https://www.irablogging.com/blog/the-turning-point-part-1
https://www.irablogging.com/blog/the-turning-point-part-2
https://www.irablogging.com/blog/the-turning-point-part-3
https://www.irablogging.com/blog/the-turning-point-part-4
दि टर्निंग पॉईंट भाग - ५
आता पुढे.....
संजीवनीः तू माझ्याशी लग्न करायचं नाही म्हणालास.. अनुरागच्या आईने मला एका लग्नात पाहिलेलं होतं. त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल माहित होतं. माझं नशिब चांगलं म्हणून त्यांनी मला मागणी घातली. मग काय घरी सगळ्यांना खूप आनंद झाला आणि लवकरच आमचं लग्न झालं. मी संजीवनी अनुराग मोहीते झाले. आणि मोहीते कुटुंबासह हैद्राबादला आले.
अनुराग तसा साधा होता, पण खूप महत्त्वाकांक्षी होता. मागंच सगळं विसरुन, मी पण हळुहळु संसारात रुळत होते. अधूनमधून मी तुझ्या आणि आभाच्या संपर्कात होतीच. वर्षभरातच अन्वीचे आमच्या आयुष्यात आगमन झाले. तिच्या येण्याने आम्ही सगळेच खूप खुश झालो होतो. मी तर घरातलं, सासू-सासऱ्यांचं आणि या दोघांचा करण्यातच व्यस्त झाली होती. मग जशी अन्वी मोठी होऊ लागली तसं तिचं शिक्षण सुरू झालं. तिचं आवरणं, तिची शाळा, ट्युशन्स यामध्ये मी व्यस्त झाली. सासू-सासर्यांची जबाबदारी, तन्वीची पालनपोषण आणि अनुरागचं वेळापत्रक सांभाळण्यातच माझा सगळा वेळ जाऊ लागला. या सगळ्यात अनुराग कुठेच नव्हता.. हो, पण कधी कधी तो न्यायचा आम्हाला फिरायला... पण तिथेही त्याच्या डोक्यात फक्त बिझनेसच असायचा.
सतत काम, काम आणि फक्त काम यामुळेच त्याला अॕटॅक आला आणि त्यातच तो गेला रे... वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी... त्या धक्क्याने काही महिन्यातच सासरे गेले आणि ते कमी होतं की काय, तर काही दिवसातच, हे सगळं सहन न झाल्यामुळे, सासुबाईपण गेल्या, आम्हा दोघींना एकटं सोडून.... शेवटी आम्ही दोघीच राहिलो... एकावर एक धक्के बसत होते, पण अन्वीकडे बघून मी खंबीर झाले. अनुरागचा बिझनेस माझ्या हातात घेतला. पण यापुर्वी जशी अन्वी झाली होती, तसं मी बिजनेस मध्ये लक्ष घालणं सोडलं होतं... आणि अचानक अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मला बिझनेस मध्ये लक्ष घालावे लागले. सुरुवातीला मी खूप गांगरून गेले होते, पण एकीकडे तुझे पाठबळ आणि दुसरीकडे अन्वीचा आधार, यामुळे मी तो बिझनेस सांभाळू शकले. दिवस-रात्र एक केले आणि बिझनेसला परत एकदा त्याचं स्थान मिळवून दिलं, जे अनुरागने मिळवलं होतं. हळूहळू सगळं पूर्वपदावर येत होतं. पण तोपर्यंतचा सात ते आठ वर्षाचा काळ खूपच टेन्शन मध्ये गेला. त्यात एक गोष्ट चांगली होती की अन्वीच इंजीनियरिंग नुकतंच पूर्ण झालं होतं. तिला पण तिच्या पप्पांसारखा बिझनेस करायचा होता. त्यामुळे तिची पण खुप मदत झाली मला. दोघी एकमेकींचा आधार बनलो.
सततच्या संपर्कामुळे कंपनीतच असलेल्या तन्मय आणि अन्वी चे प्रेमसंबंध जुळले. मुलगा होतकरू आणि स्वाभिमानी होता ... दोघांनी एकमेकांना जाणून घेऊन, एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी त्याची सगळी माहिती काढली आणि समाधानाने त्या दोघांचं लग्न लावून दिलं. आता सगळा बिझनेस दोघांना सांभाळायला दिलाय.. ते नक्कीच बिझनेस खूप भरभराटीस आणतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
जेव्हापासून ती दोघं बिझनेस सांभाळत आहेत, तेव्हापासुन मी जरा मोकळी झाली.... पण या मोकळेपणाची यापेक्षा रिकामपणाची मला सवयच नव्हती. त्यामुळे मग सगळं घर खायला उठायचं... खूप एकटं एकटं वाटायचं. खुप वेगळं आयुष्य जगले असं नाही, पण आयुष्यात स्पेशल असं काही नव्हतं. कधीकधी वाटतं की आपण आयुष्य जगलोच नाही. आयुष्य जगायचं राहूनच गेलं. पण आता मला आयुष्य जगायचं आहे... नुसतं जगायचंच नाही तर भरभरुन जगायचं आहे... तु देशील नं साथ मला?
मल्हारः (तिचा हात हातात घेऊन) हो गं, आधीपासूनच खूप सोसलंय तू... पण यानंतर कधीच स्वतःला एकटी समजू नकोस.. आता जुनं सगळं विसरून जा आणि फक्त हसत राहा.. हस ना.. (तशी ती हसते) आता बघ, किती छान दिसतेस... अशीच हसत रहा... आणि हो आता आपण दोघं एकमेकांच्या साथीने भरभरुन जगु.. सालं, त्या आयुष्याने पण म्हटलं पाहीजे, की काय जगले हे दोघंही... आयुष्यात जे जे करावसं वाटंल पण करता आलं नाही, ते ते सर्व करु...
संजीवनीः हो, नक्कीच ... तुझे खूप खूप आभार... Thanks for everything .... मला विश्वास आहे, तू मला कधीच एकटी सोडणार नाहीस. (एकदम काहीसं आठवून) अरे, आपला अंबर कधी येतोय?
मल्हारः दुपारपर्यंत येईल तो. सकाळीच त्याचा फोन येऊन गेला. निघत होता तो. बरं, मी काय म्हणतो, स्वयंपाकवाल्या सीमाताईंनी नाश्ता बनवला असेल. आपण नाश्ता करून घेऊ.
सीमाताईंना त्याने तिच्या आवडीचा नाश्ता बनवायला सांगितला होता.
मल्हारः (तो तिला डायनिंग टेबलवर बसवत) ए ए, तू कुठे जातेय? बस इथे...सीमाताईंनी नाश्ता बनवला असेल, मी घेऊन येतो.
संजीवनीः अरे कशाला, मी आहे ना... मला सवय आहे, सगळं करायची...
मल्हारः तुला म्हटलं ना बस इथे, मी आणतो.
तो बळजबरीने तिला बसवतो आणि नाष्टा आणायला जातो. एका हातात प्लेट, एक हात मागे आणि थोडं कमरेत वाकून..
मल्हारः ए लिजिये, मोहतरमा... आपके पसंदीदा गरमागरम उपमा हाजीर है...
त्याला तसं पाहून तिला हसू येतं आणि खूप आनंद होतो.
संजीवनीः अरे कशाला एवढं करायला सांगितलं?
मल्हारः असू दे ग! आता तू आराम कर, काही दिवस तरी.. मग पुढे बघू.
संजीवनीः तुला माझी आवड लक्षात आहे अजून?
मल्हारः बस का आता! आपण जेव्हा जेव्हा बाहेर जायचो, तेव्हा तू नेहमी हेच मागवायची, माझ्या लक्षात आहे अजुन.. अशाच खूप सार्या साराच्या गोष्टीपण लक्षात ठेवून तिला सरप्राईज द्यायचो, पण नेमकं तिला तेव्हा ते आवडत नसायचं... (तो उदासपणे बघत बसला)
संजीवनीः ए मल्हार, इकडे बघ (त्याचा चेहरा आपल्याकडे वळवून) जाऊ दे, झालं गेलं विसरून जा. आपलं ठरलंय ना, पुन्हा नव्याने आयुष्य भरभरून जगायचं?
मल्हारः संजीवनी, मलाही हे सगळं विसरायचं आहे. पण काय करू? अजूनही विसरता येत नाही. संजीवनी, तुला खरं सांगू? मी कधीच या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही. पण आज बोलू दे मला.
तुला आठवतं? तुझं लग्न झालं, त्यानंतर मी कंपनी बदलली. आणि नवीन कंपनी जॉईन केली. तिथे माझं काम पाहून माझा बॉस खूप खुश असायचा. इतका खुश की एके दिवशी त्यांनी मला त्याच्या मुलीसाठी म्हणजे सारासाठी मागणी घातली, तीही डायरेक्ट माझ्या वडिलांकडे... मग काय, वडील खुश झाले. कंपनीच्या बॉसनेच मागणी घातली, तर ते लगेच माझं लग्न जोडून तयार झाले. कारण हे सगळं आमच्या जातीतलंच होतं. माझ्याकडे पण नाही म्हणायला काही कारण नव्हतं. शेवटी नाइलाज झाला. मग मी तयार झालो लग्नाला.. खूप धुमधडाक्यात तिच्या बाबांनी आमचं लग्न लावून दिलं... तू तर नव्हती आलीस... एका अर्थी बरंच झालं म्हणा...
लग्न झालं आणि ती आमच्या घरी आली, गावी.. पण तिथे तिला बिलकुल आवडलं नाही.. ती लगेच सकाळी मुंबईला निघून आली. सकाळी पूजा ठेवलेली होती. पूजा न करताच ती निघून गेल्यामुळे घरचे सगळे नाराज झाले. पण मला त्यांनी तिला समजवायला परत पाठवले. तर तिने चक्क नकार दिला गं... मी त्या गावाच्या घरात नाही राहु शकत, तुला मी हवी असेल तर माझ्या डॅडच्या घरी ये, तिथेच राहा, असं म्हणत होती. पण मी नकार दिला, घर जावई व्हायला... मी दुसरा फ्लॅट घेतला. मग ती तिथे आली. आमची नेहमी भांडणे व्हायची. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करायचो. पण ती नेहमी तिचंच खरं करायची. माझ्या महिन्याच्या पगार म्हणजे तिचा फक्त पॉकेटमनी होता. मी तिला एवढे पैसे द्यायला नकार दिला तर मग ती तिच्या डॅड कडून पैसे घ्यायची आणि तिची हौसमौज पूर्ण करायची. मला आवडत नव्हतं, हे सगळं... पण काय करणार, शेवटी तिच्याशी लग्न झालं होतं माझं. निभवावं तर लागणारच होतं ना.. कधीतरीच माझ्याशी चांगली वागायची, फक्त जवळीक साधायला..
अशातच एके दिवशी तिला दिवस गेल्याचे कळले... किती आनंद झाला होता मला, काय सांगू तुला... पण तिला हे मूल नको होतं. ती ते पाडायला पण गेली होती.. पण जास्त दिवस झालेले असल्यामुळे तिच्या जीवाला धोका होता, त्यामुळे डॉक्टरांनी मनाई केली. मग काय? होऊ दिलं.. आणि माझा अंबर या जगात आला.. त्याला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं ना, तेव्हा सगळं जग आपल्या कुशीत सामावले कि काय, असं वाटायला लागलं. तो हुबेहूब माझ्या सारखाच होता दिसायला... त्याचे ते छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, गोबरे गोबरे गाल, सुंदर डोळे, मी तर बघतच राहिलो होतो. (आजही तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता). खुप आनंद झाला होता मला.. मला वाटलं, माझ्या सुख दुःखांचा सोबती आला. खूप खुश होतो मी...
पण ती, ती त्याला दूध पाजायला पण नकार देत होती गं... एक आई कशी काय एवढी निर्दयी होऊ शकते? आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही कसं तरी त्याला वरच्या दुधावर मोठा केला त्याला... तिने तर माझ्यावर कधी माया केलीच नाही, नाही त्या बाळावर... असाच मोठा झाला गं तो.... कुठेही, कोणासमोरही ती मला हाणून पाडून बोलायची, माझा अपमान करायची... अंबर लहान होता, तेव्हा त्याला समजत नव्हतं. पण तो जसा मोठा होऊ लागला, तसं तसं त्याला पण सगळं कळू लागलं. आईच्या प्रेमासाठी तो तरसायचा... पण ती त्याला जवळ घेत नव्हती... नेहमी त्याचा, माझा राग करायची. मग काय आम्ही दोघंच एकमेकांना सांभाळू लागलो... आणि एकदा अशाच रागात घरातून गाडी घेऊन निघाली आणि तिच्या गाडीला अपघात झाला... अपघात एवढा जबरदस्त होता की तिला आम्ही वाचू शकलो नाही आणि ती कायमची आम्हाला सोडून गेली... अंबर तेव्हा सोळा सतरा वर्षाचा होता. पण तिचा एवढा लळा नसल्यामुळे, काही दिवसानंतर आई गेल्याचे त्याला पण काही वाटलं नाही.
मग आम्ही तो फ्लॅट विकला आणि या फ्लॅटवर राहायला आलो... खूप नाही पण खाऊन पिऊन शिल्लक आहे एवढा पैसा नक्कीच कमावला.. खूप कमी स्वप्न पूर्ण झाली, पण मी समाधानी आहे. आज माझ्या दोन कंपनी आहेत. मी कंपनींचा बॉस आहे, पण प्रेमाला पारखा झालो गं... कधी प्रेम मिळालंच नाही...
मग अंबरने पण एमबीए केलं आणि मला जॉईन झाला. आता तो मला बिझनेसमध्ये सोबत करतो. सगळं तोच सांभाळतो. पण कालच डील माझं स्वप्न होतं आणि ते तुझा पाय गुणामुळे पूर्ण झालं. चार दिवसांपूर्वी ते अशक्य वाटत होतं, पण फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच ते पूर्ण झालं...
एवढं सगळं तो एका दमात बोलून गेला... त्याला तर काय सांगू आणि काय नको, असं झालं होतं. आज खूप खूप आनंदात होता तो... त्या आनंदाने त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले... ती उठली आणि त्याचे डोळे पुसले आणि त्याला मिठीत घेतलं... त्याला त्या मिठीत इतकं आश्वासक वाटत होतं की या मिठीतच रहावं. मग थोड्यावेळाने तो मिठीतुन बाजुला झाला.
संजीवनीः आता यापुढे माझीपण तुम्हा दोघांप्रति जबाबदारी आहे. मी वचन देते की यापुढे तुम्हा दोघांच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. आता तुम्ही पण नेहमी खुश राहाल आणि अंबर तुझाच नाही तर, माझा पण मुलगा आहे.
हे ऐकून तो तिच्याकडे बघतच राहिला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला, अंबरचा कॉल होता...
अंबरः बाबा, मी एअरपोर्टवर पोहोचलो आहे. कॕब करून सरळ घरीच येतो.
मल्हारः अरे,मी येतो ना घ्यायला.
अंबरः बाबा, आता मी काय लहान आहे का? येतो मी. Don't worry... तोपर्यंत आई सोबत गप्पा मारत बसा.
मल्हारः कसा आहे हा मुलगा... आधी कॉल केला असता, तर मी गेलो नसतो का मी घ्यायला..
संजीवनीः असू दे रे येईल तो... बरं मला सांग, अंबरला गोड पदार्थांमध्ये काय आवडतं?
मल्हारः का गं? अचानक असं का विचारतेस?
संजीवनीः अरे, सांग तर?
मल्हारः बरं बाई... त्याला ना बदामाचा शिरा खूप आवडतो..
संजीवनीः बरं, आता तू थोडा आराम कर. तोपर्यंत मी अंबरसाठी बदामाचा शिरा बनवते.
मल्हारः बरं कर... या पामराला पण द्याल थोडासा...
संजीवनीः हो रे! अर्थातच तुला पण देणार..
संजीवनी किचनमध्ये बदामाचा शिरा बनवायला जाते आणि मल्हार तोपर्यंत पेपर वाचत बसतो. थोड्यावेळात डोअरबेल वाजते...
क्रमशः