दरम्यान आकाशने मात्र दोघींमध्ये काहीही बोलायचे नाही हे आधीच ठरवले होते.
"मुद्दाम करतात हे मायलेक नेहमी. नसते बाहेर झोपले तर सकाळ सकाळ बोलणी तरी खावी लागली नसती." नेहा मनातच पुन्हा एकदा आकाशलाच दोष देत होती.
आकाश मात्र स्वतःचे आवरुन ऑफिसला निघून गेला. आज त्याने ना नाश्ता केला ना डबा नेला.
आतातरी दोघींना समजेल असे वाटले होते आकाशला पण घडले भलतेच.
आकाश गेल्यानंतर सासू सून पुन्हा एकमेकींना दोष देण्यात जुंपल्या. "तुझ्याचमुळे आकाश आज उपाशी गेला." म्हणत सासू स्वतःचे घोडे पुढेच नेत होती.
यावर सुनेने तरी गप्प बसावे ना, "बरं बाई माझ्यामुळे तर माझ्यामुळे म्हटली असती तर काय बिघडले असते?" इतके दिवस तशीही गप्प बसून सासूच्या चुकीच्या गोष्टींना तिने खतपाणी घातलेच ना. मग आजही परिस्थिती पाहून वागायचे होते तिने. पण नाही कधीही न बोलणारी नेहा आज मात्र पहिल्यांदा स्वत:चा स्टँड घेताना दिसली.
"सगळं माझ्याचमुळे होतं ओ आई, तुम्ही काही करतच नाहीत. घरात जे काही चुकीचे घडते त्याला फक्त आणि फक्त नेहाच जबाबदार असते."
"अरे बस करा दोघीही, काय सुरु आहे हे? थोडा तरी विचार करा." नेहाच्या सासऱ्यांना सहन झाले नाही आणि न राहवून ते बोललेच.
"अगं आशा तुझा मुलगा आणि नेहा तुझा नवरा, आज पहिल्यांदा उपाशी घराबाहेर पडलाय. याचे जरा भान ठेवा दोघीही. कुठेतरी थांबवा आता हे रोजचे रडगाणे. अरे एकीने तरी त्याला समजून घ्या रे. बायको आणि आईच्या भांडणात मधल्या मध्ये मरण त्याचे होत आहे; ही एवढीशी साधी गोष्ट कशी कळत नाही तुम्हाला? जेव्हा पहावं तेव्हा नुसत्या तलवारी घेवूनच उभ्या असता. एकदाचं संपवून टाका हे सगळं. एक एक तलवार आमच्या दोघांच्याही मानेवरून फिरवा अगोदर आणि व्हा दोघीही कायमच्या मोकळ्या."
बोलता बोलता सुरेशरावांच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली. रोजची अशी भांडणे पाहून त्यांच्याही सहनशीलतेचा आता अंत झाला होता.
तात्पुरती भांडणे तर थांबली होती पण त्यानंतर नेहाने आकाशला कितीतरी फोन लावले पण तो फोनच उचलत नव्हता. आईही फोन करुन थकली पण आकाशकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता.
सुरेशराव मात्र आज खूप दिवसांनी घराबाहेर पडले. लेकाची अवस्था त्यांना पाहवत नव्हती. आकाशमध्ये त्यांना स्वतःचाच भूतकाळ दिसत होता. आई आणि बायकोमध्ये त्यांची देखील आधीच कोंडी व्हायची नेहमी. आज मात्र आकाशसाठी तेही घराबाहेर पडले.
ऑटो पकडून सुरेशरावांनी सरळ आकाशचे ऑफिस गाठले. तो कामात बिझी असल्यामुळे थोडा वेळ ते बाहेरच बसले. परंतु कोणीतरी सुरेशरावांना ओळखले आणि आत निरोप पाठवला.
हातातील काम सोडून तो लागलीच बाहेर आला.
"बाबा असे एकटे कशाला आलात तुम्ही?"
"नाही राहवलं आज म्हणून कोणताही विचार न करता तडक निघून आलो बघ इकडे. तू काही खाल्ले का नाही रे?"
"बाबा काही खाण्याची इच्छा तरी होईल का ओ? तुम्हीच सांगा बरं."
"समजतंय रे बाळा मला. आशालाही समजावून थकलो. पण यावर काही मार्ग निघेल असे वाटत नाही. दोघींनीही आता हद्दच केली आहे."
"तुम्ही खाल्ले का बाबा काही?"
"तू असा न खाता पिता निघून आलास, कोणाच्या घशाखाली घास उतरणार आहे? सांग बरं मला."
"बाबा चला आपण काहीतरी खावून घेवू अगोदर."
आकाश मग बाबांना घेवून शेजारच्या एका रेस्टॉरंट मध्ये गेला. बापालाही आज खूप समाधान लाभले.
"आज मी आलो म्हणून नाहीतर आकाश जेवलाच नसता हे माहीत आहे मला. नेहमी घरात काहीही झाले तरी त्याचा त्रास हा स्वतःलाच करुन घेतो." सुरेशराव मनातच बोलत होते.
क्रमशः
आता दोघे बापलेक कशी अद्दल घडवणार आपापल्या बायकांना? जाणून घ्या पुढील भागात.
©® कविता वायकर