दि लूप होल पर्व २ (भाग १२)

The is a thriller story

        अहिल्याबाई काळजावर दगड ठेवून अभिज्ञाच्या वडिलांना घेऊन गेल्या खऱ्या पण त्यांचा जीव मात्र मागेच गुंतला होता अगम्य आणि अभिज्ञामध्ये!  त्या दिवसातून पाच-सहा वेळा तरी तिथून फोन करायच्या!  दोन दिवसांसाठी नाशिकला गेल्या पण त्यांना तिथे  अजून दोन-तीन दिवस लागणार होते.इकडे अभिज्ञा घरातूनच काम करत होती. अगम्य मात्र घरात बसून वैतागला होता. तरी अज्ञांक शाळेत न गेल्यामुळे त्याची भुणभुण अगम्य मागे असायची आणि अगम्य त्याच्या बरोबर रमत होता. अभिज्ञाची आई बाकी घरातील सर्व पाहत होती. त्यामुळे अभिज्ञा ही घरातून निवांतपणे काम करत होती. एकूण काय तर सगळं आलबेल चालले होते.पण अचानक अगम्यला संध्याकाळी  चार वाजता  कोणाचा तरी फोन आला अगम्य  फोनवर फक्त हो आणि बरं मी येतो असे बोलत होता. अभिज्ञा चहा घेऊन आली होती आणि ती अगम्यचे बोलणे कान देऊन ऐकत होती पण तिला तो कोणाशी आणि काय बोलतो आहे याचा अंदाज मात्र येत नव्हता. अगम्यने फोन ठेवला आणि अभिज्ञाने त्याला चहा देत त्याच्याकडे रोखून पाहत विचारले.


 

अभिज्ञा,“कोणाचा फोन होता अगम्य आणि कोणाला येतो म्हणून सांगत होतास?” 

अगम्य,“ अभी खूप महत्त्वाचा फोन  होता आणि खूप महत्वातचे काम आहे म्हणून मला जावे लागेल आज बाहेर! मी सहा वाजता जाणार आहे तू प्लिज आईंना सांभाळून घे दोन-तीन तास!” तो गंभीर होत म्हणाला.

अभिज्ञा,“ असे काय महत्त्वाचे काम आहे?तू कोठे ही जाणार नाही आहेस समजलं! आधीच डोक्याला कमी टेन्शन नाही अगम्य गप्प घरात बस!” ती काळजीने म्हणाली.

अगम्य,“ तसेच महत्वाचे काम असल्या शिवाय मी  जाईन का? प्लिज अभी try to understand!” तो थोड्या चिडक्या स्वरात म्हणाला.

         अभिज्ञा मात्र आता विचारात पडली. तिला अगम्यला बाहेर जाऊ द्यायचे नव्हते पण त्याच्याशी भांडण करून आणि हुज्जत घालून ही चालणार नव्हते कारण त्याचा बी.पी. वाढला तर त्याला  अजूनच त्रास होणार होता आणि जर अहिल्याबाईना फोन करून किंवा तिने अगम्यला अडवायला सांगितले तर त्यांना मीच सांगितले म्हणून तो अजून चिडचिड करणार होता. अभिज्ञाची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर झाली होती. अभिज्ञाला त्याला बाहेर ही जावू द्यायचे नव्हते आणि त्याची चिडचिड ही होऊ द्यायची नव्हती. असा काही तरी मार्ग काढण्याचा विचार करत होती नाही. मार्ग सुचल्यामुळे  ती हसली. अगम्य मात्र आता ही आपल्याला भांडणार म्हणून तो त्या पवित्र्यात होता. पण तसे काहीच झाले नाही उलट  काही तरी विचार करून तिला हसताना पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले.

अगम्य,“हसायला काय झाले तुला?” 

अभिज्ञा,“ काही नाही!असं म्हणून ती निघून गेली!”

       अगम्य मात्र तिला पाहत राहिला कारण ती त्याला ना भांडली ना काही बोलली उलट हसून निघून गेली तिच्या डोक्यात काय शिजत आहे हे मात्र त्याला कळत नव्हते शेवटी त्याने तो विचार झटकला आणि लॅपटॉपवर काही तरी करत बसला. घड्याळ पाहून तो तयार झाला. नेव्ही ब्ल्यू जीन्स आणि त्यावर स्काय ब्यु टी शर्ट अशा कॅज्युअल कपड्यात तो तयार होऊन आरशा समोर उभा राहून परफ्युम मारत होता तर अभिज्ञाने दार लावून  त्याला मागून येऊन हळूच मिठी मारली. ते पाहून अगम्य  म्हणाला. 

अगम्य,“ हे  काय अभी ही काय वेळ आहे का रोमान्स करण्याची सोड बरं! मला उशीर होतोय!

अभिज्ञा,“ रोमान्स काय टाइम पाहून करतात का?” असं म्हणून तिने त्याला बेडवर बसवले आणि त्याच्या मांडीवर बसून त्याच्या गळीत दोन्ही हात गुंफत म्हणाली.

अगम्य,“ भलत्याच मूडमध्ये आलीस की पण sorry dear! मला खूप महत्वाचे काम आहे जावे लागेल! रोमान्स रात्री!” असं म्हणून तो स्वतःला तिच्या मिठीतुन सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होता पण अभिज्ञा त्याच काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.तिने तिचे ओठ त्याच्या ओठावर टेकवले आणि अगम्य ही तिच्यात विरघळू लागला. पण बराच  वेळाने हॉर्नच्या आवाजाने तो  भानावर आला आणि अभिज्ञाला स्वतः पासून दूर करत कपडे व्यवस्थित करत म्हणाला.

अगम्य,“ sorry अभी मला जावं लागेल खरं तर मला पण तुला सोडून जावंस वाटत नाही आहे पण खूप महत्वाचे काम आहे. खाली गाडी आली आहे हॉर्न वाजतोय बघ! आईंना काही तरी थाप मार आणि हो आऊचा फोन आला तर मी झोपलो आहे म्हणून सांग. मला आला तर मी उचलणार नाही! मी दोन-तीन तासात येतो” तो केस विंचरूण जायला निघाला आणि अभिज्ञा त्याचा हात धरून म्हणाला.

अभिज्ञा,“ अगम्य नको जावू म्हणलेलं कळत नाही का तुला आणि कोण आले आहे खाली रे तुला न्यायला! जावू नको ना प्लिज!” ती स्वतःचा राग होता होईल तेव्हढा कंट्रोल करत त्याच्या जवळ जावून त्याच्या शर्टाच्या बटनावर नक्षी काढत लाडिकपणे म्हणाली.

अगम्य,“ मी तुला आल्यावर सगळं सांगेन अभी आणि हो राहिलेलं सगळं रात्री love you!” असं म्हणून तो तिला पुसटसा किस करून निघून जावू लागला.

अभिज्ञा,“ अगम्य अरे तुला कळत कसं नाही इतर वेळी अडवले असते का मी तुला पण बाहेर हल्लेखोर मोकाट फिरतोय तू गेलास आणि काही झालं म्हणजे? मी आऊला काय उत्तर देणार आहे!” आता ती रागात म्हणाली

अगम्य,“ काही नाही होणार मला मी इथेच जातोय अभी! नको काळजी करूस! म्हणालो ना मी की दोन-तीन तासात येईन खूप महत्वाचे काम आहे कमीत कमी तू तरी समजून घेत जा ना मला!” तो नाराजीच्या सुरात म्हणाला.

अभिज्ञा,“ बरं ठीक आहे जा पण दोन तासा पेक्षा एक मिनिट पण जास्त नाही! नाही तर….” ती दम देत म्हणाली.

अगम्य,“ हो माझी आई मी येतो दोन तासात!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ आई काय आई मी बायको आहे तुझी you know! you are looking killer today!चाललास ना सोडून मला याचा बदला तर मी घेणारच!” ती लटक्या रागाने म्हणाली.

अगम्य,“ अच्छा! I am looking killer!  मग आज तुला kill करणार बघच तू आणि बदला घेणार तू माझा! घे हो!” तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला आणि तो हसत  निघून गेला.

            अभिज्ञा मात्र त्याच्याकडे  पाहून हसत राहिली.तिने अगम्यला जावू तर दिले होते पण तिचे मन मात्र थाऱ्यावर नव्हते. ती विचार करत होती की तिने अगम्यला इतका रिझवण्याचा  प्रयत्न केला. इतर वेळी त्याने तिला सोडलीच नसती पण आज इतकं काय महत्वाचं काम आहे की हा असा निघून गेला. ना आपल्या रिझवण्याचा उपयोग झाला ना समजावण्याचा ना रागावण्याचा! कुठे गेला असेल हा? आणि कोण आलं होतं त्याला घेऊन जायला? हा कोणता ट्रॅप तर नसेल? अगम्यला काय होणार तर नाही? त्याला काही झाले तर? या ना अनेक विचाराने ती मनातून घाबरली होती. हॉलमध्ये ती  बेचैन होऊन एरजाऱ्या  घालत होती. तिचे सगळे लक्ष दाराकडे होते. अज्ञांक तिथेच खेळत होता पण अभिज्ञाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. अभिज्ञाची आई आली आणि त्यांनी विचारले.

आई,“ अभी अग अमू कुठे गेला आहे? मी  रूममधून बाहेर आले तर तो मला कोणाच्या तरी गाडीत बसताना दिसला!तू का जावू  दिलेस ग त्याला?” त्या काळजीने म्हणाल्या

अभिज्ञा,“ अग आई त्याचा मित्र आला होता त्याच्या बरोबर गेला आहे तो येईल तासा भरात! तू नकोस काळजी करुस! पण आऊला मात्र तो बाहेर गेल्याचे सांगू नकोस! अगम्य मग चिडचिड करेल!” ती दाराकडे पाहत म्हणाली कारण तो जाऊन आता तास होऊन गेला  होता. 

                    अभिज्ञाने तिच्या आईला तर समजावले पण तिचे मन मात्र आता थाऱ्यावर नव्हते.पावसाळ्यात आभाळ भरून येत आणि दिवसा ही या अंधार दिसू लागतो. काळे-सावळे ढग आसमंत व्यापून टाकतात अगदी तसेच अभिज्ञाचे मन अगम्यच्या काळजीने आणि नाही नाही त्या  विचाराने व्यापून गेले होते. ती आता स्वतःलाच दोष देत होती की तिने त्याला जावूच का दिले? त्याच्या गोड बोलण्याला आपण नेहमीच भुलतो आणि त्याला हे चांगलेच माहीत आहे. त्यातून आज तर आपण त्याच्यावर फुल्ल लट्टू होतो हे त्याला ही माहीत होत म्हणूनच तो आपल्याला गोड बोलून सटकला. आता मात्र त्याची काळजी वाटते आहे. कधी येणार अगम्य? असा विचार करून  तिने घड्याळ  पाहिले तर सडे सात वाजल्या होत्या. म्हणजेच अगम्य जाऊन दीड तास झाला होता आणि तो पर्यंत गाडीचा आवाज आला अभिज्ञाने  दारात जाऊन पाहिले तर अगम्य गाडीतून उतरून वाड्यात येताना तिला दिसला आणि तिच्या जीवन जीव आला. तो आत आला तस अभिज्ञा त्याला काही विचारणार तर अज्ञांक अगम्यला येवून म्हणाला.

अज्ञांक,“ बाबा माझा होम वर्क राहिला आहे. मी ना सुमितला फोन करून विचारले की आज मिसनी काय होम वर्क दिला? आईला किती वेळ झालं मी म्हणतोय पण आई लक्षच देत नाही चल ना तू घे माझा होम वर्क!” असं म्हणून तो अगम्यला त्याच्या खेळण्याच्या रूममध्ये घेऊन गेला. 

        अभिज्ञाला मात्र त्याला बोलायला वेळच मिळाला नाही  नऊ वाजता सगळे जेवले आणि अगम्य रूममध्ये निघून गेला. ती अज्ञांकला झोपवत होती पण तिचे मन मात्र विचारात गुंतले होते.अज्ञांक झोपला आणि अभिज्ञा धावतच रूममध्ये गेली तर अगम्य काही तरी वाचत  खुर्चीवर बसलेला तिला दिसला! त्याने अभिज्ञाला पाहिले आणि तिला हात धरून ओढले. बेसावध अभिज्ञा त्याच्या मिठीत जाऊन आदळली. ती स्वतःला सावरत उठू लागली तर तिला अगम्यने मांडीवर बसवून घेतले.अभिज्ञा रागानेच बोलू लागली.

अभिज्ञा,“ झालं तुझ्या मना सारख आलास ना जावून बाहेर मी इतकं अडवून ही?”

