Login

ती एक रात्र

एका भयावह रात्रीची कहाणी

शितल ठोंबरे....(हळवा कोपरा )

ती एक रात्र....

रेवतीने थर्मामीटर तीनदा पाहिलं.समोर तिचा पाच वर्षांचा मुलगा सुयश तापाने फणफणत होता.ताप उतरायचं काही नाव घेत घेईना.औषध देऊन सहा तास झाले पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर रेवतीची काळजी वाढू लागली....

संध्याकाळ पर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतिसमोर निपचित पडला होता.अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना.त्यात सुनिल रेवतिचा नवरा कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता.तो आता सकाळीच परतणार.

सुनिलला फोन करावा तर तो काळजी करत बसेल.त्यातही सकाळशिवाय तो परत येऊच शकत नव्हता.त्यात हे गाव अन घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं रेवतिला सुचेना.

घड्याळाने बाराचे टोल दिले तसे रेवती दचकली.बापरे! बारा वाजले अजूनही सुयश चा ताप उतरला नव्हता.शेजारी पाजारी ना कोणाची फारशी ओळख ना पाळख.चारच तर दिवस झाले होते त्यांना या गावात घरात येऊन.

त्यांच सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या वाटल्या तिला.सुनिलला तस तिने बोलूनही दाखवलं.पण आपण नवीन आहोत कुतूहलाने पाहत असतिल अस म्हणतं सुनिलने रेवतीच म्हणणं उडवून दिलं.

घर फार मोठं नव्हतं.पण पाहता क्षणीच रेवतीला आवडलं.दार उघडून ते आत जाणार तोच एक जोरदार वार्याचा झोत त्यांना स्पर्शून गेला.रेवतीच्या तर अंगावर शहाराच आला.घर अजून पूर्णपणे आवरलं ही नव्हतं.दिवस भर सुयश इकडून तिकडे उड्या मारत फिरायचा.त्याला ही घर फार आवडलं.विशेष करून पडवीत असलेला झोपाळा.

आल्या आल्या त्या झोपाळ्याचा सुयशने ताबाच घेतला होता.सुयश च  मन नवीन जागेत रमलयं म्हटल्यावर रेवती अन सुनिल निश्चिंत झाले.त्यातच दोन दिवसासाठी सुनिलला तालुक्याला जावं लागलं.घरी आता रेवती अन सुयश दोघेच होते.

रेवतीने घर आवरायला घेतलं.छोटसं घर पण ते आवरताना रेवतीची अक्षरशः दमछाक झाली.दोन तीनदा तिला वाटले की तिने आवरलेलं सामान पुन्हा अव्यवस्थित झालयं.पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरलोय अस वाटून तिनं दुर्लक्ष केलं.

तिने सामान लावता लावता जेवण बनवले.तोपर्यंत सुयश झोपळ्यावरच खेळत होता.ती सुयशला जेवणासाठी बोलवायला गेली.तिला वाटलं सुयश कोणाशीतरी बोलत आहे.पण ती झोपळ्याजवळ गेली तिथे कोणीच नव्हतं.सुयश ला विचारलं कोणाशी बोलत होतास पण सुयशने रेवतिकडे दुर्लक्ष केलं.

खेळता खेळता स्वत: शीच बोलत असेल अस म्हणत तिने सुयशला जेवायला नेले.ताट वाढायला घेतलं तर जेवण आधीच कोणी खाल्लेलं होतं.हा सगळा काय प्रकार आहे काहिच कळेना.रेवतिने विचार केला कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर काही करत नसावं.तिने ताट केलं सुयशला जेवण भरवणार तोच सुयश च्या शर्टावर भाताचे शीत पडलेले दिसले.

हे सगळ काय चाललय.सुयश जेवला? पण कसं शक्य आहे.त्याला सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते.मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेऊ शकतो.सकाळ पासून इतकी कामं झाली आहेत की माझं डोकं चालत नाही बहुतेक असा विचार करून रेवतिने थोडा आराम करावा असा विचार केला.

सुयश ला घेऊन ती खोलीत झोपायला गेली.सुयश ला झोपवलं पण प्रयत्न करुनही तिला झोप लागेना.सकाळ पासून घडणारया विचित्र घटनांनी रेवतिची झोप उडाली.शेवटी कंटाळुन ती उठली.सुयश शांत झोपला होता.तिने प्रेमाने त्याच्या चेहरयावरुन हात फिरवला.

तिच्या हाताला चटका लागला.बापरे सुयशच अंग चांगलच भाजत होतं.तेव्हापासून ते आता रात्रीचे बारा वाजलेत.सुयश चा ताप तसूभरही कमी झाला नव्हता.सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरकडे जायच ठरवलं.थंड पाण्याच्या पट्ट्या तिने सुयश च्या डोक्यावर ठेवल्या.रात्री अडीच तीन वाजले असतील.रेवतिच्या डोळ्यांवर झोप आली तसं सुयशच्या बाजुला डोकं टेकवून तिने डोळे मिटले.

