प्रेमाचा अंकुर ( भाग ४)

About Love


प्रेमाचा अंकुर (भाग ४)


दारी भव्य मंडप,घरावर  रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट , सनईचा  सुमधुर आवाज, जेवणाच्या पदार्थांचा मस्त घमघमाट, मंडपात सर्व जण  छान तयार होऊन हातात अक्षता घेऊन उभे होते .

आईबाबा आपल्या काळजाच्या तुकड्याला आज नवरी झालेले पाहून , जबाबदारीतून मुक्त झालेल्या जाणिवेतून समाधानी . आणि आता आपली लेक आपल्यासाठी पाहुणी होऊन जाणार या विचाराने भावनिक झालेले .


राणी कलरचा  व सिल्व्हर बॉर्डर असलेला  भरजरी शालू , डायमंडचा साज, हात,पाय मेंहदीने  मस्त रंगलेले,  केशभूषा आणि त्यावर लावलेले मोगऱ्याचे गजरे .  जास्त नाही पण रंगाला ,रूपाला साजेसा मेकअप .

अशी छान तयार झालेली आणि  लग्नमंडपात अंतरपाटाच्या एका बाजूला हातात वरमाला घेऊन, नजर खाली ठेवून उभी राहिलेली  नवरी . भटजींच्या मंगलाष्टकांचे स्वर  कानावर पडत होते .  तिच्या मनात अनेक विचार येत होते आज आपण आईबाबांना,भावाबहिणींना सोडून जाणार आहोत म्हणून वाईट वाटत होते  आणि आजपासून आपल्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात होणार होती त्याची ही स्वप्ने मनात होती .

 भटजींनी \"शुभमंगल सावधान \" म्हणताचं मुलीने अगोदर वरमाला नवरदेवाच्या गळ्यात  टाकावी म्हणून तिने वरमाला टाकण्यासाठी नवरदेवाकडे पाहिले आणि तिला धक्काचं बसला व एकदम ओरडलीचं , " तू इथे कसा?  असं कसं शक्य झालं? " 


"अगं बाई,आज परत काहीतरी स्वप्न पाहिले वाटत हिने" असं म्हणतं आईने  तिला झोपेतून उठवले . आणि ती काही तरी बोलतचं जागी झाली .


पाहिले तर काय? खिडकीतून कोवळी सूर्य किरणे रूम च्या आतपर्यंत आलेली होती . आईची सकाळची सर्व कामे आटपून आई तिला उठवत होती  .  म्हणजे आपण पाहिले ते खरे नव्हते , स्वप्न होते तर...


आई  - " काय गं , आज काय पाहिले स्वप्न ? आणि काय बडबड करीत होती ? " 


संध्या - " काही नाही गं ,असचं काहीतरी . मी जे कथा,कांदबऱ्या वाचते ना , त्यातील पात्र दिसतात स्वप्नात आणि बोलते मगं मी त्यांच्याशी.

रात्री जरा जास्त वेळ  वाचत बसली म्हणून उशीर झाला उठायला . पण काय सांगू आई , कथा इतकी छान होती ना .., पूर्ण वाचली नसती ना तर झोपचं लागली नसती इतकी रहस्यमय आणि उत्कंठा वाढवणारी होती . किती छान लिहीतात ना लेखक ? वाचतांना वाटते , जसे की आपल्या आयुष्याबद्दलचं लिहीले आहे , हे सर्व आपल्याभोवती तर होत असतं,घडतं असतं ,अगदी जसच्या तसं ..."


आई - " तुझे हे बोलणे ऐकत बसली तर उशीर होईल पुढे कामांना ,चल आटोप लवकर तू ही ."


एवढे बोलून आई तिच्या कामाला निघून गेली .


इकडे संध्याचे विचारचक्र सुरू झाले . \"आईला आपण स्वप्नात काय पाहिले हे खरे सांगितलेचं नाही, वेगळेचं सांगितले, जे पटकन सुचले ते . तिला जर खरे सांगितले असते तर  तिला काय वाटले असते ? 


आपल्याला असे का स्वप्न दिसले ?  घरात आपल्या लग्नाचा विषय  आणि आपल्या  मनात जे विचार सुरू असतात, यामुळे असे स्वप्न पडले असावे..

आपण जो विचार करतो तेचं स्वप्न म्हणून दिसतात .


काही काही स्वप्न खरे ही होतात असे म्हणतात . मगं आज मला पडलेले स्वप्न होईल का पूर्ण?  होईल का माझ्या मनासारखे? आपण आई बाबांना आपल्या मनातले का सांगत नाही ? ...


शाळेत असताना तो मनापासून आवडायचा . दिसायला छानचं होता . पण दिसण्यापेक्षाही त्याच्यात असे काहीतरी वेगळेपण मला जाणवायचे  आणि त्याला पाहिले की मनाला बरे वाटायचे . पण मी त्याला कधी जाणवू दिले नाही . आणि माझ्या मैत्रीणींनाही कळू दिले नाही . मनातले भाव मनातचं ठेवत गेली .


खुपदा वाटायचे , त्याला सांगावे ,"तू मला आवडतोस ,..." 


पण त्याला मी आवडत नसेल तर ? त्याच्या मनात तसा काही विचार नसेल तर ?  

चित्रपटात दाखवतात तसे..

दोघांनाही एकमेकांविषयी काही तरी वाटते ,दोघांच्याही मनात तशी भावना निर्माण होते वगैरे वगैरे

पण त्याच्या वागण्याबोलण्यातून तसे काही जाणवलेचं नाही.


जेव्हाही आम्ही दोघं  अभ्यास, होमवर्क वगैरे निमित्ताने बोललो तर मी त्याच्याकडे नजर वर करून ,त्याच्याकडे बघून बोलत नसे, नजरेला नजर भिडवण्याचे धाडस होत नव्हते . त्यामुळे त्याच्या भावना ही जाणवल्या नाही कधी . 


दहावीच्या निरोप समारंभाच्या दिवशी , शाळा सोडून जात असल्याच्या दुःखाने सर्व मुली रडत होतो . पण मुलांवर काहीही परिणाम नाही . मुलींना भावना पटकन व्यक्त करता येतात , मुलींना लवकर  रडू येते .

मुलांना ही भावना असतात पण ते व्यक्त करीत नाही आणि रडणे वगैरे हे जमत नाही .


ही शाळा, हे शिक्षक ,हे मित्रमैत्रीणी हे सर्व आपल्याला परत भेटणार नाही . यानंतर प्रत्येक जण आपआपल्या आणि  वेगवेगळ्या मार्गाने, दिशेने जीवनरुपी प्रवासास सुरुवात करणार होते . 


आठवण म्हणून सर्व शिक्षकांचा,मैत्रीणींचा,मित्रमैत्रीणींचा  असे फोटो काढले आणि ज्यांना हवे होते त्यांनी घेतले .


या  दिवसानंतर आपण कधीही एकमेकांना भेटणार नाही या जाणिवेतून आपण त्याला आपल्या मनातील सगळे सांगून टाकावे ,असे वाटूनही  आपण त्याला काहीही बोललो नाही . फक्त डोळ्यांनी मनभरून पाहून घेतले . \"


आईच्या आवाजाने संध्या आपल्या विचारांतून बाहेर पडली . आणि आपल्या रूटीनला लागली .


