तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 15 अंतिम भाग

एका दुःखद अंतातून सुखद सुरुवात.

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 15(अंतिम भाग)

मागील भागात आपण पाहिले की पूर्वा आणि सूरज योग्य वेळी पोहोचले. बिल्ला,चिकना आणि त्यांचे सर्व साथीदार पकडले गेले. तरीही सूरजने तिथेच थांबयला सांगितले. त्यानंतर आणखी एक व्यक्ती तिथे आली. आता पाहूया पुढे.


पुर्वा समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहताच हादरली. सुनयना सरदेसाई. साक्षात मुख्यमंत्र्यांची प्रिय पत्नी आणि तिच्या पाठोपाठ आता आलेली सौम्या मेहरा.

"तर तुम्ही तिघी आहात ब्लॅक रॅबीट. पण कशासाठी? इतके निष्पाप जीव मारले गेले."
पूर्वा प्रचंड संतापली होती.

"चिल,इन्स्पेक्टर पूर्वा. रस्त्यावर भटकणारी मुले मारली गेली. त्यांना तसेही खायला प्यायला मिळत नसते."
सौम्या बोलली.

"पण कशासाठी? इतके सगळे केलेत तुम्ही?"
सूरज आता चक्रावला होता.

"सांगते, शाल्मली समीरच्या आयुष्यात त्याला संपवायचे म्हणून आली. तिचे खरे प्रेम अंगदवर होते."
सुनयना थांबली.

"पण तुमचा या सगळ्यात काय फायदा?"
पूर्वा बंदूक रोखत म्हणाली.

"माझे वडील त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून मला निवडतील अशी खात्री असताना त्यांनी त्यांच्या शिष्याला निवडले. वर त्याच्याशी माझे लग्न लावून दिले.
माझी आई जशी कार्यकर्त्यांचे चहा पाणी करण्यात संपून गेली. माझेही तसे होऊ देणे मला मान्य नव्हते. मी संधी शोधत होते. लवकरच शाल्मली आणि माझी मैत्री झाली.

त्यानंतर तिने मला सगळे सांगितले. त्याचवेळी प्रियांक समीरच्या आयुष्यात आला आणि मला संधी दिसली."
सुनयना शांत झाली.

"म्हणजे तुम्ही तिघी आधी प्रियांक आणि समीरचे व्हिडिओ व्हायरल करणार होता. म्हणजे ते दोघे आपोआप बाजूला झाले असते."
पुर्वाला आता प्लॅन उलगडत होता.

" येस, त्यासाठीच श्लोक आणि सुपर्णा गायब झाले तर आम्हाला संधी मिळाली असती. पैशांसाठी नित्या हे काम करायला तयार झाली."
शाल्मली पुढे सांगू लागली.

"पण चुकीची मुले हाती लागली आणि नित्याने मदत नाकारली. पण नित्याला सत्य समजले होते. तिला जिवंत ठेवणे धोक्याचे होते.

तू बिल्लाला पकडायला तिथे गेलीस. अंधारात झटापट करताना तुझे रिव्हॉल्व्हर पडले. मी ते उचलणार इतक्यात सौम्याने त्याच पिस्तुलाने नित्याला गोळ्या घातल्या."

शाल्मलीने सांगितलेले ऐकून पूर्वा चिडली आणि तिने सरळ शाल्मलीच्या कानाखाली लावली.


"प्लॅन अगदी नीट चालला होता. पण मुन्नी,तुझे हे मित्र त्यानंतर मयंक असे अनेकजण अडथळा बनू लागले."

सुनयना रागाने बघत बोलली.


तेवढ्यात अंगदने खाली पडलेली सुरी उचलून समीरच्या गळ्यावर लावली.

"इन्स्पेक्टर,मला जाऊ द्या. ह्या मूर्ख बायकांना मी सांगत होतो की माझे काम मला करू द्या. पण नाही ऐकले.
माझ्या औषधांचा वापर करून सी.एम. कसे मेले कोणाला कळले नसते ना."
अंगद चिडून बोलत होता.

"अंगद,समीरला सोड. तू आता वाचणार नाहीस."

सूरज ओरडला.
तेवढ्यात पुर्वाने त्याच्या मस्तकाचा वेध घेतला आणि अंगद कोसळला.


"सुनयना मॅडम,आता तुम्हा तिघींना जेलची हवा खावी लागणार."
सूरज बेड्या बाहेर काढत होता.

तेवढ्या काही क्षणात सुनयनाने पिस्तूल काढले. शाल्मली आणि सौम्या दोघींना संपवून तिने स्वतः च्या डोक्यावर पिस्तूल लावले.

"मी अशी सामान्य कैद्यासारखी जेलमध्ये मरणार नाही."

दुसऱ्या क्षणी ट्रिगर ओढला गेला. सुनयनाचा निष्प्राण देह कोसळला.


"इन्स्पेक्टर प्लीज,मला आधी सोडवा इथून."
समीरने विनंती केली.

सूरजने त्याला सोडवले आणि त्याने कपडे शोधायला धाव घेतली. मयंक आणि सत्येन दोघांनाही सूरजने सोडवले.

"त्या खोलीत आणखी तीन मुले आहेत. मी त्यांना बाहेर आणतो."
मयंक आतमध्ये गेला.

समीर बाहेर आला आणि पूर्वाकडे पाहू लागला.

"समीर डील इज डील. हे तुमचे सगळे फोटोज् आणि व्हिडिओ." पूर्वा त्याला लॅपटॉप सोपवत म्हणाली.

"ऑफिसर,ह्या घटनेतून तिघींना बाजूला करता येईल का?" मुख्यमंत्री आत येत म्हणाले.

तसे पूर्वा आणि सूरज दोघांनी त्यांना सॅल्यूट केला.

"समीर,आय एम सॉरी. प्रियांक आणि तुझ्यात नाही येणार आम्ही."
मुख्यमंत्री म्हणाले.

"सर,तुमची अडचण समजते मला. आपण ह्या तिघींची नावे यात नाही येऊ देणार."

सूरज बोलत होता.

पूर्वा चिडली आणि काही बोलणार इतक्यात समीर म्हणाला,"सर त्या बदल्यात आम्हाला रस्त्यावरील आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करायला जमीन,फंड सगळे हवे."

मुख्यमंत्री हसले.

"मान्य आहे. सूरज,इथला व्हिडिओ ? आम्हाला तुझी पद्धत माहीत आहे."
मुख्यमंत्री त्याला जवळ बोलावून म्हणाले.

"ज्या दिवशी संस्था सुरू होईल त्या दिवशी सगळे तुम्हाला मिळेल. ट्रस्ट मी."

मुख्यमंत्री बाहेर पडले.


सिरियल किलर अंगद मारला गेल्याची हेडलाईन सगळीकडे झळकत होती. त्याच बरोबर एका विचित्र अपघातात मिसेस मुख्यमंत्री,शाल्मली आणि सौम्या यांचे निधन झाल्याची बातमी अशोक कव्हर करत होता.


************सहा महिन्यानंतर*************


माननीय मुख्यमंत्री,प्रसिद्ध सिनेतारका रागिणी आणि समीर देशमुख यांच्या उस्थितीत एका सुसज्ज आवारात दीपस्तंभ नावाच्या संस्थेचे उद्घाटन झाले.

श्री. व सौ. पूर्वा सूरज देशमुख सर्वांचे स्वागत करायला दारात उभे होते. रागिणी आणि अशोक स्वतः जातीने सगळी व्यवस्था बघत होते. मुन्नीला रागिणीने दत्तक घेतले होते.

मुन्नीची आई कमल आणि अशा अनेक अभागी स्त्रियांना रोजगार मिळवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम दिव्या आणि प्रियांका करणार होत्या.


ह्याच समारंभात रागिणीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. रागिणी बोलायला उभी राहिली.

"माझे आयुष्य आता सगळ्यांना माहीत झाले आहे. ह्या पुस्तकात अशा काही कथा आहेत ज्या तुम्हाला भोवताली अंधार पसरलेला असताना जगायची प्रेरणा देतील.

कारण आकाशात अंधार दाटलेला असताना पृथ्वीवर छोटे दिवे प्रकाश देतात.

तसेच जीवनाच्या लढाईत सगळीकडे भय,हिंसा,निराशा दाटलेली असताना काही देवदूत दिवे बनून येतात.

त्यांच्यासाठी म्हणावेसे वाटते. तमाच्या तळाशी दिवे पेटलेले."

रागिणी थांबली.

टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. सगळे एकमेकांचा हात धरून उभे होते आणि पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या सुरांनी आसमंत व्यापला होता. तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.........



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धेतील सात फेऱ्या तुम्हा रसिक वाचकांच्या प्रमाणे पार केल्या. अंतिम फेरीतील ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.

सात फेऱ्या आणि सात वेगवेगळे विषय घेऊन लिहिताना खूप मजा आली.

लवकरच भेटू नवीन कथा घेऊन.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all