वैखरी एक प्रेमकथा भाग-२२

A Lovestory Of A Girl
वैखरी एक प्रेमकथा भाग - २२
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .


प्रेम : " माझ्या ऑफीसमध्ये वसंत नावाचा प्रोजेक्ट ऑफीसर आहे . अगदीच प्रतिक्षा सारखा दिसतो . तसेच लांब नाक… नाकावर काळा तिळ प्रतिक्षासारखाच अगदी . उजव्या गालावर तशीच खळी.. कुरळे केसही प्रतिक्षासारखेच…. तो समोर आला की मला अगदी आपलासा वाटतो…. मी खूप अस्वस्थ होतो… वाटतं त्याच्याशी खूप बोलावं…".

प्रेमची आई : "असूही शकते प्रतिक्षाचा
मुलगा . तुला काय त्याचं ? आता प्रतिक्षाचं लग्न झालं . तू उगाच तिच्या मुलाला घेवून का भावूक होतोच ?".

प्रेम : " नाही आई तो मुलगा प्रतिक्षाचा नाही . मी त्याची माहिती काढली तर कळालं तो अनाथालयात वाढला ."
प्रेमची आई : " मग जावू दे . कशाला विचार करतोस त्या गोष्टीचा . तसंही जगात सात व्यक्ती एका चेहऱ्याच्या असतात असं म्हणतात . तसं काही असेल ."

प्रेम : " अगं आई चेहऱ्यात सारखेपणा असेलही थोडा . हुबेहुब तसाच नाकावर तिळ…
तशीच उजव्या गालावर खळी .कशी शक्य
आहे ?."
प्रेमची आई : " प्रेम,तुला नेमकं काय सांगायचं आहे जरा खुलून बोलशील का ?".

प्रेम : "आई, म्हणजेss…ss माझ्या मनात प्रश्न घोंघावतो की तो माझा व प्रतिक्षाचा मुलगा असेल का?. मला तो खूप आपलासा वाटतो . माझं मन तसं मला सांगतं .
ज्यादिवसापासून मी त्याला भेटलो त्या दिवसापासून त्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नाही .मी फार अस्वस्थ असतो गं त्याला भेटल्या पासून ."

प्रेमची आई : "काय ? काय बोलतोस ? प्रेम असं जर तुला वाटत असेल तर त्या मुलाची माहिती काढावी लागेल . तुझा मुलगा …. माझा नातू… काय नाव काय त्याचं ?"

प्रेम : "वसंत नाव आहे त्याच ." हो आई . मी माहीती काढतो वसंतची .

प्रेमची आई : " प्रेम मला भेटायचंय वसंतला . ऑफीसला येईल तुझ्या सोबत ."
प्रेम : " हो आई चालेल . उदया चल ."

****"*************************************

स्वरा : " हॅलो वैखरी , झाला का उद्याचा पेपरचा अभ्यास ."
वैखरी : " अभ्यास कधी होती का? केला तर खरं मनलावून . बघू काय होते . तुझा झाला
का ?".
स्वरा : "करत आहे. पण जाम टेन्शन आलं गं उद्याच्या पेपरचं ."
वैखरी : "टेन्शन नको घेवूस . एक लांब श्वास घ्यायचा आणि पेपर लिहायला सुरुवात
करायची . मी असंच करत असते ."
स्वरा : "ओके मी पण असच करते चल .all the best. भेटू उद्या ."
वैखरी : "ओके .all the best to you too.."
आतू : "वैखरीss.. काय करतेस ?"
वैखरी :" काय गं आतू ? स्वराशी बोलत
होती ".
आतू : " जेवायला चल . तुझी वाट बघत बसलोय आम्ही दोघीजणी ."
वैखरी : "चल, तशी भूकही नाही गं आतू . परिक्षेच्या दोन महिने आधी तरी अभ्यास एके अभ्यास हवा . तसं नाही झालं तर टेन्शन येतं वेळेवर . माझा खूप वेळ खाल्ला या \" आशय \"
प्रकरणानं ."
आतू : " टेन्शन नको घेवूस . छान गुणांनी पास होशील तू नेहमीसारखीच . देव बरोबर करतो "
वैखरी : " काय गं आतू काही पण बोलतेस ?
देव काय रिकामा आहे का? तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टीत डोकं घालायला . किती मोठा जगाचा व्याप आहे त्याच्यामागे . मार्क्स अभ्यास केल्याशिवाय मिळत नसतात . आता मला जास्त तास अभ्यास करावा लागेल . तरच रिझल्ट चांगला येईल ."
आतू : " जेवण वेळेवर घेत जा . मग अभ्यास कितीही तास कर तुला आम्ही डिस्टर्ब करणार नाही . चल पटकन " .
डोअर बेल वाजते…. आशाकाकू दार
उघडतात . तर वैखरीचे बाबा आलेले असतात .
बाबा : "काय म्हणते परिक्षा वैखरी किती पेपर बाकी आहेत ?".
वैखरी :" छान! एकच पेपर राहिला . बाबा तुम्ही असे मध्येच आलात ?"
बाबा : " माझं महत्वाचं फाईल घरी राहून
गेलं. शेवटचा पेपर कधी आहे "
वैखरी : "दोन दिवसानी आहे बाबा".
बाबा : "व्हेरी गुड ."
आतू : "कुणाला पाठवायचं ना . फाईलसाठी"
बाबा : " नाही गं ताई .ते माझ्या लॉकरमध्ये
आहे ."
आतू : "वहिनीकडे देवून ठेव जाबी .
बाबा : "बरं येतो मी ."
वैखरी : "बघ आई बाबांनी पेपर कसे गेले ? नाही विचारले . किती पेपर राहिले विचारले .
त्यांना माझी परिक्षा कधी संपते अन् एकदाचं कधी लग्न होते असं झालं . घरातून काढून दयायची घाई . दुसरं काय ?".
आई : " बाबांच्या बोलण्याचे काहीही अर्थ काढू नकोस वैखरी ."
वैखरी : "आतू तु सांग . माझं लग्न लावण्यात परिक्षा अडसर ठरली त्यामुळे बाबा माझी परीक्षा संपायची वाट बघत आहेत हे खोटं आहे का?"
आतू : "जावू दे वैखरी . तू असा विचार का करतेस ? शांत डोक्यानी अभ्यासात लक्ष घाल ."
वैखरी : हो गं आतू .माझा अभ्यास मी नीट करतेच गं . फार चीड येते असं घरात वातावरण असलं की . तू मोकळी बोलायला लागलीस तेव्हापासून तुझ्याशी मनातलं बोलतेय तर जरा बरं वाटतं .नाहीतर चीड आल्यानंतरही व्यक्त व्हायला संधी नव्हती . सगळे तुझ्याच चिंतेत असायचे . आईजवळ मनातलं बोलू की नको असं व्हायचं मला ."
आतू : "मी समजू शकते गं वैखरी . माझ्यामुळे घरातील प्रत्येकालाच खूप त्रास झाला ."
वैखरी : " तसं नाही गं आतू . तुझ्यामुळे त्रास नाही झाला उलट तूच घरच्यांच्या खोट्या प्रतिष्ठेची . शत्रृत्वाची , अहंकारी स्वभावाची बळी ठरलीस . तुझं मुलं तुझ्यापासून दूर केलसं . तुझा काही दोष नाही . या सर्व बाबींना कारणीभूत आहे. केवळ सामाजिक प्रतिष्ठेची चूकीची संकल्पना . बाबा अजूनही त्यातच अडकून आहेत . त्यामुळे तुझं किती नुकसान झालं ."
आतू : "खरं आहे तू बोलतेस ते यावर आपण तुझी परिक्षा झाल्यावर बोलू . ही वेळ नाही यावर चर्चा करण्याची . मनस्थिती बिघडते हा विषय काढला की . त्यामुळे नकोच तो विषय . चल तू अभ्यास कर .मी माझ्या रुममध्ये जावून थोडा आराम करते ."

क्रमशः

पुढे कथेत काय होते यासाठी नक्की वाचा ….
वैखरी एक प्रेमकथा भाग - २३

धन्यवाद!

©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .





🎭 Series Post

View all