निरहार एकादशी अंतीम

What We Do On The Day Of Fast


मीरा - " छान! मस्त सगळ्यांना कामं वाटून दिलीत. "

रमा - " अगं पण त्या कापा - कापीत भांडी किती भरलीत त्याचा काहीही हिशेब? कोण धुणार ती भांडी हे आधी न ठरवल्याने रेणु आणि कंपनीने अहो ना मस्का मारला. अहो पण हुशार स्वतः मस्त उपासाचे कस्टर्ड खाल्ले आणि भांडी घासायच्या कामाला मला जुंपले."

मीरा -" अग पण तू का घातलीस भांडी? "

रमा - " कारण कामवाल्या मावशी बाई त्या दिवशी रजेवर होत्या, आणि रात्रीचा बेत नव्हे मेनू मलाच बनवायचा होता. "

मीरा - " (अवंढा गिळून ), एवढे खाल्ल्यावर आता रात्री आणखीन काय खाणार होते तुझ्या घरचे लोक? "

रमा - " ते काही तू विचारू नये आणि मी सांगू नये !"

मीरा - " अग रमा तू सांगितल्याशिवाय काय मला कळणार आहे, रात्रीचा उपवासाचा मेनू."

रमा - " रात्री अहो नी दोन केळी, दोन सफरचंद आणि चार खजूर खाल्ले , एक पेला दूध घेतले . मीहिरने बटाट्याचा कीस, साधी भगर, चिंचगुळाच्या आमटी सह खाल्ली. रेणू ने साखरेच्या पाकातले रताळ्याचे काप करून दे , म्हणून विनवणी केली."

मीरा -" आणि नाना माई त्यांनी काय खाल्लं? "

रमा - " अगं भगर आमटी, रताळ्याचे काप, आणि बटाट्याच्या किसाला नाना - माईंच्या पोटात गेल्याशिवाय काय मोक्ष मिळणार होता?"

मीरा - "हो तेही खरंच आहे म्हणा!"

रमा - " आणि दिवसभर हरी भजनाच अकाउंट मात्र रिकामाच राहिलं, ह्या पोटोबाच्या सेवेत. उपवासाच्या दिवशी नको तेवढं खाऊन नाना माईंनी डॉक्टरांना पाचारण करायला लावलं नसतं तरच नवल!"

नानांना झाला पोटात गॅस आणि अजीर्ण, माईचं पोट बिघडलं, अहो ना जास्त खाल्ल्याने करपट ढेकरांचा त्रास झाला शिवाय ऍसिडिटी पण. "

मीरा - " अरे बापरे मग?"

रमा - " मग काय मग? डॉक्टरांना माहिती आहे अहोंचा आणि नाना माईंचा स्वभाव . दोन दिवसाचे चांगले कडक पथ्य सांगितले त्या तिघांना. यावर माईंनी मलाच सुनावले….

माई - " देशपांड्यांच्या तात्या ताईंची राधा छान बडदास्त ठेवते. खाण्याचीही छान काळजी घेते. शिवाय एकादशीला तिचा हरिपाठ आणि विष्णू सहस्त्र नाम ठरलेल, रमेला मात्र स्वयंपाक घरच सुटत नाही !"


*********************************************

बहुतेक घरांमध्ये असंच होतं एकादशी किंवा तत्सम उपवास आले तर त्या गृहिणीला रोजचा स्वयंपाकापेक्षा कितीतरी जास्त पदार्थ बनवावे लागतात, आणि तिचा संपूर्ण दिवस स्वयंपाक घरातच निघून जातो. खरं तर उपवास याचा अर्थ असा आहे की, उप पण म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे , देवाच्या जवळ रहाणे,
नामस्मरण करणे , पण आपण मात्र पूर्ण दिवस खाण्यात घालवतो.



कथा कशी वाटली नक्की कळवा तुमच्या सगळ्यांच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.

समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.


फोटो साभार गूगल.



जय हिंद.

*********************************************



🎭 Series Post

View all