*********************************
आईने सांगायला सुरुवात केली ...तू माझ्यावर रागावून बाहेर निघून गेलीस खर ,पण खूप वेळ झाला तरी तुझा काहीच पत्ता नाही . तुझ्या मित्र मैत्रिणींना विचारून झालं .कॉलेज, डांस क्लास अगदी सगळीकडे चौकशी केली ,घरातून निघून गेल्यापासून यांपैकी कोणाशीही तुझा काही संपर्क झाला नव्हता . शेवटी न राहवुन मी पोलीस कंम्प्लेन्ट केली .पण त्यांनी तुझा शोध घेईपर्यंत मला चैन पडणार नव्हता . शेवटी मी विचार केला ,म्हणलं आता आपणचं निघाव तुझ्या शोधात , मला माहित होत ,तू नक्कीच कुठल्या तरी मोठ्या अडचणीत सापडली असणार .
नाहीतर , माझं पिल्लू , आपल्या मम्मा पासून एवढावेळ लांब राहन शक्यचं नाही ... मला मागच्यावेळीचा प्रसंग आठवला ,जेव्हा तू अजून एकदा माझ्यावर रागावून निघून गेली होतीस ... तिकडेच शोधायचं ठरवलं मी तुला . आणि तिकडेच तुझी गाडी उभी असलेली दिसली . माझा संशय खरा ठरला ,थोडं आत जंगलात बघितलं , कुठे दिसतेय का तू , तर तुझी तुटलेली चप्पल ,चिखलात पडलेला मोबाईल फोन दिसला .. पण तू कुठेच दिसत नव्हती ..
मला समजलं ,तुझ्याबरोबर काय घडलं असणार . अस एकटीने शोधण्यात काही होनार नव्हतं ,कोणाचीतरी मदत घ्यायला हवी होती . हे आठवतायत का तुला ,गुराखी आजोबा ...... मागच्या वेळी ही यांनीच सांगितलं होतं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुझ्याबद्दल ..... आणि यांनी हेही सांगितलं होत .पोरीला पुन्हा इकडं एकटं लावून देऊ नका .. पण मी ही गोष्ट एवढी सिरियसली घेतली नव्हती ,त्यामुळे तेव्हा तुला नाही काही बोलले .
तुला वाचवण्यात तेव्हा यांनीच मदत केली होती , आताही करतील या आशेने मी तडक त्या जंगलातून गाडी काढली आणि जंगलापलीकडे यांचं गाव आहे तिथे यांना शोधत गेले... पहिल्यादा तर गावातील माणसं घाबरली ... एवढ्या मुसळधार पावसात कोण ही बाई .. कोणाचा पत्ता विचारतेय ... कोणी सांगायलाच तयार नाही .. नंतर त्यांना विश्वासात घेऊन घडलेली सगळी हकीकत सांगितलं .मग कुठे त्यांनी ह्या गुराखी बाबांचं घर दाखवलं ... तशीच पळत पळत पावसातून मी यांच्या घरी गेले ,कारण उशीर करून चालणार नव्हता ,तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता ..
बाबांना आदी ओळख सांगितली ,की मागच्या वेळी कसं भेटलो आपण ,कशी ओळख झाली .. मग त्यांच्या लक्षात आलं .. आणि हेही लक्षात आलं की मी एवढ्या पावसातून का आलेय त्यांच्याकडे ,त्यांनी न सांगताच ओळखलं होत की काय घडलं असेल..... तेवढ्यात ते म्हणाले , तुमाला म्या सांगितलं होतं की नाय ,"पोरगिला पुन्यानदा हिकडं ईवून दिवू नगासा !" तुमी ऐकलेलं दिसत नाय वाटतं . बघा घडल का नाय अघटित .. आव ,ती वासावरचं असत्याती .. कोण घावतयं का न्हाय ,ह्यनच्या तडाख्यात ....
"देव ,करो नी तुमची पोरगी सुखरूप असो ! " चला बिगी बीगी माझ्यासंग , म्या दावतो तुमाला योक माणूस .. लय देवगुणाचा हाय .... त्यो जरुर मदत करील आपली ... आनं ,पोरगिला बी वाचवलं तुमच्या ..
एवढ्या पावसातून हे म्हातारबाबा ,माझ्याबरोबर आले .. गावातली अजून एक दोघे जाणती माणसं पण बरोबर घेतली ... आणि गाडीत बसून निघालो , गुरुजींच्या घरी ..
गुरुजींचं गाव ,यांच्या गावापासून पाच सहा किलोमीटर लांब असेल .. पावसानं ओबडधोबड झालेला रस्ता कसातरी पार केला आणि पोहचलो तिथं .. नुकतेच ते आपलं ,जप .... नित्यादी काम उरकून , झोपायलाच चालले होते .. तेवढ्यात आम्ही तिथं पोहचलो .. त्यांचा चेहरा अगदी शांत होता ... एक निर्विकार ,तेजस्वी भाव होता त्यांच्या चेहऱ्यावर.. जसं की त्यांना आदीच हे सगळं माहीत होत ,की पुढे काय घडणार आहे ...." स्वामींचे , निस्सिम भक्त होते ते "
ते म्हणले आलोच , मग लगेच निघू . ते आत घरात गेले , ते त्यांच्या देवघरातून काहीतरी घेऊन आले ... पाऊस रपरप पडतचं होता . तरीही त्यांनी कशाची पर्वा केली नाही . एवढ्या मुसळधार पावसात तेही बसले आमच्याबरोबर गाडीत .असेच असतात साधुपुरुष सदैव इतरांच्या मदतीसाठी तयार . त्यांच्या बरोबर त्यांनी एक पोथी घेतली होती ... केसरी रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली , काहीसे धागे , पवित्र जलाच कमंडलू...
गाडीतूनही त्यांचा जप ,मंत्रोच्चार चालू होता ... जेणेकरून तिथे पोहचल्यावर काही अघटीत घडू नये .. माझ्या मनातही देवाचा धावा चालूच होता ,, काहीतरी पुण्य असेलच की माझं .. पोरगिला वाचव माझ्या .. परमेश्वरा !
जिथे तुझी गाडी उभी होती तिथेचं ,माझी गाडीही मी उभी केली .. सगळेजण खाली उतरलो .. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता ,सगळीकडे चिखल ,चालनं काय ,उभं राहणं ही कठीण होत त्या जंगलातल्या निसरड्या वाटेत .... तशात हे सगळेजण एकमेकांच्या मागे मागे चालत येत होते .
गुराखी बाबा ,वाट दाखवत होते सगळ्यांना.. चालत चालत जंगलाच्या मध्यभागी पोहचलो .. बाबा मधेच थांबले , कारण पुढे स्मशान शांतता होती ,पाऊस तेवढा रपरप पडत होता .तो आपलं काम चांगल्या रीतीने करत होता .. पुढें तो वाडा उभा होता , अंधारात ,आपलं आसुरी तोंड घेऊन .. बघताक्षणी धस्स झालं काळजात ..
माझी पोरगी इथं फसलेय , कशी असेल ,काय झालं असेल तिच्याबरोबर ..
गुरुजी म्हणाले ,शांत व्हा सगळे .... मुलीला काहीही होणार नाही विश्वास ठेवा सगळे . फक्त कोणीही आवाज करायचा नाही ,नाहीतर ती पिशाच्च सावध होतील ..मग मुलीला वाचवणं अवघड जाईल ..
वाड्याच्या दरवाजाजवळ गेलो , भलामोठा दरवाजा ,पण त्याला उघडण अवघड होतं ... आणि आवाज करूनही चालणार नव्हतं .. नाहीतर तुझ्या जीवाला धोका झाला असता . तेवढ्यात एक गावकरी म्हणाला ," गुरुजी, मला एक रस्ता माहिती हाय , लय बारकं हुतो तवा आलो हुतो,गुरं चारीत चारीत ..... . आयनं लय बदडल हुत .! पुण्यानदा तिथं गेलास तर तांगड तुडींन म्हणली हुती ".
तवा काय वाटलं नव्हतं ,पण आय म्हणली ते खरं हुत ,आता पटतंय मला . मग सगळे त्यांच्या मागे जायला लागलो . खरंच तिथे एक वाट होती . वाड्याची बाहेरची भिंत जीर्ण झाल्यामुळे ती थोडी पडलेली होती .
सगळे तिथून आत गेलो . आता गुरुजी पुढे होते .कारण सगळं त्यांच्यावरच होत . आमचं व्यवस्थित बाहेर पडण ,तुला त्या पिशाच्यांच्या तावडीतून सोडवणं. अजून आम्हाला हेही माहीत नव्हतं की नक्की आत काय आहे ,तू कुठे आहेस, कशी आहेस.....
मागच्या पडक्या भिंतीतून आत शिरलो आम्ही सगळे .. अंधारातून नीटस दिसतही नव्हतं ,तसंच आम्ही चालत चालत पुढे पुढे येत होतो . आत पोहचल्यावर , गुरुजीनी जे धागे आणले होते ,त्याची वात तयार करुन ,ज्योत पेटवली . समोर भलामोठा दरवाजा दिसला ,जो आतून बाहेरून दोन्ही बाजूनी बंद होता .....
मला समजेना ,मग तू आत आली कशी .नक्की काय घडलं असेल तुझ्याबरोबर .. तोपर्यंत गुराखी बाबा आणि गावकऱ्यांनी तुला इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न केला , काहीजण वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेले .. आणि पळत पळत खाली आले . त्यांना काहीतरी सापडलं होत , हो ते तुझेच कपडे होते . चिखलाने बरबटलेले ,पावसाने ओले झालेले .....
माझा बांध फुटला, जो एवढा उशीर धरून ठेवलेला ,मी रडायला लागले .गुरुजी म्हणाले रडू नका ,काही होणार नाही तुमच्या मुलीला ... त्यांनी ध्यान लावून बघितलं तू नक्की कोणत्या जागेवर आहेस . त्यांनी ओळखलं ,तू कुठे होतीस ,तुझ्या बरोबर काय होणार होत .
ते म्हणाले लवकर माझ्या मागोमाग या वेळ खूप कमी आहे . फक्त शांत रहायचं जो पर्यंत मी काही सांगत नाही ,तोपर्यंत कुणी काही करायचं नाही .
आम्ही सर्वजण गुरुजींच्या मागे मागे जाऊ लागलो .वाड्याच्या अग्रभागापासून थोड्याच पुढे अजून एक खोली होती ती आम्हाला कोणाला दिसलीच नाही ,गुरुजींच्या पवित्र शक्तीमुळे त्या खोलीचा रस्ता मिळाला . त्यांच्या मागो माग आम्ही सगळेजण तिथं पोहचलो .
आणि समोर जे दृश्य बघितलं , ते बघुन पायाखालची जमीन सरकली माझ्या , अंगातल सगळं त्राण संपल . आता जीव जातोय की काय माझा असच वाटलं होत मला . माझं लेकरू ,त्या नरभक्षकांच्या ताब्यात ... मृत्यू च्या दारात ..
मग गुरुजींचं वाक्य आठवलं मला .. "विश्वास ठेवा,तुमच्या मुलीला काहीही होणार नाही " .
त्या पिशच्चीणीने तुझे केस जखडून ठेवले होते ..... तुझं डोकं त्या लाकडाच्या ओंडक्यावर ठेवलं होतं .... खाली जमिनीवर सगळे रक्ताचे डाग होते यावरूनच समजत होतं त्या पिशाच्यांनी किती ,निष्पाप जिवांचा बळी घेतला असेल , पण आज हे थांबणार होत .. आणी तो दुसरा पिशाच् ....
हातात भला मोठा कोयता घेऊन तुझ्या मानेवर वार करणार तेवढ्यात .... गुरुजींनी ... कमंडलू मधील पवित्र जल त्या पिशाच्याच्या अंगावर काही मंत्र म्हणत शिडकवलं ...... त्याच्या हातातील कोयता अलगद निसटून खाली पडला , त्या पिशाच्याला समजलच नाही ,नक्की काय झालं ... हा ....हूं.... हह .... हह.... हा... हूं .. हह ...हह.... असा जोराजोरात आवाज करत त्याने मागे वळून पाहिले .....
छिन्न विच्छिन्न झालेलं त्याचं शरीर , रक्त गळत होत त्यातून .. आदी त्याला समजलच नाही काय होतंय .. नंतर मानवी शरीर बघितल्यावर तो आमच्या वर चाल करून यायला लागला ...... ज्या पिशच्चीणी ने तुला जखडून ठेवलं होतं ,तीही उठली ..... त्यांना मेजवानीच मिळणार होती आज चांगली ,इतकी माणसं दिसतायत म्हणल्यावर ..... तुला तिने धपकन खाली टाकून दिलं .. आणि तीही आमच्याकडे यायला लागली .
गुरुजींनी मला हळूच सूचना दिली ,की तुला तिथून घेऊन यावं ... गुरुजींनी आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही पिशाच्याचं ध्यान त्यांच्याकडे आकर्षित केलं .. आणि मी हळूच जाऊन तुला तिथून घेऊन आले . आणि या सर्वांपासून बिलकुल लांब उभी राहिले ... जेणेकरुन ती पिशाच्च ,पुन्हा तुझ्यावर ताबा मिळवू नयेत .
आता खरी कसोटी होती ,गुरुजींची .. गावकऱ्यांची ... ती दोन्ही पिशाच्च ,आपलं अक्राळ विक्राळ रूप घेऊन ,आपले अवजड पाय उचलत ,गुरुजी आणि गावकर्यांकडे येत होते ..... हसत होते हा ...हा हा... ह्रि ह्रि... ह्रि .... एवढी सगळी सावजं..... खेळ चांगला रंगणार आता ... एका भक्षकाच्या बदल्यात एवढी सगळी नरदेह खायला मिळणार आपल्याला ..... कित्येक कित्येक वर्षे तिष्ठत बसावं लागायचं ,एक शरीर मिळण्यासाठी... आणि आज ही आपल्या पायांनी चालत आली आहेत ....ह्या पोरीलाच वाचवायला आला आहात ना तुम्ही सगळे .... खूप मोठी चूक केली तुम्ही सगळ्यानी इथं येऊन , आमच्या सावजाला तर नेऊच शकणार नाही आणि आता तर तुमची पण गय नाही ... कोणीच वाचणार नाही कोणीच वाचणार नाही ,एकदा कोणी या वाड्यात पाऊल टाकलं की पुन्हा त्याची आत्माही इथून बाहेर जाऊ शकत नाही .. अस बोलत तो नर पिशाच्च जोरजोरात हसायला लागला .... आणि त्या पिशाच्चीणीने खुश होऊन जोराची किंकाळी मारली .... सारा वाडा हादरला या आवाजाने ....... मला जास्तच भीती वाटू लागली हे सगळ बघुन .... तुला तरी वाचवू शकतो की नाही ,की आमचेही मृतदेह इथं पडणार . काही समजायला मार्ग नव्हता . मेंदू अगदी बधिर झाला होता.
पण , त्या पिशाच्याना कुठे माहीत होत ,की आज त्यांचा अमानवी खेळ संपणार होता .. इथून पुढे या वाड्यावर या जंगलावर त्यांच राज्य नव्हतं चालणार ..
जस जसं ते दोघे पुढे येत होते ,तस तसे गुरुजी आपला पवित्रा घेत होते ,त्यांनी गुराखी बाबा आणि अजून दोन गावकऱ्यांना ,गुरुजी जे धागे घेऊन आले होते .. ते धागे हातात घायला सांगितले .. आणि ते धागे या दोघांच्याभोवती अशा रीतीने गुंडालायला संगितले की त्या पिशाच्यांना कळणारही नाही ..
ते दोघे असुरी हास्य करत , जोरजोरात आवाज करत .. गुरुजींपासून बस एका हाताच्या अंतरावर येऊन पोहचले होते .. त्यांना पकडण्यास ते दोघे हाथ पुढे करणारचं तेवढयात त्या दोघांना जोराचा झटका बसला आणि ते दोघेही काही समजायच्या आत विद्युत वेगाने मागे फेकले गेले ..
मला ही काही समजलं नाही असं काय झालं अचानक .." साधे सुधे नव्हते ते धागे ,दैवी शक्तीने मंतरलेले होते .... गुरुजींची एवढ्या वर्षाची साधना होती त्यात ."
त्या दोन्ही पिशाच्यांनी ,उठून पुन्हा प्रयत्न केला उभ्या असलेल्या मानवी शरीरांना आपल्या काबीज करायचा .पण त्यांचा तोही प्रयत्न असफल झाला,, जोरजोरात किंचाळत ते दोघे पुन्हा मागे फेकले ... आपली असुरी शक्ती काही एक चालेना ,यामुळे ते दोघे पेटून उठले होते ... बदला घेऊ या सर्वाचा आम्ही बदला ... कोणालाही नाही सोडणार ....आकांडतांडव चालू होता त्या दोन पिशच्यांचा ... कारण ते त्या पवित्र धाग्याच्या रिंगणात अडकले गेले होते किंचाळत होते ,ओरडत होते .... त्या आवाजाने कान सुन्न झाले होते .... वाड्याने आजपर्यंत मानवी किंकाळ्या ऐकल्या असतील ... आज मात्र तोच असुरी वाडा ... त्याच्याचं छत्रछायेखाली आपला किळसवाणा खेळ मांडलेल्या पिशच्यांच्या किंकाळ्या ऐकत होता .... बघ म्हणावं त्या वाड्याला .... एक ना एक दिवस सगळ्यांची बाकी पुरी होते ,मग ती अमानवी शक्ती का असेना .. भूत पिशाच्च का असेना ... अंत ठरलेला आहे ... अटळ आहे ...
त्या पवित्र धाग्याला स्पर्श होताच पुन्हा ते तसेच मागे फेकले गेले . एवढी वर्ष त्या पिशच्यांच्या भितीमुळे कोणी करू शकल नाही ते आज होत होतं ..... त्या अमानवी पिशाच्यांचा खेळ आज संपणार होता ...ती दोन्ही पिशाच्च जिवाच्या आकांताने ओरडत होती किंचाळत होती .....पण ती गुरुजींच्या पवित्र आत्म्याला मात्र स्पर्श देखिल करू शकली नव्हती ....
गुरुजींनी ते कमंडलू मधील पवित्र जल आपल्या हातावर घेतलं आणि त्या धाग्यावर शिंपडलं .... तसं ते एक दोन धाग्याचं , कमी रुंदीचं रिंगण अचानक वाढू लागलं ... दोन धाग्यांचा गोल ... चार धाग्यांचा ...दहा धाग्यांचा .... म्हणत म्हणत त्या पिशांच्यापेक्षाही मोठा धाग्यांचा डोंगर उभा राहिला .... पिशाच्च धडका देत होते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते .. पण सर्व प्रयत्न विफल होते ...
एवढी वर्षें त्यांनी जे क्रुकर्म केलं होतं , निष्पाप जीवांची फसवून हत्या केली होती त्याची शिक्षा त्यांना मिळणार होती ... गुरुजींनी त्या वस्त्रात गुंडाळलेली ती पवित्र पोथी बाहेर काढली ... प्रणाम करून त्यातली काही अक्षरे वाचली आणि पुन्हा कमंडलू मधील पवित्र जल त्या मंतरलेल्या धाग्यांवर , ज्या धाग्यांच्या गोलात त्या नरभक्षकांना बंदिस्त केलं होतं त्यावर शिंपडले ... अस करताच त्या धाग्यांनी पेट घेतला ....
ती दोन्ही पिशाच्च भेसूर आवाजात ओरडू लागली .... सोडणार नाही तुम्हाला ... नाही सोडणार ..... बघून घेईन ...... ब........ घ...... ऊं ऊं ऊं ऊं _ _ _ _ _ नं _ _ _ _
अस म्हणत दोघांनी जोराची किंकाळी फोडली ...... आणि ती शेवटची किंकाळी होती ...... त्या नरभक्षक .... अमानवी .... श्वापदांची........
गुरुजींनी आपली पोथी होती तशी त्या वस्त्रात गुंडाळली ... आपलं पवित्र कमंडलू हातात घेतलं आणि आम्हा सर्वांना म्हणाले .... जर या पिशच्यांचा मुळापासून नायनाट करायचा असेल तर हा वाडा देखील नष्ट करावा लागेल ... कोणत्याही क्षणी वाडा पेट घेवू शकतो ,आपल्याला तुरंत इथून निघालं पाहिजे ....
सगळ्यानी आपला होकार भरला. सगळेजण व्यवस्थित आहेत ना याची खात्री केली आणि एका क्षणाचा विलंबही न करता तिथून बाहेर निघालो .... जो वाड्याचा दरवाजा मघाशी यायच्यावेळी आतून बाहेरून बंद होता तो त्या वाड्यातून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा सताड उघडा झाला होता ....
कोणास ठाऊक त्या वाड्यालाही कळलं असेल आता आपला शेवट निश्चित आहे ... संपता संपता तरी एखाद चांगल काम करावं ... वाड्यातून बाहेर निघतो न निघतोच धाड धाड करीत वाड्याने पेट घेतला ... एवढ्या मुसळधार पावसात ही त्याने पेट घेतला होता .... कदाचित त्या वाड्यालाही केव्हापासून चालत असलेला हा राक्षसी ....पिशच्ची . .. अमानवी खेळ संपवायचा असेल .....
एकदा सुद्धा मागे वळून पाहिलं नाही आम्ही त्या जागेकडे ... घृणा ....वीट ... किळस .... आल्यासारख वाटतं होत तिथे .... तडक आम्ही सगळेजण गाडीत बसलो ... इतका वेळ मी तुला ... जस लहानपणी घ्यायचे तस कडेवर घेऊनच होते ... अजून तू शुद्धीत आली नव्हती ... एवढा मोठा धक्का बसला होता तुला ... तुला गाडीत नीट ठेवलं ... गुरुजी .. गुराखी बाबा आणि गावकरी यांना म्हंटलं ... पाऊसही खुप आहे आणि अजून शिवानी ला जाग आली नाही ... जोपर्यंत ही शुद्धिवर येत नाही .. तोपर्यंत मला तुम्हा सर्वांची गरज आहे ... तुम्ही माझ्या घरी चला ...हवं असेल तर मी उद्या तुम्हाला सोडते तुमच्या घरी ... एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं ... "अजून एक उपकार करा , या अभागी आईवर "
गुरखी बाबा म्हणाले , ताईसाहेब ! तुमची पोरगी .. माणुसकीच्या नात्याने ती आमची बी हाय .. तुमी काय बी काळजी करू नका .. पोरगी शुद्धीत येस तोवर आमी कुठबी जाणार न्हाय ... गुरुजी ही म्हणाले .. ठीक आहे ...
मग आम्ही सगळे तुला घेवून घरी आलो ... माघारी येताना गाडीतून मागच्या बाजूला त्या वाड्याच्या आगीतून हिरवट पिवळसर धूर निघताना तेवढा दिसत होता .. बाकी काही बघायचं नव्हतं आम्हाला त्या वाड्याकडे .. त्या जागेकडे..
कशी बशी ड्राईव्ह करत .. घरी पोहचलो ... तुला सर्वांनी अलगद उचलून घरात आणलं... तुझ्या शुद्धीत येण्याचीच वाट बघत होतो आम्ही सगळे ... त्याशिवाय कोणी पाणीदेखील पिणार नाही म्हनले होते ...
आणि तुला जाग आली ... तेही "आई " म्हणत ...
बेटा ,घाबरायची काहीही गरज नाही .. खूप मोठ्या संकटातून वाचलेयस तू ... आणि तुझी मम्मा असताना ... तुला काही होणं ,शक्य तरी होत का .... ?
आईने असं बोलताच शिवानी तीच्या गळयात पडून रडू लागली .... दोघींच्याही डोळ्यांत अश्रू होते ... खुशीचे .... एका आईने आपल्या लेकीला ...,मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं ... आणि लेकीच्या डोळ्यात अश्रु होते कारण ... ती पुन्हा भेटली होती आपल्या लाडक्या मम्माला....
" बाळा ! या सर्वांचे आशीर्वाद घे ,आणि आभार मान सगळ्यांचे " .... गुराखी बाबा म्हणाले , पोरी ... "पहिला आशीर्वाद तू या गुरुजींचा घे ".. त्येंच्या मदतीशिवाय आमी काय बी करू शकलो नसतो ... आणि तुझी आई मोठी हिम्मत वाली ..म्हणून तितवर पोचलो आमी ...
शिवानी गुरुंजी जवळ गेली आशीर्वाद घायला ... त्यांनी तिला ... खांद्याला पकडून वर उठवले .. म्हणले .."बाळा ! आशीर्वाद घायचे असतील तर परमेश्वराचे घे ... आभार ! मानायचे असतील तर परमेश्वराचे मान ... कारण ... कर्ता कराविता तोच आहे ... हा निमित्त मात्र मी होऊन जातो "...
गुरूजींच्या चेहऱ्यावर स्मित होत ... अजून काहीतरी चांगलं केल्याचं ... तिने गुराजींच्या जवळ जी पोथी होती त्याचे आशीर्वाद घेतले .. आणि आई जवळ आली ...
म्हणाली .. मम्मा , सॉरी ना ! पुन्हा अशी चूक नाही होणार ,,पुन्हा कधी कधी नाही सोडून जाणार मी तुला , असं भांडून, रागावून , असा मूर्खपणा पुन्हा नाही करणार ...
आई बोलली एकाच अटीवर मी माफ करेन ? ... शिवानी ,बोलली ... सांग मम्मा तू एवढं केलंस माझ्यासाठी ,मी तुझ्यासाधी एक अट मान्य करू शकत नाही . .
मम्मा, बोलली ! प्रॉमिस कर इथून पुढे मला सोडून कुठेही जाणार नाही ...
प्रॉमिस ! मम्मा , इथून पुढे मी कुठे कुठे जाणार नाही तुला सोडून .अगदी तू जा म्हणाली तरी ....
शिवानीचं हे बोलन एकूण तिथले सारे हसायला लागले .... हे हसू आनंदाचं होत .... खुशीचं होत ...एक निष्पाप जीव वाचवल्याचं.... पिशाच्ची शक्ती संपवल्याच ....
माझी मम्मा ,, प्यारी मम्मा ,, आय लव्ह यु , मम्मा ! म्हणत शिवानी ने आईला घट्ट मिठी मारली .... आईही बोलली . लव्ह यु टू ... माझा बच्चा .... !
( इति श्री .... "त्या भयानक रात्री " लिहून सुफळ सम्पूर्ण ...... आशा आहे वाचक प्रेमींना माझा हा प्रयत्न आवडेल ... )
(कथेतील ,पात्र, घटना ,स्थान सर्व काल्पनिक आहे . याचा कुठल्याही जीवित व्यक्ती या वस्तूही संबन्ध नाही )
(हा यातील जी आई आहे ती जरूर मला दर्शवते , मलाच काय जगातील प्रत्येक आईला. जी कितीही संकटं येऊदेत आपल्या मुलावर केव्हा आच येऊ देत नाही. त्यातून आपल्या मुलाची सुटका करते ,मग तिला कितीही त्रास का सहन करावा लागेना ..." अशा प्रत्येक आईला माझा ,सलाम ")
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद ..☺️
माझं facebook page ,नक्की like करा ...
https://www.facebook.com/blogsofvaishupatil/
© vaishu patil