दि टर्निंग पॉईंट भाग- १० (अंतिम भाग)
आता पुढे ....
सगळ्यांच रुटीन चालू झालं असतं. जो तो आपापल्या कामात व्यस्त झालेला असतो. तिकडे नीला आणि अंबर हे पण दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अंबरचा भूतकाळ नीलाला खूप जवळून माहीत असतो. ती त्याची बालमैत्रीण असते. त्यामुळे ते दोघंही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत असतात. येत्या काही दिवसात नीला आणि अंबरच लग्न होतं. लग्नात सगळेजण खूप एन्जॉय करतात. लग्नाला आभा कुटुंबासह आलेली असते. अन्वी - तन्मय, त्यांचे सगळे नातेवाईक, क्लायंट, ऑफिस स्टाफ, मित्र मंडळी असे सगळे आलेले असतात.
अंबरच्या लग्नानंतर तन्मय आणि अन्वीला हैद्राबादला करमेनासे झाले. दोघंही तिकडे एकटे पडले होते. तन्मयचे आई बाबा एका एक्सीडेंटमध्ये वारले होते. त्यामुळे तो पण एकटाच राहीला होता. आता तो सुद्धा संजीवनी आणि मल्हारलाच आपले आईबाबा मानत होता. सगळ्यांनी विचार विनिमय करुन दोन्ही व्यवसाय एकत्र करण्याचा निर्णय घेतला. आणि काही दिवसांतच तन्मय आणि अन्वीला हैद्राबाद सोडून कायमचे मुंबईला स्थायिक झाले. आता चौघं मुलांना संजीवनी आणि मल्हारचे प्रेम मिळु लागले. सगळे एकत्रच राहु लागले.
तिकडे संजीवनी आणि मल्हारचा संसार पण नव्याने फुलत असतो. दोघं एकमेकांना वेळ देत असतात. एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जणु त्यांच्यात चढाओढ सुरू असते. मल्हारला वर्ल्ड टूर करायची खूप इच्छा होती. नीलांबर हनीमूनसाठी स्विझर्लंडला जाणार होते. त्याचे बुकिंग करताना अंबरने चौघांचेही बुकिंग केलं होतं. नीलांबरने संजीवनी मल्हार नाही म्हणत असतांनाही त्यांना बळजबरीने आपल्या सोबत नेलेच. चौघांनीही ती टुर एन्जॉय केली. आता मल्हार खूप खूप खुश होता.
संजीवनीला डान्स शिकायचा होता. त्यांनी तिचेही स्वप्न पूर्ण केलं. मुलाला स्वीकारतांना ती सुद्धा कुठे कमी पडली नाही. त्याला कधीच असं जाणवू दिलं नाही, कि ती त्याची जन्मदात्री नाही. सुनेला मुलीप्रमाणे वागवलं. मल्हारची आणि पूर्ण कुटुंबाचीच तीने वेळोवेळी काळजी घेतली. त्याला प्रत्येक निर्णयात साथ दिली.
जे सुख मल्हारला गेल्या साठ वर्षात मिळालं नाही, ते त्याला या दहा वर्षात मिळालं. या दहा वर्षांत तर त्यांचा बिझनेस दहा पटीने वाढला होता. मल्हारचं ते स्वप्नही पूर्ण झालं. आयुष्याची दुसऱ्या लग्नानंतरची दहा वर्षे कशी संपली, हेसुद्धा त्यांना कळलं नाही.
नीलांबरची गोड मुलगी अनया आणि तन्मय व अन्वीचा मुलगा तरल.... मल्हार व संजीवनी तर अनया व तरल यांच्याशी खेळायचे. त्यांना न्हाऊमाखु घालणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांची काळजी घेणे यात ते स्वतःला हरवून जायचे. त्यांना शाळेत सोडणे, नातवंड घरी आल्यावर त्यांचे कपडे बदलणे, त्यांना खाऊपिऊ घालणे, त्यांना ट्युशनला, खेळाच्या क्लासला सोडणे, त्यांच्या सोबत वेळ घालविणे, त्यांना रात्री गोष्टी सांगून झोपविणे असं सगळं दोघेही स्वखुशीने, न कंटाळता करायचे. आईबाबांपेक्षा ते आजी आजोबांजवळच जास्त वेळ असायचे. आईबाबांपेक्षा त्यांना आजी आजोबा जास्त जवळचे वाटायचे.
दोघांनाही कोणीही काहीही न सांगता एकमेकांचं सगळं कळायचं.. ना कोणती अपेक्षा, ना कोणती नवरेगिरी ना फालतू स्त्रीहट्ट.... दोघं एकमेकांना खूप समजून घ्यायचे. एकमेकांची काळजी घ्यायचे... तब्येतीची तर घ्यायचेच पण एकमेकांच्या मनाची पण तितकीच घ्यायचे.
हे होतं दुसऱ्या लग्नानंतरचं प्रेम... आणि त्या आधी अनुभवलं होतं ते पहिल्या लग्नानंतरचं प्रेम... दोन्ही प्रेमांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. पहिल्या लग्नानंतर दोघेही फक्त जबाबदारी म्हणून जगले, तर दुसऱ्या लग्नानंतर ते मनापासून जगले. प्रत्येक क्षण भरभरून जगले. कुठेच किंतु परंतुला जागा नव्हती. एक आदर्श जोडपं म्हणून जगले. मुलांसमोर तर जगण्याचा आदर्श ठेवलाच, पण जगासमोरसुद्धा एक आदर्श घालून दिला. आयुष्य कसं जगावं, हे शिकवलं. दोघांनीही एकमेकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, त्याही एकमेकांच्या सोबतीने...
आज मल्हार आणि संजीवनीच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस! नीला - अंबर - अनया, अन्वी - तन्मय - तरल, संजीवनी - मल्हार असं सगळ्यांनी त्यांच्या लग्नाचा अकरावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. आज सगळे बाहेरच जेवायला गेले होते. सगळ्यांनी हॉटेल मध्येच केक कापून वाढदिवस साजरा केला आणि जेवण करुन सगळे घरी आले.
मग आल्यावर थोड्या गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने गप्पा मारून सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले.
संजीवनी आणि मल्हार त्यांच्या आवडत्या गॅलरीत झोपाळ्यावर एकमेकांच्या बाजुला बसले. मल्हारने संजीवनीला आपल्या कुशीत घेतले. तिच्या कपाळावर कीस केले. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते, ते आनंदाश्रु होते की दुःखाचे हे सांगणे मुश्कीलच...
तीस वर्षांत जगता आलं नाही, ते आयुष्य ते, गेल्या ११ वर्षांत जगले. दोघं एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून, एकमेकांचा हात हातात घेऊन झोपाळ्यावर बसले होते. न बोलता सगळं आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोरुन जात होते. रात्रभर ते असेच झोपाळ्यावर बसून राहिले.
सकाळी अंबर नेहमीप्रमाणे उठला. आवरून जीमला जायला निघाला. तेवढयात त्याचे लक्ष हॉलच्या गॅलरीकडे गेले. त्याला हॉलच्या गॅलरीचा दरवाजा उघडा दिसला. तो दरवाजा कसा काय उघडा राहीला असेल याचा विचार करतच गॅलरीत गेला. पहातो तर काय, आईबाबा त्याला झोपाळ्यावरंच बसलेले दिसले. त्यांचे डोळे मिटलेले होते. पण चेहरे खूप समाधानी आणि हसरे दिसत होते.
अंबरः (मनातच) यांना इथेच झोप लागली वाटतं. यांना उठवावे का? की झोप मोड होईल? पण इतका वेळ एकाच अवस्थेमध्ये राहून अवघडलेपणा येईल.
तो त्यांना उठवायला गेला.
अंबरः ओ हो, लव्ह बर्ड्स! उठा लवकर... सकाळ झालीय... हे पक्षी पहा उडाले आणि तुम्ही अजून झोपून आहात, तेही इथे बाहेर... उठा बरं.... आत जाऊन झोपा. उगाच अंग अवघडेल...
पण तिकडून काहीच उत्तर नाही की हालचाल नाही. अंबरने परत "आई-बाबा, उठा बरं.. आत चला" असं म्हणत त्याने त्याच्या बाबांचा हात धरला, तर त्याला बाबांचा हात एकदम थंडगार लागला. आणि अंबरच्या हातातला त्याच्या बाबांचा हात एकदम ढीला पडला होता. त्याने आईला हात लावला, तर आई पण थंडगार पडली होती आणि हात लावताच एकदम त्याच्या अंगावर पडली.
एक क्षण त्याला काही कळलंच नाही... ते पाहून त्याला त्या थंडगार हवेत पण घाम फुटला आणि अचानक त्याच्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली, "आई.... बाबा....."
तो जीवाच्या आकांताने ओरडला. ते शब्द "आई.... बाबा...." साऱ्या आसमंतात घुमले. त्याची आरोळी ऐकून सगळेच बाहेर आले. पाहतात तर काय, दोघं या सगळ्यांना सोडून निघून गेले होते. पण शेवटी सुद्धा ते एकमेकांच्या मिठीत होते आणि खूप सारं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.
दोघांनाही अलगद उचलुन खाली घेतलं. सगळे जीवांच्या आकांताने ओरडत होते. आई -बाबा, आई बाबा आवाज देऊन त्यांना उठविण्याचा प्रयत्न करत होते. अनया आणि तरलला तर काहीच समजतं नव्हतं. पण त्यांचे आईबाबा रडताय हे पाहुन ते पण रडत होते. त्या लहानग्यांना फक्त एवढंच समजतं होतं की आपले आज्जी आजोबा कोणाशीच बोलत नाहीय.
सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. खाली झोपविलेल्या संजीवनी आणि मल्हार या दोघांच्या बाजूने हे सगळे उभे होते. सहज त्यांचं आकाशाकडे लक्ष गेलं तर, नीला, अंबर, तन्मय, अन्वीला त्यांचे आई-बाबा आशीर्वाद देताना दिसत होते. ते म्हणत होते "एकमेकांची काळजी घ्या. कुणाला दुखवू नका. फक्त प्रेम द्या. आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्यासारखी मुलं आमच्या नशिबात होती म्हणून आम्ही खूप समाधानी आहोत. आमच्यासाठी तुम्ही खूप केलंत, आम्हाला तुम्ही भरभरून प्रेम दिलंत... बाळांनो रडू नका... आम्ही खूप समाधानी आहोत... मनात कोणताच वाईट विचार येऊ देऊ नका. आम्ही सदैव तुमच्यासोबत असू, या सुंदर रोपट्यांच्या रूपात! ही रोपटी आम्ही कालच लावली आहेत... त्यांची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा..." असं बोलून ते आकाशात वर वर जाताना दिसले आणि आकाशात विलीन झाले.
मित्रांनो, आपल्या आयुष्यात नेहमी टर्निंग पॉइंट येत असतात. पण आपण प्रत्येक वेळी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नशिबाला दोष देत बसतो. तो पॉईंट ओळखतांना आपण जर चुकलो आणि चुकीची वाट निवडली गेली, तर सगळंच चुकीचं होतं जातं.... पण जर तोच निर्णय बरोबर घेतला गेला, तर पुढचे सगळेच सुकर होत जातं...
मल्हारने त्याच्या आयुष्यातला पहिल्या टर्निंग पॉईंट मिस केला आणि त्याचे संसारिक जीवन उद्ध्वस्त झाले. परंतु त्याच्या नशिबाने, त्याला परत ती संधी चालून आली. त्यावेळी त्याने ती बरोबर हेरली आणि संजीवनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र तो भरभरून जगला.... असं हे एका टर्निंग पॉईंट मुळे होऊ शकलं.
संजीवनी मल्हारला लग्नानंतरचं प्रेम जगता आलं.... जगासमोर एक आदर्श घातला आला... म्हणूनच टर्निंग पॉइंट ओळखायला शिका आणि आयुष्य भरभरून जगा एकमेकांना प्रेम द्या.... कारण "शायद कल हो ना हो...."
समाप्त...
मित्रांनो, मी ही कथा मालिका "प्रेम कथा लेखन स्पर्धा - लग्नपश्चात प्रेम" या सदराखाली लिहिलेली आहे. काहीतरी लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यातल्या त्यात कथा आणि त्यातही कथा मालिका लिहिण्याचा माझा तर हा पहिलाच प्रयोग होता. आपण दिलेल्या लाईक्स आणि प्रतिक्रियांमुळे मी इतके भाग लिहू शकले. मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की मी एवढं लिहू शकेल... पण तुमच्या प्रतिक्रियांनी तर मला प्रेरणा दिली आणि मी आज ही कथा पूर्ण करू शकले. अशाच शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्या.
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा