सण संक्रांतीचा
१. भाऊ गेल्यावर, गेली पंधरा वर्ष तिच्या वहिनीने संसार समर्थपणे सांभाळला, सासू-सासऱ्यांचं सारं केलं , वहिनी म्हणून नव्हे तर, भाऊ सारखचं तिचं माहेर ही जपलं.
म्हणूनच दरवर्षीप्रमाणे यंदाही सुगड्याचं पहिलं वाण ती तिच्या वहिनालाच देणार आहे.
२. \"त्या बदनाम वस्तीत\" शाळा चालवणारी ती एक सामाजिक कार्यकर्ती. या संक्रांतीला \"त्या बदनाम बायकांच्या\" मुलांना सोबतीला घेऊन तिने अनेक पतंग बनवले. ते पतंग तिने \"त्या मुलांसह\" शहरातल्या अनाथालयात नेऊन, तिथल्या अनाथ मुलांना तिळगुळ वाटुन, पतंग उडवुन सर्व बालकांसह संक्रांत सण साजरा केला.
३. यावेळेस तिच्या किटी- पार्टीच्या मैत्रिणींनी आणि तिने ठरवलं की, गावाबाहेरच्या वृद्धाश्रमात जाऊन, तिथेच तिळगुळाचे लाडू आणि तीळगूळ बनवून संक्रांत साजरी करायची आणि वृधांसह आनंद साजरा करायचा.
४. ती एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ. जिल्हा स्त्री रुग्णालयात नोकरी करणारी . तिने आणि तिच्या डॉक्टर चमुने यावेळी दारिद्र्य रेषेखालच्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात अर्भकासाठी नवे कपडे ,स्वेटर आणि त्यांच्या मातांसाठी पोषक आहाराचं वाण द्यायचं ठरवलं आहे , रुग्णालयातच संक्रांत सण साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे.
५. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पती गेल्यावर ती सैरभैर झाली होती, पण सासरच्या लोकांच्या भक्कम आधाराने, तिने आता एक गृह उद्योग सुरू केला आहे. त्या माध्यमातून ती गरजू ,गरीब, अनाथ बालकांसाठी आणि निराधार लोकांना आवश्यक ते खाण्याचे पदार्थ आणि सणावाराला मिठाई पुरवते.तीळाचे लाडु आणि हलव्याचे दागिने तीचे खास वैशिष्ट्य आहे.
६.जोशींच्या घराण्यात मागच्या दोन पिढ्यांपासून जमीनी वरून वाद होता. लहान भावाच्या नातं सुनेने, लहानग्या पुतणी ला खणाचं परकर, पोलकं आणि हलव्याचे दागिने घालून, हातात तिळगुळ आणि हलव्याचं तबक घेऊन चुलत घरी पाठवलं.आज जोशी कुटुंबाने खऱ्या अर्थाने एकत्र येऊन संक्रांत साजरी केली.