माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
घरी सासूबाईंचं आणि नंणदांच कडक सोवळ.सणवार अगदी रीतीनुसार होत. आजही होतात. घरात सनातनी वातावरण, कुळधर्म, कुळाचार सगळच आहे. सगळे सण अगदी साग्र संगीत आजही साजरे केल्या जातात.हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे आमचे अहो मुळातच अबोल आणि ह्या सगळ्या धबडग्यात आणि व्यवसायाच्या टेन्शनमध्ये त्यांना माझ्याशी बोलायला फारसा वेळ मिळतच नव्हता. तसा तो आजही मिळत नाही तो भाग वेगळा.
यथावकाश 27 जुलै 2017ला मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण सिजेरियांचा कट देताना त्या डॉक्टरने माझ्या मोठ्या आतड्याला पण कट दिला होता. त्यामुळे बाळांतपणांच्या तीन दिवसानंतर माझं पोट हळूहळू फुगू लागलं आणि ते नऊ महिन्याच्या गर्भवतीच असतं तेवढं झालं. मला शौच्च होत नव्हते. पोटात जड,लोखंडी वजनदार गोळा ठेवल्यासारखं वाटू लागल. एक्स-रे झाले,घशातून नळीद्वारे पाणी काढून झाले पण, निदान काही होईना! शेवटी पोटातील असह्य वेदनांनी मी तडफडायला लागले आणि रडू लागले. नवऱ्याला म्हटलं \"आता काहीही करा पण मला इथून बाहेर न्या आणि ते शक्य नसेल तर सरकारी दिवाणखान्यात मरायसाठी सोडुन द्या पण काहीतरी करा!\"
माझ्या वेदना बघून मग मला एका सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परत सगळ्या तपासण्या झाल्या ते तज्ञ डॉक्टर म्हणाले -\"24 तासात ऑपरेट केलं नाही तर पोटातील विष संपूर्ण शरीरात पसरेल आणि माझा जीव वाचवणार नाही.\" दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे माझं ऑपरेशन झालं. सकाळी नऊ वाजता सुरू झालेलं ऑपरेशन संध्याकाळी पाचला संपलं. त्यावेळी माझ्या नवऱ्याने मला दोनदा रक्तदान केलं होतं. त्या ऑपरेशन नंतर जवळपास तीन दिवस मी व्हेंटिलेटर वर होते,आणि पुढे 20 दिवस आय. सी. यू.त होते. या संपूर्ण काळात माझ्या पोटात अन्नाचा एक दाणाही नव्हता दिवसातून दोन वेळा केवळ एक चमचाभर पाणी मला दिल जात होतं. त्या वेळी दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा डॉक्टर मला तपासून जात. त्यानंतर ऑपरेशनच्या चौथ्या दिवशी अचानक मला ताप आला आणि काही केल्या तो उतरेना! डॉक्टरांनी नवऱ्याला सांगितलं होतं की, \"हा ताप लवकर उतरणे गरजेचे आहे नाही तर पेशंटच्या जीवाला धोका आहे.\"
इकडे माझ्या तिन्ही बहिणी आणि माझी एक मावस बहीण यांनी माझ्यासाठी अनेक नवस बोलले, देव पाण्यात ठेवले, सर्वांची प्रार्थना फळास आली आणि माझा ताप उतरला. या महिन्याभरात माझा नवरा अक्षरशः आय. सी. यु. च्या बाहेर ऑगस्ट महिन्याच्या भर पावसात, माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. माझ्या पाच दिवसाच्या बाळाची काळजी माझी आई आणि मोठ्या जाऊ बाईंनी घेतली. माझे मोठे दीर तर त्याला अगदी हाताचा पाळणा करून झोपवत.
ह्या जीवघेण्या प्रसंगातून मी वाचले माझा पुनर्जन्मच झाला. या आजारपणात नवऱ्याने माझ्यासाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. मी जेव्हा आय.सी.युत होती तेव्हा काही इंजेक्शने मुंबईला मिळत नव्हती ती त्याने चेन्नई, बंगलोर होऊन विमानाने बोलावली. माझ्या हाताच्या नसा मुळातच बारीक त्यातच सततच्या सलाईंन मुळे त्या आणखीनच बारीक झाल्या होत्या, त्यामुळे पोटावरची सर्जरी झाल्यावर मला सेंट्रल लाईनद्वारे मानेतून सलाईन देण्यात आल्या. मोठ्या आतड्याच ऑपरेशन झाल्यावर माझी शौच्चाची जागा बंद केली होती. पोटाच्या डावीकडे थोडी जागा करून एक पिशवी तिथं लावून सगळी घाण त्या पिशवीत जमा होत होती, आणि अगदी लहान बाळासारखं माझा नवरा माझी ती घाण स्वच्छ करत होता.
दोन महिन्यानंतर परत एक ऑपरेशन करून माझं मोठं आतडं परत जोडण्यात आलं आणि आता मी एक सर्वसामान्य जीवन जगते आहे. या काळात आणखीन एक आठवणीतला प्रसंग म्हणजे 2017 च्या 8 ऑगस्ट ला राखी पौर्णिमा होती. आठ ऑगस्ट हा तारखेने नवऱ्याचा आणि राखी पौर्णिमा हा तिथी ने माझा वाढदिवस होता. तो आम्ही पहिल्यांदा दवाखान्यातल्या नर्सेसच्या साक्षीने साजरा केला. त्याआधी आणि नंतरही नवऱ्याने कधी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तो भाग वेगळा.
नवरा बायकोचं नातं हे खरंच फार गहिर असतं. ती एक कमिटमेंट असते आयुष्यभराची, सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याची. केवळ बाहेर फिरायला गेल्याने, शॉपिंग केल्याने, सोबत सिनेमे किंवा सेल्फी काढल्याने आणि समाज माध्यमांवर ते टाकल्याने हे नातं दृढ होत नाही, तर आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगी तुमचा जोडीदार तुम्हाला कशी साथ देतो त्यावर या नात्याची खरी भिस्त असते आणि मला एक जिवलग साथीदार मिळाला याचा रास्त अभिमान आहे आणि आम्हा दोघांचं एकमेकांवर अगदी मनापासून प्रेमही आहे.
पूर्णविराम.
**********************************************