अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्यमय कथा
शीर्षक-द एंड...! १
श्रीरंग नुकताच बाहेरून येऊन घरी बसला. बायकोने पाणी आणून समोर ठेवले.घरात असणारा शुकशुकाट बघून बायकोला विचारले
" काय ग कोमल ,बाबा आणि मुलं गेले कुठे? इतकं शांत घर...?"
" अहो मुलं तर खेळायला गेलीत,ही खेळायची च वेळ ना त्यांची. पण बाबा मात्र आज सकाळी अकरा वाजेपासून घरून गेले ते काही आले नाही अजून." कोमल बोलली
" आलं असेल कुठे काहीतरी काम तर गेले असतील. तसेही आजवर माझ्यासाठी आणि श्रीधरसाठी बरेच काही सोसले आहे त्यांनी. आई गेल्यापासून फक्त आमचीच काळजी एके काळजी . आता आम्ही कर्ते धर्ते झालोत ,जगू दे त्यांना मनासारखे ." म्हणत त्याने रिकामा पाण्याचा ग्लास टीपॉय वर ठेवला.
फ्रेश होऊन तो पेपर वाचत बसला. तसेही सकाळच्या बाहेर जायच्या गडबडीत पेपर वाचायचा राहूनच गेला होता.
तेवढ्यात पत्नी कोमल दोघांसाठी चहा घेऊन आली.गप्पा गोष्टी करत दोघांनी चहा घेतला पण त्याला सुद्धा बाबा अजून परत न आल्याने त्याची नजर दाराकडेच लागली होती.
काही वेळानी मुलं पण खेळून घरी आली. हातपाय धुवून त्याच्या गळ्यात पडली. त्यानी त्यांच्यासाठी आणलेला खाऊ बघून तर ती एकदम खुश झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यालाही त्याचं बालपण आठवलं.
त्याने दोन तीनदा बाबांच्या नंबर वर फोन करून पाहिला पण प्रत्येक वेळी फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया किंवा स्विच ऑफ च दाखवत होता.
"हे बाबा पण ना, नक्कीच फोन नसेल चार्ज केला त्यांनी बहुतेक म्हणत तो मनात चरफडलाच.
वेळ होऊ लागली तशी त्याला त्यांची चिंता वाटू लागली. त्याने त्यांच्या एकदोन मित्रांना फोन करून विचारले पण कुणालाच ते कुठे गेले हे नीटसे माहीत नव्हते. दुपारी तीन चार वाजताच्या दरम्यान ते गावातच दिसल्याचे बऱ्याच जणांनी सांगितलं पण नंतर मग ते कुठे गेले ते कुणालाच माहीत नव्हते.
,
जेवायची वेळ होऊन गेली तरीही त्यांचा काही पत्ता नव्हता. त्याने गावात सुद्धा शोध घेतला पण अजून ते काही त्याला सापडले नाही.
"अरे , गेले असतील कुठेतरी बाहेर कुणासोबत .वेळ झाली असेल तर तिथेच थांबले असतील. अरे ते काही लहान मूल नाहीत काळजी नको करू,येतील जा घरी." त्यांच्या एका मित्रानेच त्याला समजावले आणि तो घरी परत आला.
बराच वेळ झाल्याने दोघाही नवराबायको ने बळेच दोन घास खाल्ले अन् पुन्हा बाबांची वाट पाहणे सुरू झाले.
तसाच दार बंद करून हॉल मधल्या सोफ्यावरच त्याचा डोळा कधी लागला ते त्याला कळलेच नाही.
सकाळी सकाळी त्याला जग आली ती एका फोन नेच.....
" अरे,श्रीरंग ह्या तुमच्या शेताकडे एक हार्वेस्टर उभा आहे. अन् ...अन्..."
" अन् काय,काय झालं सांगा ना......" श्रीरंग
" अरे ,फोनवर नाही सांगता येणार, जमलं तर..... नाही ,तुला यावेच लागेल इकडे. " तो बोलला.
"अगं कोमल मी शेता कडे जाऊन येतो. काहीतरी झालं वाटते तिकडे." म्हणत त्याने कोमल ला आवाज दिला.
"अहो काय झालं एवढं अर्जेंट.....?" तिने विचारले.
त्याने थोडक्यात तिला माहिती सांगितली अन् तो निघाला...
"काय झालं असेल नेमके ?"
अशा विचारातच तो शेताकडे पोचला.
त्याला फोन करणारा शरद तिथेच होता. श्रीरंग तिथे पोचताच तो त्याच्या जवळ गेला. " श्रीरंग सांभाळ रे बाबा स्वत: ला." म्हणत त्याच्या खांद्यावर त्याने आश्वासक हात ठेवला.
वं्.
श्रीरंग ला बघताच सगळे बाजूला होऊन त्याला वाट देऊ लागले अन् आता पर्यंत लोकांच्या बोलण्याचा जो कल्ला होता तो अजिबातच बंद झाला अन् एक भेदक शांतता तिथे निर्माण झाली.
दोन मिनिटं श्रीरंग ला सुद्धा काही कळत नव्हतं."काय झालं रे, ही एवढी गर्दी कशाची रे इथे अशा सकाळच्या वेळी? मला बघून सगळे असे चूप कां झाले, सांग ना?" शरद चा प्रश्न संपत नाही तोच सायरन देत पोलिस गाडी तिथे दाखल झाली.
पोलिस पण आले...? काय झालेय नेमके..? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात अगदी क्षणात निर्माण झाले.....
शरद त्याला हाताला धरून समोर जात होता. उभा असलेला हार्वेस्टर त्यांचाच होता.
" म्हणजे बाबा आज मळणीचीमशीन घेऊन गेले होते. मी बाहेर गेलो होतो पण घरी आल्यावरही माझ्या हे लक्षातच आले नाही." तो मनातच म्हणाला.
तो आणि शरद समोर अन् पोलिसांना ज्यांनी फोन केला होता तो मागे पोलिसांसोबत येत होता.
जसे ते त्या जागी पोचले तर समोरचे दृष्या बघून त्याच्या जीवाचा नुसता थरकाप उडाला होता. कारण दृश्यच तसे होते.
हार्वेस्टर च्या मागच्या चाकात येऊन कुणीतरी गेल्याचं तिथे प्रथमदर्शनी वाटत होतं.
पण त्या माणसाच्या अंगावरचे कपडे सुद्धा ओळखीचे वाटत होते श्रीरंग ला.................
हो, वाटणारच होते ना कारण ते त्याच्या बाबांचे होते.
म्हणजे....,म्हणजे...बाबा.......तर .....नाहीत ना हे........?
बाबांचा चेहरा बघण्यासाठी तो दुसऱ्या बाजूला गेला पण हे काय?????????
त्या बॉडी ला चेहराच नव्हता, फक्त चेंदलेले काहीतरी त्या जागी होतं.....!उरलेले धड सुद्धा बऱ्याच जागी माराने चेंदले होते.......!
श्रीरंग ची अवस्था बघून शरद त्याला आधार देत होता," सांभाळ स्वतः ला मित्रा,सांभाळ......!"
श्रीरंग चे डोके , कान,मन सारेच बधीर झाले होते......
काय झालंय,काय होतेय हे काहीच त्याच्या गावी नव्हते संवेदनाशून्य पणे तो तिथे उभा होता एका निश्चल पुतळ्यासारखा......!
पोलिस आपले काम करत होते, त्यांचा फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगल ने बॉडी चे, जागेचे फोटो घेत होता. पोलिसांचा पंचनामा सुरू होता.
कुणीतरी शेजारच्याच शहरात राहणाऱ्या त्याच्या भावाला पण फोन केला होता अन् त्याचा एक मित्र तर दस्तुरखुद्द त्याला घ्यायलाच गेला होता. तो सुद्धा तिथे पोचला आणि तो सुद्धा परिस्थिती पाहून हादरलाच होता.
एकतर श्रीरंग मोठा असल्याने त्याने कसे तरी स्वतः ला सावरले होते पण हा मात्र श्रीरंग च्याच खांद्यावर डोके ठेऊन स्फुंदुन स्फुंदुन रडू लागला.
आता पर्यंत कसे तरी थोपवलेले त्याचे अश्रू आता मात्र डोळ्या वाटे बाहेर पडू लागले.
काय झाले असेल पुढे? ते श्रीरंग चे बाबाचं होते का? असतील तर त्यांचा असा अपघात कसा झाला असेल? तो नेमका अपघात होता की घातपात ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा कथेचा पुढचा भाग.
© मुक्तमैफल
डॉ. मुक्ता बोरकर आगाशे.