दोन- तीन दिवसांनी बाबांनी  सांगितले  की, "माझ्या मित्राच्या ओळखीतील एक स्थळ आहे . मुलगा दिसायला चांगला आहे, शिकलेला आहे , वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवत आहे . व्यवसायाचा चांगला जम बसलेला आहे . घरातील माणसे ही चांगली आहेत  आणि शिवाय ओळखीतील आहे त्यामुळे संध्या साठी अगदी योग्य स्थळ आहे . विशेष म्हणजे त्यांनी स्वतः हून विचारले आहे . म्हणजे संध्या त्यांना आवडली असेल हे नक्कीचं . घरबसल्या चांगले स्थळ आले आहे तर उगाचं नाही म्हणण्यात काही अर्थ नाही . आलेल चांगलं स्थळ नाकारलं  आणि पुढे काही चांगले झालेचं नाही तर ?  मला तर  हे स्थळ योग्यचं वाटते  . तुम्ही दोघी बघां ,तुमचा काय विचार ? "


आईला तर बाबांवर विश्वास होता . त्यामुळे ते जो  निर्णय घेतील तो योग्यचं असेल म्हणून तिने होकार दिला .

संध्याने लग्न वगैरे याविषयावर अजून विचार केलेला नव्हता . \"आपण जर आईबाबांना आपल्या मनातील व्यक्तीबद्दल सांगून त्याच्याशी लग्न करण्याचे सांगितले तर ते मान्य करतील का ? आजपर्यंत आपण त्यांना कोणत्याही प्रकारे दुखावले नाही . आणि आपल्या या विचाराने ते दुखावले  गेले तर ..


आपल्या नंतर आपले बहीणभाऊ लग्नाचे . त्यांना भविष्यात आपल्यामुळे काही त्रास झाला तर ..


आणि ज्या व्यक्तिचा आपण इतका विचार करत आलो आहे आणि अजूनही करतो आहे , तो आज कोठे आहे ? कसा आहे ? त्याला आपल्याबद्दल काय वाटते ? त्याला आपली आठवण येत असेल का ? आपल्याला तो विसरला ही असेल ..


शाळा सोडल्यानंतर मी ज्या कॉलेजमध्ये होते , त्या कॉलेजला तो कधी दिसला नाही . 

 

 शाळेत होतो तेव्हा कोणाकडे फोनही नव्हते, त्यामुळे काही कॉन्टॅक्ट नंबरही नाही . अनेकदा त्याला शोधण्याचा,त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळविण्याचा प्रयत्न केला पण निराशाचं पदरी पडली..

देवाला जर पुढे काही घडवायचेचं नव्हते तर माझ्या मनात त्याच्या बद्दल प्रेमाची भावना का निर्माण केली? \"


असे अनेक प्रश्न आणि विचारांनी संध्या दुःखी झाली . 


" अजीब दास्ता हैं ये,

कहाँ शुरू कहाँ खतम 

ये मंजिले हैं कौनसी,

न वो समझ सके न हम..."


हे गाणे गुणगुणत कामात गुंतून गेली . 


दुसऱ्या दिवशी बाबांनी निर्णय विचारल्यावर तिने होकार सांगितला . 


आई बाबांना तर खुपचं आनंद होतो आणि ते पुढच्या तयारीला लागतात . 


रीतसर दाखवण्याचा कार्यक्रम, साखरपुडा आणि लग्न हे सर्व कार्यक्रम एकदम छान आणि मनासारखे...

दोघंही कुटुंबात आनंदचं आनंद ..


आपल्याला गुणी सून मिळाली म्हणून सासरचे खुश तर आपल्याला काहीही त्रास न होता , आपल्यापेक्षा परिस्थिती ने चांगले सासर संध्याला मिळाले म्हणून माहेरचे खुश! 


संध्या ने अमितशिवाय कोणाचाचं विचार  केलेला नव्हता आणि इतर कोणाही मुलाबद्दल तिला तशी भावनाही वाटलेली नव्हती .


नवरा मुलगा दिसायला चांगला होता  आणि स्वभाव ही चांगला वाटत होता . आणि आईबाबांना सर्व काही आवडले होते म्हणून संध्या  ही जास्त विचार न करता लग्नाला तयार झाली आणि लग्न करून सासरी गेली.


क्रमशः

🎭 Series Post

View all