अभयारण्याची थरारक सहल भाग 1

रात्रीचे किती वाजले हे कळत नव्हतं. हाताला घडयाळ असूनही इतका गडद अंधार होता की काटे दिसणं तर दूर

   अभयारण्याची थरारक सहल

भाग 1

रात्रीचे किती वाजले हे कळत नव्हतं. हाताला घडयाळ असूनही इतका गडद  अंधार होता की काटे दिसणं तर दूर, घडयाळ पण दिसत नव्हतं. आपल्याला पंचांग कळत नसल्या मुळे अमावस्या आहे का हे समजत नव्हतं. अर्थात आता ते समजूनही काही उपयोग झालाच नसता. संदीप नुसता वैतागलाच नव्हता तर सॉलिड घाबरला पण होता. कारण प्रसंगच तसा होता.

संदीप च्या मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या ऑफिस मधले काही मित्र मिळून त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ताडोबा च्या सफरीवर आले होते. तलावाकाठी असलेल्या गेस्ट हाऊस मधे थांबले होते. वाढ दिवस आणि जेवण खाण झाल्यावर, सर्व जणं थोडं  जंगल फिरू म्हणत फेर फटका मारण्यासाठी निघाले. गेस्ट हाऊस च्या वाचमनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण सर्व तरुण, आणि त्यात दोन तीन पेग पोटात गेलेले, सगळेच एकदम शूर वीर झाले होते. मग काय कोणीच ऐकलं नाही. आणि सर्व सात जणं जंगलात शिरले.

त्या वेळेला म्हणजे १९८५ साली, मोबाइल चं नाव सुद्धा कोणी ऐकलं नव्हतं. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट चे नियम सुद्धा फार कडक होते. गेस्ट हाऊस मध्ये सुद्धा विजेचे दिवे नव्हते. जंगलात फिरतांना फॉरेस्ट गार्डस कंदील आणि काठी घेऊन फिरायचे. या पोरांजवळ टॉर्च पण नव्हता. तसेच अंधारात, एकमेकांचा हात पकडून जंगलात शिरले. सुरवातीला विरळ  जंगलात काही वाटलं नाही पण जस जसं जंगल दाट होऊ  लागलं तशी सर्वांची चाल मंदावली. पण दारूचा अंमल कायम होता म्हणून कोणी मागे फिरायला तयार नव्हतं. एकमेकांचे हात घट्ट धरून सर्व चालले होते. आणि, अचानक जंगलात कलकलाट सुरू झाला. ही पोरं विचारच करत होते की असं अचानक काय झालं असावं म्हणून, पण त्याचं उत्तर लगेच मिळालं. जीवाचा थरकांप उडवणारी वाघाची डरकाळी कानावर पडली. मग काय, हात सुटले आणि पळा पळ सुरू झाली.

अरे पळू नका वाट चुकाल. कोणी तरी ओरडून म्हणालं. आणि मग एकमेकांना आवाज देत सर्व जण एकत्र आले. आता मात्र सर्वांना माघारीच जायचं होतं. जंगलाच्या बाहेर आल्यावर थोडया अंधुक प्रकाशात सर्वांना एकदम जाणवलं की संदीप त्यांच्या बरोबर नाहीये. काय करायचं ? सगळेच घाबरले, पण त्याला शोधायला पुन्हा जंगलात कोण जाणार ? आता दारूचा अंमल सगळा उतरला होता, मग काय, सगळे गेस्ट हाऊस वर आले आणि त्यांनी गार्ड ला सांगितलं.

गार्ड ने कपाळा ला हात लावला.

तरी मी तुम्हाला सांगत होतो की जाऊ नका. पण तुम्ही ऐकलं नाही. आता बघा काय होऊन बसलं ते.

वॉचमन दादा, चुकलं आमचं. पण आता त्याला शोधायला आम्हाला मदत करा ना. अहो तो जंगलात एकटा काय करत असेल, कुठे जाईल ? वाटा पण सापडत नाहीत एवढ्या दाट झाडी मध्ये आणि अंधार सुद्धा इतका आहे, की डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही. प्लीज चला ना शोधायला. प्लीssज.

ठीक आहे. शोधावं तर लागणारच आहे. तुम्ही इथेच थांबा. कुठेही जाऊ नका. मी जाऊन दोन तीन लोकांना घेऊन येतो मग दोन तीन टीम करून आपण जाऊ.

आणि गार्ड निघून गेला. आता गेस्ट हाऊस मधे फक्त सहा पोरं. सगळेच  घाबरलेले. इथे पण वाघ आला तर ? हाच विचार सर्वांच्या मनात होता. तसे ते ताडोबा अभयारण्यात वाघालाच पाहायला आले होते, पण आता वाघच त्यांना पाहायला येतोय म्हंटल्यांवर संगळ्यांचीच बोबडी वळली होती. मारुती स्तोत्र सुरू झालं होत.

थोड्या वेळाने गार्ड अजून दोघा गार्ड ना घेऊन आला आणि तीन टीम बनवून ते तीन दिशांना पांगले. प्रत्येक गार्ड च्या जवळ एक एक कंदील आणि काठी होती.

किर्र जंगलात जोरजोरात संदीप च्या नावाने हाका मारत सगळे तीन दिशांना पांगले.

इकडे सांदीपला कळतच नव्हतं की त्यांनी कोणच्या दिशेने जायचं आहे म्हणून. दाट झाडी मध्ये आणि किर्र अंधारात दिशा कळणं शक्यच नव्हतं. कळूनही उपयोग नव्हता कारण गेस्ट हाऊस कोणच्या दिशेला आहे हे पण माहीत नव्हतं. वाघांची डरकाळी पुन्हा ऐकू आली नव्हती एवढीच काय ती समाधानाची गोष्ट होती. पण संदीप चं मन काही थाऱ्यावर नव्हतं . वाघ दबा धरून तर बसला नसेल ना आणि अचानक ध्यानी मनी नसतांना, आपल्यावर झडप घातली तर कसं ? असे वेडे वाकडे विचार त्यांच्या मनात घोळत होते. मघाच्या पळापळीत तो केंव्हा पायवाट सोडून झुडपात शिरला होता ते त्यालाच कळलं नव्हतं आणि आता फांद्या, वेली वगैरे बाजूला सारत कसा बसा वाट काढत समोर जात होता. त्यांनी त्यांच्या मित्रांना बराच आवाज दिला पण कुठलाच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यांनी एक झाडांची फांदी तोडून हातात घेतली. तेवढं तरी शस्त्र हातात असावं म्हणून. कुठल्याही जंगली प्राण्यांसमोर काठीचा किती उपयोग तो करू शकला असता  या बद्दल त्यालाच शंका होती. पण हातात काठी घेतल्या मुळे थोडा धीर आला हे खरं.

तो समोर समोर जात होता आणि जंगल अधिकच दाट होत होतं. तो विचार करत होता की पळापळी मधे तो उजव्या बाजूला पळाला की डाव्या ? त्यांनी मनात ठरवलं की तो नक्कीच डाव्या बाजूला वळला असावा. म्हणजे आता जर पुन्हा पायवाट शोधायची असेल तर उजव्या बाजूला जावं लागेल असा विचार करून तो वळला. आणि नशीबानी त्याला साथ दिली. १५-२० मिनिटं चालल्यावर त्याला पायवाट दिसली. आता पुन्हा प्रश्न समोर जायचं का मागे. कुठल्या दिशेने तो गेस्ट हाऊस ला पोचेल आणि कुठल्या दिशेने अधिकच दाट जंगलात ? नो आयडिया.  

बारीकसा का होईना पण रस्ता होता झाडी कमी होती, त्यामुळे चांदण्यांचा अंधुक प्रकाश होता. तेवढ्याने सुद्धा संदीपला धीर आला. आता कमीत कमी समोर आलेलं संकट दिसलं तरी असतं. त्यांनी एक नाणं काढलं आणि टॉस करून त्या दिशेला चालू पडला. काही इलाज नव्हता. आता बहुधा त्याच्या नशीबानी त्याला साथ द्यायचं ठरवलं होतं. थोडं दूर गेल्यावर मोठा रस्ता लागला. साधा मुरूम आणि खडी टाकलेलाच रस्ता होता पण बस जाण्या इतका मोठा रस्ता पाहिल्यावर संदीपला हर्ष वायु झाला. Now I am safe. आता नक्की कुठे तरी आपण पोहोचू. असं मनाशीच म्हणून त्यांनी चालायला सुरवात केली. आता नक्कीच त्याचं नशीब जोरावर होतं. दुरून एका  कार चे लाइट्स दिसले.

कार त्याच्या जवळ येऊन थांबली. अंधार असल्याने आत कोण बसले आहेत ते काही कळलं नाही. ड्रायव्हिंग सीट वर बसलेल्याने कांच खाली करून त्याच्या कडे पाहिलं आणि विचारलं.

अहो हा रास्ता गेस्ट हाऊस कडे जातो का ? नाही, म्हणजे आम्ही या जंगलात वाट चुकलोय, म्हणून विचारतो आहोत.

संदीप ने कपाळाला हात लावला. म्हणाला

तुम्ही पण वाट चुकलेलेच आहात ?

म्हणजे काय ?- ड्रायव्हर

मी पण चुकलो. तुमच्याकडे गाडी तरी आहे मी तर पायीच फिरतो आहे या किर्र जंगलात रस्ता शोधत. संदीप ने उत्तर दिलं.

My god. तुम्हाला कुठे जायचं आहे ? ड्रायव्हर नी विचारलं.

गेस्ट हाऊस ला. आम्ही सहा सात मित्र आलो आहोत, जंगलात फिरतांना वाघांची डरकाळी ऐकली आणि पळा पळीत मी वाट चुकलो. बाकीच्या लोकांचं  काय झालं असेल ते माहीत नाही.

आई ग, अहो, आता काय करायचं. रस्ता कसा सापडेल ? कार मधून एक बायकी आवाज आला.

मी येऊ का तुमच्या बरोबर ? जागा आहे का ? संदीप ने विचारले.

एक मिनिट हं. शशांक म्हणजे ड्रायव्हिंग  सीट वरचा माणूस संदीपला बोलला, आणि त्यानी मान वळवून आपल्या बायकोला, नलिनीला  विचारलं की घ्यायचं का यांना आपल्या बरोबर ? बिचारे एकटेच जंगलात रस्ता शोधत फिरताहेत.

अनोळखी माणसाला कार मध्ये घ्यायचं ? – नलिनी

हे बघ इतर वेळी मी थांबलो पण नसतो, पण रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगला मधे हा माणूस रास्ता शोधत एकटा पायी फिरतो आहे, तू ऐकलसच की याला पण गेस्ट हाऊसलाच जायचं आहे. जंगलात प्राण्यांचा धोका संभवतो , काही वेडं वाकडं  झालं तर आपण स्वत:लाच माफ नाही करू शकणार, बरं चांगला सभ्य दिसतो आहे. काय म्हणतेस ? शशांक म्हणाला.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटतेय मला. आणि मग मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या नणदे वळून म्हणाली, शलाका, तुझं काय मत आहे ?

घे दादा त्यांना. आपल्याला पण सोबत होईल. वहिनी तू ये मागच्या सीट वर.

मी नाही खाली उतरणार. मला वाघाची भीती वाटते. नलिनी म्हणाली

अग वाघ कुठे आहे इथे ?

आत्ताच तर ते म्हणाले की डरकाळी ऐकली म्हणून वाट चुकले.

अग त्याला झाला बराच वेळ. आता इथे वाघ नाहीये. आणि मागच्या सीट वर जायला एक क्षण सुद्धा पुरतो. जा मागे. शशांक नी वैतागून म्हंटलं.

पण नलिनीने ठाम नकार दिला.

शेवटी संदीप मागच्या सीट वर शलाकाच्या बाजूला बसला.

शशांक नी कार सुरू केली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. संदीप आता थोडा रीलॅक्स झाला होता. आता तो कार मध्ये होता आणि सेफ होता. पण पाचच मिनिटाने कार थांबली.

काय झालं ? कार का थांबवली ? नलिनीने विचारलं.

टायर पंक्चर झालेलं दिसतंय. खाली उतरून बघावं लागेल. – शशांक.

तुम्ही खाली उतरू नका.

मग कोण उतरणार ? तू बघतेस का टायर ?

नलिनी काही बोलली नाही. पण संदीप समजला. तो म्हणाला की मी उतरतो, आणि बघतो. आणि तो खाली उतरला.

