पोरका

Story Of Kunti And Karna

जलद लेखन 

विषय  नातीगोती.


म्हणून महाभारती नाही
ते नोहे लोके तिन्ही
येणे कारणे म्हणीने पाही
व्यसो च्छिष्ट जगत्रयो
-ज्ञानेश्वर
महाभारतात जी कथा नाही ती त्रयलोक्यात ही नाही यावरून सर्व कथा या व्यासांच्याच आहेत.

आज मी तुम्हाला सांगणार आहे अशीच एक कथा. एका दुर्दैवी मुलाची. ज्याचा पदोपदी मानभंग झाला, तेजोभंग झाला. बाळपणापासून अपमानित असल्यामुळे तो केवळ पुरुषार्थाची आणि कर्तव्याचीच पूजा करत होता त्याची, आणि हतबल, नियतीला शरण गेलेल्या,कर्तव्याने बांधलेल्या आणि पदोपदी आपली निष्ठा पटवून देणाऱ्या त्याच्या अभागी आईची.

ही कथा आहे कुंती-कर्णाची. एक कमनशिबी माता आणि अत्यंत कर्तुत्ववान, पराक्रमी,महारथी परंतु आयुष्यभर सूतपुत्र म्हणूनच जगून मरणाऱ्या कर्णाची.

रामायण आणि महाभारत भारतीय तत्वज्ञानाचा पायाच जणू,किंबहुना समग्र भारतीय तत्वज्ञानाच ह्या दोन ग्रंथांनी सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचले.त्यातही रामायणाचे उदाहरण म्हणजे एका आदर्श कुटुंबाची, परिवाराची, त्यागाची कथा. तर महाभारत म्हणजे व्यक्तीचा मी त्याच्या कर्तृत्व पेक्षा अधिक मोठा झाल्याने निर्माण झालेल्या लोभाची, आकसाची, स्वार्थाची, अहंकाराची पारिवारिक हेव्या-दाव्यानची, भाऊबंदकीची एक महागाथा.


पांडव बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगून महाराज धृतराष्ट्रांना स्वतःचा राज्यातला हिस्सा मागतात. परंतु सत्तेच्या लालसे पायी आताताई झालेला दुर्योधन आणि पुत्र प्रेमात अंध असणारा धृतराष्ट्र कृष्णाची शिष्टाई पण मोडीत काढतात. शेवटी युद्ध अटळ आहे हे सर्वजण मान्य करतात. काहिंना त्यात आनंद आहे तर काहींना चिंता. पण युद्ध थांबवण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्ण कर्णाला त्याचे जन्म रहस्य सांगण्यासाठी सज्ज होतो.

खरे तर स्वतः कृष्ण किंवा पांडव युद्धाच्या बाजूने कधीच नव्हते. युद्ध म्हणजे संहार, विनाश, विलाप, पराक्रमी योद्धयांचे वीरमरण, विधवा स्त्रियांचा आक्रोश आणि अनाथ बालकांचे हुंदके, हे कृष्ण किंवा पांडवांना नकोच होते. परंतु अमर्याद आणि निरंकूश सत्तेसाठी हपापलेल्या दुर्योधनाला आणि पुत्र प्रेमाने बधीर झालेल्या धृतराष्ट्रालाही हे समजणे आणि उमजणे शक्यच नव्हते. म्हणून कृष्णाने मनाशी विचार केला होता की, जो दुर्योधन केवळ अभेद्य कर्णाच्या भरवश्यावर या युद्धाला सज्ज झाला आहे, त्यालाच जर त्याचे जन्म रहस्य सांगितले तर कदाचित होणारे युद्ध टळेल, म्हणूनच कृष्णाने कर्णाला त्याचे जन्म रहस्य सांगितले.


कृष्ण -"कर्णा तू जर मनात आणलं तर हे अटळ युद्ध कळू शकते. भीषण नरसंहार थांबू शकतो."

कर्ण -"कृष्णा महाराज धृतराष्ट्र, युवराज दुर्योधन आणि दरबारातली इतर मोठी, अनुभवी, जाणती मंडळी माझ्यासारख्या य:कश्चित सूत पुत्राचे म्हणणं का ऐकतील? आणि त्यांनी ऐकावं असा आग्रह तरी मी कसा धरू?"

कृष्ण -"कर्णा तुला आज मी एक मोठं गुपित सांगणार आहे. तुझ्या जन्माचे रहस्य आज या मावळतीच्या सूर्यासमोर मी उघड करणार आहे."

कर्ण -"कृष्णा अरे मी एक साधारण सूतपुत्र. धृतराष्ट्र महाराजांच सारथ्य करणाऱ्या, सारथी अधीरथाचा मी पुत्र, याशिवाय माझी दुसरी काय ओळख असणार?"


कृष्णा -"नाही कर्णा तू सूत पुत्र नाही. तू सारथी कुलातील नसून, जन्मानं आणि स्वकर्मानं क्षत्रिय आहेस. तू राधेय नसून कौन्तेय आहेस. तू राजमाता कुंतीचा, माझ्या आत्याचा प्रथम पुत्र आहेस. तू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पांडव आहेस. तू माझा भ्राता आहेस."


कृष्णाच्या या वाक्यानं एक क्षण कर्ण बधिर झाला. पण कृष्ण पुढे बोलतच होता..

कृष्ण -"तू साक्षात हिरण्यगर्भाचा, तेजपुत्र आहेस. तू सूर्यपुत्र आहेस."


आता कर्णा च्या नेत्रातून अश्रूंची संततधार ओघळू लागली होती.


कर्ण -"कृष्णा मी सूर्यपुत्र आहे. सुतपुत्र नाही. मी क्षत्रिय आहे. सारथी पुत्र नाही. मग आजवरच अपमानाचे जीवन का माझ्या वाट्याला आलं? रणरंगभूमी, द्रोपदी स्वयंवर, दिग्विजय प्रत्येक वेळी माझ्या कुलाचा उच्चार सूतकुल, माझा उल्लेख सूतपुत्र असा का करण्यात आला? नाही कृष्णा मी हे सत्य जाणत नाही. मी सूतपुत्र राधेय आहे, आणि हीच माझी खरी ओळख आहे."

कृष्ण -"अरे वेड्या असा अगोचर पणा करू नकोस. तू राजमाता कुंतीदेवीला विवाहपूर्वी प्राप्त झालेलं रत्न आहेस. सामाजिक आणि कौटुंबिक मर्यादांचे पालन करण्यासाठी तिने तुला स्वतःपासून दूर केलं. अरे गेली अनेक तप अखंडपणे ती तुझ्यासाठी झुरते आहे, तळमळते आहे, तुझ्याविना तिच्या जीवनाला थारा नाही. चल माता कुंतीकडे चल. पांडव त्यांचा श्रेष्ठ बंधू म्हणून तुझा स्वीकार करतील. तू सर्व पांडवांच्या अग्रस्थानी असशील. जी माता, मातृत्व तू आयुष्यभर शोधत होता, ते तुझी वाट पाहत आहे. माझं सर्व राज्य तुझं होईल. द्रोपदी तुझा पती म्हणून हसत हसत स्वीकार करेल. चल जेष्ठ कौन्तेया माझ्याबरोबर चल."


©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all