तु मला मी तुला भाग ३

Pangalticha Sohla Hi Nisarg Sajra Karat Hota
कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका
भाग : ३

अदितीने तिची कम्प्युटर सायंसची डिगरी पूर्ण केली आणि आता तिचं MBA पूर्ण झालं होतं...

गोरापान रंग, चाफेकळी नाक, तिच्या तपकिरी डोळ्यात वेगळीच चमक होती. लांब दाट केसांची, तीन पेडाची छान लांबसडक वेणी पडायची. गालावर छोटीशी खोल खळी अदितीच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होती.

अभ्यासात हूशार होतीच बरोबर बहूकलागुनसंपन्न होती.. रांगोळी असो की भरतकाम सगळचं मनापासुन करत होती.

नव्या गोष्टी शिकायला आवडत असल्याने, सतत काहीतरी नविन शोधत रहाण्याचा तिला ध्यास असायचा.

साधी, शांत, सोज्वळ, सालस अदिती नातेवाईकांबरोबरच मित्र मैत्रीणींच्या मनावर ही राज्य करायची. अदिती शांत होती, पण करारी तेवढीच खंबीर आणि कणखर होती.

आस्थाच्या लग्नाआधी, सतत तिच्या मागेपुढे करणा-या अदितीला.. आस्था लग्नानंतर एकाच शहरात असून खूप दूर कुठेतरी निघून गेल्यासारखी वाटतं होती. वारंवार भेटणं तर दूर पण फार काही बोलणं ही हल्ली होतं नव्हतं. अदिती आस्थाला खूप मिस करायची.

आस्थाला माहेरपणाला यायलाचं मिळायचं नाही. विनित सोबतच ती यायची आणि जायची. कॉलेजच्या वेळा सांभाळून कधीकाळी मधुनचं माहेरी आलेलं ही विनितला पटत नव्हतं. त्यावरुन ही विनित तिला अनेकदा ओरडतं.

सासू सासरेही, सुनेच्या माहेरी जाण्यावरुन नाखुष असायचे? काय असतं माहेरी? नविन लग्न झालेल्या सासुरवाशिनीसाठी माहेर म्हणजे स्वर्ग सुखाची अनुभूतीच असते तिला सांगावं वाटायचं, पण ह्यांना कोण सांगणार, आस्था गप्पच असायची. आस्थाच्या स्वभावातला सोशिकपणाच तिच्या सासरच्यांनी हेरला होता.


आस्थाचा मानसिक कोंडमारा व्हायचा, लाडक्या बहिणीची घुसमट अदितीला अस्वस्थ करायची..

अदितीची बालमैत्रीण रिया, अदितीची अस्वस्थता दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असायची..

रिया आणि अदिती, शाळेच्या पहिल्या वर्गापासुन सोबत होत्या.. बालमैत्रीणीच दोघी...

पाच वर्षाच्या होत्या तुम्ही दोघी, दोघींना ही आम्ही.. शाळेच्या आवारात सोडलं.... दोघींच्या आयांची एकच गत, लेकींना सोडून जाताना दाटून आलं होतं..

मागे वळून बघितलं तेव्हा, कसलीही ओळख नसताना मात्र, ह्या दोघी.. एकमेकींच्या हातात हात घालून, सोबत सोबत शाळेच्या आवारातून वर्गाकडे चालत जाताना दिसल्या..

रिया आणि अदिती, तेव्हापासुन त्यांची सुंदर जोडगोळी तयार झोली होती. जसजशा मोठ्या होत गेल्या दोघीही एकमेकींच्या रंगात रंगत गेल्या.. सुमनताई आणि रियाची आई कविता.. दोघी त्यांच्या मैत्रीचे गुणगाण गाताना थकत नव्हत्या.

दोघींच कसं म्हणून पान हलत नाही एकमेकींशिवाय.. लग्न झाल्यावर, सासरी कशा गं राहाल एकमेकींशिवाय? सगळेच दोघींना चिडवायचे.

"तिथेही एकमेकींच्या घरी, आम्ही पडीक राहू. हक्काने सांगू, पहिले आमची यारी बाकी नंतर तुमची दुनियादारी".. दोघीही हात हाती घेत, आपल्या सोबतीचे दाखले देत.

लग्न झाल्यावर.. सगळचं बदलतं, महत्वाचं म्हणजे प्रायोरटिज बदलतात.. असे घरातले जूने जाणते,मोठे लोक सांगताक, तेव्हा पटत नसलं तरी, आस्थाच्या लग्नानंतर प्रकर्षाने ह्याची जाणिव अधिकाधिक गडद होत होती.


दोघींच्या घट्ट मैत्रीच्या पल्याड... दोघींच्या आईवडिलांची ही छान मैत्री जमली होती. दोघे ही अधुनमधुन एकमेकांची चौकशी करीत सगळं ठिक चाललाय ना ह्याची खात्री करुन घेत..

दरवर्षी निदान हळदीकुंकवाच्या निमित्ताने कविता आणि सुमनताईंची भेट होतच होती.

अदिती आणि रियाचू रोजचं भेट व्हायची, अभ्यास, तासनतास गप्पा, खाणपिण.. एकमेकींचा निरोप घेवून जाताना, दोघीही अस्वस्थ होतं..

यार, मला मोठा भाऊ असता तर, मी माझ्या भावासाठी तुला मागून घेतलं असतं. तुला माझी वहिणी बनवून, तुला घरीच ठेवून घेतलं असतं. रियाच्या बोलण्यावर अदितीची ही सारखी भावना असायची.

रियाचा भाऊ मंदार... वयाने दोघींपेक्षा जवळजवळ.. पाचेक वर्षाने लहान होता. रियाच्या घरी, अदिती गेली की.. ताई ताई म्हणून मंदार सतत अदितीच्या मागेमागेच असायचा..

रिया आणि मंदारचे अनेकदा, खटके उडायचे. अदिती मध्यस्ती करायची आणि अगदी हक्काने बहिण भावंडांमधलं भांडण मिटवायची.

गेली अनेक वर्ष... अदीती त्याला राखीच्या दिवशी घरी बोलवून राखी बांधायची. मंदारने अदितीच्या आयुष्यात भावाची जागा भरुन काढली होती.


ऐ.. जानेमन.... जाने बहार... मेरी जान...
आती क्या खंडाला!! भूकंप आल्यागत, बाहेरुन धावत येत, निवांत बसलेल्या, अदितीला... रियाने मिठीत ओढत विचारलं..

रियाच्या अतिउत्साही शब्दांना झेलत... रियाच्या डान्सिंग स्टेप्सवर थिरकत अदितीने होकार भरला.

कुठे? जायचयं तरी कुठे? अदितीने विचारलं..

माझ्या आजोळी, मामाच्या गावी...वन डे पिकनिक टू मामाचं गावं...
खंडाळा नाही बरं का.. आसंगावंला.. रिया बोलली.

रियाच्या आजोळी जाण्याचा पूर्वीही अनेकदा प्लँन झालेला, पण काही ना काही कारणाने तो फिसकटायचाच. एक दोन वेळा ऐन सुट्टीच्या दिवशी, आस्थाला पाहूणे बघायला येणार म्हणून, रियासोबतचं जाणं फिसकटल्याचं अदितीला आठवलं.

आत्ता काहीच ऐकणार नाही मी तुझं! अदितीला काहीच बोलू न देता रिया आपलीच एकटीच बोलत सुटली.

काकू, अदिती उद्या येतेय आमच्यासोबत.. जवळचं पेपर वाचत बसलेल्या सुमनताईंनी मानेनेचं होकार भरला.


डिअर डार्लिंग,
उद्या सात वाजता, आम्ही येतोय...तयार रहा, म्हणत रिया आल्या पावली घरी निघून गेली...

डन... म्हणत .. अदितीने ही अंगठ्याने खुणावलं...

अदीतीने आस्थाला फोन करुन, उद्या घरी येणार आहेस का म्हणून विचारलं.. किती दिवस झाले ताईशी साधी भेट नाही, उद्या ताई येणार असेल तर मी नाही जाणार, रियासोबत गावी...

बोलतचं, अदितीने आस्थाच्या मोबाईलवर, तीन वेळा कॉल केला. आस्थाचा फोन विनितने रिसिव्ह केला. मँनर्स आहे की नाही काही.. काय एवढं काम असतं, तुम्हा बहिणींना, म्हणत आस्था, वॉशरुममध्ये आहे असं सांगून, विनितने एका झटक्यात कॉल कट केला.

उशिरा रात्रीपर्यत, अदिती आस्थाच्या कॉलची वाट बघत बसली, मात्र समोरुन आस्थाने फोनचं केला नाही.

दुस-यांच्या मुली म्हणजे काय गुलाम वाटतात की काय ह्यांना, अदितीचू खूप चिडचिड होतं होती..

आस्थाच्या सोशिक स्वभावाचा, अदितीला खूप रागही येत होता. तिच्या सोशिकपणा पुढे, सगळेच रस्ते बंद झाल्यासारखं वाटतं होतं..

अखेर, रियासोबत वन डे आऊटिंगला जायचं अदितीने ठरवलं..

सकाळी सातच्या ठोक्याला, अगदी वेळेत, भल्ली मोठी गाडी दारात येवून उभी झाली.


अदितीचे बाबा, झोपाळ्यावर पेपर वाचत बसले होते. गाडीचा हॉर्न वाजला तसा, ते ही गेटकडे गेले. दारात रांगोळी काढत असलेली अदितीची आई ही, हातचं काम ठेवून, कारकडे गेल्या.

गँसवर चहाचं अंधण ठेवलंच आहे, घोटं घोट चहा घ्या आणि मग निघा म्हणत, सुमनताईंनी रियाच्या आईला म्हणजे कविताताईंना आणि रियाच्या बाबांना म्हणजे अशोकरावांना चहाचा आग्रह केला.


घोटभर का असेना पण चहाच्या पाण्याला नाही म्हणण्याचं पाप ह्या हातून व्हायचं नाही म्हणत... रियाचे बाबा, कारबाहेर उतरले.

आज सुट्टी, " म्हटलं मेव्हन्याच्या घरुन फिरवून आणतो. म्हणजे आमच्या राणीसरकार खुश", रियाचे बाबा, मिस्किल्लपणे रियाच्या आईकडे बघत बोलले.

अंगणात ठेवलेल्या, खूर्च्यावर सगळेच बसले, सुमनताई आणि कविता, एकमकींशी बोलत बसल्या.

आस्था बरी ना! सगळं ठिक ना पोरीचं... रियाच्या आईच्या बोलण्यावर सुमनताईंना काय बोलावं कळेना..

"बडा घर पोकळं वासा", बरयं म्हणायचं आणि स्वत:च स्वत:चं समाधान करून घ्यायचं, दगडाखाली हात चेपलेत म्हटल्यावर दोष तरी कोणाला द्यायचा, एवढं बोलून सुमनताईंनी बोलता बोलता विषय बदलवला.

अदू !! अदू!! जोरात हाका मारत.. रिया धावतचं घरात गेली...

अगं आली आली... वाफाळत्या, गरमागरम चहाच्या कपांचा ट्रे, घेवून बाहेर येत अदिती बोलली.

तूने तो मौसम बना दिया... रियाने पहिलाच चहाचा कप स्वत:साठी उचलून घेतला. अदितीने सर्वांच्या हाती चहा दिला.

"छान झालाय हं अदिती चहा!" पहिल्याच घोटात, कविताताईं तीन बोटावरचा मोर नाचवला.

तुम्हाला आठवतयं, पोरी लहान होत्या, एकदा संक्रांतीला, तुम्ही हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या, माझ्या भाच्याने फक्त आस्थाच्या सायकलला हात लावल्याचं निमित्त झालं, अदितीने त्याचे केस उपडायचे तेवढे बाकी ठेवले होते.. रियाच्या आईने अदितीच्या लहानपणीची गोष्ट सांगितली तसे सगळेच हसले.

आत्ताही तशीचं आहे, जेवढी वरवर समंजस आणि विचारी दिसते तेवढीच कणखर आणि भांडकुदाड आहे ही पक्की.. रियाने ही अदितीची खेचलीच.


चहा पिवून झाला... चला निघायचं का?रियाच्या बाबांनी विचारलं कसा सगळेच होकार भरत, उभे झाले.

आता सायंकाळपर्यंत तुमची अदिती आमची, काळजी करु नका.. चला येतो, म्हणत रियाच्या बाबांनी शेकहँन्डसाठी हात समोर केला.

तुम्ही सोबत आहात.. मग चिंता कसली...
आरामात जा, अदितीच्या बाबांनी हात पुढे करत ..निरोप दिला...

सगळेच कारमध्ये बसले...
बाय, कारच्या खिडकीतून डोकावत अदितीने हात हलवला.

झाडांमागून येणा-या सूर्याच्या पहिल्या वहिल्या किरणांना मागे टाकत कारने वेग धरला.. हायवेवरुन कार सुसाट्याने पळत सुटली... काही अंतर गुळगुळीत फोर लेन हायवे सोडून, गाडी आत गावाच्या दिशेने निघाली..


हिरवी गर्द झाडी, सर्वदूर पसरलेले उंचच उंच डोंगर... जमिनिवर बहरलेली शेती आणि दूतर्फा गर्द हिरव्या झाडांच्या मधुन, पहाडांच्या कडेकडेने जाणारा निमुळता रस्ता. सगळं सौदर्य डोळ्यात साठवावं असचं होतं..


रिया आणि अदितीने हट्टाने, खिडकीच्या काचा खाली करवून घेतल्या... अंगाला स्पर्श करणारा तो गार गार वारा... आल्हाददायक वाटत होता.

वॉव!! अमेझिंग!!.. काय फ्रेश वाटतयं.... अदिती पुटपुटली. खिडकीतून डोकावून बघत, उडणा-या केसांना हवेच्या तालावर नाचवत, वा-याशी स्पर्धा करणं सुरु होतं.


वाह!! वाह!! किती सुंदर वाटतय.... शहरातल्या त्याच त्या पणापासुन दूर, ना प्रदुशन ना ती गाड्यांची गर्दी, ना ते कॉक्रिटचं जंगल... हेच खरं सुख... अदिती निसर्गाने नटलेल्या नवलाईचं भरभरुन कौतुक करीत हेती.


हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफल करा मस्तीने
मन सरगम छेडा रे!!
जीवनाचे गीत गावे..
अदिती आणि रीया दोघींनी, त्यांच्या फेवरेट गाण्याचा ताल धरला आणि आपल्याच धुंदित गुणगुणू लागल्या..

पक्षांचा सुमधुर किलकिलाट कानी पडला, पाणगळतीचा आनंद ही हा निसर्ग साजरा करत होता..

बाबा,प्लीज कार थांबवा ना प्लीज.. रियाने हट्ट केला तशी त्यांनी, माळरानावर हिरव्या गर्द वनराईत, रस्त्याच्या कडेला, एका शांत जागी कार पार्क केली....

शहरी आणि ग्रामिण भागातलं वातावरण, आपल्या आपल्या परीने भुरळ घालतंचं, अस म्हटल्यासं वावगं ठरणारं नाही. माळराणावरचं आल्हाददायक वातावरण, वातावरणातला फ्रेशनेस, ओसंडून वाहाणारा आनंद, ह्याची तुलना कशाशीच होवू शकत नाही.. शहरात राहाणा-या अदितीला ह्या सर्वांचच अप्रुप. काय होईल अदितीच्या आयुष्यात पुढे,
कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी वाचत रहा .. कथा तु मला मी तुला!!

टिम - भंडारा
-©®शुभांगी मस्के...

🎭 Series Post

View all