उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
भाग 2:
वडिलांनी बारकूला व्यावसायिक बनवले. खतांचे दुकान सुरू करून दिले. गावात खतांचे आणि बियाणांचे एकमेव दुकान असल्यामुळे बारकू चा व्यवसाय तेजीत आला. आणि बारकू चा "बारकू शेठ" झाले.
आता बारकू शेठ ला लग्नासाठी स्थळे येऊ लागली. तिथेही बारकूचा स्वभाव नडला. एका स्थळाची काहीही चौकशी न करताच त्याने स्थळाला होकार दिला! झाले!!
बैठक बसली. घेण्याची बोलणी सुरू झाली. मुलीकडची पार्टी खूप पैसे वाली होती. त्या मुलीचेही कुठेच लग्न जुळत नव्हते. आता हे नाते जुळते आहे म्हटल्यावर, मुलीकडचे पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार !
वधू पित्याने बोलणीला सुरुवात केली ,
" आम्ही दोन्ही अंगाचा कपडा, सगळे मानपान आणि थाटामाटात लग्न, वरदक्षिणा म्हणून 15 लाख रुपये आणि...... "
" बस बस बस बस बस बस बस , मामा फोडा की सुपारी,. लगेच लग्नाची तारीख पण काढा. " बारकू शेठ ने लगोलग गुडघ्याला बाशिंग बांधले!!
आणि च्या नंतर वधुपिता काय बोलणार होता, हे मात्र हवेतच जिरले. सुपारी फुटल्यानंतर होणारी नवरी मुलगी ओसरीवर सर्वांना नमस्कार करण्यासाठी आली.
सर्वांना नमस्कार करून तिने सरते शेवट वडिलांच्या पायावर डोके ठेवले. कधी आनंदाने वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू तिच्या डोक्यावर पडले. तसे ती म्हणाली
" ता...... ता.... ता... तात्या
" ता...... ता.... ता... तात्या
का... का.... का.... काळजी
नं..... नं...... ननं नका करू ..., "
अरे बापरे! बारकू शेठ ने डोक्यावर हात मारून घेतला.
देवाची लीला मात्र आघादच असते.
देवाची लीला मात्र आघादच असते.
एकदम घाई घाई जगणाऱ्या माणसाला, अतिशय शांत , मंद आणि तोंडातून शब्द सुद्धा लवकर न म्हणता येणारी बायको दिली...
तेव्हापासून बारकू शेट ने ठरवले घाई करायची नाही, उतावळेपणा करायचा नाही.
पण स्वभावाला काही औषध असतं का? काही महिने जरा शांततेत गेले. पण पुन्हा पहिले पाढे पंचांवान्न!!"
आता व्यवसाय मध्ये बारकू शेठ चा बऱ्यापैकी जम बसला होता. मुलगा, मुलगी , ऐश्वर्य, सगळं काही होतं. फक्त अक्षर अक्षर जोडून बोलणाऱ्या बायको सोबत मात्र बारकू शेठ चे पटत नव्हते. पण आता त्याशिवाय काही गत्यंतरही नव्हते म्हणा ...
आता बारकू शेठ ने राजकारणात नशीब आजमावयाचे ठरवले. नशिबाने ही त्यांना जोरदार साथ दिली.
सतरंजी उचलणारा कार्यकर्ता, ते नेता असा प्रवास बारकू शेठ साठी या झटक्यात सरपंच पदावर येऊन थांबला!
आणि बारकू शेठ चे बारीकराव अण्णा झाले...
बारीकरावांनी मग विकास कामाचा धडाकाच लावला. गावचा कायापालट केला. सुदृढ गावाला खरोखरच सुदृढ बनवले. त्याबद्दल त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला.
सगळीकडे आनंदी आनंद झाला. पुरस्कार सोहळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला. आणि कोणी एक म्हटले,
" अण्णा , तुमची तब्येत जरा सुधारा. सरपंच अन तो सुदृढ गावाचा कसा असला पाहिजे?
भारदस्त दिसला पाहिजे तो. आणि तुम्ही तर नावाप्रमाणेच बारीक दिसता राव. काही बरोबर नाही हे.... "
झाले. बारीकरावला तेवढेच पाहिजे होते. त्यांनी दोन महिन्याच्या आत "बॉडी बिल्डिंग" करून " बिस्किट" दाखविण्याचे ठरवले.
आणि म्हणूनच आज भल्या पहाटे, सगळ्यात तामझाम करून बारीकराव जिंकडे निघाले होते.
जिम मध्ये काही सोपे व्यायाम झाल्यावर, प्रशिक्षकाने त्यांना वजन उचलून व्यायाम करण्यास सांगितले.
वजन हळूहळू उचलायचे तसेच थोड्या थोड्या दिवसांनी त्यात वाढ करायची, अशा सूचना दिल्या.
पण प्रशिक्षक जाताच, त्यांच्यातील उतावळेपणाने डोके वर काढले.. आणि केवळ एकाच महिन्यात " बिस्किटं "काढू असा निश्चय केला....
त्यानुसार त्यांनी जास्त वजनाचे डंबेल्स उचलून व्यायाम करण्याचे ठरवले. दोन्ही हातात डंबेल्स धरले. जोर लावून दात ओठ खात ते उचलण्याचा प्रयत्न केला.
जोर लगा के हैय्या..... म्हणत कसेबसे डंबेल्स उचलले. परंतु डाव्या हाताला तो भार सहन झाला नाही. आणि ते डंबेल बारीकरावच्या पायावर पडले...
डॉक्टरांनी पायाला प्लास्टर घालून, दोन महिन्यांसाठी बारीकरावला विश्रांती घेण्यास सांगितले.......
समाप्त.
गीतांजली सचिन