जाणीव.... संवेदना.... या भावना प्रत्येकाला जन्माला येताना निसर्गाने कमी अधिक प्रमाणात बहाल केलेल्या असतात.... कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जाणिवेला, संवेदनेला समजून घेते,तितकेच ती त्या व्यक्तीच्या जवळ जाते.... समदुःखी किंवा सारख्या विचारांची माणसे लवकर जोडली जातात कारण त्यांच्या जाणीवा ,भावना कदाचित एकमेकांशी पटकन जोडल्या जातात.... ही कथा आहे अशाच एक जाणिवेची,एक संवेदनेची जिला जुळायला,समजायला,जाणून घ्यायला,खूप मोठी परीक्षा तिला द्यावी लागली....
डॉ. सुषेण क्षेत्रे, प्रथितयश न्यूरो अँड स्पाईन सर्जन.... हुशारी आणि बुद्धीच्या जोरावर यशश्रीला आपल्या गळ्यात जयमाला घालायला लावणारे,लोकप्रिय आणि विनम्र डॉक्टर.... काहीसे हळवे ..... रुग्णांच्या मेंदू आणि मज्जासंस्थेची अतिजटील सर्जरी करण्यात कुशल,दुसऱ्यांदा विचार करावा लागणार नाही इतके सरावलेले हात आताशा संध्याकाळचा कॉफीचा एकला कप उचलताना थरथरत असत.... लेकीसाठी सगळं सगळं करताना इतर कशाचाही विसर पडणारे डॉक्टर मात्र ,लेक तिच्या विश्वात रमायला लागल्यावर काहीसे असुरक्षित जाणिवांनी ग्रस्त झालेले.... बायको सुरभी,त्यांची मुलगी निला फक्त एक वर्षाची असताना मर्त्य जगाचा निरोप घेऊन बापलेकीला एकमेकांच्या आधारावर सोडून गेली.... निलाची आजी,सुरभीची आई आधार म्हणून सोबतीला होती.... तिने त्या लहानग्या जीवाला अगदी हृदयाशी कवटाळून फुलपाखराप्रमाणे जपलं,वाढवलं......
आजीला जसं निलाचं मन कळत होतं,तसंच डॉक्टरांच्या आयुष्यातली चलबिचलसुद्धा कळत होती,आणि म्हणूनच त्यांच्याच आग्रहाखातर,डॉक्टर ओळखीतल्याच स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक नाडीपरिक्षक डॉक्टर सुनैना हिच्यासोबत विवाहबंधनात अडकण्यास तयार झालेले......
डॉक्टर वयाच्या पन्नासाव्या वर्षी हाती वरमाला घेऊन बोहोल्यावर चढत होते हे त्यांच्या स्वतःच्या लेकीला,निलाला पटत नव्हते..... सगळ्यांनी तिची समजूत काढून, समजावून पण तिला हे लग्न मान्य होत नव्हते आणि म्हणूनच ती मांडवाच्या कोपऱ्यात शेवटच्या खुर्चीवर हताश बसून होती.....
"या वयात कशाला हवंय लग्न..... गेल्या सोळा वर्षात,मला सांभाळण्यासाठी बाबांना साध्या आया ची गरज वाटली नाही आणि आता या उतारवयात कशाला हे लग्नाचे चोचले पुरवत स्वतःसोबत मला लाज आणतायेत.... शीssss..... मी मुळात इथे आलेच का आणि काय म्हणून हे सगळं पाहावं लागतंय देवास ठाऊक...... सगळं आहे बाबांकडे..... पैसा, प्रसिद्धी, यश,करिअर..... काय कमी पडलंय यांना.... माझ्या लग्नाचा विचार करायच्या ऐवजी स्वतःचा संसार मांडायला निघालेत....."
तेवढ्यात तिच्या खांद्यावर आजीच्या हाताचा थंडगार स्पर्श झाला..... निलाच्या हाताला धरून तिच्याशेजारीच खुर्चीवर बसत आजी म्हणाली.... "निलू बेटा.... आय नो,किती कठीण आहे तुझ्यासाठी हे सगळं स्वीकार करणं.... की तुझा बाबा आता तुझा राहिला नाही,की तो तुझ्या आईच्या आठवणी पुसून त्या जागी दुसऱ्या कोणालातरी स्थानापन्न करू पाहतोय...... तुला वाटत असेल की या वयात बाबा स्वार्थी होऊन स्वतःसाठी नवीन प्रपंच मांडतोय..... तुला न जुमानता,तुझ्या विचारांना दुय्यम स्थान देत स्वतःच्या विचारांवर उतरतोय.... पण तसं नाहीये राणू......"
खाली मान घातलेल्या निलाची हनुवटी धरून वर करत तिच्या गालाभोवती रुळणाऱ्या केसांची बट कानामागे सारत आजी म्हणाली.......
"आयुष्य हे म्हंटलं तर फार सोप्पं, पण म्हंटलं तर फार अवघडसुद्धा आहे बाळ..... तुझ्या बाबासाठी आयुष्याने दोन्ही रूपं दाखवायचा विचार केलेला असावा..... तुला सांभाळताना,तुझा विचार करताना त्याला आयुष्य सोप्पं होतं, पण जेव्हा त्याने स्वतःच क्षणभर विचार केला तेव्हा त्याला ते अवघड वाटायला लागलं.....जाणिवा..... खूप खोल खोल रुतून बसलेल्या असतात या जाणिवा.... जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासोबत अपेक्षित किंवा अनपेक्षितपणे घडते,आणि सोबत आधाराचा हात नसतो, आणि त्याला एकटेपणाची जाणीव होते,तेव्हा माणूस खचून जातो.... आणि म्हणून आधार खूप महत्त्वाचा असतो...... तुला या गोष्टी आता कळणार नाहीत,लहान आहेस तू.... पण हो,जेव्हा कळतील तेव्हा मला खात्री आहे तू तुझ्या बाबाला पुन्हा पूर्वरूपात पाहशील....."
