कथेचं नाव - वैखरी एक प्रेम कथा भाग 2
कॅटेगरी - राज्यस्तरीय कथा मालिका
सबकॅटेगरी- प्रेमकथा
टीम - अमरावती
सुहितला वसंतमध्ये अचानक झालेल्या बदलाचं कारण शोधायचं होतं ; म्हणून तो डिटेक्टिव
बनून त्याच्या वागण्यावर लक्ष ठेवून होता . तसंच या दोन दिवसात काय विशेष घडलं ; की त्याचा परिणाम वसंतच्या वागण्यावर झाला . वसंत असा चावराबावरा, विचलित का झाला ? याचा शोध घेण्यासाठी गेल्या दिवसाचे पूनर्विलोकन करत होता . त्यात काही सापडतं का ? चाचपळत होता .
दिवसभर वसंत बेचैन होता . तसेच रात्रभर कुस बदलवत होता . त्याचं हे वागणं पाहून सुहितला खात्री पटली होती ; की वसंतच्या बेचैनीचे कारण , त्याचं कवी मन किंवा एखादी कथा डोक्यात रंगाळणे वगैरे काही नाही , तर निश्चितच दुसरंच काही कारण आहे .
पाचव्या वर्गापासून दोघे सोबत
राहायचे .वसंतचा स्वभाव, मुळातच हळवा व संवेदनशील. दहावी - अकरावीत असेल तेव्हापासून वसंत कविता करायचा. चित्र तर पाचव्या वर्गापासूनच काढताना सुहितने त्याला बघितलेलं . अकरावीनंतर हळूहळू अवतीभवतीचे प्रसंग सुंदर शब्दात डायरीत उतरवायचा . एखादा मनाला भिडलेला प्रसंग लेखणीतून कागदावर उतरवला ; की वसंत रिलॅक्स व्हायचा ; परंतु वसंतला असं विचलित झालेलं आजवर सुहितनी बघितलं नव्हतं .
एवढ्यात काढलेले स्केच ,चित्र ,कथा कविता बघितल्यावर वसंतच्या मनाचा ठाव लागू शकेल असं सुहितला वाटलं .तो वसंतच्या सुटकेसला हात लावायला जाणार , तोच त्याला ते दोघे सहावीत असताना घडलेला प्रसंग आठवला .
वसंतनी वहीत एक चित्र काढलं
होतं . हुबेहूब त्याच्यासारखेच नाक, त्याच्यासारखेच टपोरे डोळे , त्याच्या सारखीच उजव्या गालावर खळी, कुरळे दाट काळे केस .फक्त फरक इतकाच की ते एका तरुण स्त्रीचे चित्र होते .
त्या चित्राला हातात घेत सुहित उद्गारला,
" वाव ! किती सुंदर चित्र काढले ! कोण आहेत ह्या ? तुझी आई का ? "
सुहितचे प्रश्न ऐकूण, शांत सुस्वभावी वसंतचे डोळे रागाने लालेलाल झाले होते . वसंतचा तो क्रोधित अवतार पाहून सुहित जाम घाबरला होता.
सुहितच्या हातचे चित्र हिसकावत , वसंतने सुहितला, रागाने समोरील भिंतीवर ढकलले . त्यावेळी सुहितच्या कपाळावर जखम झाली . त्या जखमेचा व्रण आजही सुहितच्या कपाळावर आहे .त्या व्रणाला हात लावताच वसंतची ती क्रोधित मुद्रा सुहितच्या डोळ्यासमोर उभी राहिली .तसाच सुहित वसंतच्या सुटकेस जवळून मागे फिरला .
वरून शांत दिसणारा वसंत . त्यावेळी क्रोधित का झाला होता ? त्याच्यावर कशाचा अदृश्य प्रभाव होता ? अशा असंख्य प्रश्नांनी सुहितच्या डोक्यात गर्दी केली होती .
कथा, कवितांची डायरी तसेच स्केचेस ,चित्र काढण्याची वही वसंत सुटकेसमध्ये ठेवायचा .काहीच कथा, कविता, चित्र तो मित्रांमध्ये शेअर करायचा.
वसंतचा त्याच्या सुटेकसला असं हात नं लावू देणं त्याच्या स्वभावाचा एक भाग म्हणून मित्रांनी तसेच सुहितनी त्या बाबीकडे आजवर दुर्लक्ष केलं होतं .
आज मात्र सुहितला प्रकर्षानं जाणवलं
की ; वसंतचे ते चित्र, कविता, कथा, स्केचेच त्याचं भावविश्व आहे. मी मित्र म्हणून वसंतच्या भावनिक विश्वाला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो . त्याच्या भावनांचे कंगोरे, सोबत राहूनही मी समजू शकलो नाही. त्यामुळेच आज मला माझ्या प्रिय मित्रात हा अचानक बदल का झाला ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड झाले असं सुहितला वाटलं .