अगम्य,“ हो आलो ना बरं तू काय काय म्हणत होतीस ग! की मी killer दिसतोय वगैरे वगैरे!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ काही नाही म्हणाले मी! आता सांग कुठे गेला होतास ते?” ती त्याच्या खांद्यावर विसावत म्हणाली.

अगम्य,“ असं कसं काही नाही म्हणालीस आता बोल ना तेच सगळं!” तो तिचा हात धरत म्हणाला.

अभिज्ञा,“ मी काय तुझा पोपट आहे का जेंव्हा पाहिजे तेव्हा मिठू मिठू करायला! आणि तेंव्हा माझा मुड होता आता नाही आणि तुला नाही सांगायचं ना कोठे गेला होतास ठीक आहे नको सांगू! मी झोपते मग!” ती रागाने म्हणाली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण अगम्य तिला थांबवत म्हणाला.

अगम्य,“ बरं राहील आणि चिडू नकोस मी सांगतो तुला सगळं मला इन्स्पेक्टर मानेचा फोन आला होता आणि ते स्वतः मला घेऊन जायला आले होते.” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ काय? पण कशाला आणि कुठे घेऊन गेले होते ते तुला?” हे ऐकून ती उडालीच होती.

अगम्य,“ अग सांगतो की जरा दम खा!त्यांना माझ्याशी बोलायचं होत पण इथं आपल्या घरी ही नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये ही नाही म्हणून ते मला इथून थोडे दूर  एका टेकडीवरच्या मंदिरात घेऊन गेले. तिथेच आमच्यात चर्चा झाली! त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या मला आपल्या केस बद्दल  ज्या खूप धक्कादायक आहेत!” तो सांगत होता. 


 

अभिज्ञा,“ अरे पण असं तिसरीकडे भेटण्याच काय प्रयोजन आणि काय सांगितलं त्यांनी आपल्या केस संदर्भात? ती उठून समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली.

अगम्य,“ अभी आपल्याला हे प्रकरण जितकं साधं वाटतं तितके साधे नाही! तुझा अपघात हा अपघात नसून घातपात होता आणि नंतर तुझ्यावर गोळी बार झाला! तुझ्या नावाची एका मुंबाईच्या प्रोफेशनल किलरला सुपारी देण्यात आली होती. त्याच नाव मौन्टि जगदाळे आहे त्याला गुन्हेगारी विश्व m k म्हणून ओळखत!” तो सांगत होता.

अभिज्ञा,“ काय? माझ्या नावाची सुपारी पण कोण आणि का देईल अगम्य?” ती आश्चर्याने म्हणाली.

अगम्य,“ कारण याच्या मागच्या जो मास्टर माईंड आहे त्याला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ एका दगडात दोन पक्षी पण ते कसे?काही तरी समजेल असं सांग अगम्य!” ती जरा वैतागून म्हणाली.

अगम्य,“ तुला आठवत का की बोर्ड मिटिंगमध्ये आपले भांडण झाले आणि मला वाटत दुसऱ्याच दिवशी तुला अपघात झाला.तेंव्हा इंस्पेक्टर मानेना वाटत होतं की मीच तुझा अपघात घडवून आणला असावा.त्यांचा पहिला संशयित आरोपी मी होतो. त्या नंतर परत आपले इथे वाड्यात भांडण झाले आणि दुसऱ्या दिवशी तुझ्यावर गोळीबार झाला. म्हणजेच ते जे कोणी आहे त्याला तुला मारून मला तुझ्या खुनाच्या आरोपा खाली अडकवायचे आहे. म्हणून तुला मारण्याचा प्रयत्न झाला. अभी अपघाताच्या वेळी ही तू प्रसंग अवधान दाखवून समोरून आलेल्या ट्रक पाहून लगेच गाडी दुसरीकडे वळवलीस आणि थोडक्यात बचवलीस तुला गंभीर दुखापत झाली नाही. जर तुला अपघातात काही  झालं असत तर… विचार करून डोकं सुन्न होत माझं आणि त्या दिवशी मी बस स्टॅंडवर वेळीच पोहोचलो नसतो तर अग ते प्रोफेशनल शूटर आहेत!” तो गंभीर होत डोळ्यात पाणी आणून बोलत होता.

अभिज्ञा,“ पण आपल्याला अस टार्गेट कोणी का करेल? आणि मला तुझ्याशी बरेच दिवस झालं बोलायचं होत” ती म्हणाली.


 

अगम्य,“ कदाचित कोणाचा तरी आपल्या इस्टेटीवर डोळा आहे ती व्यक्ती असं करू शकते! आणि काय बोलायचं आहे माझ्याशी बोल?” तो म्हणाला.

अभिज्ञा,“हुंम असू शकतो!तू काय स्वतःला सुपर हिरो  समजतो का?” ती रोखून पाहत म्हणाली.

अगम्य,“ आता मी काय केलं?” तो आश्चर्याने म्हणाला.

अभिज्ञा,“ त्या दिवशी तुला कोणी सांगितलं होतं रे असं पळत पळत येऊन मला ढकलायला?” ती म्हणाली.

अगम्य,“ मूर्ख आहेस का तू जरा? अग तुझ्यावर गोळी झाडणार होते ते लोक मग मी काय करायला हवं होतं?तुला काही झालं असत तर” तो चिडून म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा! आणि तुला काही झालं असत तर?”:तिने ही चिडून विचारलं.

अगम्य,“ नाही झालं ना काही मग कशाला इतका विचार करायचा!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हो का? काहीच झालं नाही तुला? अगम्य तू पाच दिवस बेशुद्ध होतास! कधी शुद्धीवर येशील डॉक्टरांना ही सांगता येत नव्हतं. त्यातून तू पाणी ही घेतलं नव्हतस चोवीस तासात! ब्लड लॉस झालेला, बी.पी. हाय तुला तरी माहीत का तुझी अवस्था काय होती? डॉक्टरांच म्हणणं होतं की तू कोणत्या तरी गोष्टीचा धसका घेतला आहे! अरे तुझी ट्रीटमेंट अजून ही सुरू आहे आणि काय झालं नाही म्हणतोस तुला? तुला जर काही झालं असत तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते अगम्य!” इतक्या दिवसांपासून मनात साचलेल्या भावना ती बोलून दाखवत होती आणि त्या बरोबर अश्रू झरत होते.

अगम्य,“ अग रडतेस काय? मला नाही झालं ना काही मग झालं तर!उगीच नसत्या गोष्टींचा विचार करून कशाला त्रास करून घ्यायचा उगीच!” तो तिच्या जवळ जावून तिचे डोळे पुसत तिला समजावत म्हणाला.

अभिज्ञा,“ I am sorry amu! खरंच माझं खूप चुकलं रे! मी तुला भांडायला आणि इतका आततायीपणा करायला नको होता! असं वागताना मी जरा सुध्दा तुझा विचार केला नाही! माणूस आपल्या समोर चालता बोलता असतो तेंव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण त्याच माणसाला काही झालं की त्याला गमावण्याची भीती वाटू लागली की त्या माणसाची किंमत कळते! मी नाही वागणार  इथून पुढे असं तुझ्याशी रादर मी भांडणारच नाही तुझ्याशी!” ती त्याला मिठी मारून रडत बोलत होती.

अगम्य,“ रडू नकोस तुला माहीत आहे मला रडलेले आवडत नाही! आणि जे झालं ते झालं माझी ही चुक होती त्यात! तुला मी जा असं म्हणायला नको होतं बरं झालेल्या गोष्टी कशाला उगाळायच्या!” तो तिला समजावत म्हणाला.

अभिज्ञा,“ हुंम! पण मग तुझ्यावर हॉस्पिटलमध्ये हल्ला का केला गेला?” तिने डोळे पुसून  विचारले.

अगम्य,“ कदाचित चिडून केला गेला असावा असं इंस्पेक्टरचे म्हणणे आहे!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“पण ही सगळी माहिती इन्स्पेक्टर मानेला कुठे आणि कशी मिळाली?” तिने पुन्हा विचारले.

अगम्य,“अग मी त्यांना हल्लेखोरांच्या  मोटरसायकलचा नंबर सांगितला होता. तो अलवार राजस्थान मधील आहे. तिथे एक माणूस चोरीच्या गाड्या गुन्हेगारांना अशा गुन्ह्यात वापरण्यासाठी विकतो त्याच्याकडून मुंबई मधील त्या mkने ती विकत घेतली आणि आपल्यावर हल्ला करण्यासाठी वापरली आहे!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ मग त्या mk ला पोलिस अटक का करत नाहीत?” तिने विचारले.

अगम्य,“ अभी तो mk फक्त प्यादे आहे त्याच्या मागे मास्टर माईंड कोणी वेगळाच आहे जो आपल्या जीवावर उठला आहे आणि त्याचा चेहरा अजून पुढे यायचा आहे! तो जो कोणी आहे तो खूप चलाख आहे. तो अजून समोर आला नाही. इन्स्पेक्टर मानेला त्याला पकडायचे आहे! तो mkला टेलिफोन बूथ वरून  कॉल  करतो ते ही वेगवेगळ्या असेच त्या mkला त्याने  ऍडव्हान्सचे पैसे ही एका अडाणी धुनीभांडी करणाऱ्या बाईच्या अकाऊंटवरून ट्रान्स्फर केले आहेत त्या बिचारीला तर हेच माहीत नाही की तिचे अकाउंट बँकेत आहे. मग विचार कर किती  चलाख आहे तो!”त्याने स्पष्टीकरण दिले.

अभिज्ञा,“ अरे पण तो पुढे कसा येणार आहे मग? आणि तुला इन्स्पेक्टरने असे मंदिरात का नेले हे सगळं सांगण्यासाठी?” तिने विचारले.

अगम्य,“अग त्या mkच्या फोन रेकॉर्ड वरून असं कळलं आहे की आता त्या मास्टर माईंडला आपल्या दोघांना ही मारायचे आहे. त्याला जेव्हा कळेल की आपण जिवंत नाही तेंव्हा तो mkला त्याच दिवशी पैसे देणार आहे समोर येऊन कारण mkला  राहिलेले पैसे हार्ड कॅश हवी आहे. त्यांच्यात झालेले हे संभाष पोलिसांनी टॅब केले आहे. म्हणून त्याला पकडण्यासाठी आपल्याला सापळा रचावा लागणार आहे. ते हि आऊ येण्याच्या आधी कारण आऊ आपल्याला अस काहीच करू देणार नाही! ती थैयथैयाट करणार आणि इन्स्पेक्टर मानेने  मला मंदिरात हे सगळं सांगण्यासाठी नेले कारण आपल्यावर कोणी तरी पाळत ठेवून आहे आपली सगळी माहिती त्या मास्टर माईंडला कळत असते रोजच्या रोज!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“आऊ आपल्याला असे काही करू देणार नाही म्हणजे काय नेमकं आणि सापळा रचायचा म्हणजे काय करायचे नेमके?” तिने विचारले.

अगम्य,“ आता त्यांना आपल्या दोघांना ही मारायचे आहे अभी म्हणून आपण दोघांनी काही तरी कारण काढून बाहेर पडायचे पोलीस आपल्या सुरक्षेसाठी मागे पुढे असणारच आहेत सध्या वेशात आणि आपण मारले गेलो असे नाटक करायचे मग तो मास्टर माईंड आपला छुपा शत्रू बाहेर नक्कीच येईल! यात थोडी रिस्क आहे पण रोज भीतीच्या सावटाखाली जगण्या पेक्षा ही रिस्क परडवली आणि मला इन्स्पेक्टर मानेवर पूर्ण विश्वास आहे ते आपल्याला काही नाही होऊ देणार!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हुंम आणि मला तुझ्या विश्वासावर विश्वास आहे  पण हे सगळं कधी करणार आपण आणि आऊ दोन दिवसातच येतील ना?” तिने विचारले.

अगम्य,“ नाही ग आऊला अजून अघोरी बाबा भेटले नाहीत त्यामुळे ती अजून चार दिवस तरी येणार नाही तिचा फोन आला होता मला खरं तर मी उचलणार नव्हतो पण अजून काळजी करेल म्हणून उचलला तर तिने सांगितले मला. तुला विचारत होती आऊ पण तू खाली आहेस म्हणून सांगितले मी मग ठेवला!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ मग कधी करायचे हे धाडस?” तिने त्याला विचारले.

अगम्य,“ खरं तर मी अजून काहीच ठरले नाही इन्स्पेक्टर मानेकडे सगळा प्लॅन तयार आहे पण मीच विचार करून सांगेन म्हणून त्यांना सांगितले आहे! इथे प्रश्न फक्त माझ्या जीवाचा नाही तर तुझ्या जीवाचा ही आहे.  मला गोळी लागली ना त्या दिवशी मला माहित होतं की मला काही झालं तर तू आहेस सगळं सांभाळून घ्यायला पण आता विचार करावा लागेल अभी!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ एक नंबर नालायक आहेस तू! तुझ्या शिवाय मी कशी जगेन याचा विचार ही शिवला नाही ना तुझ्या मनाला!” ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली.

अगम्य,“ असं काही नाही ग! आणि उद्या काय ते ठरवू आपण पण आता मी बाहेर जाताना काय म्हणत होतीस ना ते सांग?” तिला जवळ ओढत म्हणाला.

अभिज्ञा,“ आता माझा मूड नाही म्हणाले ना मी आणि तुला ना माझी किंमत राहिली नाही अगम्य! जावू दे! मला आता झोप येतेय!” ती त्याच्या पासून दूर जात बेड वर बसत रागानेच म्हणाली.

अगम्य,“ आत्ता थोड्या वेळा पूर्वी तर म्हणाली की मी तुझ्याशी भांडणारी नाही आता लगेच भांडायला पण लागली! ठीक आहे! असं म्हणून तो तोंड फुगवून बेडवर  त्याच्या जागेवर जाऊन झोपला.

अभिज्ञा,“ आता मी काय भांडले रे? एक तर तू बाहेर निघालास तेंव्हात मला तुझा प्रचंड राग आला होता तुला ना भांडून थांबवावे वाटत होते पण काय करणार साहेबांचा बी.पी लगेच  वाढला असता आणि डॉक्टरने सांगितले आहे की काळजी घ्या म्हणून मग मी तुला रिझवण्याचा…….”ती जीभ चावून मध्येच बोलायची थांबली.

अगम्य,“ काय म्हणालीस रिझवण्याचा म्हणजेच मला थांबवण्यासाठी सुरू होत तर हे सगळं! मला तर वाटले की तू आता भांडणाचे हत्यार उपसनार पण तू तर प्रेमाचा धनुष्यबाण काढलास की” तो तिचा हात धरत डोळे मिचकावत म्हणाला.

अभिज्ञा,“ पण काय उपयोग तू कुठं थांबलास?तुला माझी किंमत नाही राहिली आता!” ती हात सोडवून घेत म्हणाली.

अगम्य,“ वेडी  आहेस का तू? तुझ्या बाणाने मी कधीच घायाळ झालो होतो आणि हॉर्न वाजला नसता  ना तर कदाचित गेलो ही नसतो आणि पुन्हा म्हणू नकोस मला तुझी किंमत नाही  you are my life! I am nothing without you! I love you more than myself and you have to understand it! ठीक आहे मी इथून पुढे तुला हे नाही समजावणार!” तो नाराजीने बोलला आणि तोंड फुगवून झोपला.

           अभिज्ञा त्याच्या अशा बोलण्याने वरमली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानात बोलू लागली.

अभिज्ञा,“ ऐक ना अमू तू ना आज किलर दिसत होतास फॉर्मल पेक्षा कॅज्युलमध्ये खूप हँडसम दिसतोस तू! म्हणून ना फॉर्मल कपडे घालत जा उगीच कोणाची नजर नको लागायला!” 

अगम्य,“ हो का? आता तर मी ऑफिसमध्ये ही कॅज्युअलच कपडे घालणार असं ही कोण विचारणार आहे मला after all I am the boss!” तो गालात असत तिच्याकडे पाहून म्हणाला.

अभिज्ञा,“ तू नाही मी बॉस आहे ऑफिसमध्ये ही आणि हो घरात ही तर मी म्हणेल असतंच वागायचं!” ती नाटकीपणे म्हणाली.

                   अगम्यला तिने  मिठी मारली. अगम्यने मात्र काहीच न बोलता तिचा ताबा घेतला होता. 


 

Mk ला सुपारी देणारा तो मास्टर माईंड कोण असेल जो अगम्य आणि अभिज्ञाच्या जीवावर उठला होता? त्याला पोलीस वेळीच पकडू शकतील का?अगम्य सापळा रचण्या बाबत काय निर्णय घेणार होता?

©swamini chougule

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत

ही कथा निव्वळ मनोरंजनासाठी लिहण्यासाठी आली आहे कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा या मागे हेतू नाही

                       

















 

🎭 Series Post

View all