तिला समजून घेताना...

Just Attached With Her In Various Ways So You Will Better To Understand Her.


तिला समजून घेताना....

जन्म,मर्यादा,गरजेपुरते शिक्षण,चूल,मुल,जबाबदारी आणि उंबरठ्याच्या आतून स्वप्न बघणारी ती...
तिला समजून घेताना कुठे चुकतोय अस स्वतःला विचारलं तर एक उत्तर आधी मिळेन की तिचं अस्तित्वच निर्माण होवू देताना आजही अविकसित खेड्यांचा दृष्टिकोन हा तिला जन्माआधीच नाकरण्याकडे जातोय तेव्हा खरी सुरुवात म्हणजे खरंतर आधी तिला जन्माआधी समजून घ्यायला शिकावं लागेन तेव्हा ती पुढे जाऊन कुणाची मुलगी,कुणाची परी,मैत्रीण,प्रेयसी,बायको,आई, आजी पर्यंतच्या रूपातील बहुरंगी कलाकार म्हणून वेगवेगळ्या रूपात सर्वांसमोर येईन. कुठेतरी तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तिला सुख समाधान मिळतं पण क्षणिक असणाऱ्या या रोजच्या आयुष्याची मजा ही कुठेतरी त्या त्या वेळेवर असते नंतर नाही आणि त्याच वयात कुठेतरी तिच्यावर बंधन यायला लागतात.मुलगी म्हणून तिला समजून घेताना बाप कधी चुकत नसतो कारण बंधनापलीकडे जाऊन बघितल तर तिथे काळजी आडवी येत असते आणि मग तिला समजून घेणाऱ्या बापाला ही नंतर मग ती समजून घ्यायला लागते.
ती कुठल्या ही रुपात असली तरी \"ती\"च मन आधी जिंकावं लागत.कारण मध्यम वर्गात राहताना आयुष्याची तडजोड शिकलेली असते भावाच्या शिक्षणासाठी किंवा घराची आर्थिक स्थिती ओळखून एक पाऊल मागे येऊन स्वतःचं शिक्षण ती थांबवते तेव्हा तिच्या मनाला समजून घ्यावं लागतं कारण तीच स्वतःच ही एक वेगळं भविष्य,एक वेगळी ओळख असताना ही या पलीकडे जाऊन तिने इतर कुणासाठी आधी स्वतःच्या मनाला समजावून घेतलेलं असतं. अन् मी पणा हा नात्यामध्ये आला तर तो अहंकार घेऊन येतो आणि तिला समजून घेण्याऐवजी इतर प्रश्नच जास्त उभे करून जातो. तेव्हा मनाचे संवाद जर व्यवस्थित होत असेल तर तिला किंवा कुठल्याही नात्याला समजून घ्यायला फारसा वेळ लागत नाही यात तीळमात्र शंका नाही.
मैत्रीण म्हणून तिची साथ असते तेव्हा फक्त तुम्ही लॉयल असाव लागत आणि तुमच्याकडे मन मोकळं करताना तिने दाखवलेला विश्वास हा टिकवून तिला समजून घ्यावं लागत.तिच्या आयुष्याच्या अडचणी आणि समाजाची भूमिका आणि बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये ती दुर्दैवाने २१व्या शतकात ती अडकली आहे, मनात राहणाऱ्या गोष्टींना व्यक्त व्हायला वाट असावी लागते अन् तिला ती वाट दाखवताना त्याने ही तिला समजून घ्यावं लागत.
खरंतर निवडलेले नात हे तिच्याकडून निभावलं जात फक्त आवड निवड म्हणजे आयुष्य नाही तर तिचे स्वप्न,प्रश्न,जबाबदारी,समाज या कुंपणामध्ये राहून जबाबदारीची जाणीव,घरातील माणसं आणि काम,मुलांची शाळा अन् अभ्यास,नवऱ्याचा ऑफिस,वैयक्तिक वादविवाद या सर्व गोष्टी मधून जाताना तिला समजून घेणं अवघड असतं कारण बदलणारी जबाबदारी तिच्यातील \"ती\" ची भूमिका बदलत असते आणि शेवटी कुठेतरी विश्वास असला की ती व्यक्त होते.त्यावेळी तिला समजून घेताना जन्मापासून स्री मध्ये असलेला भावनिकपणा आणि त्याच्या विरोधात असलेला पुरुषाचा स्वभाव यांचा योग्य मिलाफ असेन तर तितकं अवघड तिला समजून घेणं कधीही नसेन.
स्री ला समजून घेणं जे माणसांना लवकर जमत नाही असं बोललं जात असलं तरी एका मुलीला एका मुलीपेक्षा; प्रेम,विश्वास आणि आपुलकीने तिला समजून घेणारा एक मुलगा किंवा एक पुरुष असतो. जिथे ती ही व्यक्त होते.
काही गोष्टी वयानुसार होत असल्या तरी तिच्याकडे बघणं हे फक्त आकर्षण नसावं, तिच्यासोबत होत असलेल फ्लर्टिंग,निर्माण होत असलेली जवळीक याला तराजूच्या एका बाजूला ठेवून त्या पुढे जाऊन आधी तिच्या आयुष्याची परिभाषा ओळखून तिच मन आणि विश्वास जिंकता येत असेन तर त्या प्रेमात तराजुचा समतोल टिकवून तिच्यासोबत असलेल्या नात्याला समजून घेणं नक्कीच अवघड नसेन.नात्यामध्ये झालेले भांडण हे सध्या एका वेगळ्याच दिशेला जाताना बघायला मिळतात त्याआधी वेळेवर एकमेंकांसोबत होणारे संवाद परिस्थितीला नक्कीच बदलवू शकतात कारण लग्नात पत्रिकेत फक्त गुण जुळतात बाकी मन हे नंतर जुळवावे लागतात.
शरीरावर आणि मनावर असलेला ताबा हा नात्याला वेगळी ओळख करून देत असतो. तिचा समाजातला वावर हा भीती शून्य ज्यावेळी असेन त्यावेळी समाजाची भूमिका खऱ्या अर्थाने तिला समजून घेणारी ठरत जाईन यात शंका नाही त्यापलीकडे तिने स्वप्न हे फक्त घराच्या उंबरठ्याच्या आत न ठेवता स्वतःच्या जबाबदारीच भान ठेवून मनसोक्त पणे पूर्णत्वाचा प्रयत्न करावा.नात्यातला संवाद संपला,तिरस्कार,द्वेष वाढत असेन तर ती गोष्ट तितक्याच लवकर थांबवून आयुष्याची तिच्यासोबतच्या नात्याची नाळ टिकवायचा प्रयत्न दोघांनी ही करायचा असतो.
कुणाला समजून घ्यायला किंवा समजून सांगताना त्या विचलित मनाला आधी ओळखावं लागत त्यानंतर तिला समजून घ्यायला तितकंस अवघड नक्कीच होणार नाही, तुमच्या असण्याची जाणीव ही तिला हे वेगळ्या रूपात आधार देऊन जात असते .समजून घेणं तेव्हा अवघड होत जेव्हा कुठलही नात हे केवळ गरजेसाठी आणि काही अपेक्षा ठेवून निभावलं जात ही भूमिका आयुष्याची नात्याच्या मुळावर घाव घालते.तेव्हा एकमेकांत गुंतलेल्या भूमिका तिच्या मानसिकतेचा ताबा घेत असतात तेव्हा समज-गैरसमज ओळखून आणि ते वेळेवर दूर करून उभ्या आयुष्यात तिला तिच्या पाठीशी तुमचा भक्कम आधार असल्याची जाणीव होणं म्हणजे ही कुठेतरी तिला समजून घेतल्या सारखं असतं.
शेवटी इतकचं बोलता येईन तिचा जन्म हा व्यक्त होण्यासाठी,कुत्सित मर्यादांच्या पलीकडे जाऊन जगायला शिकवणारा, जबादारीला आयुष्याच्या पारड्यात तोलून भविष्याचे स्वप्न पूर्ण करणारा तेव्हा असेन जेव्हा तिच्या सोबत टाकलेली पाऊल,समजून घेतलेली मन,बदलणारी तिची भूमिका आणि त्या वेळेला दिलेली साथ, तिच्या भावनिक आयुष्याचे पैलू समजून जपलेली मन आणि तिचा टिकवलेला विश्वास हा शेवटी तिच्यातील \"ती\" ला समजून घ्यायला तुम्हाला मदत करत असतो.

लेखक - चैतन्य काळे
कथा - लेख(लघुकथा)
विषय - स्री ला समजून घेणं खरचं कठीण असतं का हो?
लेख - तिला समजून घेताना...
टीम - इरा नाशिक