किती वेळ झाला कोणास ठाऊक पण रेवतिने आपले डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे काही केल्या उघडेनात.किलकिल्या डोळ्यांनीच तिने डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला.तिला समोर पुसटशी आकृती दिसली.रेवतिने डोळ्यांना अजून ताण दिला.

तसतशी ती आकृती रेवतिला स्पष्ट दिसू लागली.नऊवारी साडी नेसलेली,कपाळाला रुपया एवढं कुंकू,केस मोकळे, दात विचकत ती रेवती कडेच पाहत होती.रेवतिच्या अंगावर सरसरुन काटा आला.कोण ही बाई? माझ्या घरात काय करतेय? रेवतिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला.

तेवढ्यात रेवतिचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं.एक लहान मुलगा तिचा हात धरुन उभा होता. रेवति आता अधिक सावध झाली.तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला.तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसुन रेवतिचा सुयश होता.

सुयशला पाहताच सगळं बळ एकवटून रेवति उठण्याचा प्रयत्न करु लागली.पण तिला जाणवू लागलं.तिला कोणीतरी उठण्यापासून रोखत होतं.तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला.सुयशला पकडण्यासाठी रेवतिने हात पुढे केला.तशी ती बाई दात विचकत सुयशला घेऊन मागे मागे जाऊ लागली.

रेवतिने आपला हात अधिकच पुढे नेला.पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला.अचानक ती बाई आणि सुयश रेवतिच्या डोळ्यासमोरुन गायब झाले.रेवतिच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली.तिला दरदरून घाम फुटला.डोळे विस्फारुन रेवति समोर पाहण्याचा प्रयत्न करु लागली.पण तिच्या समोर कोनीच नव्हतं.रेवतिचं अंग थरथरु लागलं.

आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर.कारण समोर कोणीच नव्हतं.रेवति सुयशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळली आणि रेवतिला घाम फुटला.सुयश बेड वर नव्हता.अंगात एवढा ताप असताना हा मुलगा गेला कुठे? रेवति बेडवरुन खाली उतरली.सुयश ला शोधू लागली.पण सुयश कुठेच दिसेना.रेवतिचे पाय थरथरू लागले.आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं.कसं शक्य आहे हे.रेवतिने सुयशला हाका मारल्या पण काहिच प्रत्युत्तर आले नाही.

दार उघडून पहाव म्हणून ती दाराकडे वळली.कडी काढताना तिला बाहेरुन हसण्याचा आवाज आला.इतक्या रात्री कोण असाव आणि सुयश तिने घाईत दार उघडलं.पडवीत झोपाळ्यावर तिच बाई सुयश ला मांडीवर घेऊन बसलेली.एक विचित्र हास्य तीच्या चेहरयावर होते जणू ती याच क्षणाची वाट पाहत असावी.

रात्रीची ती भयाण शांतता अन तिचे हास्य वातावरण अधिकच भयाण करत होतं.काय करावं रेवतिला काही सुचेना ती वारयाच्या वेगाने झोपळ्या जवळ गेली.सगळा धीर एकवटून आपल्या भीती वर मात करत रेवतिने सुयश ला उचलण्याचा प्रयत्न केला तसा त्या बाईने रेवतिला हिसका दिला.रेवति भिंतीवर आपटली.पुन्हा रेवतिने उठण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तिने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

तस तिच विचित्र हास्य हळूहळू बंद झालं अन तीने कानावर हात ठेवले तसं रेवतिने चपळाइने सुयशला उचललं अन धावतच घराबाहेर पळाली.शेजारच्या सावंतांच दार ठोठावलं.सावंतांनी दार उघडलं.रेवतिला अस पाहून त्यांच्या सगळ लक्षात आलं.रेवतिला पाणी देऊन शांत केलं.सुयशला देव्हार्यातला अंगारा लावला.

"नशिब चांगल म्हणून वाचलात दोघं " सावंत काकू म्हणाल्या.

तशी रेवतिने डोळे विस्फारले.

"मला माहित आहे सारं. तुम्ही  ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो पण त्या बयेनं आम्हाला ही त्रास दिला असता.नाईलाजाने गप्प बसलो.तू आज जीला पाहिलसं ती सुमती"

कोण सुमती? रेवतिने विचारलं.

देशपांडेंची सून लग्नाला 10वर्ष झाली तरी मूलबाळ झालं नाही.सासरच्यांच्या जाचाने तिला वेड लागलं.कोनाचही मूल उचलायची अन पळवायची.लोकांनी तिला मारहाण केली त्यात तिचा जीव गेला.रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली.देशपांडेच कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं.

हे घर एजंट कडून भाड्याने देतात.पण सत्य सांगत नाहीत.तुम्ही या घरातले दुसरे भाडेकरू.याआधी सुमतीने एक जीव घेतलाय.दैव बलवत्तर म्हणून वाचलात तुम्ही.

रेवति सावंत काकू कडे पाहतच राहिली.तिने सुयशला घट्ट पोटाशी धरलं.

सकाळी सुनिल आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली.तासाभरातच त्याने ते घर खाली केलं.रेवति अन सुयश ला घेऊन तो तिथून निघाला.

.......पण सुमती मात्र वाट पाहत आहे आजही नव्या शिकारिची....

( कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित)