तु मला मी तुला भाग ७

Prem Ki Aakarshan Hya Guntyatch Ti Adkli Hoti
कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग : ७

लग्नाचं वय, अदितीच ही झालचं होतं.. अदितीसाठी आत्ता, इकडून तिकडून निरोप यायला लागले होते.

तिन साडे तीन वर्षात, परिस्थिती काहीच बदललेली नव्हती.
परंतू ह्यावेळी... मुलगी बनण्याच्या कार्यक्रमाला प्रदर्शनाचं स्वरुप येणारं नाही ह्याची काळजी, वसंतराव पुरेपुर घेत होते..

बघायला यायचं आणि काहीबाही कारण शोधुन नकार कळवायचा, पुन्हा तोच कांदापोहे कार्यक्रम आणि पुन्हा तोच खटाटोप, अदितीला पटत नव्हतचं.

एखादा मुलगा बघता क्षणी पसंत पडावा, मनाने कौल द्यावा आणि चूटकीसरशी लग्न पक्क व्हावं, असं अदितीला मनापासुन वाटत होतं... आजवर, अदितीला, हाच तो माझ्या स्नप्नातला राजकुमार वगैरे असं कधिच वाटलं नव्हतं, मनाच्या हळव्या कप्प्यात मात्र, एवढ्यात वैभवने जागा कमावली होती. मनात कुठेतरी वैभव अधुनमधुन डोकावत होता.

बघायला जाण्याचा कार्यक्रमात दोन्ही कुटूंबाप्रती आदराचा भाव असायलाच हवा, मुलीकडची बाजू म्हणून, फक्तच गृहीत धरावं, हे न पटण्यासारखं असलं तरी, वरपक्षाकडून अनेकदा वधुपक्षाला गृहीत धरल्या जातं, हे सत्य नाकारता येत नाहीच, हे आस्थाच्या वेळी ही अनुभवलं होत चं. ..

मुलीला पहिले बघून घ्यायचं, कुंडली वगैरेच नंतरच नंतर, अस म्हणायचं, मुलगी बघायची आणि छोट्या छोट्या गोष्टीवरुन नकार द्यायचा. एक दोन वेळा असे प्रकार अदितीच्या ही बाबतीत घडलं होतेच.

आत्ता हा निरोप चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर असलेल्या मुलाचा होता. काका आम्हाला मुलाची आणि कुटूंबाची सर्वाची इंत्तंभूत माहीती द्या पहिले, त्यांनाही माझी आणि माझ्या घरातल्या सर्वांची माहीती द्या. एकमेकांना साजेसे असू तर.. पुढे भेटून सगळं ठरवू. कांदेपोह्यांमध्ये बघण्याचा कार्यक्रम, हवाय कशाला, मला पटतचं नाही ते, अदितीने मध्यस्थी असलेल्या काकांना सांगून टाकलं.

तू एकटिच आहे की काय ह्या जगात, पोरगी शिकला सवरला आहे, तुझ्यासारख्या लाख पोरी मिळतील त्याला, मध्यस्थी असलेल्या काकांनी अदितीच्या बोलण्यावर चिडून म्हटलं.

वसंता, पाह्य बाबा.. आपली पोरीची बाजू, असा आडमुठेपणा बरा नाही. पोरीकडच्या लोकांनी असं तटस्थ राहून चालत नाही, नमतं घ्यावं लागतं वगैरे वगैरे... मध्यस्थी काका समजावू लागले. पोरगी पाहिल्याशिवाय कोण कशाला देईल आपली माहीती, नाव गाव, उंची, इथपर्यत ठिक... काकांचा सुर वेगळ्याच दिशेने जात असल्याचं जाणवत होतं.

अहो, काका पण तुम्ही मागे आणलेल्या एका पाहूण्या मुलाच आणि माझं, दोघांचे मामेकुळ एकचं आहे, हे देखिल बघितलं नव्हतं... असं जेव्हा आपल्यात चालत नाही, तर मग.. पोहे खायसाठी का हा अट्टहास.. कांदेपोहे काय, आम्ही असेही खावू घालू, त्यासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाचे प्रदर्शन हवेय कशाला? अदिती फटकळपणे बोलली.

वसंता, पोरीच्या तोंडाला लगाम दे.. पोरगी घरात बसवायची आहे वाटते तुला? अशाने कसं व्हायचं लग्न.. असे काहीबाही बोलून काका रागात निघून गेले.

सुमनताई घरी नव्हत्या , त्यांना कळल्यावर त्यांनी अदितीला चांगलच रागावलं.. वसंतरावांनी अदितीचं फटकळ बोलणं आवडलं नसलं तरी, तिच्या बोलण्यात ही तथ्य आहे, हे मनोमन पटतं होतं.

आजकाल मध्यस्थी, निरोप ही आणायला टाळाटाळ करु लागले होते. वसंतराव आणि सुमनताईंच्या लक्षात आलचं होतं.. मध्यस्थी म्हणजे दूर जवळचे नातेवाईकचं, त्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाला काय म्हणणार होते.

रिया अदिती जेव्हा जेव्हा भेटायच्या, तेव्हा तेव्हा... वैभवचा विषय निघायचा, काही ना काही कारण घेवून रिया अदितीला चिडवायची एकही संधी सोडायची नाही. अदू, अदू चा नांदा लावणारी, रिया, आजकाल काय ते "वैभादिती" म्हणून.... अदितीला चिडवत होती. वैभादिती नावाने, वरवर चिडत असलेली अदिती, मनोमन सुखावत मात्र होती.

हे प्रेम की फक्तच आकर्षण, ह्या सगळ्यात अदिती गोंधळात अडकली होती, आकर्षण वाटावं हे वयं नव्हतं आणि प्रेम वाटावं ही जाणीव सध्यातरी होतं नव्हती.. अदितीचा सगळाच गोंधळ उडाला होता.


अदितीचं ऑफिस सुरळीत सुरु होतं, वय वाढतं होतं तसतशी, सुमनताईंना अदितीच्या लग्नाची चिंता सतावत होती..

आस्थाला पुन्हा दिवस राहीले, पुन्हा एकदा घरात आनंदाचं वातावरण तयार झालं. आस्थाकडे आनंदाची बातमी आहे कळल्यापासुन आस्थाला कधी एकदाचं भेटतो असं सर्वांना झालं होतं.

अरे वाह!! कित्ती छान घमघमाट.. नारळाची वडी, वाह!!मस्तच... लव्ह यू आई.. धावत येत अदितीने ताटातली एक वडी, पटकन उचलून तोंडात टाकली.

अगगं!! ही नारळाची वडी, ताईसाठी स्पेशल... तुटल्या ताटल्या वडया आणि तो चूरा खा तू, छान झालेल्या चौकोनी वड्यांना हात नको लावू, आईने दम दिला. हा पूर्ण डब्बा आस्थाकडे न्यायचाय, गोड बातमी दिलीय पोरीने.. सुमनताईंच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.

बाबांसोबत जाणार होते, पण त्यांना उशिर होणार आहे आज, ऑफिसमधुन यायला.. सुमनताईंच्या बोलण्यावर अदितीने होकार भरला. आणि दोघीही आस्थाकडे जायला तयार झाल्या.

विनितची कार घरी नव्हतीच, आज ताईसोबत छान मनसोक्त गप्पा मारता येणार, अदितीला छानच वाटलं. मोठ्या उत्साहात, तिने डोअरबेल वाजवली. सासूबाईंनी दरवाजा उघडला.


या या!! वाटलचं तुम्ही कशा नाही आल्या ते, आस्थाच्या सासूबाईंची प्रतिक्रिया जरा गोंधळात टाकणारी होती. त्यांच्या बोलण्यावर अदितीने फक्तच हसुन छोटसं स्माईल दिल. अदिती आणि सुमनताई घरात आल्या.. आस्थाच्या सासूबाईंनी प्यायला पाणी दिलं.. आणि आस्थाला रुममधुन बोलावलं.

सकाळपासुनच आस्थाला खूप मळमळत होतं, चक्कर ही येत होती म्हणून ती आज झोपूनच होती, म्हणूनच आज आस्था ऑफिसला ही गेली नव्हती.

आस्था बेडरुममधुन बाहेर आली तशी, सुमनताईंनी नारळाच्या बर्फीचा डब्बा उघडून, त्यातलीच एक बर्फी आस्थाला भरवली... बर्फीचा डब्बा त्यांनी आस्थाच्या हाती सोपवला.

अहो काय करताय तुम्ही, आम्ही इथे लाडवाची आस लावून बसलोय आणि तुम्ही ह्या काय बर्फ्या, वड्या भरवताय लेकीला... आस्थाच्या सासूबाईंच्या बोलण्याची दिशा सुमनताईंबरोबर आस्था आणि अदिती दोघींना ही कळली. समजून न समजण्याचा आव आणत सगळ्या गप्पच बसल्या.

एक दिड तासात, ग्लासभर पाण्याशिवाय, कपभर चहाला ही आस्थाच्या सासूबाईंनी विचारलं नव्हतं. निघायची वेळ झाली तशा सासूबाई बोलल्या, चहा ही नाही घेतला तुम्ही.. अदितीला हसुच आलं...

बाळा, बरं नाही तुला .. आराम कर!! सुमनताईंनी आस्थाच्या डोक्यावरुन हात फिरवला, त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.

मनाची चलबिचल अवस्था, सकाळची ती अस्वस्थता, बदलणारे मुड, आस्थाला खरतर दोन दिवस आईकडे जावून रहावं खूप वाटत होतं. माहेरी जायच्या नावाने , विनित कसा विजेसारखा कडकडतो, तिने अनेकदा पाहिल होतं. सासूबाईंचे ही गाल फुगतात आणि मग घरातलं सगळचं वातावरण दुषित होतं. त्यापेक्षा नकोच आस्थाने स्वत:लाच मनोमन समजावलं.

आजकाल विनित, तिला जरा जास्तीच जपायला लागला होता. तिच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देत होता. तिची काळजी घेत होता. हेच तिच्यासाठी खूप होतं.

घराण्याला कुलदिपक हवा, मुलगी नको मुलगाच पाहिजे! हा उद्देश पुढे ठेवून सासूबाई आस्थाची काळजी घेतायत, हे स्पष्टच दिसत होतं.

पोटातलं बाळ मग ते मुलगा की मुलगी.. माझचं असणार, बाळ मुलगी राहीली तर, ती इथे ह्या वातावरणात सुरक्षित राहील ना, तिला ह्या घरातली माणसं आपलसं करतील ना, ह्या विचाराने तिला कधीकधी रात्र रात्र भीती वाटत रहायची, बी पी फ्लक्युएट होतं होतं.

मुलगा असो की मुलगी.. मला काहीही चालेल, असं म्हणून विनितने आपल्या आईला धीर द्यावा, आपल्या मनातली भिती दूर करावी. मुलगा मुलगी एकसमानचं, आईला समजावून सांगावं, एक स्त्री ह्या नात्याने असा विचार किती चूकीचा आहे हे पटवून द्यावं. आस्थाला वाटत होतं, पण तस घडत मात्र नव्हतचं
काय असेल सत्यपरिस्थीती, आस्था आणि अदिती दोन्ही बहिणींच्या आयुष्यात काय होईल पुढे??? वाचत रहा तु मला मी तुला च्या पुढच्या भागात..

टिम : भंडारा
-©®शुभांगी मस्के...

🎭 Series Post

View all