आजीच्या बोलण्याने निला चा मूड काहीसा निवळला..... पण तरीही चेहऱ्यावर हवा तो आनंद नव्हता..... ती तिच्या नवीन आईला स्वीकारायला तयार नव्हती.... जेवायला बसताना नवीन आईचा चेहरा पाहून निला अजूनच खट्टू झाली...
लग्नाचा सोहळा अगदी शांततेत आणि शिस्तीत पार पडला..... जवळच्याच पाच पन्नास लोकांत अत्यंत साधेपणाने आवश्यक विधी पार पाडले..... संपूर्ण लग्नात डॉक्टरचं लक्ष फक्त लेकीकडे होतं.... तिने नाईलाजास्तव मान्यता दिली असली तरी तिच्या डोळ्यांतली नाराजी उभयतांना दिसत होती.....
चि. सौ. कां. सुनैना, म्हणजेच निलाची नवीन आई.... अतिशय मनमिळावू,शांत आणि संथ स्वभावाची होती.... तिला जाणून घेण्यापूर्वीच निलाने तिच्याशी बोलणं तिला भेटणं टाळलेलं..... वयाने पंचेचाळीस असली तरी निलाची मोठी बहीण शोभेल अशी व्यवस्थित रेखीव शरीरयष्टी, चेहऱ्यावर आनंदी,प्रसन्न भाव आणि सकारात्मक देहबोली यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अशी सुनैना तिचं मन जिंकायचा दृष्टीने अनेक वेळा निलाला भेटण्यासाठी,तिला काही देण्याच्या निमित्ताने घरी यायची पण निला मात्र आजीकडे घरी नसल्याचा खोटा निरोप पाठवून स्वतः खोलीत रागाने नाकपुड्या फुगवून बसलेली असायची..... बाबांनी फक्त तिचं शरीर आणि आकर्षकता पाहून तिच्याशी लग्न केलंय हा ठाम विचार तिच्या मेंदूने घट्ट धरून ठेवलेला..... तिला या विचारापुढे काहीच सुचत नसे..... बाबाने असा निर्णय घेतल्यापासून दिवस दिवस ती एकटी बसत असे,किंवा रचना कडे अभ्यासाच्या निमित्ताने जाऊन बसे..... आजीने खूप वेळा तिला बोलतं करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला.....
लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सुनैनाने निलाच्या आवडीचा नाष्ता आणि जेवण करून ठेवलं.... डॉक्टरांना डबा भरून बंधूच्या हाती देत गाडीत ठेवायला सांगितला..... नवीन लग्न झाल्यानंतर वास्तविक जेवढे लक्ष नवऱ्याकडे असायला हवे त्यापेक्षा जास्त लक्ष सुनैनाचे निलाकडे होते.... पण ती सकाळीच प्रॅक्टिकल ला निघून गेली होती..... ऐकून सुनैनाला वाईट वाटले पण ती इतक्यात माघार घेणाऱ्यातली नव्हती... तिने लग्न जरी डॉक्टरांसोबत केले असले तरी तिच्यातली आई प्रकर्षाने जागृत झाली होती..... निलाने एकदा मनापासून आई म्हणून हाक मारावी,वर्षाच्या बाळाला सोडून गेलेल्या आईचा स्पर्श,जिव्हाळा आणि मायेची ऊब तिला मिळावी म्हणून सुनैनाची धडपड सुरू होती..... "काही हरकत नाही" असं मनाशी म्हणत सगळं उरकून ती बंगल्यासमोरच्या बागेतल्या झोपाळ्यावर वाचायला पुस्तक घेऊन बसली..... दुपारचे दोन वाजलेले....
''कोणतंही नातं फुलायला वेळ द्यावा लागतो.... जसं बीज मातीत रुजून,अंकुर फुटतो,वेल उगवते आणि मगच त्यावर फुलं फुलतात,तसंच नात्यांचंही..... काळजाचं पाणी करून लहान लहान संबंधांच्या अंकुरांना प्रेमाचं सिंचन केलं तरी वेळ जाऊ द्यावा लागतो.... मगच नात्यांच्या वेलींवर आपलेपणाची, आनंदाची आणि प्रेमाची फुलं फुलतात......"
वाचत असताना स्कुटीचा आवाज आला.... पाहिलं तर निला होती..... समोरच नवीन आईला पाहून एक कुत्सित स्मित करून ती आत गेली..... जेवणासाठी थांबलेली सुनैना तिच्यामागोमाग गेली तेव्हढ्यात निलाचा जिन्यावरून आवाज आला.... "बंधूकाका, जेवण बेडरूममध्ये आणता का प्लिज...."
एकामागोमाग एक असेच दिवस जात राहिले.... डॉक्टर आणि सुनैनाच्या नात्याला छान बहर आला होता..... लग्नाच्या आधी काहीसे अनाकलनीय वागणारे डॉक्टर आता बरेच कॉन्फिडन्ट वाटत होते..... अंकुर फुटत नव्हता तो फक्त सुनैना आणि निलाच्या नात्याला..... सुनैना मनापासून प्रयत्न करीत होती पण निला त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती..... बाबांसोबत आताशा पूर्वीसारखी बोलू लागली होती,पण तिचा वेळ बाहेरच जास्त व्यतीत होत असे.... जाणीवपूर्वक अभ्यास आणि इतर उपक्रमात तिने स्वतःला गुंतवून घेतलेलं.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा