खरा अर्थ

अहिंसेचा नेमका अर्थ काय ?
" शंतनु , शांत हो . हिंसा हा कशावरही पर्याय नसतो. का मारलं तू त्या सचिनला ? " आईने विचारलं .

" आई , आता तू अहिंसा शिकवू नको मला . तो जमाना गेला . तो साला सचिन काहीही म्हणेल, ते पण ताईच्या बाबतीत आणि मी ऐकून घेऊ ? ती अहिंसा आणि गांधीगिरी ठेव बाजूला....तो म्हणाला , तुम्ही काय मिडल क्लास, मी खुश ठेवेल तुझ्या ताईला, बघ माझी मर्सिडीज ! त्याने घाणेरडे हावभाव पण केले , दिल्या दोन थोबाडीत ठेवून मग. आणि तू म्हणतेस अहिंसा...." रागाने झपाटलेला शंतनु म्हणाला .

" नेमकं काय खोटं बोलला तो ? आपण मिडल क्लास आहोत हे की त्याच्याकडे मर्सिडीज आहे हे ? घाणेरडे हावभाव केले असतील तर ते नक्की चुकलं पण आपण ते proove नाही करू शकत. पण तू काय केलं? तू त्याला मारलं , चार लोक गोळा झाले आणि तू काहीच चूक केली नसतांना फक्त हिंसा केल्यामुळे तू चुकीचा आहेस असं सगळ्यांनी मानलं . हो ना ? म्हणजे परत काही झालं तरी पहिलं बोट तुझ्याकडे " आई

" अगं पण मी नुसतं ऐकून घ्यायचं का ? " शंतनु थोडासा नरमला होता .

" मारून काय साध्य झाले ? " आईने शांतपणे विचारलं

"......."

" शंतनु , मी मुळीच तुला अहिंसा शिकवत नाही पण अहिंसेमुळे काय होतं ते सांगते . आपण शांत राहिलो तर पुढचा रस्ता दिसतो , रागात तो धूसर होतो . एक लक्षात ठेव शांत राहून मिळवलेले नेत्रदीपक यश म्हणजेच खरा बदला! तुला त्याला धडा द्यायचा आहे ना , मग हो यशस्वी , जा पुढे , कमव पैसे, घे मर्सिडीज आणि सिद्ध कर की तू त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेस.... हे मारामारी करून नाही तर अहिंसेनेच शक्य होईल....आता पुढचं तू तुझं ठरव " आई म्हणाली .

अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही असं नाही तर शांत राहून निर्णय घेणे हा अर्थ आज शंतनुला कळलं . सचिनच्या श्रीमंतीच्या मोठ्या रेषेला लहान ठरवण्यासाठी आपली रेष त्यापेक्षा मोठी ओढायची हा निश्चय करत परत हिंसेच्या मार्गाने जायचं नाही हे त्याने ठरवून टाकलं !

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर