दि लूप होल पर्व २ (भाग 26)

This is a suspens story

आत्ता पर्यंत

     अगम्यने त्याला  लूप होल मध्ये काही झाले तर या गोष्टीचा विचार करून अभिज्ञा आणि बाकीच्यांची सगळी व्यवस्था केली होती.तशी कागदपत्रे तयार करून घेतली होती.पण अभिज्ञा मात्र या गोष्टींमुळे नाराज होती.तीही लूप होलमध्ये जाणार म्हणून ती आनावधनाने   काही तरी बोलली पण अगम्यला संशय आला म्हणून तिने सगळे सावरून घेतले.केदारला बाबांनी स्वप्नांलोकातून मुंबईला जाऊन कसलीशी पूजा करण्याची अज्ञा दिली कारण त्या पुस्तकांशी म्हणजेच लूप होलशी  केदारचा ही संबंध होता.त्यामुळे केदार आणि सोनिया मुंबईला निघून गेले.

आता पुढे..


 

      पंधरा दिवस कापरा सारखे उडून गेले. त्या दिवसात मात्र अभिज्ञा आणि अहिल्याबाईनी महामृत्यूजय मंत्राच्या जपात एक दिवस ही खंड पडू दिला नाही. तसेच अहिल्याबाई, अगम्य आणि अभिज्ञाची आई सप्तचक्र साधना करत होते. बाबा अमावस्येच्या  एक दिवस आधीच देशमुख वाड्यात आले होते. बाबांनी सूचना द्यायला सगळ्यांना संध्याकाळच्या वेळी बोलावले होते. बाबा  मांडी खालून व्याघ्र चर्मावर बसले होते. सगळे  बाबांच्या पाया पडले आणि  सगळेच खाली त्यांच्या समोर  बसले.  

अहिल्याबाई,“बाबा उद्या अमावस्या आहे.त्या पुस्तकात कसे जायचे किती वेळ लागेल त्या लूप होल मधून बाहेर पडायला आणि  बाकी सगळी माहिती तुम्ही सांगा!” त्या हात जोडून म्हणाल्या.

बाबा,“ ते पुस्तक लहान मुलांच्या कथेचे असले तरी वेळ प्रसंगी लहान मुलांच्या कथा आणि त्यातील पात्र किती भयंकर  रूप घेऊ शकतात याची तुम्हाला कल्पना नाही. म्हणून अगम्य तू कोणत्या ही भ्रमात राहू नकोस! त्या पुस्तकात आता सूर्यकांतचे साम्राज्य आहे. त्यामुळे त्या पुस्तकातील प्रत्येक कथा आता बदलली आहे. मूळ पुस्तकात प्रत्येक कथेत सकारात्मकने नकारात्मकते  वर विजय! चांगल्याचा वाईटवर विजय अशा कथा होत्या पण सुर्यकांतने त्यात प्रवेश केला आणि आता प्रत्येक कथा बदलली आहे तिथे आता वाईट गोष्टींचे साम्राज्य आहे. प्रत्येक सकारत्मक पात्र लपून छपून राहत आहे आणि सगळीकडे नकारात्मकता आणि वाईट पात्र राज्य करत आहेत. त्यातली सगळी वाईट  पात्र सुर्यकांतची गुलाम आहेत आणि सूर्यकांत त्यांचा राजा आहे त्यामुळे तुला खूप मोठा लढा द्यावा लागणार आहे. हा पण त्या कथेतील सकारात्मक पात्र तुला वेळोवेळी मदत करतील आणखीन एक गोष्ट आपल्याला त्या पुस्तकात कथा पाचच दिसतात पण त्यात सहा कथा आहेत तिसऱ्या आणि चौथ्या कथेच्या मध्ये एक कथा आहे त्याचा संबंध केदारशी आहे.पण ती कथा काय आहे कशी आहे हे मी माझ्या विद्येच्या सामर्थ्याने पाहण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच दिसले नाही आणि म्हणूनच तुला ती कथा खूप जड जाणार आहे असे वाटते पण केदार तुझी मदत करायला त्या कथेत नक्कीच येईल. उद्या दुपारी तीन वाजता सर्व पितृ आमावस्या सुरू  होतेय आणि याच वेळ आपण राहूल आणि मीरा कडून पालाश विधी करून घेणार आहोत त्याच साठी आपल्याला त्या पुस्तकातील तो पेंटींगचा तुकडा याच विधी व्दारे नष्ट करायचा आहे!  बाकी त्रिपिंडी आणि  तेरा दिवसाचे सुतक राहुल आणि मीराला पाळावे लागेल या सगळ्यामुळे सुर्यकांच्या आत्म्याला त्याची इच्छा असो वा नसो मुक्ती मिळेल व त्याचा आत्मा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होईल. बरोबर दुपारी तीन वाजता पुस्तक भिंतीला लागून उभे ठेवले की त्या लूप होल मध्ये जाण्यासाठी एक अदृष्य मार्ग तयार होईल आणि तेव्हाच अगम्य तुला पुस्तकात प्रवेश करायचा आहे अमावस्या दुपारी  तिनला सुरू होऊन रात्री बाराला संपणार आहे आणि रात्री बाराच्या आत अगम्य तुला तो पेंटिंगचा तुकडा घेऊन इथं परत यायचे आहे.नाही तर तू एक महिना म्हणजे पुढच्या अमावास्ये पर्यंत त्यात अडकून बसशील! तू पुस्तकाच्या मुखपृष्ठातुन पुस्तकात प्रवेश करशील आणि पुस्तकाच्या शेवटच्या पानामधून बाहेर निघशील!  तुझी भार्या तुझ्या बरोबर जर लूप होलमध्ये गेली तर उत्तम होईल पण माई म्हणतात की ते तुला मान्य नाही!” ते म्हणाले.

अगम्य,“ हो बाबा मी अभिज्ञा त्या लूप होलमध्ये घेऊन नाही जाऊ शकत कारण माझ्या बरोबर मला तिचा जीव धोक्यात नाही घालायचा!” तो म्हणाला आणि अभिज्ञा आणि अहिल्याबाईनी एकमेकांकडे पाहिले.

बाबा,“ माई पूजेची सगळी व्यवस्था झाली आहे ना? आपल्याला महामृत्यजय यज्ञ त्याच बरोबर पालाश विधी आणि त्रिपिंडी हे सर्व विधी करायचे आहेत त्यासाठी कमीत कमी पाच पंडित लागतील!” त्यांनी विचारले.

अहिल्याबाई,“ हो बाबा सगळी व्यवस्था झाली आहे.” त्या म्हणाल्या.

बाबा,“ एका डॉक्टरची देखील व्यवस्था करून ठेवा कारण अगम्य कोणत्या अवस्थेत बाहेर येईल आपण सांगू शकत नाही. मागच्या वेळीच अनुभव आहेच पाठीशी! आणि हो माई तुम्ही तुमच्या विहिण बाई दुपारी तीन वाजताच अगम्यने पुस्तकात प्रवेश केला की सप्तचक्र साधने व्दारे त्याला शक्ती प्रक्षेपित करणार आहात!” ते म्हणाले.

अहिल्याबाई,“ हो बाबा मागच्या वेळीचा प्रसंग मी कसा विसरेन अगम्य मृत्यूच्या दारातून माघारी आला आहे त्या सुर्यकांतने जीवघेणा वर केला होता माझ्या लेकरावर! तरी तो अजून आमचा पिच्छा सोडायला तयार नाही! मी डॉक्टरची व्यवस्था ही केली आहे!” त्या डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या.

बाबा,“ चिंता नसावी माई या वेळी सूर्यकांतचा कायमचा बंदोबस्त होईल पण मला चिंता वाटतेय अगम्यची कारण या वेळी तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूपच कंकुवत आहे!” ते चिंतीत स्वरात म्हणाले.

अगम्य,“ मी लढेन या ही वेळी सूर्यकांतशी आणि जिंकेन ही मीच!” तो शांतपणे म्हणाला.

अहिल्याबाई,“ ठीक आहे अगम्य तू जा अज्ञांक एकटाच आहे वर त्याला पहा जर!अभी तू मला जरा पूजेच्या साहित्य पाहण्यासाठी मदत कर!” त्या सुचकपणे म्हणाल्या.

         अगम्य वर निघून गेला. राहुल आणि मीरा देखील निघून गेले आता तिथे फक्त अभिज्ञा, अहिल्याबाई, अभिज्ञाची आई-बाबा इतकेच लोक होते. अभिज्ञाने अगम्य निघून गेला याची पुन्हा एकदा खात्री केली आणि ती बाबांना म्हणाली.

अभिज्ञा,“ बाबा लूप होलमध्ये अगम्य पाठोपाठ मी ही प्रवेश करणार आहे त्याच्या समोर आम्ही गप्प होतो कारण तो मला लूप होलमध्ये त्याच्या बरोबर येऊ देणार नाही. पण तुम्हाला ही चांगलेच माहीत आहे की अगम्य खुपच क्षीण झाला आहे त्यामुळे तो एकटा नाही लढू शकणार सूर्यकांतशी!म्हणून त्याच्या पाठोपाठ मी जाणार आहे लूप होलमध्ये पण त्याला हे माहीत नाही. एकदा मी ही त्याच्या पाठोपाठ त्या पुस्तकात प्रवेश केला की तो मला बरोबर घेऊनच बाहेर निघणार कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसेल!” ती म्हणाली.

बाबा,“ ठीक आहे बेटा!” ते म्हणाले.

                 रात्रीची जेवण झाले पण आज म्हणावे तसे कोणाचेच लक्ष जेवणात नव्हते. जो तो चिंतेने ग्रासला होता. अभिज्ञा सगळं आवरून वर गेली तर अगम्य कागदपत्रे तपासत होता तिला पाहून तो म्हणाला.

अगम्य,“ बरं झालं तू आलीस मी तुला बोलवणारच होतो. ही घे फाईल यात आपल्या सगळ्या बिझनेसची कागद पत्रे आहेत. आऊने सगळं माझ्याकडे ठेवायला दिल होत. आता हे तुझ्याकडे राहू दे!” 

अभिज्ञा,“ झालं तुझं परत सुरू?” ती नाराज होत म्हणाली.

अगम्य,“ अभी प्लिज आज नकोस भांडूस ना! उद्या काय होणार आपल्याला नाही माहीत!” तो असं म्हणून तिच्या मांडीवर झोपला.

अभिज्ञा,“ मला यावर काहीच बोलायचं नाही आहे अमू!तू म्हणतोस तर ठेवते हे पेपर्स माझ्याकडे पण तात्पुरते शेवटी तुलाच सगळं सांभाळायचे आहे!” ती निश्चितपणे म्हणाली.हे ऐकून अगम्यच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली.

अगम्य,“अभी काय चाललंय नेमकं तुझं? आज रडारड नाही. तू जावू नकोस असं बोलली नाहीस घाबरली पण नाहीस! तुझ्या मनात माझ्या मागे त्या पुस्तकात यायचा प्लॅन तर नाही ना?” त्याने साशंकपणे विचारले.

अभिज्ञा,“ झालं बोलून तुझं? आता रडारड करू काही होणार आहे का? जे आहे ते मी स्वीकारले आहे आणि मी नको जाऊस त्या लूप होलमध्ये असं म्हणाले तर तू नाही जाणार असे काही आहे का? तुला जावे तर लागणारच आहे. आणि प्रत्येक वेळी काय शंका घेतो रे माझ्यावर तुझा माझ्यावर विश्वास नाही! जाऊदे मी नाही बोलत काही आता. मी झोपते तू ही झोप!” ती उगीच नाराज आहे असं दाखवत म्हणाली.

अगम्य,“ तसं नाही ग अभी पण तू इतकी शांत कशी? बरं राहू दे पण लगेच झोपते काय? ऐक ना!” तो तिच्या जवळ जात म्हणाला.

अभिज्ञा,“  अजून काय ऐकवतो?” ती लटक्या रागाने म्हणाली.

अगम्य,“ अभी I love you!तू जगातली सगळ्यात सुंदर बाई आहेस माझ्यासाठी आणि सगळ्यात चांगली बायको ही! You are the best! Thanks for being in my life!” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन भावनिक होत म्हणाला.

अभिज्ञा,“ आता तू मला thanks म्हणणार का? Love you!” ती म्हणाली आणि त्याला मिठी मारली.

        खरं तर आजची रात्र कोणालाच झोप लागणार नव्हती. उद्याचा दिवस काय घेऊन येणार आहे याची  धास्ती सगळ्यांनाच होती आणि मागच्या वेळी सुर्यकांतने जे काय अगम्य बरोबर केले होते ते विसरणे ही शक्य नव्हते. अज्ञांकला अभिज्ञाने अहिल्याबाई जवळ झोपवले होते. अहिल्याबाई मात्र जाग्याच होत्या.राहूल आणि मीरा ही चिंतीत होते अभिज्ञाचे आई-बाबा देखील जागेच होते आजची रात्र सगळ्यांनाच खूप मोठी वाटत होती. सगळे तणावात होते.मध्य रात्र उलटून गेली तरी अगम्यने अभिज्ञाला झोपू दिले नव्हते. त्या नंतर मात्र अगम्य थकून अभिज्ञाच्या कुशीत झोपला होता. अभिज्ञा मात्र जागीच होती. तिच्या मनाची वेगळीच घालमेल सुरू होती.ती झोपलेल्या अगम्यच्या केसात मायेने हात फिरवत मनातच बोलत होती.

     “ sorry अमू मी तुझ्याशी खोटं बोलत आहे. तुला अंधारात ठेवत आहे पण मी तरी काय करू तू तुझ्या हट्ट सोडायला तयार नाहीस! आणि मी आता तुला त्या लूप होलमध्ये एकट सोडू शकत नाही. तुला दोन वर्षे एकटे सोडल्याचे परिणाम मी अजून ही भोगत आहे. आणि या वेळी मी तुला ना एकट सोडणार ना तुला त्या सुर्यकांत समोर एकट पडू देणार! मला माहित आहे मी खोटं बोलले तुझ्या मागे लूप होलमध्ये आले म्हणून तू आकांड तांडव करणार! कदाचित काही महिने माझ्याशी बोलणार नाहीस पण तुझा रोष पत्करणे मला तुला गमावण्यापेक्षा सोपे वाटते.” तिला या विचारातच कधी तरी झोप लागली.

★★★

       अभिज्ञा आज पहाटेच उठली होती. अगम्य मात्र अजून झोपला होता. अभिज्ञा तीच आवरून त्याला न उठवताच खाली गेली. तर अहिल्याबाईची पूजा चालली होती. ते पाहून ती देव घरात गेली. त्या पूजा करत होत्या आणि मनोमन देवाला प्रार्थना करत होत्या की या परीक्षेतुन ही अगम्यला सुखरूप सोडव! अभिज्ञाला त्यांची घालमेल कळत होती. तिने त्यांच्या जवळ जाऊन   त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला पाहून अहिल्याबाईंचा काल पासून प्रयत्न पूर्वक अडवून ठेवलेला बांध फुटला. त्या तिला मिठी मारून रडत बोलू लागल्या.

अहिल्याबाई,“ अभी देव मला कोणत्या पापाची शिक्षा देत आहे ग! अमूला इथे येऊन धड पाच वर्षे ही नाही झाली माझ्या पोराला!  इतक्या मोठ्या संपत्तीचा उपभोग ही नीट घेता आला नाही. तीन वर्षे झाली तो एकटाच सगळं सहन करतोय! हे कमी की काय म्हणून त्या गोखल्याने गोळी बार घडवून आणला त्यातून अजून तो पुरता सावरला ही नाही आणि आता अजून नवीन संकट त्याच्या समोर आ वासून उभे आहे! कदाचित माझ्या पोटी जन्म घेतला त्याने हेच त्यांचे चुकले बघ! मला खूप भीती वाटते अभिज्ञा मागच्या वेळी त्या सूर्यकांतने माझ्या आमुचे काय हाल केले होते माहीत आहे ना तुला!”

अभिज्ञा,“ आऊ प्लिज तुम्ही शांत व्हा! तुम्हांला माहीत आहे अगम्यला तुम्ही रडलेलं नाही आवडत!आणि तीन वर्षां पूर्वी त्याला एकट सोडायची मी केलेली चूक मी पुन्हा नाही करणार! या वेळी मी जाणार आहे अगम्य बरोबर त्या लूप होलमध्ये माझ्यावर विश्वास ठेवा या वेळी मी सूर्यकांतला अगम्यच्या केसाला ही धक्का लावू देणार नाही!” ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली.

अहिल्याबाई,“ अभी त्याला संशय तर नाही आला ना? तू त्याच्या बरोबर….” त्या पुढे बोलणार तर अभिज्ञाने त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि ती म्हणाली.

अभिज्ञा,“ शु ss त्याला शंका आली आहे! पण मी त्याला गुंडाळला आहे कसा तरी आऊ आता तुम्ही ही गोष्ट तोंडातून काढू सुद्धा नका! कारण चुकून जरी त्याने हे ऐकले किंवा त्याच्या कानावर हे शब्द पडले तर तो आकांड तांडव करणार आणि मला इथेच थांबायला भाग पडणार!” ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ बरं अग पण तू त्याच्या मागे गेल्यावर तो तुला तिथे जास्त काही बोलू शकणार नाही पण लूप होल मधून बाहेर आल्यावर तो तांडव करणार हे निश्चित!” त्या काळजीने म्हणाल्या.

अभिज्ञा,“ हो त्याची कल्पना आहे मला! पण जास्तीत जास्त काय करेल भांडेल रागवेल! अबोला धरेल माझ्याशी आणि कदाचित तुमच्याशी देखील पण त्याच्याच साठी आपण करू सहन त्याचा राग! आणि त्याचा राग म्हणजे माहीत आहे आपल्याला! त्याला दादच दिली नाही की येईल ठिकाणावर हळूहळू!” ती हसून म्हणाली.

अहिल्याबाई,“ ठीक आहे…” त्या पुढे बोलणार तर अगम्य दारातून आत येताना त्यांना दिसला आणि त्या गप्प झाल्या.

अगम्य,“ तुम्ही दोघी इथे काय करताय? बाबा बोलवत आहेत तुम्हांला! अभी चल तुला आणि मला कसल्याशा पूजेला बसायचे आहे! आणि हे काय आऊ रडलीस ना?” तो नाराज होत म्हणाला.

अहिल्याबाई,“ हो रडले मी काय करणार आई आहे ना! नाही सांभाळता येत भावना मला! मला भीती वाटते अमू! आणि तुझे नियम ना तुझ्या फॅक्टरीत लावायचे हेच करू नका तेच करू नकाचे घरात नाही!” बोलताना पुन्हा त्यांचा आवाज कातर झाला होता.ते पाहून अगम्यने त्यांना मिठी मारली आणि तो म्हणाला.

अगम्य,“ आऊ नको करुस इतकी काळजी आणि नको रडूस तू! गेल्या वेळी आपण लढलो होतो की नाही आणि जिंकलो ही होतो मग या वेळी ही तसच होईल!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ बरं चला दोघे ही अगम्य देवाला नमस्कार कर आणि आऊला ही!” ती म्हणाली.

          अगम्यने देवाला आणि अहिल्याबाईना, नमस्कार केला आणि ते हॉल मध्ये आले. अगम्य, अभिज्ञा, राहुल आणि मीरा पूजेला बसणार होते त्यामुळे त्यांनी थोडासा फलाहार घेतला.अहिल्याबाईनी आणि अभिज्ञाच्या आई-बाबांनी मात्र काहीच घेतले नाही. बाबांनी ही काहीच घेतले नाही. अज्ञांकला अभिज्ञाचे बाबा बाहेर घेऊन गेले आणि पूजा विधी सुरू झाले. वेगवेगळे पूजा विधी होई पर्यंत अडीच कधी वाजले कळले ही नाही. शेवटी अगम्यला बाबांनी सुचिर्भूत होऊन यायला सांगितले. अगम्य वर निघून गेला आणि अभिज्ञा ही गपचूप खाली एका खोलीत जिथे तिच्या कपड्यांची व्यवस्था अहिल्याबाईनी आधीच करून ठेवली होती तिथे ती सुचिर्भूत व्हायला गेली. अगम्य सुचिर्भूत होऊन आला. आता तीनला एकच मिनिट कमी होता. त्याने अभिज्ञाची आई आणि अहिल्याबाईच्या पाया पडले त्याच्या वडिलांच्या तस्वीरीला नमस्कार केला. बाबांना नमस्कार केला पण त्याची नजर अभिज्ञाला शोधत होती. मात्र अभिज्ञा त्याला दिसलीच नाही अभिज्ञा त्याला एका खोलीच्या दारा आडून पाहत होती कारण तिने ही अगम्यने पांढरा झब्बा पायजमा घातला होता तशीच पांढरी साडी तिने नेसली होती. ती अगम्य समोर आली असती तर त्याला कळून चुकले असते की ती ही पुस्तकात तिच्या मागे प्रवेश करणार आहे. अगम्यची नजर तिला कळत होती पण ती डोळ्यात पाणी आणून त्याला लांबून पाहत होती शेवटी बाबा म्हणाले.

बाबा,“ अगम्य पुस्तकात प्रवेश कर लवकर त्या लूप होल मध्ये जितक्या लवकर जाशील तितक्या लवकर तू बाहेर येशील!” 

    अगम्यने होकारार्थी मान हलवली आणि त्याने नाईलाजाने अभिज्ञा न पाहता न भेटता पुस्तकात प्रवेश केला. अगम्य पुस्तकात प्रवेशकर्ता झाला आणि अभिज्ञा पळतच तिथे आली ती तिघांना नमस्कार करून अदृश्य पायऱ्या चढून पुस्तकात प्रवेशकर्ती झाली. इकडे पहिल्यांदा बाबांनी त्रिपिंडी पूजा करायला राहुल आणि मीराला बसवले. त्यांचे बाळ सखुबाईकडे होते.


 

        लूप होलमध्ये अगम्यने प्रवेश केला होता आणि त्याच्या पाठोपाठ अभिज्ञाने देखील प्रवेश केला आता पुढे पुस्तकात काय घडणार होते? तीन आणि चार या कथांमध्ये एक कथा होती ती कोणती होती आणि केदार या दोघांना कशी मदत करणार होता आणि त्या कथेशी केदारचा काय संबंध होता?


 

हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा रहस्यमय हवेली आणि दि लूप होल सीझन दोन!

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

क्रमशः
























 

🎭 Series Post

View all