भाग- २६
मागील भागात:-
एकदा आरूषीला पाहायला पाहुणे येणार ही बातमी अमोलला कळली आणि तो मनात खूप घाबरला. त्या पाहुण्या आधी आपणच पाहुणे म्हणून गेलो तर कदाचित आपलं लग्न होईल असा विचार करून तो अभि व स्मिता यांना भेटायचा विचार केला. याबाबत त्याने आधी त्याच्या घरी सगळं सांगितले. सुरूवातीला ते मान्य नव्हते पण त्याचे प्रेम बघता ते तयार झाले.
आता पुढे:-
अमोल एक चांगला मुलगा म्हणून आरूषीने घरी सांगितले होते. ते दोघे तसे बोलायचे पण जास्त करून कामासंबंधी बोलत असायचे. तिची गाडी बंद पडल्यावर तो एकदा दोनदा त्यांच्या घरी तिला सोडायला आला होता. त्यामुळे अभि व स्मिता सोबत सगळे घरचे त्याला ओळखायचे.
अमोलने अभिकडे एक काम आहे असे सांगून आरूषीकडून त्याचा मोबाईल नंबर मागितला. तिलाही अभि अभियंता होते, त्याचे काही काम असेल म्हणून जास्त आढेवेढे न घेता तिने अभिचा त्याला नंबर दिला.
त्याने त्या नंबरवर संपर्क साधून आरूषीबद्दल बोलायचे आहे असे सांगितले. अभिला त्याच्या बोलण्यातून थोडा फार अंदाज आला होता त्याला कशाबद्दल बोलायचे असेल ते. पण भेटून सगळं बोलता येईल असा विचार करून त्याने त्याला आधी एकांतात भेटायला बोलावले.
आरूषीबद्दल महत्त्वाचे बोलायचे आहे आणि घरी न भेटता बाहेर भेटू. तसेच या भेटीबद्दल आरूषीला कळता कामा नये असे त्याने सांगितले. बहुतेक ती दिव्यांग आहे या विषयावर बोलायचे असेल असा विचार करून तो त्याला भेटायला आला.
अभिने सांगितलेल्या ठिकाणी अमोल त्याला भेटायला आला. आधी त्याने त्याचे पदस्पर्श करून त्याला नमस्कार केला. त्यानेही सुखी राहा असा आशीर्वाद दिला.
अभि त्याने बोलायला सांगितले तेव्हा तो म्हणाला,"बाबा, माझे आरूषीवर खूप प्रेम असून मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मी बाबा म्हंटलेले तुम्हाला चालेल ना."
"हम्म, मला अंदाज होता या गोष्टीचा. आणि हो आवडलं तुझं हक्काने बाबा म्हणणं." अभि त्याच्या खांद्यावर थोपटत हसत म्हणाला.
तिथे असलेल्या बेंच वर त्याला बसण्याचा इशारा करत त्याला म्हणाला,"अमोल, माझी आरू आहेच अशी की कोणीही तिच्या प्रेमात पडावं. पण तुला खरंच लग्न करायचे आहे की तू लग्न करून तिच्यावर उपकार करणार आहेस." अभिने त्याला स्पष्ट शब्दांत विचारले.
"तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? मी तुम्हाला तसा मुलगा वाटतो का, बाबा? मी खूप मनापासून तिच्यावर प्रेम करतो. इतक्या दिवसापासून तुम्ही मला ओळखता मग तरीही तुमच्या मनात शंका आहे का?" अमोल आधी दुखावला व नंतर खूप कळवळून म्हणाला.
"मुलीचा बाप आहे मी, तिच्यासाठी योग्य वर निवडणे माझं कर्तव्य तर आहे. आणि मी तुला तिच्याबद्दल अशी गोष्ट सांगितली जी तुला माहिती नाही तरीही तू तिच्या तेवढचं प्रेम करशील? लग्न करशील तिच्याशी ?" अभि त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाला.
"हो, बाबा. माझा निर्णय ठाम आहे. कोणतीही गोष्ट असली तरी माझ्या निर्णयात बदल होणार नाही." अमोलही त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला.
त्याच्या डोळ्यात अभिला सच्चेपणा दिसत होता. आरूसाठी हा योग्य आहे असे मन त्याला सांगत होतं.
अभि गंभीर होतं त्याला म्हणाला, "अमोल, आरूषीच्या दिव्यांगाबद्दल तर तुला माहितीच आहे. तिच्याबाबत अजून एक सत्य आहे जे तिलाही माहिती नाही आणि तुला अंधारात ठेऊन लग्न करणे मला योग्य वाटतं नाही. ही गोष्ट कळल्यावर ती गोष्ट फक्त आपल्या दोघांतच राहिलं, दुसऱ्या कोणालाही अगदी आरूलाही सांगणार नाहीस असे वचन तुझ्याकडून हवंय. ते ऐकल्यावरच तू निर्णय घे."
अभिने त्याच्या पुढे हात केला. त्याच्या हातावर हात ठेवत अमोल म्हणाला, "मी शब्द देतो, बाबा. आरूषीलाच काय आपल्यात बोलणं दुसऱ्या कोणालाही कळणार नाही अगदी माझ्या आईबाबांनाही नाही कळणारं. आपल्यात हे बोलणं आपल्यातच राहीलं, डोन्ट वरी. सांगा आता. "
"आरूषीचे आम्ही खरे जन्मदाते आईवडील नाहीत. ती तिची आई स्मिताला एका मंदिरात सापडली होती. आम्ही दोघांनी तिचा अगदी पोटच्या मुलीसारखा सांभाळ केला आहे. आम्ही हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवले त्यामागे कारण होतं. ती खूप हळवी आहे. तिला जर सत्य समजलं तर ती आमच्यापासून लांब जाईल. ही भीती तर आहेच शिवाय ती स्वतःला त्रास करून घेईल. म्हणून तिला सांगितले नाही. तुलाही जर यावर आपत्ती असेल तर आताच सांग." अभि सर्व सांगत असताना अमोल शांतपणे ऐकत होता.
पहिल्यांदा तर ते ऐकून त्याला धक्काच बसला होता. कारण इतक्या दिवसांत त्याला कधीही असे वाटलं नव्हतं की ती त्याची खरी मुलगी नाही असे तर वागणेच नव्हते. आरूषीच्या बोलण्यावरूनही कधीच ते जाणवलं नव्हतं. ती नेहमीच आईबाबांबद्दल भरभरून बोलत होती. तेव्हा तिच्या जन्ममागे असे काही सत्य असे त्याला वाटलेच नव्हते.
थोडा विचार करत अमोल म्हणाला," बाबा, आरूच्या जन्माच्या सत्याने मला काही फरक पडत नाही. माझा निर्णयात काहीही बदल होणार नाही. माझा तोच निर्णय असेल तिच्याशी लग्न करण्याचा. कारण माझं तिच्यावर मनापासून खूप प्रेम आहे. तिचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला माहिती नाही. ती हो बोलली तर आनंदच आहे. तिला खूप प्रेम देईन, सुखात ठेवेन. अगदी फुलासारखं जपेन, जसे तुम्ही जपता. तक्रार करायला जागाच देणार नाही. ती नाही बोलली तरी हरकत नाही. तिच्या होकाराची वाट पाहायला मी आयुष्यभर तयार आहे. आणि तुम्ही सांगितलेलं सत्य माझ्या मनातच कैद राहिल. त्याची काळजी करू नका."
अमोल मनापासून अभिच्या डोळ्यांत डोळे घालून बघत बोलत होता. त्याच्या डोळ्यात आरू विषयी प्रेम, आदर, काळजी दिसून येत होती.
त्याच्या बोलण्यावर अभि गालात हसत म्हणाला, "घाई नाही, अमोल. तुला पाहिजे तेवढा वेळ घे."
क्रमशः
अभिच्या या बोलण्यावर अमोलच उत्तर बदलेल का?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा