दुसऱ्या दिवशी सकाळीही तो तिच्याशी काहीही बोलला नाही. नेहमी बडबड करणारा तो असा शांत का? हा प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होता. त्याने त्याचा शर्ट हातात घेतला. त्याला अजूनही बटन लावलेलं नव्हतं. तिने काल ठरवलं होतं ; पण ती विसरूनच गेली होती. तिला ते लक्षात आलं होतं.
ती म्हणाली, "थांब. मी लावून देते."
तो म्हणाला, "राहूदे."
त्याचा वाढलेला आवाज ऐकून ती थोडावेळ स्तब्ध उभा राहिली. तो दुसरा शर्ट घालून निघून गेला. तिला कळलंच नाही की तो असं का वागतोय? तिला वाटलं की कदाचित स्वयंपाक व इतर कामे तिला तेवढी चांगली जमत नाहीयेत त्यामुळेच तो नाराज आहे. ती परत चिंतेत डुबून गेली.
नंतर तिने त्याचं ते शर्ट हातात घेतलं. त्याला शांत डोकं ठेऊन बटन लावलं. ती उगाच चिंता करत होती. बटन लावणं काय खूप गुंतागुंतीचं काम थोडीच आहे? तिला हळूहळू जाणवू लागलं की ती बऱ्याच वेळेस खूप गडबड, घाई करते. त्यामुळेच तिची कामं बिघडतात. शांतपणे काम करायला हवं, हे तिला जाणवलं होतं.
संध्याकाळी तो कामावरून परतला. तिने हसून त्याचं स्वागत केलं. तो गंभीरच होता. त्याने एक नजर तिच्याकडे बघितलं आणि नंतर नजर दुसरीकडे फिरवली. तिचा चेहरा आता बेरंग झाला. तिलाही त्याचा थोडा रागच आला. शर्टला बटन लावायचं विसरली म्हणून एवढा राग कुणी दाखवतं का? ती किचनमध्ये निघून गेली.
तो बाथरूम मध्ये फ्रेश होऊन परत हॉलमध्ये आला. थोडा वेळ सोफ्यावर बसला. त्याची नजर समोर ठेवलेल्या कॅलेंडर वर पडली. कॅलेंडर बघता-बघता त्याला आठवलं की त्याला घरी त्याच्या आईवडिलांना औषधी पाठवायच्या होत्या. दर महिन्याला तो घरी औषधी पाठवायचा. तो विसरलाच होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर घरून फोन आला. नक्कीच औषधांचं विचारण्यासाठी आला असणार! त्याने फोन उचलला. तब्येत वगैरे विचारल्यावर त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याने पाठवलेल्या औषधी त्यांना मिळाल्या आहेत. तो अवाक झाला! त्याने तर नव्हती पाठवली औषधे. मंग कुणी पाठवली होती?
त्याने फोन ठेवला. समोर तेजश्री हातात शर्ट घेऊन उभी होती. तिने ते शर्ट त्याच्या हातात दिलं.
ती म्हणाली, "हे घे. या शर्टमुळंच रागा भरलास ना माझ्यावर? लावलं मी त्याला बटन."
तो म्हणाला, "एवढ्या छोट्या गोष्टीवरून कशाला रागा भरेल मी? मी तर ते विसरलो पण."
ती म्हणाली, "मंग स्वयंपाकामुळं राग आला का माझा? अरे मी प्रयत्न करतेय ना. आता सुधारला पण माझा स्वयंपाक."
तो म्हणाला, "त्यामुळे पण कशाला राग येईल मला? बरं मला सांग घरी औषधे तू पाठवली होती का?"
ती म्हणाली, "हो. मीच पाठवली होती. कशामुळे राग आला तुला माझा ते तर सांग."
तो म्हणाला, "तूच रुसून बसलीस माझ्यावर. त्यामुळे मला पण राग आला. मी तुला समजून घेतो नेहमी तू नाही घेऊ शकत का मला समजून?"
ती म्हणाली, "नेमकं कशाबद्दल बोलतोय तू? मी कधी रुसून बसले? मी कधी समजून नाही घेतलं तुला?"
तो म्हणाला, "काल हार नाही घेऊन दिला म्हणून तूच तर चिंतेत वाटत होतीस. त्यामुळे मी पण बोललो नाही."
ती म्हणाली, "अरे नाही. मी बोलले होते ना ठीक आहे म्हणून. नंतर घेतला तरी चालेल. हार नकोय मला. मी तर स्वयंपाक व इतर कामं यांची चिंता करत होते. इतकी वेडी थोडीच आहे मी. मी समजू शकते काय महत्वाचं आहे आणि काय नाही."
तो म्हणाला, "नक्की तुला राग नाही आला?"
ती म्हणाली, "अरे नाही."
त्या दोघांचे पण गैरसमज दूर झाले होते. समोरच्याला चुकीचं ठरवण्याआधी त्याची परिस्थिती जाणून घेणं, त्याचं मत जाणून घेणं महत्वाचं असतं. ते न करता आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. त्यामुळेच भांडणं होतात.
ती म्हणाली, "मी चांगली पत्नी नाहीये ना? मला स्वयंपाक नीट येत नाही. तसंच इतर कामेही तेवढी जमत नाही."
तिची मान खाली गेली होती. ती उदास झाली. त्याने तिला जवळ घेतलं.
तो म्हणाला,"अगं चांगल्या स्वयंपाकावरून किंवा सर्व घरकाम नीट करण्यावरून थोडीच कुणी स्त्री चांगली पत्नी आहे की नाही ते ठरतं. या गोष्टी तर होतच राहतात. शिकता देखील येतात. चांगली पत्नी तर ती असते जी पतीला समजून घेते. त्याच्यावर उगाच नाराज होत नाही. चिडत नाही. तू तर खूप जबाबदार आहेस. घरी औषधी पाठवायचं पण तुझ्या लक्षात होतं. तू चांगली पत्नी व सून दोन्ही आहेस."
तिचा चेहरा खुलला होता. तिच्या डोळ्यांत समाधान होतं.
समाप्त.
वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आवडल्यास share नक्की करा.
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा