Login

वचन..

वचन
वचन

"सुनबाई, तुझ्या सासऱ्यांना वचन दिलं होतं नां तू. शेती विकणार नाही म्हणून."

तुझ्या सासर्‍यांनी पै पै जमवून, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेती विकत घेतली होती. सततच्या आजारपणामुळे त्यांनी त्यांच्या जिवंतपणीच ती शेती आपल्या तिघांच्या नावे करून ठेवली . मुलगा माधवच्या आजारपणात माझ्या नावे असलेली शेती मी विकून टाकली. पाण्यासारखा पैसा खर्च केला मी त्याच्या आजारपणासाठी. पण शेवटी तो गेलाच. असे म्हणत सीमाताई रडू लागल्या.

"अहो सासूबाई, हे कलियुग आहे. आता गेले ते वचन पाळायचे दिवस." माधवी कुत्सितपणे हसत म्हणाली. अहो, तुमचा नातू निखिल शेती विकून शहरात फ्लॅट घ्यायचा विचार करतो आहे. तुम्हाला माहित आहे शहरात फ्लॅट किती महाग आहेत हल्ली?

"अगं पण तो नोकरीवर आहे. त्याची पत्नी आणि तो दोघेही नोकरी करतात. घेतील पुढे मागे एखादा फ्लॅट शहरात.

"हे पहा सासुबाई, तुम्ही आता विनाकारण आडकाठी आणू नका." असे म्हणत तणतणत माधवी तेथून निघून गेली.

अशा रीतीने माधवीने आपला मुलगा व सुनेच्या म्हणण्यानुसार शेती विकून त्यांना शहरात फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले. लवकरच निखिलने आलिशान फ्लॅट सुद्धा घेतला.

माधवी आपल्या मुलासोबत शहरात राहायला गेली. सीमाताईंनी मात्र तिथे जाण्यास सपशेल नकार दिला. तुम्ही जा. मी राहिल इथेच. आणि सीमाताई आता एकट्याच राहू लागल्या. कारण गाव सोडायची त्यांची इच्छा नव्हती.

काही दिवसांनी माधवीने गावातील घर सुद्धा विकायचे ठरविले. सीमाताईंनी तिला खूप समजावले. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. गावचे घर विकून सीमाताईंनाही ती शहरात मुलाजवळ घेऊन गेली. घराचे पैसेही तिने निखिलच्या स्वाधीन करून दिले.

फ्लॅट घेईपर्यंत निखिल व त्याची पत्नी माधवीशी अत्यंत गोडीगुलाबीने राहत होते. पण सहा महिन्यातच सारे चित्र पालटले. निखिल ची पत्नी निकिताची माधवी सोबतची वागणूक बदलली. ती मनास वाटेल तसे वागू लागली. निखिलचेही काहीही ऐकण्यासाठी ती तयार नव्हती.

एक दिवस तर निकिताने चक्कच सांगितले, की हे घर माझे आहे. या घरात राहायचे असेल तर माझ्या मनानेच ऐकावे लागेल.

माधवीला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. आपल्या सासूबाईंचे आपण ऐकायला पाहिजे होते. किती जीव तोडून सांगत होत्या त्या मला. आपल्या सासऱ्यांचे वचन आपण मोडले. निदान गावचे घर तरी आपण विकायला नको होते.आज आपल्याला तिथे जाऊन तरी राहता आले असते.

आपल्या चुकीच्या निर्णयामुळे आज आपली ही स्थिती झाली आहे. माधवी वारंवार स्वतःला दोष देऊ लागली. पण आता काहीही उपयोग नव्हता जे व्हायचे ते होऊन गेले होते. शेवटी तिने आपल्या सासूबाईला सोबत घेऊन आपले माहेर गाठले. आणि आपल्या भावाच्या आधारे राहू लागली. झाल्या प्रकाराने सीमाताई आजारी पडल्या आणि काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे माधवी आता एकटी पडली होती.

म्हणूनच कोणताही निर्णय घेताना सारासार विचार करूनच घ्यायला हवा. आपल्या मृत्यूनंतर आपली जी काही जमापुंजी असते ती वारसांना मिळणारच असते. पण जिवंत असेपर्यंत तरी आपण आपली जगण्यापुरती तरतूद निश्चितच करून ठेवली पाहिजे.

खेळ कुणाला दैवाचा कळला,
मी असो तू असो हा असो कुणी असो,
दैवलेख ना कधी कुणाला टळला.

सौ. रेखा देशमुख