उत्सव भीम जयंतीचा..

गाथा महानायकाची..

जनसामान्यांना न्याय देण्यासाठी 

केले ज्यांनी आजन्म अविरत प्रयत्न

बहुजनांचा उद्धार करणारे 

असे ते अपुले भारतरत्न.. 


लढले ते विकृत समाजवृत्तीशी कायम 

होता एकच हेतू, सगळ्यांनाच लाभावा शिक्षणाचा अधिकार

म्हणून करून रात्रंदिवस एक 

केला त्यांनी संविधान रचण्याचा साक्षात्कार.. 


संविधानाची देणगी भारतास देऊन 

झाले ते संविधानाचे शिल्पकार 

गोरगरीबांना आधार देण्याचा 

केला त्यांनी चमत्कार.. 


आजन्म त्यांनी घेतला होता एकच ध्यास

व्हावे मागास पिढीचे कल्याण सदोदित 

लढ्यात या त्यांनी सामील करून घेतले 

सुशिक्षित तरुण नवोदित.. 


झाला कितीही अपमान 

तरी सहज पोटात घेतला दडवून 

कूटनीती करणाऱ्यांनाही 

घेतले त्यांनी आपलेसे करून..


शिक्षणाचाच उपदेश कायम 

दिला त्यांनी सर्वांना 

एकजूट व्हायला सांगितले 

त्यांनी भारतातील जनसामान्यांना.. 


अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याआधी  

स्वतःसाठी उभे राहायला शिकविले 

बंधुभाव मनी रुजवून स्वतःसाठी लढण्याआधी

सगळ्यांना सोबत घेऊन चालायला सांगितले.. 


गुलामगिरीची व्याख्या सांगितली

अख्ख्या मागास प्रवर्गास समजावून

नक्की गुलाम म्हणजे काय 

याचे दाखविले प्रात्यक्षिक करून.. 


शिवराय आणि महात्मा फुले

यांना मानले त्यांनी गुरू 

संत तुकारामांचा वारसा जपून 

केले प्रबोधनाचे काम सुरू.. 


ख्याती त्यांची एवढी की, 

जग म्हणतं त्यांना विश्वरत्न 

पाहून जगात होताना भीम जयंती साजरी 

वाटतं झाले सार्थक त्यांचे यत्न..



©®

सेजल पुंजे( श्रावणी)