तिची व्यथा भाग ३

आजारावर विजय हा परीवाराच्या साथीने लवकर बरा होतो.

आकाश आणि दिशा यांना स्वावलंबनाचा पाठ ताईंच्या दुखण्यातून शिकवून गेला. स्वत:चे काम स्वत: करु लागले. हे दृश्य डोळ्यात साठवताना ताईंना आनंद आणि दु:ख याची एकाच वेळी प्रचिती येत होती. लहान असताना मुल आपल्या आई-वडिलांचा आधार शोधत असतात. ताईंच्या परीस्थितीत इवलिशी पिल्ले आधार देण्याचे काम करत होती.

\"हे सगळे देवा माझ्याच बाबतीत का? \" असा प्रश्न ताईच्या मनात साहजिकच उत्पन्न होत असायचा. जे आपल्या आयुष्यात लिहून ठेवले आहे त्या गोष्टी तर घडणारच आहे. या विश्वासावर ठाम राहून परिस्थिती हळूहळू पालटायला लागली.
तीन-चार महिन्यांनी तपासण्या करुन त्यावर योग्य वेळी औषध उपचार केले गेल्याने संधिवात आता आटोक्यात येवू लागला होता. औषध उपचार घेवून ८-९ वर्षांचा काळ लोटला.
कानावर पडणारे प्रश्न काळजीचे रुप धारण करत गेले, अस म्हणतात कॅन्सरवर उपाय योजना आहेत मात्र संधिवातावर नाही. आता हे दुखणे कायमस्वरुपी आपली पाठ धरुन राहणार की काय?
अनेक गंमतीशीर उदाहरणांनी देखील ताईंच्या जीवनात कधी हास्य, भय, याचे रुप धारण केले होते. त्यातले थोडेफार प्रसंग आपण पाहूयात.,
ताईंनी आहे त्या परीस्थितीतून पुढे जाण्याची उमेद मनाशी पक्की केली. आपल्याला जे जे करता येणे शक्य आहे. ते करण्या करता सकाळी उठून चालायला जाणे, योगासने करणे या उपक्रमांना प्राथमिक स्वरुपात शामिल करुन घेतले.
एकदा सकाळच्या वेळी चालायला जात असताना रस्तावर कुत्र उभे होते. त्याला पाहून पळाव तर, आपल्याला कुठे जोरात पळता येणार या भावनेन ताई तिथेच शांत उभ्या राहिल्या. कुत्र जवळ येताच ताई घाबरल्या. आता जे होईल ते होईल या विचाराने हाताची मूठ घट्ट आवळली. कुत्रा ताईंच्या समोरच उभा होता. दोन्ही खांद्यावर दोन हात ठेवून उभा होता. थोड्या वेळाने निघून गेला. कुत्रा दूर होताच, झाडून काढणा-या मावशी, " तुम्ही पळाल्या नाही ते चांगले झाले, नाही तर हा कुत्रा पळणा-या माणसाच्या पाठी लागून चावा घेतो".
त्यांचे बोलणे ऐकून ताईंना पहिल्यांदा आपल्याला पळता आले नाही याची खंत वाटली नाही. जर पळालो असतो तर., १४ इंजेक्शनाचे दुखणे आपल्या पाठी लागले असते. थोड हसायलाही येत होत आणि विचार करुन घाबरण्याची प्रक्रिया दोन्ही एकाच वेळी सुरु होते. अश्या परीस्थितीत कसेबसे घर गाठले.


एकदा एका नातेवाईकांच्या लग्नाकरता ज्योती ताई गेल्या होत्या. तिथे सर्वजण गप्पा मारायला खाली बसले होते. ताई देखील त्यांच्यामध्ये जावून बसल्या. थोड्यावेळाने सर्वजण उठून उभे राहिले. ताईला मात्र प्रश्न पडलेला? कोणाला सांगाव, मला उठण्याकरता हात द्या. योगायोगाने मिस्टर जवळच्याच खूर्चीत जेवण करुन बसले होते. त्यांनाच फक्त माहित होते कि, उठवण्याकरता आधाराची गरज भासते. आजूबाजूला एवढे नातेवाईक असताना शेखररावांनी ताईंना उठण्यासाठी हात दिला. अक्षरश: उचलून जवळच्या खूर्चीत बसवले. नातेवाईंकामध्ये कुजबूज सुरु झाली. एवढ्या लहान वयामध्ये आजार झाला, लेकर तर खूप लहान आहेत. आयुष्य पडलय आख्ख अजून कस होणार हिच. खरतर आपण अडचणीत असताना समोरच्याचे चार धीराचे शब्द अडचणींशी सामना करण्याचे बळ देत असतात. पण याउलटच दृश्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या परीस्थितीवर हसणारे, त्यावर मस्करी करणारे, अनेक जण पाहायला मिळतात. खच्ची करण करुन मनाला चटका लावून जाणारे बोल असे काही बाहेर येतात मन दु:खाच्या दरीत भ्रमंती करु लागतात.

        खडतर आयुष्यातून ताई वाट काढत खंबीर पणे आपल आयुष्य जगत आहेत हे सर्वांनीच पाहिले.  काही मजेदार किस्से देखील ताईंच्या आयुष्यात घडले ते आपण पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all