भाग:- २७
मागील भागात:-
अमोल मनापासून अभिच्या डोळ्यांत डोळे घालून बघत बोलत होता. त्याच्या डोळ्यांत आरू विषयी प्रेम, आदर, काळजी दिसून येत होती.
त्याच्या बोलण्यावर अभि गालात हसत म्हणाला, "घाई नाही, अमोल. तुला पाहिजे तेवढा वेळ घे."
आता पुढे:-
"नाही बाबा, मी घाईत निर्णय घेतला नाही. माझा निर्णय ठाम आहे. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. अशा मुलीचा तुम्ही फक्त सांभाळलंच नाही तर तिला आईवडिलांचं नाव, प्रेम, संस्कार, शिक्षण सर्व काही दिलेत. ही इतकी सोपी गोष्ट नाही. यासाठी खूप मोठं काळीज व धाडस लागतं. मी पण तिला पुढे जपणार आहे." अमोल अभिचे कौतुक करतं होता.
"मग तर तुला तुझ्या होणाऱ्या सासूचा जास्त अभिमान असायला हवा. कारण ते मोठं काळीज व धाडस तिने केले. मी फक्त तिला साथ दिली." अभि हसत म्हणाला.
अमोलने मनापासून दोघांचे कौतुक केले. त्याच्या मनात त्या दोघांबद्दल प्रंचड अभिमान वाटून त्यांच्याबद्दलचा आदर कैक पटीने वाढला.
नंतर त्याच्या लक्षात आले की अभिने स्मिताचा उल्लेख तुझी सासू म्हणून केला. तेव्हा तो खूप खुश
झाला.
झाला.
"काय म्हणालात तुम्ही, बाबा? होणाऱ्या सासू म्हणजे.. आय मीन तुम्हाला मी आरूसाठी योग्य वाटतो ना." अमोल खूप आनंदी होऊन उत्सुकतेने म्हणाला.
अभिने हसत होकारार्थी मान डोलावली.
अमोलने खुश होतं त्याला मिठी मारली. नंतर त्याच्या लक्षात आल्यावर तो पटकन बाजूला होतं केसांमधून हात फिरवत म्हणाला, " ते एक्सामेंटमध्ये झाले. आय एम सो हॅपी, थँक्यू बाबा." त्याचा हात हातात घेत त्यावर त्याने त्याचा माथा टेकवला.
"थांबा बहाद्दर, इतके हुरळून जाऊ नका. अजून आमच्या लेकीने होकार दिला नाही." अभि त्याची फिरकी घेत हसत म्हणाला.
"ती होच म्हणणार खात्री आहे मला." तो एकदम विश्वासने म्हणाला.
"एवढी खात्री? "अभि एक भुवई उंचावत म्हणाला.
"हो, कारण लेकीच्या बाबाने होकार दिला म्हटल्यावर लेक नाही म्हणणारचं नाही हे माहिती आहे मला." तो हसत म्हणाला.
"हम्म, असंच होऊ दे." ते त्याची पाठ थोपटत म्हणाले व त्याला तिचा निर्णय कळवतो सांगून दोघे आपापल्या घरी निघून गेले.
अभिने लग्नाला होकार दिला. पण आरूषी तयार असेल तरच तो त्यांच लग्न लावून देईल हे जाताना सांगायला तो विसरला नाही. त्याला भेटून अभि घरी आला.
अमोलबद्दल त्याने स्मिताला सर्व सांगितले. दोघांचे त्याच्याबरोबरचे बोलणेही तिच्या कानांवर घातले.
तिला खूप आनंद झाला. पण प्रश्न आता आरूषीचा होता. ती काय म्हणेल यावर ते पुढे पाऊल उचलणार होते.
आरूषीलाही अमोल आवडतं होता, ही गोष्ट तिने मनात ठेवली होती. कधी कधी त्याच्या वागण्या- बोलण्यातून तिला वाटायचं की त्यालाही ती आवडते. पण तिने विचारलं नाही. पण त्या वेडीला तरी कुठे हे माहिती होती की त्याच्या मनात तर तिचाच वास आहे.
आधी अभि व स्मिता यांनी अमोलबद्दल आरूषीला सांगितले. तिच्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. त्याला काही प्राॅब्लेम नाही म्हटल्यावर तिने तिच्या मनात तो आहे हे सांगितले. तरीही एकदा तिला त्याच्याशी बोलून मग निर्णय घेणार असल्याचं तिने सांगितलं. त्यांनीही त्यास दुजोरा दिला.
आरूषी अमोलला भेटल्यावर म्हणाली, "अमोल, मी अशी आहे तुला माहिती आहे. आता प्रेम आहे म्हणतोस पण हेच प्रेम नंतरही शेवट पर्यंत राहील ना. हे बघ माझ्यावर दया किंवा सहानुभूती दाखवून त्याला प्रेमाचं नाव देण्याची चुक करू नकोस. तसं काही असेल तर आताच सांग. नंतर मी तुझ्यात गुंतल्यावर तू दूर केलेस तर मला ते सहन होणार नाही."
तिने अगदी स्पष्ट शब्दांत तिच्या मनातील भीती त्याला बोलून दाखवली.
"वेडी आहेस का तू? माझं प्रेम म्हणजे तुला सहानुभुती वाटते का गं? इतक्या दिवसात तुला मला एवढंच ओळखलंस का? असे म्हणून तू मला हर्ट केलेस." तो उदास होतं तोंड पाडत म्हणाला.
"साॅरी, अमोल मी तसं म्हणायला नको होतं. पण माझ्या मनातील भीती म्हणून हा प्रश्न विचारला." ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"मग आता तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांना विचार काय दिसतं तुला माझ्या या डोळ्यांत? प्रेम की सहानुभुती?" तो तिला जवळ ओढत तिच्या डोळ्यांत त्याची नजर खोलवर रूतवत म्हणाला.
ती फक्त एकटक त्याच्या नजरेत पाहत होती.
"सांग ना, आरू काय दिसतं तुला? प्रेम की.." ती शांतपणे एकटक पाहत होती म्हणून तो पुन्हा तिला शांत पण प्रेमळ स्वरात विचारत होता तोच ती त्याचं बोलणं मधेच तोडत त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणाली, "प्रेम दिसतं." असे म्हणून तिने तिच्या नयनशिंपले लाजेने खाली झुकवल्या.
तिचा लाजेने गोरामोरा चेहरा पाहून त्याला काय ते सर्व समजलं.
तिने घरी आल्यावर अमोलशी लग्न करण्यास होकार असल्याचे सांगितले. ते ऐकून घरातील सर्व लोक आनंदी झाले.
"बाबा, कोणी तरी खूप खुश आहे नाही. इतक्या दिवसापासून लग्नापासून दूर पळणारी आता बुवा, बोहल्यावर चढणार." जितेश तिला चिडवत होता.
"हो ना, गोडगोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी." रितेश तिला उचलून गोल फिरवत हसतं चिवडत म्हणाला.
"बाबा, सांगा ना या दोघांना." ती लाजत अभिला बिलगत म्हणाली.
त्याने डोळ्यांने त्यांना लाडिक दटावत तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाला,"अगं, चिडवू दे की, तुझ्या सासरी येऊन तुला थोडी ना चिडवणार ते."
"जा बाबा, तुम्ही पण चिडवता." असे म्हणत लटका राग करत गाल फुगवत स्मिताच्या खुशीत शिरली.
"लेक लाडकी या घरची होणार सून तू त्या घरची." स्मिता तिला मायेने कुरवाळत म्हणाली.
"आई, तू सुद्धा."असे म्हणत तिचा कंठ गहिरा झाला.
सगळे थोडावेळ भावूक झाले. परी व ऋषी यांनी त्यांच्या मस्तीने वातावरण हलकं करून टाकलं.
दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. भाच्चे मंडळी ऋषी आणि परी आत्तूचे लग्न म्हणून खूप खुश होती. लग्नाची खरेदी करून झाली.
आरूषीने अभि व स्मिता यांना तिच्याकडून खास कपडे भेट म्हणून द्यायला त्यांच्या रूमकडे आली होती. ती दार ठोठावणार तोच तिच्या कानावर त्यांचे बोलणे ऐकू आले. ते ऐकून ती जागीच थिजली. आपसुकच तिचा हात तोंडावर गेला.
क्रमशः
काय ऐकलं असेल आरूषीने?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा