पोहोचणार आहेस. त्यासाठी खरंच तू लायक आहे का? पात्र आहेस का? तुझात खरंच ते मिळवण्याची हिम्मत, ताकत, सहनशीलता आहे का?'

   मी सुद्धा अजून हरलेलो नाहीये. अजूनही तिची साथ सोडलेली नाहीये. अजूनही जेव्हा जेव्हा पाऊस येतो ना ! तेव्हा तेव्हा तिला पावसात भिजायला सोडतो. न जाणे तिला तिचा सखा पुन्हा आठवेल आणि पुन्हा एकदा ती नव्यानं पावसात चिंब चिंब भिजेल. त्या पावसाची वाट अजूनही पाहतोय मी. अन तीही!

       ती माझी सखी, प्रिया, राधा. माझ्या श्वासात, ध्यासात, स्वप्नात कायम रमणारी. कधी मला धुंद करणारी तर कधी पावसाच्या सरी प्रमाणे अलगद चिंब भिजवणारी. कधी तिच्या मनमोहक हसण्याने मला मोहवणारी तर कधी तिच्या स्पर्शाने मला बेधुंद करणारी. ती कधीही न पुसली जाणारी मनावर कोरलेली रेष, जिच्याशी मी कधीच जोडल्या गेलो होतो. कायमचा! ती काय आहे माझ्यासाठी? हे मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आमच्या कितीतरी सुंदर आठवणी मनाच्या गाभाऱ्यात मी संचित करून ठेवल्या आहेत. प्रत्येक भेटीत तिचं अल्लड रूप मी डोळ्यांत भरून घेतो. ती लाजून विचारतेही मला बरेचदा की, असं काय बघतोस रे सारखं माझ्याकडे? मी फक्त तिच्याकडे पाहून हसतो. तिला तिच्याही नकळत अगदी चोरून! तिचं सौंदर्य न्याहाळताना, तिच्या गालांवरची नाजूक खळी, तिचे काळे गहिरे भावविभोर डोळे, मी आणखीनच तिच्यात गुटफटत जातो. कधीही न बाहेर येण्यासाठी. मनापासून वाटतं मला, ती फक्त माझीच असावी. याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी ती माझी व्हावी! फक्त माझी!

        मित्रांनो, कदाचित त्या दिवशी तिनं हेल्मेट घातलं असतं तर तिची अशी अवस्था झाली नसती. सध्या पावसाचे दिवस आहेत. कामानिमित्त बाहेर जाताना आवश्यक ती काळजी घ्या. रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, साचलेली डबकी, तर कुठे ऑईल वगैरे सांडलेले असते. तेव्हा मर्यादित वेगात बाईक चालवा. बाईकवर असाल तर हेल्मेट नक्की वापरा. घरी आपली मुलं, आई-वडील, नवरा-बायको, कुणाचे बहीणभाऊ घरी येण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे घाईगडबडीत गाडी वेगात चालवू नका. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

कथा आवडल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.