" वसंतात झालेल्या अचानक बदलाचे कारण शोधायचं झाल्यास आणखी एक उपाय आहे", असं सुहित स्वतःशी पुटपुटला . त्याचे बोलणे जर आपण नीट डिटेक्टिवच्या कानाने ऐकले . वागणे
डिटेक्टिवच्या डोळ्यानी बघितले . तर त्याच्या वागण्या बोलण्यातून कुठेतरी धागादोरा सापडेल .
वसंतनी आजकाल बोलणं कमी केलं होतं .तो स्वतःतच रममाण राहायचा .कॉलेज संपल्यावर रात्री डायरीत काहीतरी लिहीत राहायचा . त्यामुळे हाही उपाय निष्फळ ठरला .
आठवडाभर वाट पाहू . कोणत्याही गोष्टीवर काळ हेच औषध असते .काही दिवसांनी वसंत नॉर्मल होईल . असे सुहितनी ठरवले .
आठवडा उलटून गेला तरी वसंतचं ना अभ्यासात , ना जेवणात कशातच नीट लक्ष नव्हतं . हे पाहून सुहितची चिंता वाढली .
न राहवल्याने सुहित वसंतला म्हणाला, "वसंत असंच सुरू राहिलं ; तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन सेमिस्टर बोंबलणार. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होईल .हे निश्चित."
सुहितच बोलणं वसंत ऐकत होता . झोपेतून जागं व्हावं . असं काहीसं वसंतला झालं .त्या रात्री वसंत रात्रभर स्वस्थ झोपला नव्हता .तरीही सकाळी लवकर उठला . प्राणायाम व ध्यान करायला लागला . हे पाहून सुहितला आश्चर्य वाटले .त्याचबरोबर आनंदही झाला .
"अरे वा ! प्राणायाम व ध्यान .मी पण करतो तुझ्यासोबत ".
"हो सुहित ये , तू पण कर . प्राणायाम व ध्यान केल्याने, अभ्यासातील एकाग्रता वाढते."
" अच्छा ! एकाग्रता वाढण्यासाठी आहे तर हा उपाय. गुड. व्हेरी गुड."
प्राणायाम व ध्यान आटोपल्यावर आंघोळ आटपून सुहित वसंत अभ्यासाला लागतात.
सुहित, वसंतचं लक्ष नसतांना त्याचं निरीक्षण करत होता .वसंत कालपेक्षा त्याला नॉर्मल वाटला . मन लावून अभ्यास करत होता .
वसंतला भावनांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्यही अवगत आहे हे पाहून सुहितला नवल वाटले . वसंतकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे . मन अस्वस्थ असेल तर त्यावर मात करण्यासाठी स्वभावनांचे व्यवस्थापन यायलाच हवे . असा विचार
सुहितनी मनात केला .
" ज्यांना आई-वडील नसतात त्या मुलांना स्वतःच स्वतःला सांभाळावं लागतं .त्यामुळे की काय वसंतला हे सर्व जमतं ; की अनाथ मुलांची देवालाच काळजी असते .त्यांच्यात निसर्गतः तो गुण देव देत असावा . असे अनेकानेक विचार सुहित मनात करत होता ."
" मी , अस्वस्थ झालो तर , मला
आई ,बाबा तसेच वसंतचा आधार लागतो .वसंतचं तसं नाही . तो प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर आहे ".
वसंतमध्ये झालेला सकारात्मक बदल पाहून सुहित जरी आनंदी असला तरी त्याच्या डोक्यात एक प्रश्न घर करून होता .वसंत एवढा अस्वस्थ, बेचैन कशामुळे झाला होता ? हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नसल्यामुळे त्याने त्या दिशेने त्याची शोध मोहीम सुरूच ठेवली .
"वरून शांत दिसणाऱ्या वसंतने मनाच्या डोहात काय दडवून ठेवलंय . हे जाणून घेण्यासाठी मला त्याच्या मनात डुबकी मारावीच लागेल; तरच वसंतच्या मनाचा ठाव लागेल " .असं सुहित मनाशीच
बोलत होता . .
वसंतच्या वागणूकीमागचे सूक्ष्म धागेदोरे उलगडेपर्यंत मला डिटेक्टिव बनून प्रवास करावाच लागेल .असं सुहितला वाटत होते .
वसंतबाबत सुहितच्या मनात असलेले प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते . अजूनही वसंतच्या मनाचा थांग लागणे बाकी होते . .त्याला डिटेक्टिव बनून वसंतचे ब्रेन हॅकिंग करायचे होते . जेणेकरून त्याचा मित्र कोणत्या अडचणीत तर नाही ना . हे एक मित्र म्हणून सुहितला जाणून घ्यायचे होते .
क्रमश :
थांग वसंतच्या मनाचा गवसेल का ?
सुहितचा प्रवास संपेल का ?
हे जाणून घेण्यासाठी , वैखरी एक प्रेम कथा- भाग 3 वाचायला विसरू नका .
कथा आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा .कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा . न आवडल्यास माफ करा .
धन्यवाद !
©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे टीम-अमरावती