वैखरी एक प्रेमकथा भाग-११

A Lovestory Of A Girl

वैखरी एक प्रेम कथा भाग-११
विषय- प्रेमकथा
उपविषय- राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .



पूर्वांध : वैखरीला स्वराकडून यायला उशीर झाल्यामुळे वैखरीची आतू वैखरीची वाट बघत असते . वैखरी उशीर झाल्याचे कारण सांगतांना आतू वैखरीच्या गळ्यात पडून रडते….


पुढे वाचा भाग-११


वैखरी : "आतू रडू नकोस ना . बघ आई येत
आहे ."

आई : "वैखरी केव्हा आलीस बाळा ? "

वैखरी : "आताच आले आई ".
आई : " हे काय प्रतिक्षाताई तुमच्या डोळ्यात पाणी ? काय झालं ?"
वैखरी : "अगं मी स्वराच्या आई बाबत आतूला सांगत होते आणि आतू भावूक झाली ."
आई : बरं बरं . प्रतिक्षाताई चला आपण दोघी किचनमध्ये जावू . रात्रीच्या जेवणात आज काय बनवायचं सांगा जरा कुकला .
वैखरी : "थांब न आई जरा . जेवणाचं बघू नंतर सहाच वाजलेत जेमतेम . मला तुम्हा दोघींशी काही बोलायचं आहे."
आई : "कोणती महत्त्वाची गोष्ट आहे ? बोल पटकन ".
वैखरी : "कसं विचारू ? आई sss… मी काय म्हणते.. अगं आतूच्या भूतकाळाबाबत तुम्ही मला सविस्तर कधी सांगीतलच नाही ….मला ते सविस्तर सांग नं प्लीज . आतूच्या बाळाबाबत आतू स्वप्नात बोलली म्हणून मला कळालं पण नेमकं सत्य काय मला माहितच नाही … सांग न गं . आतू दुःखी का असते ?
आतूच्या नवर्‍यानी आतुला का सोडलं ? आतुच्या मुलाचं काय झालं ? असे अनेकानेक प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालत असतात.आतुच्या भूतकाळाचा परिणाम घरात आजही दिसतो . माझ्या वागण्यावर अनेकानेक निर्बंध घातली जातात . नेमकं आतुसोबत काय घडलं ?आतु नेहमी दुःखी असते कुठे जात येत नाही . तू आणि बाबा आतुला टाकून कुठेच जात नाही . घरी कुणाला बोलवत सुद्धा नाही . माझ्या मैत्रीणी म्हणतात गं मला, तू तुझ्या घरी कधी बोलवत सुद्धा नाहीस."


आई : "वैखरी किती प्रश्न विचारशील ? नंतर कधी बोलू या विषायावर . आता नको आतुची
मानसिकता ठिक नाही ".


वैखरी : " म्हणूनच तर विचारतेय . आतू का भावूक झाली . मला जाणून घ्यायचं आहे . आज नाही उद्याही हा विषय काढला तर तू
टाळणारच . मलाही अर्धवट माहितीचा त्रास होतोय गं."

आई :" प्रतिक्षाताई बरं वाटतयं ना ?."

आतु : " हो वहिनी मी ठीक आहे ."

वैखरी : "ये आतू , तूच सांगशील का गं . तुझ्या दुःखी राहण्याचं कारण . मनातलं आभाळ रितं केल्यावर बरं वाटेल तुला . माझ्याही मनातील प्रश्न सुटून मलाही बरं वाटेल . सांग नं गं आतू . मला आज ऐकायचयं ."

******

आतू : ऐक…..
" खूप आनंदी राहायची गं मी… स्वछंद बागडायची . राजकुमारी सारखं माझं जीवन … तुझ्या आजोबांचा व पवार काकांचा पार्टनरशीप मध्ये व्यवसाय होता . दोघंही बालमित्र . खूप पटायचं दोघांचं . अजित - अनिल ची जोडी प्रसिद्ध होती … दोघेही गावातील देशमूख पाटलाची मुलं… गडगंज श्रीमंती . जमीन जुमला असणारी गावातील श्रीमंत पार्टी . देशमूख पाटलात गावोगावी चुरस राहायची . गावतलं राजकारण तर दोघांमध्ये रंगायचं ; परंतु आपल्या गावात तसं नव्हतं . आपलं गावं यासाठी अपवाद

होत .देशमूख पाटलात पिढ्यापिढया सख्य होतं… मैत्र होतं . गावात आनंदाचा बहर होता… पवारपाटील काका माझ्या लहानपणापासून मला त्यांची सुनबाई म्हणायचे . पवारपाटील काकांचा मुलगा
प्रेम ,त्याची बहिण, तुझे बाबा व मी लहानपणापासून सोबत खेळलो . तुझे
बाबा ,मी, प्रेमची बहिण व प्रेम आम्ही बालमित्र .
आम्ही सर्वजण गावात पाचव्या वर्गापर्यंत शिकलो.. आमच्या आजोबांचे मुंबईत बंगले
होते . पाचवीनंतर दोन्ही कुटुंब मुंबईला राहायला गेले . पवार काका व तुझ्या आजोबांची
वडिलोपार्जित मुंबईत कंपनी होतीच त्या व्यवसायानी मुंबईत स्थायीक झाल्यावर चांगलीच छोडदौड सुरु केली होती… व्यवसाय म्हटला की स्पर्धा आलीच. पवार काका व तुझे आजोबा यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला व त्यात ते यशस्वी झाले . जिवलग मित्र एकमेकांचे जानी दुश्मन झाले ."


वैखरी : " पुढे काय झाले आतू ?"

आतू : " काय होणार ? जे व्हायचे ते झाले . दोन मित्रांचं शत्रुत्व दोन कुटुंबाचं झालं …
माझी आणि प्रेमची नुकतीच इंजिनिअरिंगची डीग्री पूर्ण झाली होती . डिग्रीनंतर आमचा साखरपुडा करायचं दोन्ही कुटुंबानी ठरवलं होतं..
शत्रुत्वासमोर दोन मनात फुललेल्या प्रेमाला महत्त्व नव्हतं . आम्हा दोघांच्या मनाचा विचार कुणाच्याच मनाला शिवला नव्हता. जेवढया मनापासून मैत्र निभावायचे तेवढ्याच तिव्रतेने शत्रुत्व वाढत होतं… बालपण ते तारुण्य अशी फुललेलं आमच्या दोघांतील मैत्र प्रेमात आकंठ बुडालं होतं . एकमेकांशिवाय आम्हाला राहणं शक्य नव्हतं . एकमेकांसवे आयुष्य जगण्याच्या आणा-भाका आम्ही घेतल्या होता . दोघांतील प्रेमाचा दरवळ आमच्या नसानसांत भिनला होता. त्या प्रमोच्या दरवळानी अस्तित्वातील सळसळता जिवंतपणा उसळून उठायचा . घर छोटंसं सुंदर सुखाचा वर्षाव करणारं .
एकमेकांचा मृत्यूंचा दारातही साथ न सोडणारंआयुष्य जगायचं ठरवलं होतं दोघांनी .दोन कुटुंबात कितीही शत्रुत्व वाढू देत पण आपल्यातील प्रेम त्याच्या दृप्पट वाढवायचं अन् प्रेमानी शत्रुत्वापुढं झुकायचं नाही असं ठरलं होतं आमचं …".

वैखरी : " का थांबलीस ? पुढे काय झालं ? सांग नं

गं ."


आतू : "प्रेम आणि मी दोघांनी ठरवलं काहीही झालं तरी आपण लग्न करायचं . आज नाही तर उद्या घरचे स्वीकारतीलच . ठरल्याप्रमाणे आम्ही दोघांनी चूपचाप कुणालाही न सांगता एका मंदिरात लग्न केलं ."

वैखरी : "लग्न केल्यावर तुम्ही सोबत नाही

राहिलात ?".


आतू : " नाही, योग्यवेळ आल्यावर घरी सांगायचं असं आम्ही ठरवलं होतं . घरच्यांनी नाही म्हटलं तर दूरदेशी पळून जावून राहायचं असं आमचं ठरलं होतं . आम्ही काही निर्णय घ्यायच्या आतच प्रेमच्या बाबांना आम्ही मंदिरात लग्न केल्याचं कळालं ."

वैखरी : " बापरे ! मग ? ".

आतू : "मग काय ? प्रेमच्या वडिलांनी चाल खेळली . बिजिनेसच्या निमीत्ताने प्रेमला अमेरिकेला पाठवलं . अमेरिकेला गेलेला प्रेम परत आलाच नाही . "

वैखरी : "काही मेसेज वगैरे ? "

आतू : "नाही . फोन, पत्र, मेसेज काहीच
नाही . एका त्रयस्ताकडून कळालं की प्रेमनी त्याच्या बाबांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं .
ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली . माझ्या प्रेमाच्या राज्यांची राखरांगोळी झाली .
माझे अस्तित्व मी प्रेमवर उत्स्फूर्तपणे उधळून टाकले होते . माझ्या गर्भात आमच्या प्रेमांकूर वाढत होता . त्या प्रेमांकुराला मला खुडायचं नव्हतं . मी त्याला जन्म दिला. ही गोष्ट जगापासून लपविण्यासाठी घरच्यांनी लोकांशी संपर्क तोडला ."

वैखरी : तुझं मूलं कुठे आहे आतू ?

क्रमशः


आतूचं मूलं कुठे आहे ? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा….

वैखरी एक प्रेमकथा भाग-१२

कथा कशी वाटली नक्की कमेन्टकरून सांगा .
आवडल्यास लाईक करा न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद !

©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .

🎭 Series Post

View all