मागचं चाक बसलं आहे. स्टेपनी आहे नं ? डिकी उघडा मी बदलतो टायर, तुम्ही चिंता करू नका. शशांक कडे बघून संदीप हसून म्हणाला.

शशांक नी किल्ली दिल्यावर, संदीप ने पान्हा काढून चाकांचे नट उघडायला सुरवात केली. शलाका खाली उतरली. आणि थोडी दूर झाडी कडे जाऊ लागली. शशांक नी ते बघितलं आणि ओरडला-

शलाका कुठे चालली आहेस तू ?

शलाका मागे वळली आणि शशांक ला करंगळी दाखवली.

ओके. जास्त दूर जाऊ नकोस. धोका आहे.

शशांक नट उघडतच होता की नलिनीच्या दृष्टीस वाघ  पडला. तो संदीप पासून केवळ १५ फुटांवर होता आणि संदीप कडे बघत होता. नलिनीच्या तोंडून एक किंचाळी निघाली. आता शशांक चं पण लक्ष गेलं आणि त्याचा थरकांप उडाला. शलाका बाहेरच होती. आता काय करायचं ? शलाकानी किंचाळी ऐकली आणि ती धावतच झाडीच्या बाहेर आली आणि तिने पण वाघाला बघितलं. तिच्या धावपळी मुळे वाघाचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यानी तिच्या कडे मोर्चा वळवला. आता मात्र परिस्थिती खरंच बिकट झाली होती, आणि या संकटाचा सामना करायची क्षमता कोणातच नव्हती.

शलाका भीतीमुळे गारठली होती, एकाच ठिकाणी स्तब्द अगदी पुतळ्या सारखी  उभी राहिली. वाघ एक एक पाऊल शलाका कडे सरकत होता. त्याला आजिबात घाई दिसत नव्हती. शलाका, वाघ आणि संदीप त्रिकोणाच्या तीन बिंदू वर होते. संदीप काही मारा मारी एक्स्पर्ट नव्हता. खरं तर तो सुद्धा जाम घाबरला होता. घामाने डबडबला  होता. पण आता विचार करायला फुरसत नव्हती. एका क्षणात त्याने निर्णय घेतला आणि काठी आणि पान्हा घेऊन तो शलाका आणि वाघाच्या मध्ये जाऊन उभा झाला. शशांक ने ते पाहिलं आणि तो खाली उतरण्यासाठी दार उघडत होता पण नलिनीने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तुम्ही मला सोडून मुळीच कुठेही जायचं नाही. आणि घाबरलेला शशांक थांबला.

वाघ संदीपला पाहून एक क्षण थबकला आणि एक गगन भेदी डरकाळी फोडली.

ती डरकाळी ऐकल्यावर शशांक च्या काळजाचं पाणी पाणी झालं. शशांक आणि नलिनी दोघेही घामाने ओले चिंब झाले होते.

संदीप मध्ये आता भीतीचा  लवलेश ही दिसत नव्हता. त्याच्या मध्ये आता सँडोकान संचारला होता. सँडोकान हा मलेशीयन राजपुत्र होता आणि त्याच्या अनेक दंतकथा प्रचलित होत्या त्यापैकी त्याची आणि वाघाची झालेली झुंज त्या काळी  फार प्रसिद्ध होती. संदीप ती झुंज डोळ्यासमोर आणत होता. संदीप आता संदीप राहिलाच नव्हता. त्याचं आता पूर्णपणे सँडोकान मधे रूपांतर झालं होतं. वाघाच्या डोळ्याला डोळे भिडवून त्यानी पण ब्रूस ली टाइप एक तार स्वरात आरोळी ठोकली. संदीपची ती आरोळी इतकी भयानक होती की शलाकाचाच थरकांप उडाला. ती सॉलिड  घाबरली, वाघ भयंकर की संदीप हेच तिला कळेना. तीचा इतका गोंधळ उडाला की ती घाबरून दोन चार पावलं मागे सरकली आणि दगडाला ठेचकाळून खाली पडली. ते पाहून शशांक अजूनच घाबरला. त्याला ओरडून शलाकेला सावध करायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटेनात. नुसतीच वाफ.  

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all