रमाताईंचं बोलणं ऐकून आता अश्विनीला खूप बरं वाटायला लागलं होतं. तिने सगळी काम आवरली आणि तिच्या रूममध्ये जाऊन तिने थोडा वेळ आराम केला.
संध्याकाळी अशोक आल्यानंतर रमाताईंनी विषय काढला.
“अशोक मी काय म्हणते तिची इच्छा आहे तर तिला बाहेर काम करू दे ना, काय हरकत आहे?”
“अशोक मी काय म्हणते तिची इच्छा आहे तर तिला बाहेर काम करू दे ना, काय हरकत आहे?”
“अग आई हरकत काहीच नाहीये पण मला खरं सांग जमेल का तिला? इतके वर्ष ती घरी होती, बाहेरच्या लोकांची तिचा संपर्क नाही. घरी काम करणे आणि बाहेर काम करणे यात खूप फरक आहे. बाहेरच्या जगाशी वावरताना खूप सावधगिरीने सगळं करावं लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफिस करून, बाहेरचं काम करून तिला घरकाम जमेल का? तिला हा मेळ साधता येईल का?”
“बाहेर काम करणं कठीण आहे, तुला वाटतं तेवढं सोप्प नाही.” अश्विनीकडे बघून अशोक बोलला.
“अहो घरकाम करणे काही सोपं नाहीये, घर सांभाळणं काही सोपं काम नाहीये. तुम्ही बाहेर जाता, दिवसभर बाहेरच काम करता. दिवसभर घरात काय होतं हे तुम्हाला नाही कळत. म्हणून तुम्ही घरातल्या कामाला कमी लेखू नका.”
“अगं माझं तसं म्हणणं नाहीये.”
त्याचं बोलणं मध्येच थांबवून रमाताई बोलल्या.
“पण अशोक एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू दे तिला तिच्या मनासारखं.”
“हे बघ आई तू तिची बाजू घेऊन बोलू नकोस.”
“पण अशोक मला असं वाटतं तू एकदा तिला तिच्या मनासारखं करू द्यावं आणि काही अडलं तर मी आहे ना तिला मदत करायला.”
“तुमच्या दोघीच ठरलेलं आहे तर मग तुम्ही मला का विचारताय? होऊ द्या तुमच्या मनासारखं.”
दोघीही एकमेकीकडे बघून हसल्या.
दुसऱ्या दिवसापासून अश्विनीने नोकरी शोधायला सुरुवात केली. जवळजवळ पंधरा दिवसानंतर तिला एका कंपनीत जॉब मिळाला. रोज सकाळी साडेनऊला ती लोकलने जायची आणि संध्याकाळी साडेपाचला लोकलने परत यायची. सुरुवातीला तिला थोडी दमछाक व्हायची.
सकाळी लवकर आवरून तिला निघायला लागायचं. सकाळी उठून तिचा डबा, अशोकचा डब्बा, मुलांचे डबे त्यानंतर आईसाठी चहा, नाश्ता, स्वयंपाक सगळं केल्यानंतर ती निघायची. संध्याकाळी आल्यानंतर तिला थकायला व्हायचं. सुरुवातीला तिला थोडा त्रास झाला पण हळूहळू तिला सगळं जमायला लागलं होतं.
तिच्या रुटीनमध्ये ती रुळायला लागली होती. आपल्याला जमतय ही भावना तिच्या मनाला आनंद देऊन जायची. आता अशोकही तिला छोट्या छोट्या कामाला मदत करायला लागला.
तिला सकाळी जावं लागतं म्हणून रात्री तिच्या तयारीत तिचा हातभार लावायचा. हे बघून रमाताईंना पण थोडं बरं वाटलं की सगळा भार अश्विनीवर नाहीये.
क्रमशः