तो पाठिशी आहे ना

न विसरता येणारा तो प्रसंग


तो पाठिशी आहे ना..
गोष्ट छोटी डोंगराएवढी..
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

" मला ना या रोजच्या आयुष्याचा खूप कंटाळा आला आहे.. सगळे सोडून हिमालयात जावेसे वाटते आहे."

" चल मग जाऊया."

" कर.. तू ही मस्करी कर."

" मी मस्करी नाही करत. कालच माझ्या मित्राचा फोन आला होता. तो चालला आहे हिमालयातल्या चारधाम यात्रेला. विचारत होता, येताय का? तू म्हणत असशील तर जाऊ. पंधरा दिवसांचा कार्यक्रम आहे."

"तू देवाला जाणार?"

" देवाला असे नाही. पण फिरणे तर होईल.. आली तर त्या देवाला माझी दयाही येईल."

" तुला एवढी सुट्टी मिळेल?"

"सुट्टी खूप बाकी आहे. नाही मिळाली तर सोडून देईन नोकरी. तसाही मला कंटाळा आला आहे या ऑफिसच्या राजकारणाचा. आपण कामे करायची आणि मेवा दुसर्‍याने खायचा. सोड तो विषय. आपण जाऊया. तु तुझ्या सुट्टीचे बघ."

अपेक्षेप्रमाणेच त्याला सुट्टी मिळाली नाहीच. तरिही त्या दोघांनी आपल्या आठ वर्षाच्या लेकीला घेऊन जायचे नक्की केले. जायचे बुकींग झाले. आणि तिघे निघाले दिल्लीच्या दिशेने. दिल्ली , तिथून हरिद्वार तिथून सुरू झाली यात्रा.

" तुम्ही कोणीच मुलांना नाही का आणले?" तिने त्याच्या मित्राच्या बायकोला विचारले.
" नाही.. ही यात्रा तशी खडतर असते ना, मृत्यूही होतात."
हे ऐकून तिच्या छातीत धडकी भरली. तिने आपल्या आठ वर्षांच्या मुलीकडे बघितले. ती नद्या, डोंगर सगळे मजेने बघत होती. तिने देवाला हात जोडले. घरी सुखरूप पोहोचव म्हणून. खडतर यात्रेची चुणूक त्यांना यमुनोत्रीला आली. उभाच्या उभा चढ. दोन पावले चढली तरी लागणारा दम. घोड्याने वर जाईपर्यंत लेकीला श्वास घ्यायला सुरू झालेला त्रास. हे सगळे सोडून परत घरी जावेसे वाटत होते. पण खाली आल्यावर लेक परत नॉर्मलला येऊन मजा करत होती. गंगोत्रीला काहिही त्रास न होता छान दर्शन झाले. या सगळ्यात एक गोष्ट ती विसरली होती. प्रवासात एक दिवस तिची संकष्टी होती. जिथे साध्या जेवणाचे वांदे तिथे उपवासाचे मिळणे कठीणच होते. सोबत असलेले सगळेजण उपवास करू नको सांगत होते. पण तिने नकार दिला. इथेच पहिला साक्षात्कार झाला. अशा ठिकाणी तिच्या पुरतीच साबुदाण्याची खिचडी मिळाली.
तिथून ते निघाले केदारनाथला.. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक. ते ही एवढ्या उंचीवर. बाजूला असणाऱ्या मोठ्या मोठ्या दरीखोर्यातून वाहणारी मंदाकिनी. तिथे लावलेले पुराचे निशाण ती पावसाळ्यात किती खवळत असेल याची साक्ष देत होते. ते बघूनच डोळे फिरत होते. हो नाही करता करता तो, ती आणि त्यांची लेक घोड्यावरून जायला निघाले. सोबत असलेले चालत दर्शन घेणार होते. त्यांच्या सांगण्यावरून दोघांनीही सोबत मोजकेच पैसे ठेवले होते. तिघेही घोड्यावरून रमतगमत वर पोहचले. आणि सुरूवात झाली परीक्षेला. घोड्यावरून उतरताच तिथे पाऊस सुरू झाला..जणू हे उतरण्याचीच तो वाट पहात होता. पाऊसही साधा नाही बर्फाचा. तिथे विकत मिळत असलेले तकलादू रेनकोट लगेच फाटूनही गेले. एका टपरीवर थोडा वेळ थांबले. पण किती वेळ थांबणार? शेवटी तिघे निघाले. जोरात वाहणारा वारा आणि वरून आता कमी झालेला पावसाचा मारा. भिजले तर होते. तसेच कुडकुडत मंदिरापाशी गेले. तिथे भलीमोठी रांग. त्यांची लेक थंडीने थरथरायला लागली. ते बघून शेजारच्या दुकानदाराने त्यांना आत बोलावले. तो रांगेत उभा राहिला. ती मुलीला घेऊन आत बसली. घाईघाईत सगळे सामान त्याच्याकडेच राहिले. तिच्याकडे फक्त फोन होता. नंबर जवळ आला म्हणून त्याने तिला फोन करून बाहेर बोलावले. त्या दुकानदाराला पैसे द्यावे म्हणून तिने खिशात हात घातला तर पैशांची पर्स त्याच्याकडच्या सामानात होती. त्या दुकानदाराला तिने परिस्थिती सांगितली.
" लहान मुलांना फक्त आत बसवायचे आम्ही पैसे घेत नाही." हे त्याचे उत्तर ऐकून काय बोलावे तेच तिला सुचेना. नवर्‍याचे फोनवर फोन येत होते. त्याचा तिला फोन लागतो आहे हे बघून त्याच्या पाठच्या माणसाने त्याच्याकडे फोन मागितला. पण त्या माणसाचाच काय दुसर्‍या कोणाचाही एकही फोन लागला नाही. ती लेकीला घेऊन मंदिराजवळ आली. तिघे आत आले आणि मंदिर आरतीसाठी बंद झाले. बाहेर थंडीने कुडकुडणारी त्यांची लेक मंदिरातल्या उबेने तरतरली. तिकडच्या पंड्याने त्यांच्याकडून यथासांग पूजा करून घेतली. नमस्कार वगैरे करून ते तिघे तिथून निघाले. बाहेर आले. मगाशी असलेले ढगाळ वातावरण आता निवळले होते. समोर निसर्गसौंदर्य दिसत होते. उतरताना फक्त लेक घोड्यावर बसली. तो आता लेकीसोबत होता. ती मगाशी राहिलेले फोटोसेशन करत होती. फोटो काढता काढता एका वळणावर दोघांची चुकामूक झाली. मगाशी लागणारा फोन आता लागत नव्हता. अंधार पडत होता. जाताना गजबजलेल्या रस्त्यावर आता तुरळक गर्दी होती. ती थोडी घाबरली होती. आधीच थोडे असलेले पैसेही नवर्‍याकडेच होते. ती एकटी पडली होती. हॉटेलचे नावही लक्षात नव्हते. तशीच ती पुढे पुढे चालत राहिली. मोबाईलची बॅटरीही आता संपत आली होती. रस्त्यावरचे दिवे इतके मंद होते की त्यापेक्षा वरच्या ताऱ्यांचा प्रकाश जास्त वाटत होता. कुठे थांबायचे हे ठरले नव्हते, जिथे घोडे घेतले तिथे तरी तो असेल असे वाटून ती पुढे चालत राहिली. ती खाली आली. तो तिथे नव्हता. इथे थोडीफार गर्दी होती. पण ती एकटी पडली होती. तिला जोरजोरात रडावेसे वाटत होते. स्वतःला सावरून ती तशीच पुढे जात राहिली. आणि तो तिथे उभा होता. लेकीला भूक लागली होती म्हणून कोपर्‍या वरच्या एका हॉटेलमध्ये तो थांबला होता. परत हिची चुकामूक होऊ नये म्हणून लेकीला आत बसवून तो बाहेर उभा होता. त्याला बघून तिच्या जीवात जीव आला. दोघांनीही नजरेनेच एकमेकांना मिठी मारली. लेकीला घेऊन ते दोघे हॉटेलकडे निघाले.
ज्याच्यासोबत ते या यात्रेला आले होते तो एकटाच दर्शन न घेता परत जाताना भेटला.. जो निघताना म्हणाला होता, लहान मुलांना घेऊन वर जाऊ नका. त्याचे दर्शन का नाही झाले हे त्यालाच माहित पण नाही झाले एवढे नक्की.


हा अनुभव आहे आमचा मे, जून 2013 सालचा. चारधाम यात्रेहून घरी परत आलो. आठवडा झाला आणि बातमी आली केदारनाथच्या जलप्रलयाची. पहिल्या सोमवारी आम्ही केदारनाथला होतो, दुसर्‍या सोमवारी घरी पोहोचलो आणि तिसर्‍या सोमवारी तिथे पूर आला. तिथे झालेला विध्वंस बघत असताना एकच विचार येत होता, आपण पंधरा दिवस उशीरा गेलो असतो तर?? त्यावेळेस नवर्‍याच्या ऑफिसने सांगितले होते नंतर सुट्टी घे. तशी घेतली असती तर? आज आपण तिथे असतो. हा विचार मनात येताच अंगावर शहारा आला. पण नंतर स्वतःशीच विचार करताना वाटले नसते झाले असे. कारण तो सतत जाणीव करून देत होता. तो पाठिशी असल्याची. तेव्हा न समजलेल्या अनेक गोष्टी हळूहळू आठवत गेल्या.. पहिली घटना बरोबर एकच प्लेट साबुदाणा खिचडी मिळण्याची.. दुसरी जिथे कोणाचाच फोन लागत नव्हता तिथे एकमेकांना भेटेपर्यंत फक्त आमचाच फोन लागण्याची.. तिसरी अगदी ऐनवेळेस मंदिरात प्रवेश मिळण्याची. कारण नंतर मंदिर दोन तास बंद होते.. त्या पूर्ण प्रवासात एक अज्ञात शक्ती जणू आमच्या पाठिशी उभी होती.. त्या प्रसंगाने आधी देखल्या देवा दंडवत घालणाऱ्या माझ्या नवर्‍याचा देवावर म्हणा किंवा त्या शक्तीवर विश्वास बसू लागला.. आणि मी.. कोणतेही संकट आले की न डगमगायला शिकले कारण आता मला माहित असते की तो दिसत नसला तरी सतत माझ्या पाठिशी आहे.. फक्त तो योग्य वेळीच त्याची जाणीव करून देतो..
हा होता माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग.. कसा वाटला ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई