तु मला मी तुला भाग १०

Samajane Ghaatleli Ekch Kamtarta Ti Mhanje To Shetkari Ahe
कथेचे नाव : तु मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग १०

वेटिंगरुममध्ये बसल्या बसल्या, अदितीचा कधी डोळा लागला तिलाही कळलं नाही. ती गाढ झोपी गेली, पहाटे जाग आली तेव्हा, अदिती आणि वैभव, एकमेकांच्या सहा-याने, एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेले होते.

जाग आली तशी, अदिती वैभवच्या खांद्यावरुन डोक ठेवलेले बघून चाचपडली. त्याच्या खांद्याचा आधार तिला आश्वस्त करणारा वाटला.

तो माझा सहारा झाला, मी का होवू नये त्याचा सहारा, तिने त्याच्या खांद्यावरचं डोकं काढून तसचं ठेवलं.. डोळे घट्ट मिटून घेतले.

जराच वेळात, वैभवला ही जाग आली.त्याने डोक काढून घेतलं तसं, तीने ही मिट्ट मिटलेले डोळे उघडले, आत्ताच जाग आल्याचं तिने त्याला भासवलं.

काय झालं? त्याने विचारलं..
ती जराशी ओशाळली, काही नाही म्हणत तिने मान डोलावली.

झोप लागली ना! मग झालं.. थकली होतीस तू, गाढ झोपलीस, ते महत्वाचं.. फ्रेश वाटेल बघ तुला आता..

वैभव हळूवार, बोलत होता.

मी येते, तीने हातातली पर्स खुर्चीवर ठेवली, आणि वॉशरुमच्या दिशेने गेली.

"वैभवादिती"... कित्ती गोड ना!! जाता जाता तिच्या चेह-यावर हलकं हलकं स्माईल आलं.

अदिती, फ्रेश होवून आली आणि बसल्या जागी पुन्हा येवून बसली.

वैभव ही फ्रेश होवून आला, जरी वेळ बसला..

चहा घ्यायचा, थोडा थोडा.. वैभवने विचारलं.

खालच्या मजल्यावरच कँन्टिन होत. सेल्फ सर्विस होती, अदितीला खूर्चीवर बसवून, वैभवने दोघांसाठी चहा आणला.

तू जातोस का घरी.. मी आहे.. तुला ही तुझे काम असतीलच ना.. अदिती वैभवला बोलली.

थांबतो, जरा वेळ... रिया येईलच बघ, सकाळी येते ती बोलली होतीच.. ती आली की जाईल मी. वैभव


डॉक्टरांच्या सकाळच्या राउंडसाठी, वाट बघणं सुरु होतं.. डॉक्टर आले, डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी देताच, वैभव फार्मसीतून औषध आणायला गेला. पाठमो-या त्याच्या आकृतीकडे ती एकटक बघत राहीली.

बाबांना, आय सी यू मधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.. बाबांना असं झोपलेलं बघून अदितीला गहिवरुन येत असलं तरी, सर्वांना समोर बघून, बाबा सर्वांशी छान बोलत होते, बघून अदितीला बरं वाटलं.

दवाखाण्यातून सुट्टी होईस्तोवर, वैभव अधुनमधुन येत जात होता. रियाचा भाऊ म्हटल्यावर प्रश्नचं नव्हता, वसंतरावांशी वैभवची आता छान ओळख झाली होती.

तुमची खूपच मदत झाली ह्या सगळ्यात, अदिती आणि सुमन सांगत होती, खाण्या पाण्यापासून सर्व गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलत, तुमचे आभार कसे मानावे शब्दच नाहीत माझ्याकडे, रियाचे आईबाबा भेटायला आले असताना वसंतरावांनी त्यांचे आभार मानले.

आपली माणसंही संकटात, अडीअडचणीत साथ सोडतात, तुम्ही आणि वैभवने सगळं सांभाळलत सगळंं, देवासारखे धावून आलात., तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही, खरचं नशिबवान आहोत आम्ही. वसंतरावांनी हात जोडले.

फार काही केल नाही आम्ही. अडी अडचणीत एकमेकांना साथ नाही तर मग कधी द्यायची. तुम्ही आता आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करणार आहात का? पटकन बरे व्हा आणि जेवायला बोलवा, गोडधोड नाही बरं का चालणार, चांगलं सावजी तिखटाचचं व्हायला हवं...

हो हो.. कधिही.. म्हणत, दोघे ही खळखळून हसले.

तुमचा वैभव ही मस्तच आहे, चांगला आहे पोरगा, मनमिळावू आहे, सर्वाशी प्रेमाने वागतो, दवाखान्यात रात्री थांबायचा तो माझ्याजवळ.... सर्वांना नाही जमत हे.. धन्य झालो आम्ही. आत्ता आमचच बघा ना, ना फार काही ओळख ना पाळख.. जीव लावला पोराने.... हल्ली कुठे दिसतात अशी पोरं, वसंतराव वैभवचं भरभरुन कौतुक करत होते.

पोरगा चांगलाच आहे, निर्व्यसनी आहे.. शिकला सवरला आहे.. समाजाने गळ्यात घातलेली एकच कमतरता, ती म्हणजे तो शेतकरी आहे! रियाचे बाबा म्हणाले.

काही नाही हो, आपणहून आपल्या पायावर धोंडा मारुन घेतल्यागत झालय त्याच. चांगली कंपनीची नोकरी लागली होती. पण मला कोणा दुस-याची हमाली करायची नाही. एकच अट्टाहास..

म्हटलं सरकारीसाठी प्रयत्न करं.. पण नाही, वडिलोपार्जित शेतीवाडी आहे, तिच सांभाळतोय हल्ली.

अरे पण शेतीवाडी, म्हणजे काय थोडी थोडकी आहे का.. रियाच्या बाबांचं वाक्य, रियाच्या आईने खोडून काढलं.

हातात लक्ष्मी आहे, विचारांत सरस्वती आहे.. सगळं बरं चाललयं की त्याचं. पिकपाण्याला बरकत एवढी की काय सांगू... रियाची आई, बोलत होती.

पण काय फायदा.. शेवटी शेतकरीच ना! रियाचे बाबा..

वैभववरुन सर्वांची चर्चा रंगली, रियाच्या बाबांच म्हणनं वसंतरावांनी ऐकून घेतलं.. एका अर्थी बरंयं पण.. राजकारण आणि शेती व्यवसायात , नव्या तरुणाईने यायलाच हवं... आपली मागची पिढी हेच आपल्या देशाचं भविष्य...

पण, ऐकावं ते ही नवलचं वाटतयं, असं ही असू शकतं?ह्यावर विश्वास बसत नाही. शेतक-याला शिकली सवरली मुलगी मिळत नाही, हे ऐकताच, वसंतरावांनी डोक्यावर हातच मारुन घेतला.

पण सगळं छानच होणार पोराचं.. चांगल्या माणसांच वाईट होत नाही कधिच.. हा वेळ यावी लागते फक्त.


वसंतरावांना सुट्टी झाली होती. वसंतराव आता वॉकर घेवून कुणाच्याही आधाराशिवाय हळू हळू चालू शकत होते.. फिजिओथेरपी सुरु होती, गुण येतच होता.

आपल्या बिझी शेड्युल्डची ग्वाही देत, विनित मोठ्यात मोठा एखाद दुस-या वेळा आला होता. पण त्याने ह्यी परिस्थीतीत आस्थाला सांभाळलं होतं, ह्यातलं समाधान ही खूप मोठ होतं..

वसंतराव घरी आल्यावर पूर्ण दिवसभ-यासाठी, आस्था हट्टाने आईकडे आली होती. माझ्यापासुन एवढं सगळं लपवून ठेवलंत, आई बाबा आणि अदितीवर ती खूप रागावली होती.

पोटातल्या बाळावर, उगाच ह्या चलबिचल अवस्थेच्या मनस्थितीचा परिणाम नको म्हणून सर्वांनी अपघाताबद्दल लपवून ठेवलं, हे पटवून दिल्यावर तिलाही पटलं.

आता ब-यापैकी सगळं सुरळीत होत होत तरी, आस्थाच्या डोळ्यात काळजी दिसतच होती, गर्भवती बाईच्या चेह-यावर दिसणारं तेज तिच्या चेह-यावर दिसत नव्हतचं.. तिचा चेहरा मलूल पडला होता.

काय बाळा, काय झालं? सुमनताईंनी विचारलं..

काही नाही, आस्था ने डोळ्यातलं पाणी पुसलं...

बाळा, बाबांची चिंता तू करु नको, ते आहेत आता ठीक, सुमनताईंनी हाती हात देत आस्थाला आश्वस्त केलं.

ये बाळा, आस्था.. बघ महिण्याभ-यात कसा, चालायला लागतो ते.. तुझं बाळ आलं की धावायचयं ना त्याच्यामागे, आबूने (आबा) असं, एका जागी बसुन चालणार आहे थोडं...

रडता रडता, आस्थाच्या चेह-यावर हसु आलं.. हंSS असं हसायचं, बाळ रडकं नकोय बरं का आम्हाला, तू रडलीस की बाळ ही रडेल बरं का...

आस्थाच्या चेह-यावर ती अस्वस्थता, काही न बोलता खूप काही सांगू पाहात होती... त्या दिवशीच्या सासूबाईंनी, साध्या घासभर बर्फीवरुन मुलगा मुलगी विषय छेडल्याचं... सुमनताईंना आठवलं.. आणि त्यांचा चेहरावर क्षणभर उदासी झळकली.

छे, पण शिकले सवरले आहेत विनित... दुनियेबरोबर चालावं असा ध्यास ठेवतात तरी बायकोला मुठित ठेवण्याचा प्रयत्न करतात.. किती हा विरोधाभास..
एक बाळ झालं की, कसं सुधारेल सगळंच... सगळचं आपल्या मनासारखं कुठे होतं.. पण येणारं हे बाळं, माझ्या आस्थाच्या आयुष्यात सुखाची नवी पालवी घेवून येणारी ठरावी, एवढंच मागते रे बाप्पा... सुमनताईंनी मनोमन देवाला प्रार्थना केली.

ओ हो!! वैभवादिती!! रिया अदितीला चिडवायची एकही संधी सोडत नव्हती..

रिया आणि अदिती, धावत बाहेरुन आत आल्या..

काय गं काय सुरु आहे तुमचं... दोघींना बघून, आस्थाने विचारलं..

काही नाही.. काही नाही!! म्हणत अदितीने आस्थाला मिठी मारली.

आस्थाला बघून दोघींना ही आनंद झाला... ताईकडे गुड न्युज आहे, कळल्यापासुन रिया पहिल्यांदाच भेटत होती, तिने तिचं अभिनंदन वगैरे केलं.

"वैभवादिती".. वगैरे काय गं!! ऐकलयं बरं का मी... वैभव अदिती... एवढं कळतं बरं का आम्हाला, मावशीबाई... आस्थाच्या बोलण्यावर अदितीने पुन्हा आस्थाला घट्ट मिठी मारली. वैभव तुझा मामेभाऊचं ना गं, रियाने आस्थाच्या बोलण्यावर हलकी हलकी मान डोलावली.

खूप मदत केली म्हणे त्याने, रात्री अदितीसोबत हॉस्पिटलमध्ये ही थांबायचा... काय गं!! आस्थाने अदितीला पोटात गुदगुल्या केल्या.

काय सुरु आहे, अदूू... आस्थाने हळूच अदितीला विचारलं..

आवडतो का तुला तो.. मला नाही का सांगणार..

ये बघ ना गं ताई, बालपणीची मैत्रीण आहे माझी.. माझी मैत्रीण प्रेमात पडलीय, हे का ओळखता येवू नये मला... पण पठ्ठी बघ ना कशी म्हणून ठाव लागू देत नाही... मनातल्या मनात मात्र गुदगुल्या होतात हिला माझ्या वैभव दा चं नावं ऐकल्यावर.

तिकडे तो, माझा वैभव दा... अदिती त्याला ही आवडते, असचं वाटतं मला, त्याच्या डोळ्यात दिसत मला, फोनवर आजकाल आम्ही अदिती वरुनच बोलतो, पण तो ही हिच्यसारखाच मठ्ठ...

आता ह्यांना एकमेकांबद्दल काय वाटत? हे आपण ठरवायचं की ह्या दोघांनी ठरवायचं..सांग बरं..

अदू... काय बोलते आहे रिया.. आस्थाने अदितीला विचारलं..

आस्थाने विचारताच, अदिती गोरीमोरी झाली होती, तिच्या गालांवर लाली पसरली... वैभवचं नाव ऐकताच, तिच्या डोळ्यात चमक आली... ती गोड लाजली ही...

अरे वाह!! प्रेमात पडलीय माझी अदू.... आस्थाने अदितीला कवटाळून घेतलं..

मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी... वाट कुणाची बघताय.. आस्था अदितीवर जोरात ओरडली.


आस्था बाहेर आली.... बाबा, अदूचं लग्न असं घाईघाईत करु नका, छान विचारपुस करा, माहीती काढा, फक्तच मध्यस्थ्यांनी सांगितलेल्या, जूजबी माहितीवर विश्वास ठेवून लग्न ठरवतो, आण् फसवले जातो.

शिकले सवरले, मोठमोठ्या बंगल्यात राहाणारे, ही लोक फसवतात बरं का. त्यापेक्षा, बघण्यातला ओळखी पाळखीतला असेल तर काय हरकत आहे. आस्थाच्या बोलण्यावर बाबांनी काहीच हरकत नसल्याच सांगितलं.

आस्था... कुणी आवडतो का गं आपल्या अदितीला.. तुला काय वाटतं, बोलली का काही ती तुला, सुमनताईंनी आस्थाला विचारलं..

मला नाही माहीत बाई काही.... तुम्हीच विचारा.. आस्था उत्तरली..

वाटतयं हल्ली, आपल्यातच राहू लागलीय, खरं तर... प्रेमात बिमात पडलीय का काय आपली अदिती... सुमनताईं बोलल्या.

ह्या गोडजोडीला फोडावं लागणार... ही रीया आहे ना.. हिला माहीती असावं सगळं... विचारतेच कधी .. सुमनताई.

आईबाबा, बहूतेक अदितीला वैभव आवडू लागलाय असं दिसतयं.. त्याच्या प्रेमात पडलीय तुझी लेक आई, आस्थाने सुमनताईंना मिठीतच घेतलं .

खरं की काय!! चांगला आहे पोरगा तसा.. महत्वाचं म्हणजे संस्कारी आहे, प्रेमळ आहे.

जर का दोघांना ही पसंत असेल तर हरकत ती काय? वसंतरावांच्या बोलण्यावर सुमनताईंनी होकार भरला.

अहे पण, गावात राहाणारा शेतकरी आहे तो.. शिकली सवरली, आपल्या पायावर उभी आहे आपली अदिती.

काय होईल पुढे... वाचत रहा, तु मला मी तुला कथेच्या पुढच्या भागात.

टिम : भंडारा

-©शुभांगी मस्के...


🎭 Series Post

View all