तिचा संसार 3 अंतिम

प्रत्येक बाईला प्रिय असतो आपला संसार
इतक्या वेळ समजावून सांगूनही मीनाक्षी ऐकत नव्हती तेव्हा वीणाने सरळ नकार दिला.

मीनाक्षीला चांगलंच झोंबलं. लगेच आईला फोन लावला..

"आई अगं हे काय ऐकतेय मी? दादा वहिनी उद्या वाढदिवसाला नाहीत?"

"हो त्यांची कामं आहेत असं म्हणताय खरं... पण खरं कुणाला माहीत..खरं आहे की ढोंग...आलं असेल जीवावर काम करायचं, दुसरं काय...नवऱ्यालाही फूस लावली असेल.."

एकाच घरात राहून सुनेबद्दल इतकं वाईट बोलतांना आईला काही वाटत नव्हतं..मुलाच्या घरी काय परिस्थिती आहे, कुणाच्या काय अडचणी आहेत याबद्दल किंचितही कल्पना त्या ठेवत नसत, मात्र मुलीच्या घरी कधी कोण केव्हा आलं, केव्हा गेलं, कुणाचे काय प्रोब्लेम्स, कुणाला काय लागतं याची खडानखडा माहिती आईला असे...

अखेर वाढदिवस साजरा झाला, मुलांनी नेहमीप्रमाणे पावभाजी नाही म्हणून नाकं मुरडली..पण दुसऱ्या दिवशी वीणा मोठं गिफ्ट घेऊन मीनाक्षीकडे आली..तिच्या सासूबाई आदल्या दिवसापासून मीनाक्षीकडेच होत्या..

"कुठेय आमची परी?? काल जमलं नाही बाळा खरंच... पण आता बघ मेघाचा शेवटचा पेपरही झालाय, आता वेळच वेळ.."

वीणा आली तरी मीनाक्षी आणि आईने तिच्याकडे पाहिलं नाही...शेवटी वीणा स्वतःहून बोलली,

"कसा झाला मग वाढदिवस?"

"कसा होणार? लोकांना कामं करायची जीवावर येते...मग सगळं पडतं आमच्यावर.."

"काय गं वहिनी? तू नाही तर नाहीस, दादाला सुद्धा मुद्दाम तू पाठवलं नाहीस ना?? काय तर म्हणे परीक्षा आणि ऍडमिशन होतं... फक्त स्वतःच्या संसाराचा विचार कर तू आता.."

वीणाची सहनशक्ती संपली, तिने दोघींना एका दमात वठणीवर आणले..

"माझ्या संसाराचा विचार मी नाही करणार मग काय शेजारचा करेल?? आणि काय हो ताई, काही वर्षांपूर्वी तुमची घरात गरज होती तेव्हा तुम्ही मदत करायला कचरत होतात, तुमच्या सासरच्या लोकांचं नाव पुढे करून आला नाहीत.. आईंनीही तुम्हाला दुजोरा दिला..तेव्हा तुम्ही नव्हता केला का स्वतःच्या संसाराचा विचार?? आणि वाढदिवस कसा झाला एवढंच विचारलं मी..आजवर सहा वाढदिवस झाले परीचे, प्रत्येकवेळी मी इथे राबले ते दिसलं नाही की त्याबद्दल चकार शब्द काढला नाही, पण एक वेळा आले नाही तर मलाच ऐकवताय? काय तर म्हणे काम करायचं जीवावर येतं.. मग गेली सहा वर्षे कोण करत होतं सगळं? तुम्ही एकूनएक कामात माझ्यावर विसंबून आहात.. तुमच्या मुलांना मी माझी मुलं समजून राबते...आणि तुम्ही मेघाला दहावी साठी शुभेच्छा म्हणून एकदा तरी फोन केला का? तसं पाहिलं तर हा वाढदिवस तुमच्या मुलीचा आहे, इथे काम करणं, राबनं हे तुमचं काम...त्याबद्दल मला का दोषी धरताय...? आणि हो, केला मी माझ्या संसाराचा विचार...मीच नाही तर प्रत्येक बाई करते...तुम्ही केला, आईंनी केला...पण संसार फक्त आपल्याला आहे आणि बाकीच्यांना फक्त त्याभोवती फिरत राहावं हा गैरसमज काढून टाका आता...येते मी.."

वीणा दोघींना चांगलं सूनवुन निघून गेली, इकडे मायलेकी मात्र एकमेकांसमोर मौन बाळगून बसल्या, कारण वीणा खरं बोलली होती...आणि त्यात तिला दोष देण्यासारखं आता काही उरलंही नव्हतं...


🎭 Series Post

View all