दि लूप होल पर्व २(भाग 3)

This is a thrilling and suspense story

      अगम्यने तिला झोपवले आणि तो तिला झोप म्हणून चालला होता. तर अभीज्ञाने त्याला थांबवले आणि ती बोलू लागली.

अभीज्ञा,“ थांब अगम्य माझा मोबाईल कुठे आहे?” तिने विचारले

अगम्य,“ आहे आईं जवळ तुला कशाला हवा तो आता! आराम कर!” तो तिला दम देत म्हणाला.

अभीज्ञा,“ मला हवा आहे तो कारण आज दुपारी साखर कारखान्याच्या डारेक्टर्स बरोबर मिटिंग होती माझी! पण ती होऊ शकली नाही ती मिटिंग तुझ्या बरोबर ठरावा असे सांगायसाठी फोन करायचे होते.” तिने स्पष्टीकरण दिले.

अगम्य,“ त्याची काही गरज नाही मी सगळ्यांना आज घरी बोलावले आहे मिटिंगसाठी तू काळजी करू नकोस कशाची स्वतःची काळजी कर आणि आराम कर!” तो असं म्हणाला आणि निघून गेला.

        अभीज्ञाला मेडिसीन्समुळे झोप लागली.अगम्य खाली आला. तो पर्यंत मिटिंगसाठी कारखान्याचे डायरेक्टर लोक येण्यास सुरुवात झाली होती.अगम्य हॉलमध्ये गेला. मिटिंगसाठी सहा जण म्हणजेच सगळे आले होते.पहिल्यादा चहा,नाष्टा आला.अगम्यने सगळ्यांना आग्रह केला. अगम्यचा चेहरा पडलेला दिसत होता. ते पाहून पाटील म्हणाले.

पाटील,“ सर मॅडमची तब्बेत आता ठीक आहे ना?म्हणजे काही सिरीयस नाही ना?” त्यांनी आस्थेने चौकशी केली.

अगम्य,“ हो!  She is fine now! नाही म्हणजे हात फ्रॅक्चर आहे आणि बराच मुक्कमार लागला आहे अभीज्ञाला दीड महिना बेडरेस्ट सांगितला आहे पण घाबरण्याचे कारण नाही!” तो म्हणाला.

सुमंत,“ तरी बरं सर मॅडमकच्या जीवावर आलेले संकट हातावर निभावले कारण माझ्या मेव्हण्याची एक नातेवाईक आठवड्या पूर्वी अशाच अपघातात गेली. On the spot!” ते सांगत होते.

माने,“ हो ना कालच पुण्यात माझ्या समोरच अपघात झाला बाईच ड्राइव्ह करत होती. हॉस्पिटलमध्ये पोहचवे पर्यंत रस्त्यातच गेली. मॅडमच  आणि तुमचं नशीब बलवत्तर इतक्या मोठ्या अपघातातून  थोडक्यात बचावल्या! Take care of her!”ते म्हणाले.

अगम्य,“ हो ना! मी खरं तर घाबरलो होतो काल खूप! Any way! मिटिंग सुरू करूया?” त्याने असं म्हणून मिटिंग सुरू केली.

       अगम्य मिटिंगमध्ये होता पण त्याचे लक्ष मिटिंग मध्ये नव्हते त्याचे सगळे लक्ष अभीज्ञाकडे लागून राहिले होते. या लोकांचे बोलणे ऐकून तर तो अजूनच अपसेट झाला आणि त्याला अभीज्ञाची अजूनच काळजी वाटू लागली. कधी एकदा मिटिंग संपते आणि कधी एकदा अभीज्ञाला पाहतो असं त्याला झाले होते. शेवटी मिटिंग संपली आणि अगम्य वर बेडरूममध्ये गेला. एव्हाना आठ वाजून गेले होते. अभीज्ञा झोपलेली होती. तिला झोपलेली पाहून अगम्य तिच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिचा हात हातात घेऊन डोळ्यात पाणी आणून तो बोलत होता.

अगम्य,“अभी काय आहे हे सगळं? काय अवस्था करून घेतलीस स्वतःची?मी किती घाबरलो होतो काल! मी तुला गमावण्याचा विचार ही करू शकत नाही!तू आपल्या अदू पेक्षा ही हट्टी झालीस बघ! मला माहित आहे तुझ्या मनात माझ्या बद्दल रोष आहे कारण मी तुला जाताना थांबवले नाही म्हणून! मला ही नाही राहवत तुझ्या शिवाय पण दीड महिना तुझा सहवास मिळेल म्हणून मनात खूप बरं वाटतंय. एक भीती  आहे अभी माझ्या मनात या भीती मुळेच मी तुला दूर लोटल आहे ग माझ्या पासून! दीड महिना झाला की मी परत तुला सोडून येईन पुण्याला! ज्या सावाटाने मला ग्रासले आहे ते सावट तुझ्यावर पडू नये आपल्या अदुवर पडू नये म्हणूनच मी तुमच्या पासून दूर राहिलेले बरे! काय व्हायचे ते माझे होऊ दे तुम्हाला काही झालेले मला सहन होणार नाही!” तो पुढे बोलणार तो पर्यंत कोणी तरी दार वाचवले आणि अगम्य डोळे पुसून दाराकडे वळला.

                अगम्यची पाठ वळताच अभीज्ञाने डोळे उघडले. खरं तर अगम्यच्या डोक्यावरून हात फिरवण्यानेच ती जागी झाली होती पण अगम्य काय बोलतो हे ऐकण्यासाठी तिने डोळे उघडले नाहीत. तिने अगम्यचा शब्द ना शब्द  ऐकला होता.रामू दोघांसाठी जेवण घेऊन आला होता.अगम्यने जेवण टेबलवर ठेऊन घेतले आणि त्याला पाठवून दिले.अभीज्ञा तशीच डोळे झाकून पडून होती. अगम्य तिच्या जवळ गेला आणि तिला उठवत म्हणाला.

अगम्य,“ उठ अभी जेवून घे!” तो तिला उठायला मदत करत म्हणाला.

अभीज्ञा,“ ठीक आहे!ठेव ताट मी जेवेण ती” ती उठून  बसत म्हणाली.

अगम्य,“ मी भरवतो तुला!”

अभीज्ञा,“ माझी मी जेवेण की दुपारी जेवलेच ना!” ती जरा नाराजीने म्हणाली.

अगम्य,“ अग दुपार पर्यंत  तुला ड्रीप लावले नव्हते जेंव्हा तुझ्या पाठीचे रिपोर्ट आले आणि तू पाठ दुखत आहे म्हणून तक्रार केलीस तेंव्हा ड्रीप लावून त्यातून औषधे सोडण्यात आली. आता ड्रीप लावल्या मुळे तुझा हात बघ थोडा सुजला आहे. म्हणून म्हणालो मी भरवतो!” तो स्पष्टीकरण देत म्हणाला.

अभीज्ञा,“ काही गरज नाही त्याची!” तो चिडून म्हणाली.

अगम्य,“ तुला घरी येताना ही सांगितले आहे आणि आता पण सांगतो आहे तुझी नाटक ना काही दिवस बाजूला ठेव!उगीच मला जबरदस्ती करायला लावू नकोस!”तो असं म्हणून तिच्या तोंडा समोर घास नेत म्हणाला.

     अभीज्ञाने गूपचूप जेवण केले.औषधे घेतली आणि ती थोडावेळ बसली. अगम्य लॅपटॉपवर काम करत बसला होता.अभीज्ञाच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते.अगम्य ती झोपली आहे समजून जे काही बोलला होता.त्यावरून तो काही तरी लपवत आहे हे स्पष्ट होते आणि त्याचे माझ्या पासून दूर राहण्याला हेच कारण आहे. अगम्य माझ्या पासून रादर आमच्या सगळ्या पासून काय लपवत आहे?गेली दोन वर्षे झालं तो असं वागतो आहे. पण का? त्याचा अशा वागण्याला आणि माझ्या पासून काही लपवण्याला ती पेंटींग तर जबाबदार नाही ना? नाही असं कसं असू शकेल ती पेंटिंग तर तेव्हाच नष्ट झाली ना?की मागे काही राहून गेलं आहे चुकून जे फक्त अगम्यला त्रास देत आहे. जे त्यालाच माहीत आहे.तो रात्री घाबरून उठायचा आता ही तसाच उठतो का? या सगळ्या प्रश्नांचा विचार खरं तर मी तेव्हाच करायला हवा होता.मी अगम्यला एकट सोडून मूर्खपणा केला आहे! त्याला अजून ही काही तरी त्रास देत! आज तेच सावट त्याला आमच्यावर पडू द्यायचे नाही! तो म्हणाला की त्याला काही झाले तर चालेल म्हणजे अजून काही अघटित घडणार आहे का? ज्याची चाहूल त्याला लागली आहे. नाही मी नाही त्याला काही होऊ देणार! आता या सगळ्या प्रश्नांचा छडा मला लावायला हवा! मी अगम्यला नाही गमवू शकत!आता मी त्याला सोडून कुठेच जाणार नाही!

     या सगळ्या विचारांच्या तंद्रीत ती होती आणि अगम्य तिला हलवत बोलू लागला त्यामुळे तिची तंद्री भंगली.

अगम्य,“ लक्ष कुठे आहे तुझे अभी? किती वेळ झालं मी एकटाच बोलतोय? झोप आता बघ दहा वाजून गेले की!” तो म्हणाला.

अभीज्ञा,“ हो!” इतकच म्हणाली आणि तिथेच अलगद सरकून झोपली.

       अगम्य ही  बेडवर तिच्या शेजारी बसला. अगम्य खरे तर झोपणे टाळत होता.पण गेल्या चोवीस तासापासून त्याची अजिबात झोप झाली नव्हती. त्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आला होता त्यामुळे तो झोपी गेला आणि रात्री दोन-तीनच्या दरम्यान तो घम्याघुम होऊन ओरडू लागला. अभीज्ञा जागी झाली आणि तिने कसे तरी उठून बसत टेबलावर असलेल्या टेबल लॅम्पचे बटन दाबले तर अगम्य झोपेत ओरडत होता. त्याला श्वास ही नीट घेता येत नव्हता असं वाटत होते की त्याचा गळा कोणी तरी दाबत आहे.अभीज्ञाने त्याला हलवून जागे केले आणि टेबलावर भरून ठेवलेले ग्लास भर  पाणी त्याला दिले.अगम्य  घटाघट पाणी प्याला आणि जरा सावरला.अभीज्ञा त्याच्याकडे काळजीने आणि प्रश्नार्थक नजरेने पाहत होती.

      अगम्यला कोणत्या गोष्टीचे सावट अभीज्ञा आणि अज्ञांकच्या आयुष्यावर पडू  द्यायचे नव्हते?अगम्य  सगळ्यां पासून गेल्या दोन वर्षापासून काय लपवत होता? अभीज्ञा ते शोधून काढू शकेल का? ही अगम्य आणि अभीज्ञाच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या वादळाची चाहूल तर नव्हती?


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule






 

                

🎭 Series Post

View all